https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २५ जून, २०२०

पुस्तके रद्दीत!

माझ्या पुस्तकांची जागा आता रद्दीत!

विविध विषयांवरील हजारो पुस्तके जमवली, वाचली व शेवटी रद्दीत देऊन टाकली. आता घरात साठलेल्या पुस्तकांची आणखी रद्दी बाहेर काढण्याच्या विचारात आहे. या सर्व पुस्तकांची जागा आता रद्दीतच! एक कोरोना विषाणू जगाला खेळवतोय, नाचवतोय, पण त्याला रोखण्याचा मंत्र किंवा तंत्र जर एकाही पुस्तकात नसेल तर काय करायची ही खंडीभर पुस्तके जवळ ठेवून? मुंबईच्या लोकल्स म्हणे १२ अॉगष्ट पर्यंत बंद ठेवणार! कोणी काढला हा १२ अॉगष्टचा मुहूर्त? मार्च २०२० पासून बंद  ठेवलेल्या लोकल्स आता अॉगष्ट २०२० च्या मुहूर्ताची वाट बघत बसणार. जवळजवळ सहा महिने मुंबईचे व्यवहार ठप्प! सरकारने काय सहा महिने लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू फुकट पुरवल्यात? काय नियोजन आहे या लॉकडाऊनचे हे त्या सरकारमध्ये बसून बंदचे आदेशांवर आदेश काढणाऱ्या मंत्र्यांना व अधिकाऱ्यांनाच ठाऊक! सहा महिने नोकरी, धंदा, व्यवसायाशिवाय घरी बसून रहायचे! बापरे, हे काय चाललंय? घरी रहा, कोरोना पासून सुरक्षित रहा आणि उपासमारीने घरातच सुरक्षित मरा, असाच याचा अर्थ होतो ना! सरकारकडे लोकांना जगवण्यासाठी ना अन्न ना लोकांना वाचवण्यासाठी कोरोनाचे औषध, मग कोणत्या आशेने या सरकारकडे बघत रहायचे? मी फक्त महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार विषयीच हे बोलत नाही. जगातील सरकार नावाच्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच मी हे हतबल मनाने बोलत आहे. कोरोनासारखा एक विषाणू जर जगाला इतका हतबल करू शकतो तर मग मनुष्याच्या इतर प्रगतीला काय अर्थ उरतो? कोरोनाची ही गोष्ट खरोखरच चमत्कारिक आहे! बिहारमध्ये ८० च्या वर लोक वीज पडून मेले अशी बातमी आलीय. मरणाचे संकट जर असे सगळ्या मार्गांनी येत असेल तर मग कोरोनाला घाबरून घरी किती दिवस बसवणार सरकार उपाशी लोकांना? ज्या पुस्तकांवर मी आयुष्यभर जिवापाड प्रेम केले ती सर्व पुस्तके अगदी देवधर्माची पुस्तके सुध्दा आता कोरोना महामारीने रद्दीत जाणार यात बरेच काही आले!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा