https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ८ जून, २०२०

काळतोंड्या कोरोना!

कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

या कोरोनाने मला खूप काही शिकवले. हे माझे, ते तुझे या वादाच्या बूडालाच काडी लावली या कोरोनाने! या कोरोना लॉकडाऊन काळात आजूबाजूला माणसे मरताना बघतोय. कोरोनाग्रस्त रूग्ण मेल्याचे सोडा पण साध्या आजाराने किंवा वयोमानानुसार माणूस मेला तरी त्याच्या मयताकडे आणि मयताच्या कुटुंब सदस्यांकडे लोक टवकारून बघतात. मेलेल्या माणसाबरोबर किती आनंदाने दिवस घालवले असतील त्या कुटुंब सदस्यांनी! घरातला कुटुंब प्रमुख जाणे म्हणजे घराचा वटवृक्षच ढासळणे. पण हाच वटवृक्ष या कोरोना काळात ढासळला तर कसले दुःख आणि कसले रडणे! हळूच ॲम्ब्युलन्स बोलवायची, त्यात तो मयत झालेला  वटवृक्ष कोंबायचा आणि तोंडाला मास्क लावून घाबरत घाबरत तो वटवृक्ष धार्मिक विधी प्रमाणे जाळायला नाहीतर पुरायला स्मशानभूमीत किंवा कबरस्थानात न्यायचा. काय पण हा विचित्र अंत माणसाचा! कुठून आला आणि कोणी आणला हा कोरोना? वाट लावलीय सगळ्या माणसांची या नवीन विषाणूने! या काळात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अर्धवटराव मात्र असा आव आणतात त्यांच्या  शहाणपणाचा की बोलायलाच नको! हे सगळे कोरोनाग्रस्त वातावरण बघून कोरोनाची भीती कमी आणि आजूबाजूला वावरणाऱ्या अर्धवट लोकांचीच भीती जास्त वाटू लागलीय. आता पावसाळ्यात थंडी, ताप, सर्दी, खोकला हे नेहमीचे आजार (सॉरी आजाराची लक्षणे) होणारच ना! पण ही सामान्य लक्षणे घेऊन  आपल्या फॕमिली डॉक्टरकडे जायची पण भीती वाटू लागलीय. काही भरवसा नाही त्या डॉक्टरचाही! चुकून त्याला कोरोनाचा संशय यायचा आणि मग ती महागडी कोरोना टेस्ट करायला सांगायचा. आणि त्या डॉक्टरलाच लक्षणे नसलेला कोरोना असला तर? बापरे, म्हणजे आली का नसती पंचाईत! घरात तीन महिने बसून कंटाळा आलाय. पण लॉकडाऊन उठवल्याने लोकल ट्रेन्स सुरू झाल्या तरी त्या ट्रेन्समधून डोंबिवली वरून मुंबईला कामाला जायची भीतीच वाटणार. किती वेळ तो मास्क तोंडाला लावून ठेवायचा! गुदमरून जायला होते. मोकळा श्वास घेता येत नाही. आणि ट्रेन मध्ये तीन फूटाचे अंतर ठेऊन कसे बसणार व कसे उभे राहणार? आणि ट्रेनला लटकत जाणाऱ्यांचे काय होणार? मला क्लायंटकडे भेट द्यावी लागते तेंव्हा तिथे लिगल टायपिस्टला जवळ बसून तोंडाने डिक्टेशन द्यावे लागते. आता मास्क लावून असे डिक्टेशन मी कसे देणार? या सगळ्या गोष्टी, हे सगळे विचित्र प्रश्न डोक्यात सारखे घोंघावत राहतात. या कोरोनाने माझ्यासाठी मात्र एक गोष्ट चांगली केली. माझी मरणाची भीतीच घालवून टाकली. मी आता बिनधास्त झालोय. मरायला तयार झालोय. पण काही मित्र फोनवर म्हणतात "अरे, तू खूप तयार झाला असशील कोरोनाशी लढत लढत कोरोना योध्दा म्हणून मरायला, पण तुझ्या बरोबर राहणाऱ्यांचे काय, तू मरशील पण वर जाताना त्यांना कोरोना चिकटवून जाशील त्याचे काय"? म्हणजे आली का पंचाईत! धड जगताही येत नाही आणि धड मरताही येत नाही. कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा