https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*बुद्धीची परीक्षा*!

*बुद्धीची परीक्षा*!

(१) मनुष्य जीवनात शांती थोडी व अशांतीच फार! प्रेम थोडे व युद्धच फार! याचे प्रमुख कारण म्हणजे मनुष्य जीवनाला चिकटलेल्या असंख्य विषय वासना आणि या विषय वासनांना चिकटून राहिलेले मनुष्याचे स्वार्थी मन.

(२) असंख्य विषय वासनांच्या जंजाळात सापडून मानवी मनाचा घोडा बेभान होऊन चौफेर उधळू पहातो. अर्थात असंख्य विषय वासनांमुळे मानवी मन चंचल होऊन सतत इकडेतिकडे भरकटत रहाते. असंख्य विषय वासनांची असंख्य आकर्षणे यामुळे मानवी मन भरकटते आणि असंख्य विषय वासनांच्या असंख्य आकर्षणांभोवती पिंगा घालत त्यांचे समाधान करण्याच्या स्वार्थापोटी ते तामसी प्रवृत्तीचे होते.

(३) मानवी मनाच्या चंचलपणाला व तामसी प्रवृत्तीला एकच शक्ती काबूत ठेवू शकते आणि ती शक्ती  म्हणजे मानवी मनातच वास करून असलेली मानवी बुद्धी. मानवी शरीर हा धावणारा रथ, मानवी मन हा चौफेर उधळणारा घोडा आणि मानवी बुद्धी म्हणजे या रथावर आरूढ होऊन रथाच्या घोड्याला लगाम घालीत तो रथ जीवनातील योग्य ध्येयाच्या दिशेने पळविणारा श्रीकृष्ण रूपी सारथी असे माझे गीतेचे सर्वसामान्य ज्ञान आहे.

(४) चंचल मनाची ताकद एवढी मोठी की ती कठोर बुद्धीलाही अस्थिर करून भरकटत नेऊ शकते. इथे तर बुद्धीची खरी कसोटी आहे. बुद्धीला स्थिर राहून कठोरपणे चंचल मनाचे बंड मोडून काढावेच लागते, नाहीतर मनाचा घोडा आणि शरीराचा रथ कोलमडून पडला म्हणूनच समजा. स्थिर बुद्धीलाच शरीररूपी रथाचे संरक्षण करीत व मनरूपी घोड्याला लगाम घालीत तो रथ व तो घोडा योग्य त्या ध्येय  दिशेने पळविण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करता येते.

(५) बुद्धीला मन व शरीर या दोन्हींचे आरोग्य व संतुलन जपावे लागते. कारण वातावरणातील जीवजंतू मानवी  शरीरावर आघात करण्यासाठी टपून बसलेले असतात व सभोवतालची स्वार्थी व तामसी  माणसे मानवी मन व मानवी शरीर या दोन्ही वर आघात करण्यासाठी टपून बसलेली असतात. अर्थात जगात प्रेम थोडे आणि युद्ध फार, अशीच परिस्थिती कायम असते. त्यामुळे बुद्धीला सतत जागृत राहून सात्त्विक प्रेमाच्या मृदू भावनेला सांभाळून घेत, तिचे रक्षण करीत प्रेमाचे अर्थशास्त्र नाजूकपणे जपावे लागते व युद्धाचे राज्यशास्त्र कठोरपणे लढावे लागते. अर्थात मृदू प्रेम भावनेला कठोर बुद्धीचे संरक्षण  कवच लाभल्यामुळेच ती भावना जीवंत राहू शकली आहे. नाहीतर तिचे कधीच तीनतेरा वाजले असते.

(६) जहाल व तामसी वासनेवर मृदू व सात्त्विक प्रेम भावनेने विजय मिळविता येतो की कठोर बुद्धीच्या अंकुशाने विजय मिळविता येतो, हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. परंतू बुद्धीला सतत स्वतःच्या मनाबरोबरच युद्ध लढत रहावे लागते, हे मात्र खरे. स्वतःच्या मनाबरोबरच युद्ध लढत राहून बाहेरच्यांबरोबरही युद्ध लढत रहाणे, ही केवढी कठीण गोष्ट. परंतू बुद्धीला ती गोष्ट पार पाडावीच लागते. अर्थात बुद्धीच श्रीकृष्ण रूपी सारथी आणि   अर्जुन रूपी शूर वीर आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

(७) युद्ध म्हटले की, यश आणि पराभव या दोन्ही गोष्टी आल्या. तेंव्हा पराभवाने नाउमेद न होता युद्धातला पराभव पचवून पुन्हा नवीन जोमाने युद्धाची तयारी करून युद्धाला सामोरे जात मरेपर्यंत न थकता यशासाठी लढत रहाणे हेच कठोर बुद्धीचे प्रमुख काम आहे.

(८) सर्व विश्वाला व्यापून राहिलेल्या ज्या निसर्गशक्तीला आम्ही मानवांनी देवत्व बहाल करून देवस्वरूप दिले आहे त्या महान निसर्गशक्ती कडून मानवी बुद्धीची घेतली जाणारी हीच सत्व परीक्षा आहे आणि त्या परीक्षेतील प्रेम व युद्धाचे प्रश्नही तेच कायम आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे सुध्दा तीच कायम आहेत आणि निसर्गशक्तीचा मानवी बुद्धीला असलेला संदेशही तोच कायम आहे. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा