https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २४ जून, २०२०

देवांश!

देवांश (गॉड पार्टिकल)!

(१) देवांश (गॉड पार्टिकल) ही अशी तर्कशुद्ध संकल्पना आहे की तिच्यावर वैज्ञानिकांचा अभ्यास सुरू आहे. तिची सत्य, असत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग केले गेले, पण त्यात वैज्ञानिकांना अपयश आले. वैज्ञानिकांना देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्यात आलेले अपयश म्हणजे निसर्गात देवांश नाहीच असे अनुमान काढणे हे पूर्णतया चुकीचे! या मुद्यावर नास्तिकांशी माझे कायम मतभेद राहतील.

(२) माझ्या वैयक्तिक संकल्पनेतून निसर्ग म्हणा, विश्व म्हणा नाहीतर सृष्टी म्हणा ते एक विशाल शरीर आहे. पण या शरीराला कुठेतरी केंद्रबिंदू आहेच या मतावर मी ठाम आहे. तो केंद्रबिंदू निश्चितच अतिसूक्ष्म आहे. तोच देवांश (इंग्रजीत गॉड पार्टिकल)! निसर्गाचा हा केंद्रबिंदू म्हणजे देवांश हे एक भौतिक अणुकेंद्र, रासायनिक शक्तीकेंद्र व मानसिक क्रियाकेंद्र आहे. अर्थात भौतिक, रासायनिक व मानसिक असे देवांशाचे तीन भाग आहेत.

(३) यातील मानसिक भाग हा भौतिक वासना, आध्यात्मिक भावना व बुद्धी या तीन गोष्टींनी युक्त आहे. देवांशाचा मानसिक भाग हाच निसर्गाला क्रियाशील ठेवणारा प्रमुख भाग आहे. पण या मानसिक भागातील जो बुद्धीचा भाग आहे तो भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या फक्त दोनच मानसिक गोष्टींवर नव्हे तर भौतिक वस्तुमान असलेले विविध अणू व रासायनिक शक्ती तथा गुणधर्म असलेली विविध द्रव्ये या इतर दोन शारीरिक गोष्टींवरही लक्ष ठेऊन या सर्वच मानसिक व शारीरिक गोष्टींना नैसर्गिक हालचाल करण्यास उद्युक्त करतो व त्या हालचाली नियंत्रित करतो.

(४) देवांशाबद्दलचा माझा हा तर्क अंधश्रध्द नसून तो वैज्ञानिक आहे यावर मी ठाम आहे. निसर्गातील देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्याचे वैज्ञानिक कार्य पुढे कित्येक हजारो वर्षे चालूच राहील. या देवांशाचा वैज्ञानिक शोध लागेपर्यंत मानव जगातील अनेक धर्म या देवांशाबद्दल अनेक कल्पना करतील ज्या कल्पनांना अनेक अंधश्रध्दा चिकटून राहतील.

(५) मी या देवांशालाच देव म्हणतो. मानतो नाही तर त्याचे निसर्गात अस्तित्व आहे म्हणून म्हणतो. या देवापुढे नतमस्तक होण्याची माझी आस्तिकता व या देवाशी एकरूप होण्याची माझी आध्यात्मिकता ही या देवांशाशी जोडली गेली आहे. निसर्गातील देवांशात असलेले बुद्धीकेंद्र व माझी स्वतःची बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. मी निसर्गालाच गुरू मानतो बाकी कोणालाही नाही याचे कारण म्हणजे निसर्ग बुद्धी ते माझी बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे यावर माझा असलेला ठाम विश्वास!

(६) निसर्गात बुद्धीला सर्वोच्च स्थान असण्याचे कारण म्हणजे बुद्धीकडे असलेली व्यवस्थापन व नियंत्रण शक्ती! मानवी मेंदूत असलेली बुद्धी हे मनुष्याला निसर्गाकडून अर्थात निसर्गातील देवांशाकडून (थोडक्यात देवाकडून) मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. तसे पाहिले तर नुसती बुद्धीच काय पण मनुष्य जीवन, त्या जीवनाला निर्माण करणारी आई वडील रूपी माध्यमे, त्या जीवनाला जगवणारी हवा, पाणी, अन्न रूपी साधने, त्या जीवनाला रोगांपासून, शत्रूंपासून वाचवणारी औषधे, शस्त्रे रूपी साधने या सर्वच गोष्टी ही निसर्गातील देवांशाकडून (देवाकडून) मनुष्याला मिळालेली वरदानेच आहेत.

(७) पण मनुष्याने कधीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करता कामा नये. स्वतःच्या बुद्धीचा टेंभा मिरवताना मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उगम निसर्गात (माझ्या मते निसर्गातील देवात) आहे हे विसरता कामा नये. खरं तर सगळ्यांच गोष्टींचा उगम निसर्गात (निसर्गातील देवात) आहे. मग ती निसर्गातून निर्माण होणारी अनेक प्रकारची आव्हाने असोत की निसर्गाने बुद्धीसह बहाल केलेली अनेक साधने (वरदाने) असोत.

(८) माझ्या मते, बुद्धी हे एक अत्यंत शक्तीशाली नैसर्गिक साधनच आहे. त्या साधनाचा मनुष्याने नीट उपयोग केला पाहिजे. बुद्धीला निसर्गातील प्रश्न निसर्गातच व समाजातील प्रश्न समाजातच सोडविणे जमले पाहिजे. नैसर्गिक व सामाजिक प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे निसर्गात व समाजातच आहेत. त्यांचा शोध निसर्गात व समाजातच घेणे बुद्धीला जमले पाहिजे. त्यासाठी बुद्धीने खूप प्रयत्न केले पाहिजेत. यालाच बौद्धिक कष्ट म्हणतात जे शारीरिक कष्टापेक्षा श्रेष्ठ असतात. बुद्धी श्रेष्ठ म्हणून बौध्दिक कष्टही श्रेष्ठ  हे मान्य करायलाच हवे. कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर जर बुद्धीमुळेच मिळते तर मग बुद्धी श्रेष्ठ नव्हे काय?

(९) बौद्धिक कष्ट केल्याने कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतात व यालाच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. पण बुद्धी श्रेष्ठ म्हणून कोणीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करू नये. कारण शेवटी बुद्धी हे निसर्गाचेच (माझ्या मते निसर्गातील देवांशाचे) वरदान आहे. म्हणून बुद्धीने नेहमी निसर्गाशी (निसर्गातील देवांशाशी) कृतज्ञ राहिले पाहिजे. निसर्गाशी/देवांशाशी कृतज्ञ राहणे, त्याच्यापुढे आदराने नतमस्तक होणे, त्याच्याशी सर्वार्थाने एकरूप होणे म्हणजे त्याच्यापुढे शरणागत होऊन भीक मागणे नव्हे. अशी भीक मागणे हा स्वतःच्या बुद्धीचाच नव्हे तर निसर्गाचा/देवांशाचाही अपमान आहे. माझी आस्तिकता ही अशी वैज्ञानिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा