https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २८ जून, २०२०

मन मोकळे करा!

मन मोकळे करा!

(१) झाकली मूठ सव्वा लाखाची अशी एक म्हण आहे. पण किती काळ तुम्ही मूठ झाकून ठेवणार? मनाची तगमग सुरू झाली, काही सुचेनासे झाले, परिस्थिती गंभीर झाली की आतल्या आत कुढत बसू नका. बिनधास्त मन मोकळे करा. काही लोक चेष्टा करतील तर करू द्या. तुमची वाईट वेळच तुमचे कोण हे सिद्ध करते. जे लोक तुमचे नसतात तेच तुमची चेष्टा करणार, तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या वाईट परिस्थितीत तुमची चेष्टा करणारी अशी वाईट माणसे तांदळातल्या खड्यासारखी बाजूला काढा आणि त्यांना लांब गटारात फेकून द्या. अशा माणसांसाठी तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक गटार तयार ठेवा जिथे अशा माणसांची रवानगी करता येईल. थोडक्यात अशा माणसांना तुमच्या आयुष्यातून कायमचे ब्लॉक करा. पुढे डोक्याला ताप नको. अशा चाळणीतून तुमच्यावर खास प्रेम करणारी माणसे नक्की पुढे येतील जी तुम्हाला आर्थिक नसला तरी मानसिक आधार नक्की देतील.

(२) आता गंमत बघा! माझी बायको, मी माझ्या पैशाने तिच्यासाठी केलेले मंगळसूत्र, कठीण प्रसंगी ते मोडण्यासाठी ती मला सांगते, आम्ही मंगळसूत्र मोडल्यावर कर्ज फिटले या आनंदात राहतोय आणि हे माहित नसलेल्या काही महाभागांना माझ्या बायकोचा कळवळा येतोय. म्हणे मी लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी अशी वैयक्तिक पोस्ट लिहिली. बायकोला हा किस्सा सांगितल्यावर तिने तर डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली की, असेही लोक फेसबुकवर असतात काय आणि ते स्वतःला तुमचे मित्र म्हणवतात. अहो तुम्ही अशा लोकांना ताबडतोब ब्लॉक करून का टाकत नाहीत. कशाला डोक्याला उगाच ताप करून घेता?

(३) आजच एका फेसबुक मित्राचा मला माझ्या व्हॉटसअपवर मेसेज आला. मेसेज काय हे त्या मित्राचे नाव गुप्त ठेऊन सांगतो. "साहेब, खूप बिकट परिस्थिती आलीय, तुमच्याजवळ मन मोकळे केले की बरे वाटते म्हणून सांगतोय. मला काल हे करायचे होते पण करता आले नाही"! कोण आहेत ही माणसे? का वाटतो त्यांना माझा विश्वास! फेसबुकचे जग म्हणे आभासी जग! अरे कोण म्हणते हे आभासी जग? या फेसबुकवर पण जिवंत माणसे आहेत. त्यांनाही मने आहेत. पण खुली होऊ शकत नाहीत. कारण याच फेसबुकवर काही लबाड, ढोंगी मंडळीही आहेत. ही माणसे आभासी जीवन जगत असतात. खोट्या प्रतिष्ठेचे यांना वेड असते. अशा माणसांनी फेसबुकला आभासी जग बनवलेय. मी माझे स्वतःचे सत्य कोणाची पर्वा न करता याच फेसबुकवर उघड केले व आभासी जगाचे रूपांतर सत्य जगात केले. तेंव्हा कुठे मला खरी माणसे याच फेसबुकवर भेटली. याच फेसबुक ने मला मनसे पक्षात बाळूकाका म्हणून ओळख मिळवून दिली. कित्येक मनसैनिक वैयक्तिक पातळीवर माझ्या जवळ आले आणि माझे मित्र  झाले. इतरही लोक माझ्या जवळ आले.

(४) कोणाला जर माझे बिनधास्त मनमोकळे लिखाण आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्यांनी मला लगेच ब्लॉक करावे, पण उगाच करायच्या म्हणून काहीतरी कमेंटस करीत बसू नये. त्यांना उत्तर देत बसायचे, वाद वाढवायचा या गोष्टी मला आता ६४ व्या वयात करायच्या नाहीत. मी काय लिहितो, माझी जीवनशैली कशी आहे, माझी विचारधारा काय आहे हे कळायला जास्तीतजास्त माझ्या पाच पोस्टस पुरेशा आहेत. त्याचा एकदा अंदाज आला व त्या गोष्टी पटूच शकत नाही हे एकदा का कळले की मग लांबण लावायची गरजच काय? उगाच वेळ व शक्ती कशाला वाया घालवायची बरे! पटकन मला ब्लॉक करून टाकणे हेच चांगले की नाही. माझे लिखाण ज्यांना आवडते तेच माझ्या बरोबर राहतील ना!

(५) आता एवढे तिखट लिहिण्याचे कारण म्हणजे इथे माणसांचा जीव चाललाय, काही लोक नैराश्येतून आत्महत्या करताहेत आणि मी माझे सत्य लिहून "घाबरू नका, मी लढतोय, तुम्ही पण लढा, आज मंगळसूत्र होते म्हणून मोडले, उद्या नाही म्हणून रडत बसणार नाही, मी वकील आहे वगैरेची बिलकुल पर्वा न करता पोटासाठी याही वयात हातगाडी चालवीन, अंग मेहनतीचे काम करीन पण आत्महत्येचा जराही विचार मनात येऊ देणार नाही, खड्ड्यात गेली ती प्रतिष्ठा, जगणे महत्वाचे" असे सांगून, लिहून आपण सर्वजण एकाच बोटीतून प्रवास करीत आहोत, आपण सर्वच जण समदुःखी आहोत, असा सकारात्मक संदेश देतोय. पण ही गोष्ट समजून न घेता काही महाभाग मी लोकांना माझ्या पोस्टसमधून नकारात्मक संदेश देतोय असे मलाच उलट शिकवत आहेत.

(६) माझे हे असे जाहीरपणे मन मोकळे करणे काही लोकांना आवडत नाही. अशी काही माणसे मलाच सुनावतात की मी माझ्या दुःखाचे जाहीर प्रदर्शन करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतोय. काय विचित्र बुद्धी आहे यांची! एखाद्या माणसाचे आयुष्य माहित नाही, त्याने आयुष्यात काय खस्ता खाल्ल्यात हे माहित नाही आणि तरीपण त्या माणसाच्या काही पोस्टसवरून त्या पोस्टसचा अर्थ नीट समजून न घेता खुशाल स्वतःचे जजमेंट काढून त्याच्या उभ्या आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचे व त्या माणसाचा पुरता निकाल लावायचा या मानसिकतेला काय म्हणावे? मित्रांनो, मोकळे व्हा म्हणजे वाईट व चांगली माणसे कळतील!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा