https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १९ जून, २०२०

गुळाला मुंगळे स्वार्थाचे

गुळाला चिकटलेले मुंगळे गूळ संपला की गायब होतात!

शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय या गोष्टी पुढे पुढे सरकत असताना अनेक मुले, मुली, पुरूष, स्त्रिया अभ्यास, कामाच्या निमित्ताने आयुष्यात आल्या व जवळून संपर्कात राहण्याचा स्वार्थ जसजसा संपत गेला तसतशा हळूहळू गायब होत गेल्या. शालांत परीक्षापूर्व निरोप समारंभ अनुभवल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिल्यावर जे निरोप समारंभ झाले त्यांचाही अनुभव मी घेतला आहे. त्या समारंभात कौतुकास्पद दोन शब्द ऐकताना आनंद होत असला तरी आता आपल्याला या सर्व सहकाऱ्यांना सोडून जायचे हे लक्षात आले की मनात खूप दुःख व्हायचे. पण वाटायचे की हा निरोप तात्पुरता आहे. जरी दुसऱ्या कंपनीत कामाला गेलो तरी पहिल्या कंपनीच्या सहकाऱ्यांबरोबरचे मैत्री संबंध चालू राहतील. पण हळूहळू जुने फोन कमी व्हायचे आणि मग मीही नवीन कंपनीच्या कामात नव्या सहकाऱ्यांबरोबर नवीन संबंधात बिझी होऊन जायचो. हल्लीची समाज माध्यमे त्यावेळी नव्हती. पण या समाज माध्यमांनी संपर्काचे जाळे वाढवले असले तरी माणसाचा स्वभाव तोच राहिलाय. लिंकडइन म्हणून असेच एक समाज माध्यम आहे. त्यावर उच्च शिक्षित व्यावसायिक व नोकरदार मंडळी भरपूर आढळली. अशाच एका उच्च शिक्षिताचे खाते भरपूर कनेक्शन्सने भरलेले पाहिले. त्याला मी विचारले की, "अरे तुझ्या लिंकडइन खात्यावर तुला किती मोठमोठी माणसे ओळखतात". तर तो म्हणाला "काही नाही रे, सुरूवातीला नोकरी शोधताना काढलेले ते खाते आहे, चांगली नोकरी मिळून पाच वर्षे झाली, ते खाते बंद केले नाही म्हणून तसेच धूळ खात पडलेय, त्या खात्यावरील कोणाशीही माझा आता संबंध नाही"! हे ऐकून मी चाटच झालो. काय माणसे असतात जगात! मतलब निकल गया तो पहचानते नही. अशीच मतलबी माणसे स्वार्थ संपला की निरोप घेताना स्टे कनेक्टेड म्हणजे संपर्कात रहा असा औपचारिक सल्ला देतात आणि मग तीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर निघून जातात. मी मात्र वेड्यासारखा अशा लोकांना फोन करायचो. मग काहीतरी औपचारिक बोलणे फोनवर व्हायचे व तिकडून रिस्पॉन्स तुटक आहे ही जाणीव व्हायची. मग समोरून फोन यायचे बंद व्हायचे. मग मीच त्यांना सारखा फोन का करायचा, असे एकतर्फी मागे लागणे काय कामाचे हे कळून चुकल्यावर मीही मग अशा लोकांचा नाद सोडून द्यायचो. असे संबंध कमी कमी होत गेले. पण तरीही पंधरा दिवसांपूर्वी मनात सहज आले की चला आपण या जुन्या कंपनी सहकाऱ्यांना फेसबुकवर तरी शोधून काढू. म्हणून काही जुनी नावे आठवली तशी फेसबुक सर्चवर टाकून दिली. पण त्यांच्या पैकी मला कोणीच फेसबुकवर आढळले नाही. कुठे असतील ही सर्व मंडळी याचा पत्ता लागणे आता शक्य नाही. या सर्वांना व मला जवळ करणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे कंपनी नोकरी आणि तोच त्यांचा व माझा एकत्र येण्याचा व काही काळ एकत्र राहण्याचा स्वार्थ होता. नोकरी संपली, स्वार्थ संपला, सर्व माणसे गायब! आयुष्यात असाच अनुभव घेत गेलो व मग पुढे त्याची सवय होत गेली. हे असे का होत असावे याचा बारकाईने विचार केला असता हे लक्षात आले की माणसांना जवळ आणणारी व त्यांचे संबंध टिकविणारी या जगात असलेली मुख्य गोष्ट म्हणजे स्वार्थ! हा स्वार्थ म्हणजे गूळाच्या ढेपी सारखा असतो. या ढेपीला माणसे मुंगळ्या सारखी चिकटतात व ढेपीचा गूळ संपला की हे मुंगळे गायब होतात!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा