https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २ जून, २०२०

ओम् शांती!

श्री गणेशाय नमः I श्री परमेश्वराय नमः II
ओम् शांती III

(१) सुख व दुःख या दोन गोष्टी जीवनात फिरून फिरून येतच असल्याने या दोन गोष्टी देवाला मागण्याची गरजच नाही. तुम्ही जर आस्तिक असाल तर देवाकडे शांती मागा. तुम्ही जर नास्तिक असाल व देवावर तुमची श्रध्दा नसेल तर मग ध्यानधारणा करून शांती मिळवा. पण जीवनात शांती हीच अत्यंत दुर्मिळ व महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या.

(२) जीवनात फिरून फिरून येणाऱ्या सुख व दुःख या दोन गोष्टी अस्थिर व चंचल असतात. त्यांचे हे विचित्र वागणे मनाला सैरभैर, अशांत करते. अशावेळी मनाला आवश्यकता असते ती स्थिर शांतीची! तुमच्याकडे भरपूर ज्ञान व पांडित्य असेल, भरपूर पैसा व संपत्ती असेल, अमर्याद सत्ता असेल, परंतु एवढी साधने जवळ असूनही तुम्ही जीवनात स्थिर शांती मिळवू शकाल याची खात्री देता येत नाही. कारण स्थिर शांती ही जीवनात अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

(३) म्हणूनच माझ्या देव प्रार्थनेचा शेवट ओम् शांती असे म्हणून होतो. ओम् म्हणजे विश्व! निसर्ग रूपी विश्व फार मोठे आहे. त्या विश्वात शांती नांदो ही सदिच्छा माझ्या ओम् शांतीच्या प्रार्थनेत असतेच. पण मी अत्यंत छोटा माणूस असल्याने माझी प्रार्थना एवढया मोठ्या विश्वात शांती निर्माण करण्यासाठी किती उपयोगी पडणार? म्हणून माझे स्वतःचे जे छोटे विश्व आहे (तसे प्रत्येकाचे एक छोटे विश्व असते) त्या माझ्या छोट्या विश्वात स्थिर शांती निर्माण करण्यासाठी या प्रार्थनेचा मला उपयोग होतो. त्यासाठी माझ्या छोट्या विश्वाची मी दररोज परिक्रमा करतो.

(४) मी निसर्ग शरीरात देव शक्ती आहे असे मानून चालणारा भौतिक व आध्यात्मिक प्रकारातला विज्ञाननिष्ठ आस्तिक आहे. त्याच बरोबर मी नुसत्या जन्मानेच नव्हे तर संस्काराने सुध्दा हिंदू धर्मीय असल्याने माझ्या हिंदू धर्म संस्कारानुसार मी अगोदर श्री गणेशाला स्मरून नंतरच निसर्गातील सर्वोच्च देव शक्तीला म्हणजे श्री परमेश्वराला स्मरतो व मग ओम् शांती अशी प्रार्थना म्हणतो. माझी ही छोटीशी प्रार्थना मी शांत चित्ताने करतो व तीच माझी ध्यानधारणा असते. ही ध्यानधारणा स्थिर शांतीसाठी असते. कारण माझ्यासाठी तरी सुख दुःखापेक्षा मला जीवनातील स्थिर शांती हीच सर्वात महत्वाची गोष्ट वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा