https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ११ जून, २०२०

कचरा माझा सांगाती!

कचरा माझा सांगाती!

(१) निसर्गाने निर्माण केलेल्या जगातील सर्व सुंदर गोष्टींतून टाकावू कचरा निर्माण होतो. पण हा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न माणसापुढे निर्माण झाला तेंव्हा त्याचे उत्तरही निसर्गानेच दिले. एका बाजूने निर्माण केलेल्या माझ्या चांगल्या गोष्टींतून तुम्ही निर्माण केलेला वाईट कचरा शेवटी दुसऱ्या बाजूने मीच आत घेणार पण कचरा सामावून घेण्याची माझी ती दुसरी बाजू तुम्ही नीट समजून घ्या, असे निसर्गाने माणसाला सांगून टाकले व माणसाच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

(२) निसर्ग त्याच्या एका नाकपुडीतून श्वास बाहेर सोडतो तेंव्हा त्या बाह्य श्वासाने चांगल्या गोष्टी निर्माण करतो. पण बाहेर पडलेल्या त्या चांगल्या गोष्टींतून निसर्गानेच निर्माण केलेले सजीव जेंव्हा कचरा तयार करतात तेंव्हा त्या कचऱ्याने निसर्गाच्या पर्यावरणात विषारी प्रदूषण कायम राहू नये म्हणून निसर्ग त्याच्या दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घेतो व त्या अंतर्श्वासाने तो कचरा आत घेऊन कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करून त्या कचऱ्यातून चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत बाह्य श्वासाने त्या चांगल्या गोष्टी पर्यावरणात सोडतो. ही प्रक्रिया निरंतर चक्राकार सुरू आहे.

(३) पण पुन्हा प्रश्न अती बुद्धीमान माणसाच्या अक्कलेचा! माणसाला कचरा शोषून घेणाऱ्या  निसर्गाच्या अंतर्श्वासाची ती नाकपुडीच सापडत नाही. मग माणूस पर्यावरणातला दूषित कचरा निसर्गाच्या बाह्य श्वास नाकपुडीतच कोंबण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, समुद्र ओला आहे तर मग ओला कचरा स्वतंत्र नाल्यामार्फत त्या समुद्रात सोडला पाहिजे व जमीन सुकी आहे तर मग सुका कचरा सुक्या जमिनीवरच सुक्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड वर जमा करून त्या सुक्या कचऱ्याची जमिनीवरच पुनःप्रक्रिया केली पाहिजे की नको! पण डॉक्टरांना जशी कधीकधी पेशंटची नस सापडत नाही तशी माणसालाही निसर्गाच्या अंतर्श्वासाची नाकपुडी सापडत नाही. मग होते काय की अती शहाणा माणूस पर्यावरणातील ओला व सुका कचरा एकत्रितपणे स्वच्छ पाणी देणाऱ्या नद्यांत बिनधास्तपणे फेकून देतो आणि त्या नद्यांचेच नाले करून टाकतो. मग स्वच्छ पाणी कुठून मिळणार? पाण्याचेच काय पण हा माणूस हवेतही विषारी वायू सोडून देऊन शुध्द हवाही प्रदूषित करून टाकतो.

(४) गंमत ही की निसर्गाची ही साधी गोष्ट समजण्यासाठी माणसाला मोठमोठया कचरा नियोजन, कचरा प्रक्रिया, नदी स्वच्छता इत्यादी  तज्ज्ञांची गरज लागते. सरकारचे स्वच्छता अभियान हा त्यातलाच एक भाग! पण आपण फक्त या पदार्थ कचऱ्याच्याच नियोजनाविषयी का बोलावे? माणसाच्या मनात नकारात्मक भावनांचा, निरर्थक विचारांचा जो मानसिक कचरा दररोज तयार होतो त्याचे काय करायचे? तो कचरा कुठे नेऊन टाकायचा? आत्मचिंतन करून तो मानसिक कचरा प्रत्येकाला स्वतःच स्वतःच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून नष्ट करता येईल का जेणेकरून मानवाचे सामाजिक पर्यावरण बिघडणार नाही! कचरा विलगीकरण मुद्यावरून राजकारण तापत असताना माझ्या डोक्यात हा सरळ साधा विचार आला आणि आज मी तो तुमच्यापुढे मांडला!

-ॲड.बी.एस.मोरे©११.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा