https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ मे, २०२५

चिवट म्हातारे!

चिवट म्हातारे!

काही म्हातारी माणसे जगण्यासाठी  एवढी चिवट असतात की त्यांना आणखी खूप दिवस जगावे वाटते. खरंच कंटाळाच येत नाही त्यांना जगण्याचा. यामागे काय कारण असावे? मला तर असे वाटते की जवळ असलेली आपुलकीची आपली माणसे व जवळ असलेला स्वतःचा भरपूर पैसा, संपत्ती हेच ते प्रमुख कारण असावे अशा चिवट म्हाताऱ्यांचे. अशा चिवट म्हाताऱ्या माणसांचा वृद्धापकाळ व त्या अवस्थेतील दुखणी यांची त्यांना तशी फार काळजी वाटत नाही. कारण त्यांची जवळून काळजी घेणारी आपुलकीची आपली माणसे त्यांच्या जवळ तर असतातच पण पैशाच्या जिवावर घरातच नर्सिंग होम तयार करून त्यात काळजी घेण्यासाठी  बाहेरून उसनी घेतलेली माणसेही (केयर टेकर) असतात. जवळ असलेल्या पैसा, संपत्तीमुळे अशा चिवट म्हाताऱ्या माणसांच्या खाण्यापिण्याचा तर प्रश्नच नसतो. गाठीला स्वतःचा भरपूर पैसा व भरपूर संपत्ती असल्यावर जवळच्या आपल्या माणसांची आपुलकी जरा जास्तच वाढते. ती का वाढते हे काही उलगडून सांगायला नको. खरा प्रश्न असतो तो अगदी जवळून काळजी घेणारी आपली माणसे दुर्दैवाने जवळ नसलेल्या व गाठीला स्वतःचा पैसा, स्वतःची संपत्ती नसलेल्या एकट्या राहणाऱ्या गरीब म्हाताऱ्या माणसांचा. अशी म्हातारी माणसे पुढे आणखी जगण्यासाठी कशी उत्सुक असतील? ती तर दररोज देवाला प्रार्थना करीत असतात की "बाबा रे, आता बस्स झाले, तू दिलेल्या जीवनाचा व्यर्थ भार आता सहन होत नाही, तेव्हा सहज मरण देऊन मला जीवनातून मुक्त कर"! चिवट म्हातारी माणसे सुद्धा असेच म्हणू लागतात. केव्हा जेव्हा ती अन्नावर कमी व औषधांवर जास्त जगू लागतात. त्यांना अती प्रिय असलेले जीवन जेव्हा जीर्ण, मोडक्या इमारतीसारखे ढासळू लागते व जेव्हा अशा इमारतीला औषधांच्या मलमपट्टीचे टेकू जराही उपयोगी पडत नाहीत व त्यामुळे जेव्हा या चिवट म्हाताऱ्यांना त्यांच्या जीवनाचा त्यांच्यावर पडलेला भार व्यर्थ वाटू लागतो तेव्हा असे चिवट म्हातारेही त्वरीत मरणासाठी देवाचा धावा करतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा