बाप बुद्धी तर आई भावना!
शिस्त हा कुटुंबाचा पाया असतो व त्यासाठी कुटुंबात कठोर बुद्धीची आवश्यकता असते. कुटुंबात बाप याच कारणासाठी कडक असतो म्हणून बाप ही बुद्धी. पण नुसत्या कठोर शिस्तीने, कडकपणाने कुटुंब चालत नाही म्हणून कुटुंबात मृदू भावना महत्त्वाची. ते काम आई करते म्हणून आई ही भावना.
कुटुंबात आईवडिलांची होणारी भांडणे ही खरं तर भावना व बुद्धी या दोघांतील होणारी भांडणे व ती या आईवडिलांपैकी एकाच्या किंवा दोघांच्या मृत्यूनेच संपतात. संसार म्हटले की अशी भांडणे ही होणारच. फक्त ती जास्त ताणून तीव्र करणे चुकीचे. त्यासाठी दोघांत संतुलित तडजोड महत्वाची असते. तुझे माझे जमेना पण तुझ्याशिवाय करमेना असा प्रकार पती व पत्नी किंवा बुद्धी व भावना यांच्यात असतो.
काही अपवाद सोडले तर पुरूष हा नैसर्गिकतः कडक व स्त्री नैसर्गिकतः मृदू असते. म्हणून स्त्रीला कोमल फूल असे म्हणता येईल. माझ्या निरीक्षणानुसार हे नैसर्गिक स्वरूप दिसून येते. म्हणून बाप ही कठोर बुद्धी तर आई ही मृदू भावना असे माझे वैयक्तिक विधान आहे. परंतु या विधानाला काही लोक आक्षेप घेऊन असे म्हणतील की मग स्रीला फक्त भावनाच असते का, तिला बुद्धी नसते का? जरूर असते. आई जेव्हा कुटुंबात तिच्या बुद्धीचा वापर करते तेव्हा ती बाप होते. कारण शेवटी बुद्धी ही बाप असते व ती भावनेला शिस्त लावत असते. हे सांगायलाच नको की, भारतात पितृसत्ताक व मातृसत्ताक अशा दोन्ही कुटुंब पद्धती आहेत. याचा अर्थ एवढाच की पितृसत्ताक पद्धती मध्ये पती हा बाप होतो तर पत्नी ही आई होते. याउलट मातृसत्ताक पद्धतीत पत्नी ही बापाच्या भूमिकेत असते तर पती हा आईच्या भूमिकेत असतो. ही अदलाबदल सोयीनुसार केली जाते.
मी या लेखात उलगडून सांगितलेल्या गोष्टी ज्या कौटुंबिक विधीशास्त्रा (फॕमिली ज्युरिसप्रूडन्स) बरोबर निसर्ग विज्ञानाचा आधार आहेत त्या सळसळत्या रक्ताच्या तरूण मुला मुलींना काय समजावून सांगणार? सळसळत्या रक्तामुळे ही मुले मुली माझ्यासारख्या माणसाचे अनुभवी ज्ञान ऐकायलाच तयार नसतात मग त्यावर विचार करणे तर सोडूनच द्या. फार बिझी असतात हो ही मुले मुली त्यांच्या करियर मध्ये व पैसे कमवत मोठे होण्याच्या व्यापात. त्यांना वेळ कुठे आहे माझ्यासारख्या माणसाचे ऐकायला, माझे लेख वाचायला?
बाप व आई म्हणजे बुद्धी व भावना यांच्या संयोगातून निर्माण झालेली काही मुले जेव्हा अधूनमधून सुरू असलेल्या वृद्ध आईवडिलांच्या भांडणांचा (बुद्धी व भावनेच्या भांडणांचा) कंटाळा येऊन त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याचा त्या मुलांच्या सोयीचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते कारण ही तरूण मुले व मुली पुढे म्हातारी होणार असतात हे त्यांना त्यांच्या तरूणपणात कळतच नाही.
आईवडिलांची भांडणे ही खरं तर भावना व बुद्धी यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. म्हणूनच तरूणांनी वेळोवेळी थांबून आपल्या आई व वडिलांच्या भांडणांमागील भावना व बुद्धीचा संघर्ष समजून घ्यावा कारण उद्या त्यांच्याही वाट्याला हेच नाते संबंध, हेच प्रश्न येणार आहेत.
माझ्या या लेखात फक्त कुटुंब व्यवस्थेचा विचार नाही तर एक कौटुंबिक तत्वचिंतक म्हणून हे माझे नातेसंबंधांचे सामाजिक, भावनिक व बौद्धिक आत्मपरीक्षण आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.४.२०२५
बाप बुद्धी तर आई भावना या माझ्या लेखावरील एक फेसबुक प्रतिक्रिया!
नवरा बायकोत भांडणे होतातच.
अगदी क्षुल्लक कारणानेही भांडणे होतात. आईवडिलांनी बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात. त्यांना एकमेकांची उणीदुणी माहित असतात. बाई ही नेहमी सावलीने जगत असते. तिचे बालपण आई बाबांच्या प्रेमावर, नंतर भावाच्या सावलीत, तरूणपणी प्रियकर नवरा यांच्या बरोबर... मुले मोठी झाली की लगेच हीच बाई मुलांच्या बाजूने होते. अशी ही बाई.. बायको, आई,
काही तरी निर्णय घ्यावा असे ठरवले की लगेच म्हणणार तुम्हाला काय कळतंय तो येऊ दे तो म्हणजे मुलगा किंवा मुलगी किंवा जावई. अशी ही बायको कधी साथ सोडेल सांगता येत नाही. त्यात आईबद्दल कणव मुलांना येतेच . बाप हा कायम निष्ठूर कठोर असतो...असो छान लेख.
-सुरेश सदाशिव गुरव, अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा