https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २० जून, २०२०

सार्थक झाले!

आज माझ्या फेसबुक लिखाणाचे खरे सार्थक झाले!

आज शनिवार, दिनांक २० जून, २०२० हा माझा सार्थक दिन! आज मी खूश आहे, आनंदी आहे. कारण गेली पाच वर्षे फेसबुकवर मी जे सातत्याने लिखाण करतोय त्याचे सार्थक झाले. माझे हे तिसरे फेसबुक खाते. पहिल्या दोन फेसबुक खात्यांवर प्रत्येकी ५००० मित्र व तेवढेच अनुयायी म्हणजे जवळजवळ एकूण २०००० लोकांना मी माझ्या ज्ञान, अनुभव व विचार यांनी आकर्षित केले. पण त्या आकर्षक करणाऱ्या मित्र, अनुयायी संख्येवर मी खूष नव्हतोच! मला जे हवे ते त्या रेकॉर्ड ब्रेक संख्येतून मला मिळतच नव्हते. म्हणून माझे सर्व लिखाण व्यर्थ गेले या भावनेतून मी ती दोन्ही फेसबुक खाती बंद करून टाकली. तरीही अजून एकदा प्रयत्न करून बघू व मी जे लिहितोय ते बरोबर आहे का याची पुन्हा एकदा चाचपणी करू या विचाराने मी हे सद्याचे तिसरे फेसबुक खाते उघडले. पहिले खाते मी ठरवून  राजकारणापासून अलिप्त ठेवले होते, दुसरे खाते मी काही अंशी राजकारणाला जोडले व आता पुन्हा हे तिसरे खाते राजकारणापासून मी ठरवून अलिप्त केले. पण आजपर्यंत मला जे हवे होते ते मला माझ्या फेसबुक लिखाणातून मिळतच नव्हते. काय हवे होते मला? पैसा, सत्ता, प्रतिष्ठा? बिलकुल नाही. पण मला जे हवे होते ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या एका गावातील २२ वर्षाच्या एका मराठी शेतकरी तरूणाने मला देऊन टाकले. काय दिले त्याने मला तर त्याने प्रत्यक्ष फोन करून मला तो जे मनापासून बोलला ते ऐकून मी स्वतःच चाट पडलो. त्या तरूणाने मला सांगितले की, माझे विचार तो दररोज नुसते वाचतच नाही तर त्या विचारांचे मोबाईलने स्क्रीन शॉटस घेऊन त्यांची तो अधूनमधून उजळणी करतो. माझ्या विचारांनी त्याच्या जीवनात बदल झाला. त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. तो आता १४ वी ला आहे व "कायदा हा माझा श्वास" हा फेसबुक वरील माझा लेख त्याने वाचल्याने ग्रॅज्यूएट झाल्यावर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्याचे त्याने ठरवले आहे व त्यासाठी तो पंढरपूर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. तसेच माझ्या विचारांतून त्याला अगोदरच कायद्याचे मूलभूत शिक्षण प्राप्त झाले आहे व होत आहे. त्याची आई चार वर्षापूर्वी वारली. वडील आहेत व तोच थोरला असल्याने धाकटया भावंडांची आता त्याच्यावर जबाबदारी आहे. तरीही माझ्या विचारांमुळे त्याला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे व त्यामुळेच आता त्याला या सर्व जबाबदाऱ्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. हे सर्व त्याच्या तोंडून प्रत्यक्षात ऐकताना मला एकच जाणीव झाली की माझ्या फेसबुक लिखाणाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले. हजारो लोकांतून मी एका तरूणाला योग्य दिशा देऊ शकलो आणि त्यातच मी जिंकलो, हीच ती माझी जाणीव! ही जाणीव मी त्या तरूणालाही "तूच माझा खरा शिष्य" असे लिहून शेअर करीत आहे, कारण माझा खरा शिष्य तोच आहे हे त्याने आज सिद्ध केले आहे. ही माझी स्वतःची आत्मप्रौढी नसून हा माझ्या जीवनाचा १००% सत्य अनुभव आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा