https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २७ जून, २०२०

कोरोनील औषध चाचणी!

रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची चाचणी करा!

मी वैद्यक शास्त्रातील कोणत्या पॕथीचा समर्थक नाही जसा मी तत्त्वज्ञानातील कोणत्या लॉजीचा समर्थक नाही. कारण कोणतीही पॕथी किंवा लॉजी परिपूर्ण नाही. हे तर जगातील सार्वत्रिक सत्य आहे. मग वैद्यक शास्त्रात ॲलोपॕथीचाच एवढा उदो उदो का? ही ॲलोपॕथी जर एवढी परफेक्ट असती तर तिला कोरोनावर लस शोधून काढायला एवढा वेळ लागलाच नसता. भारतीय वैद्यक शास्त्राचा मूलाधार आयुर्वेद आहे. पण इंग्रज आले आणि त्यांनी नुसत्या आयुर्वेदालाच नाही तर भारतीय संस्कृतीलाच इंग्रजाळून टाकले. या परकीय लोकांनी इथे भारतात ज्या सुखसोयी निर्माण केल्या (ज्याचा काही लोक खूप उदो उदो करतात) त्या त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी निर्माण केल्या. त्यामागे हाच विचार होता की ते जणूकाही भारतात कायम राज्य करणार आहेत. इंग्रज लोकांनी नुसत्या भारतीय साधनसंपत्तीचीच लयलूट केली नाही तर प्राचीन भारतीय शास्त्रांचीही, त्या ज्ञानाचीही लयलूट केली. आयुर्वेदीय ग्रंथ इंग्रजांनी नुसते चाळले नाहीत तर पळवले सुध्दा नसतील का? त्यातील ज्ञान त्यांनी चोरले नसेल का? तेच ज्ञान नव्या स्वरूपात म्हणजे ॲलोपॕथी, होमिओपॕथी मध्ये त्यांनी रूपांतरीत केले नसेल का? इथली बहुसंख्य भारतीय जनता पूर्वीपासून अडाणी ठेवली गेली. भारतातील काही विशिष्ट उच्च वर्गाने खरे ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचू दिले नाही. तेच काम इंग्रजांनीही इथल्या विशिष्ट वर्गाला हाताशी धरून केले नसेल का? म्हणून तर इंग्रज निघून गेल्यावरही भारतात आयुर्वेदात प्रगती झाली नाही. इंग्रजांनी आयुर्वेदाच्या चिंध्या केल्यावर भारतात शिल्लक राहिलेले आयुर्वेदाचे ज्ञान हे कच्च्या स्वरूपातच राहिले असावे. भारतीयांना इंग्रजाळून टाकल्यावर हेच इंग्रज जे अमेरिकेतही पोहोचले होते त्यांनी ॲलोपॕथीला पुढे आणले. कच्चा माल शुध्द (रिफाईन्ड) करून नवीन स्वरूपात आणला की नुसता चकाकतच नाही तर अधिक गुणकारी होतो. म्हणून रिफाईन्ड ॲलोपॕथी जगाने डोक्यावर घेतली. तिच्यातून ॲलोपॕथीची औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या निर्माण झाल्या व त्या जगभर सुसाट फोफावल्या. याच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अंतर्गत हितसंबंध जगातील रोगराईच्या निर्मूलनात व त्यातून भरपूर श्रीमंत होण्यात गुंतलेले आहेत. रामदेव बाबांनी कोरोना विषाणूवरील कोरोनील औषध निर्माण करताना वैद्यकीय संशोधन चाचणी प्रक्रियेचे काही तांत्रिक नियम पाळले नसतीलही (नक्की माहित नाही) पण ते जर एवढे ठामपणे या औषधाचा दावा करीत आहेत तर मग आयुर्वेद संशोधन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारा भारत सरकारचा जो आयुष विभाग आहे त्याने रामदेव बाबाचे हे कोरोनील औषध ताब्यात घेऊन स्वतः त्यावर चाचणी का करू नये? ती यशस्वी झाली तर जगात भारताचे केवढे नाव होईल! आणि समजा चाचणी अयशस्वी झाली तर त्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे? आपली मागची चांद्रयान मोहीम फसली म्हणून जगाने आपली चेष्टा केली काय? उलट आपल्या प्रयत्नांना त्यांनी दादच दिली ना! मग रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाचे फार तर तसे होईल. पण प्रयत्नच करायचे नाहीत व प्रयत्न करणाऱ्याची चेष्टा करायची ही कोणती मानसिकता? एक फोटो समाजमाध्यमावर फिरतोय त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पसाहेब हे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटायला येतात तेंव्हा पहिला प्रश्न विचारतात की "कुठे आहेत रामदेव बाबा"? या फोटोतून आपण जगात आपलेच हसे करून घेतोय की नाही? अहो, या कोरोना काळात राजकारण थोडे बाजूला ठेऊन गांभीर्याने वागा ना! रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची पूर्ण वैद्यकीय चाचणी होऊन त्याचे निष्कर्ष बाहेर आलेच पाहिजेत. आयुर्वेदाला ॲलोपॕथीशी स्पर्धा करण्याची संधी मिळालीच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा