https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

*माझे माहेर पंढरी*!

*माझे माहेर पंढरी*!

(१) माझे कार्यक्षेत्र मुंबई राहिले असले तरी माझ्या बालपणाचा अर्थात माझ्या कोमल संस्कारक्षम वयाचा इयत्ता दूसरी ते सहावी असा एकूण पाच वर्षांचा काळ मी माझ्या लाडक्या पंढरपूर तिर्थक्षेत्री घालवलाय.

(२) माझे वरील प्राथमिक शालेय शिक्षण पंढरपूरातील संतपेठ विभागात सांगोला रोडवर असलेल्या नगरपालिकेच्या ९ नंबर शाळेत पूर्ण झाले. अत्यंत खोडकर पण तरीही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा लाडका मुलगा म्हणून मी त्या शाळेत नाव कमावले. 

(३) चंद्रभागा नदीत शाळा बुडवून टाईम पास करायचो म्हणून शिक्षकांच्या आदेशानुसार मला नदीतून तसाच उघडा उचलून चौघा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर माझी तिरडी करून मला शाळेत उचलून आणला होता आणि चांगला बडवला होता. त्यानंतर मी त्या मारणा-या शिक्षकाच्या डोक्यात दगड मारून बदला घेतला होता. शेवटी वडिलांना मुंबईहून येऊन शाळेतील सर्व शिक्षकांना व मुख्याध्यापकास चहा पार्टी देऊन  ते प्रकरण मिटवावे लागले होते.

(४) पण पंढरपूराने मला खूप काही दिले, भरभरून दिले. माझ्या त्या लहान वयात त्या काळातील पंढरपूरातील प्रसिद्ध राजकीय नेते श्री. औदूंबर पाटील यांच्या निवडणूक प्रचार मिरवणूकीत मी दिमडी वाजवीत "आली रे आली बैलजोडी आली" असे बोंबलत पंढरपूरच्या गल्ल्यांतून रूबाबात फिरायचो.

(५) एकदा माननीय यशवंतराव चव्हाण पंढरपूरला हेलिकेप्टर ने उतरले होते, तर त्यांना पहाण्यासाठी सकाळी लवकर उठून त्या मैदानावर गेलो होतो. हेलिकेप्टर मैदानावर उतरताना बघून व यशवंतरावांना बघून खूपच आनंद झाला होता. त्याच यशवंतराव चव्हाणांनी मला दिल्लीतील त्यांच्या बंगल्यात जवळ ओढून घेऊन माझ्या कमरेला चिमटा काढला होता. 

(६) ही सर्व माझ्या वडिलांची पुण्याई. मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रतिनिधीत्व करीत असताना इंटकचे पुढारी म्हणून माझे वडील सोपान मोरे यांनी  यशवंतरावांची काही गिरणी कामगारांसह दिल्लीला भेट घेतली होती. त्यावेळी सातवी इयत्तेत शिकणा-या मला त्यांनी सोबत नेले होते. त्या वयात यशवंतरावांच्या बंगल्यात मी सर्वांसमोर न घाबरता स्वतःची ओळख करून दिली तेंव्हा यशवंतरावांनी मला प्रेमाने जवळ ओढून घेऊन माझ्या कंबरेला चिमटा घेतला. तो चिमटा बसल्यावर हसतानाचा यशवंतराव चव्हाणांबरोबरचा माझा तो फोटो मी खूप दिवस जपून ठेवला होता. पण कालांतराने तो खूप खराब झाला व गहाळ झाला. त्या लहानपणी एकाच वर्षात पंढरपूर ते मुंबई ते दिल्ली अशी वारी माझ्या वडिलांनी मला घडवून आणली. पण पंढरपूर सोडताना झालेल्या दुःखाचे वर्णन शब्दांत करताच येणार नाही. ते शब्दांच्या पलिकडचे आहे.

(७) सातवी इयत्तेसाठी व त्यानंतरच्या सर्व शिक्षणासाठी मी वडिलांबरोबर पंढरपूर सोडण्यासाठी एस. टी. बसमध्ये बसलो तेंव्हा पंढरपूर मागे मागे जाताना खूप रडलो होतो.

(८) आता माझी साठी संपायला आली असताना पुन्हा मागे वळून बघताना माझे पंढरपूर तिथल्या विठोबासह मला खुणावत राहते. आता त्या पंढरपूरात माझे म्हणायला कोणीच राहिले नाही. तरीही कधीतरी तिथे जाईन, तिथल्या मठात राहीन आणि पंढरपूर ते गोपाळपूर, विष्णूपद असा एकटाच फेरफटका मारीन. कारण माझे पंढरपूरातील बालपण पुन्हा एकदा मला एकट्यालाच जगायचे आहे. तिथे माझी बायको नको, मुलगी नको, कोणी नको. त्यांना काय कळणार आहे माझे ते रम्य बालपण आणि त्या स्मृतींना पुन्हा त्याच ठिकाणी जागवण्याचा माझा खेळकरपणा! मुंबई माझे सासर राहिले असले तरी माझे माहेर पंढरीच आहे. माहेरची ओढ कोणाला नसते? *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा