https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १७ जून, २०२०

कोरोना उदार झाला!

कोरोना उदार झाला!

जगाचे अर्थकारण व राजकारण कोण ठरवतेय भांडवलवादी अमेरिका की साम्यवादी चीन? हा या जगात जगायचे कसे या मूलभूत वादाचा  दृश्य परिणाम आहे. एवढे धर्म या जगात पण एकाही धर्माला या वादावर उत्तर सापडले नाही. धर्माची तत्वे व त्यातला देवही मला डिजिटल दुनियेसारखा आता आभासी वाटू लागलाय. निसर्ग व त्या निसर्गातील मानवाचे सत्य या आभासापासून फार वेगळे आहे. किती सुखी व शांत होतो मी लहानपणी! मी सुखी व शांत होतो कारण माझे आईवडील सुध्दा त्या सुवर्ण काळात गरिबीतही सुखी व शांत होते. आजार संकटाची कसली खिचखिच नव्हती की वाद संघर्षाची कसली खिचपिच नव्हती. सुवर्ण युगातील सुंदर गाणी ऐकत, सुंदर चित्रपट बघत कष्ट करतानाही माझे आईवडील अगदी आनंदी दिसायचे व गरीब म्हणून फी माफीवर शिक्षण घेणारा मीही आनंदाने शिक्षण घेत होतो. पण कोणाच्या तरी डोक्यात उदारीकरणाचे व जागतिकीकरणाचे खूळ घुसले व अमेरिका आणि रशिया (त्यावेळचे मोठे सोव्हिएट युनियन) यांच्यातील अणुस्पर्धेचे राजकीय शीतयुध्द संपून आर्थिक स्पर्धेतून जगात नवीन अर्थयुद्ध सुरू झाले. जागतिक अर्थयुद्धाचाच वाईट परिणाम आज जग अनुभवत आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे जागतिक अर्थयुद्धच आहे. दोन हत्ती लढतात तेंव्हा झाडे उन्मळून पडतात तशी जगातील इतर छोट्या मोठ्या देशांची स्थिती सद्या झाली आहे. यात आपला भारत देश कुठे आहे यावर मोठमोठे अर्थ तज्ज्ञ भाष्य करतील. कारण मी अर्थतज्ज्ञ नाही. मला माझ्या कॉमन सेन्सने जेवढे कळते तेवढेच मी बोलतो, लिहितो. प्रश्न हा आहे की, अर्थयुद्धाचे रूपांतर पुढे विध्वंसक राजकीय युद्धात होते जसे दिवाणी वाद वेळीच मिटले नाहीत तर अशा वादांचे रूपांतर पुढे फौजदारी गुन्ह्यांत होते. हे एक दुष्टचक्र आहे. कोरोना हा याच दुष्ट चक्रातून निर्माण झालेला भयंकर किडा आहे असे मला वाटते. माझा हा कयास कितपत खरा यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तसा तज्ज्ञ नसल्याने मी हे माझ्या कॉमन सेन्सने बोलतोय. कसली प्रगती आणि कसला विकास केलाय माणसाने? मुंबईत एका बाजूने उध्वस्त कापड गिरण्यांच्या जागांवर उंच उंच इमारती उभ्या केल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूने समोरच ती धारावी झोपडपट्टी आहे तशीच रडत बसलीय. माणूस निसर्गाला असा फॉलो करतोय काय! म्हणजे निसर्गाने एकीकडून हिमालयासारखे उंच पर्वत निर्माण केले व दुसरीकडून खोल पाण्याचे मोठमोठे सागर निर्माण केले. उंच उंच इमारती म्हणजे हिमालय पर्वत व धारावी झोपडपट्टी म्हणजे हिंदी महासागर अशी कल्पना करतोय. हा माझा आभास आहे की सत्य आहे यावरही मोठमोठे तज्ज्ञ भाष्य करतील. मी तर एक सामान्य माणूस, मग मी माझ्या कॉमन सेन्सनेच बोलणार ना! या उतार वयात माझी सुख शांती लोभी माणसांनी हिरावून घेतलीय असेच माझ्या कॉमन सेन्सला वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा