https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २ जून, २०२०

नजरेतला फरक!

नजरेतला फरक!

(१) काल रात्री टी.व्ही. च्या झी क्लासिक चॕनेल वर दिलीप कुमार, मनोज कुमार व वहिदा रेहमान या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला आदमी हा जुना हिंदी चित्रपट बघत होतो. त्याचे कथानक आवडले व "ना आदमी का कोई भरोसा, ना दोस्ती का कोई ठिकाणा" हे गाणेही मनाला भावले. चित्रपट रंगात आला असताना मला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्याला मी सांगितले की, "आदमी हा चित्रपट रंगात आलाय, मी तूला नंतर फोन करील"! त्यावर त्याचे उत्तर काय तर "दिलीप कुमारचा ना, मग तूच बघ"! मला काही कळलेच नाही त्यावेळी की तो दिलीप कुमार विषयी असे का म्हणाला. मग चित्रपट संपल्यावर मी त्या मित्राला फोन केला व "चित्रपट खूप आवडला, तिघांचीही अदाकारी खूप छान होती, स्टोरी छान होती" वगैरे सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया काय तर "मनोज कुमार, वहिदा रेहमान ठीक आहे, पण तो दिलीप कुमार मला बिलकुल आवडत नाही"! मी त्यामागचे कारण विचारले तर त्याचे उत्तर काय तर दिलीप कुमार अॕक्टिंग करताना खूप घमेंडी वाटतो. मी त्याला विचारले की "दिलीप कुमार व सायरा बानू यांची जोडी माहित आहे ना, मूल नसतानाही एकजीव होऊन त्यांनी किती वर्षे एकत्र संसार केलाय, त्या सायरा बानूला दिलीप कुमार कधी घमंडी वाटला नाही, मग तुलाच तो तसा का वाटतो, तुझी व दिलीप कुमारची कधी भेट झालीय का"? तर तो नाही म्हणाला. पण तरीही त्याचे उत्तर एकच की दिलीप कुमार त्याला घमंडी वाटतो. मी तर चक्रावून गेलो माझ्या मित्राचे ते उत्तर ऐकून. पण मी त्याच्याशी वाद घातला नाही. मी त्याला एवढेच म्हटले की, "असेलही तुझ्या नजरेतून दिलीप कुमार घमंडी, पण मला तरी त्याची ॲक्टिंग खूप आवडते"!

(२) वरील उदाहरण हे एकच नाही. अशी बरीच उदाहरणे आयुष्यात अनुभवास आली. काही व्यक्तींचे नेहमीचेच उद्गार असे की अमूक अमूक व्यक्तीला बघितले की त्यांचा दिवसच खराब जातो. बरं अशा अमूक अमूक व्यक्तीशी त्यांचे विशेष संबंध आलेले नसतात की कसलेही वाद झालेले नसतात. तरीही काहींना काही माणसे आवडतच नाहीत. त्यांना बघितले की त्यांच्या डोक्यात तिडीक भरते. आता सौंदर्याचेच घ्या ना. मला एखादी गोष्ट सुंदर वाटते म्हणून ती माझ्या मित्रांनाच काय पण माझ्या बायको, मुलीलाही सुंदर वाटेल याची खात्री देता येत नाही. हे असे का होते, तर नजरेतला फरक! बहुतेक यातूनच पुढे "नजर लागणे" ही अंधश्रध्दा निर्माण झाली असावी.

(३) पूर्वी मला वाटायचे की, माणसांच्या ज्ञान व बुद्धीत तफावत असते म्हणून त्यांच्यात मतभेद होतात, वाद होतात. पण नंतर कळून चुकले की माणसाची नजर हेही एक कारण आहे मतभेद व वादाचे! नजर म्हणजे दृष्टी! दृष्टीतूनच पुढे दृष्टिकोन तयार होतो व हा दृष्टिकोनच बऱ्याच वेळा मतभेद, वादाचे कारण होतो. या मतभेद, वादांना कायदा व त्यावर स्पष्टीकरणात्मक आदेश देणारी न्यायालये किती पुरेशी पडणार?

-ॲड.बी.एस.मोरे©२.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा