https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १४ जून, २०२०

विनाशकाले विपरीत बुद्धी!

विनाशकाले विपरीत बुद्धी!

कोलंबसाने भारत शोधता शोधता अमेरिका शोधली व तिथल्या आदिवासींवर गुलामगिरी लादत उद्योग, व्यापाराच्या नावाखाली अमेरिका  घशात घालली. इंग्रजांनी मग जगभर त्यांच्या स्वार्थी वसाहतींचे जाळे पसरवले. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांनी भारतात शिरकाव केला व हळूहळू भारताला इंग्रजांचे गुलाम केले. १६३० साली जन्मलेल्या शिवरायांनी महाराष्ट्र भूमीवर रयतेचे स्वराज्य निर्माण केले. पण १८१८ साली इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने मराठ्यांचा पराभव करून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर प्रचंड मोठी जंगलतोड सुरू केली. याच राक्षसी जंगलतोडीने शिवरायांचे गड किल्ले ओसाड केले. तेंव्हापासून या गड किल्ल्यांचे संवर्धन खितपत पडलेय. म्हणजे १९४७ साली इंग्रज भारत सोडून गेल्यावरही भारतातील लोकशाही सरकारला विशेष करून महाराष्ट्र सरकारला या गड किल्ल्यांचे नीट संवर्धन करता आले नाही. पृथ्वीचा ७०% भाग सागर जलाने व ३०% भाग भूमी व भूजलाने व्यापला आहे. या ३०% भूभागावर मानवी लोकसंख्या प्रचंड प्रमाणात विशेष करून भारत व चीन या पूर्वेकडील देशांत वाढतच गेली. याचे कारण म्हणजे मानवी जन्मदर हा मानवी मृत्यूदरापेक्षा खूप जास्त आहे. जन्म मरणातील ही प्रचंड मोठी तफावत माणसांची लोकसंख्या वाढवत गेली. मग या वाढत्या लोकसंख्येचा जगण्याचा उद्योग प्रचंड प्रमाणात वाढला. या जगण्याच्या उद्योगात माणसांना जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पदार्थांची मागणी वाढली आणि मग या वाढलेल्या मागणीचे समाधान करण्यासाठी या पदार्थांचा पुरवठा अधिकाधिक कसा वाढेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना माणसांनी निसर्गाच्या साधन संपत्तीची कत्तल करायला सुरूवात केली. या अनैसर्गिक कत्तलीवरच मानवाच्या तथाकथित विकासाचा डोलारा उभा राहिला आहे. या कत्तलीचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. माणसा सावध हो! निसर्गाची मैत्री पाहिलीस, निसर्गाचे शत्रुत्व पाहू नकोस! विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण सार्थकी लावू नकोस! ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा