https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २७ जुलै, २०२०

निवडक मित्रांसाठीच हे फेसबुक खाते!

काही निवडक मित्रांसाठीच आहे हे फेसबुक खाते!

(१) माझ्या या फेसबुक खात्यावर फक्त काही निवडक व्यक्तीच माझे मित्र आहेत, बाकीची मंडळी नुसती नावापुरती आहेत ही गोष्ट मला माहित आहे. माझ्या रोजच्या विचारांतून या काही निवडक मित्रांशी मी बोलत असतो व त्यामुळे माझ्याशी वेगळे वैयक्तिक बोलण्याची तशी गरज नाही. आता फेसबुक इनबॉक्स चॕटिंग नकोच नको!

(२) काल मध्यरात्री (२६ व २७ जुलैच्या मधली रात्र) मला हनी ट्रॕप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मागे एका माणसाने इनबॉक्स मध्ये अगोदर चांगले बोलून अचानक होमो लैंगिकतेचे फोटो पाठवले. कोणाला कसा ओळखू आणि कितीजणांना ब्लॉक करीत बसू? ६४ वय होऊन अनुभवाने परिपक्व व ज्ञानाने प्रगल्भ झालो असलो तरी शेवटी मीही एक माणूसच आहे ना! असे काही विचित्र घडले, माझ्या पोस्टसवर कोणी काही विचित्र कमेंटस केल्या की मग मी वैतागून जाऊन फेसबुक खातेच बंद करून टाकतो. पूर्वी पण अशाच काही गोष्टींमुळे वैतागून जाऊन मी माझी दोन फेसबुक खाती कायमची बंद केली. पण विचार थांबत नाहीत. ते लोकांना सांगावेसे वाटतात म्हणून पुन्हा हे तिसरे फेसबुक खाते उघडले. पण त्यालाही काल दृष्ट लागली. हनी ट्रॕपच्या जाळ्यात काल कसा ओढला गेलो हे कळलेच नाही. मग रात्रभर झोप आली नाही. सकाळी नाष्टा वगैरे न करता स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला तक्रार केली.

(३) माझ्या सततच्या विचारांतूनच या काही निवडक फेसबुक मित्रांशी माझी मैत्री सुरू आहे. मी आता व्हॉटसअप पण कमी करणार आहे. नको ते गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे औपचारिक संदेश व नको ती इकडून तिकडून फिरणारी माहिती! पूर्वी आमच्या काळात ही समाजमाध्यमे नव्हती तेच खूप चांगले होते. पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांतून होणारा संवाद खूप जवळचा वाटायचा. समोरासमोर बोलणे व्हायचे तेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्यक्ष बघायला मिळायचे. त्यामुळे फसगत होत नसायची. आता या अॉनलाईन संवादात समोरची व्यक्ती तिकडून कोणत्या मूड मध्ये आहे, तिच्या मनात काय चाललेय, ती पुढे काय करणार आहे याचा अंदाजच येत नाही. मला तर मोबाईल वरून स्क्रीन शॉटस कसे घ्यायचे हेही माहित नव्हते. एका फेसबुक मित्रानेच ते शिकवले. ते माहित नसते तर मला काल त्या हनी ट्रॕप चॕटिंगचे पुरावेच ठेवता आले नसते. मग माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. या सर्व गोष्टी फार भयंकर आहेत. काय पण अनुभव! माणसे पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलीत! अॉनलाईन व्यवहार तर मला जमतच नाहीत. मला कधी एटीएम ने बँकेतून पैसे काढता आले नाहीत.

(४) अशा परिस्थितीत मी या अॉनलाईन समाज माध्यमावर का रहावे आणि कशासाठी रहावे? फक्त ज्ञान व अनुभवावर आधारित माझे विचार मांडण्यासाठी? पण आज माणसाला चांगल्या विचारांचे कोठे सोयरसुतक आहे! काहीजण मलाच म्हणतील की, अहो मोठमोठे विचार मांडणारे तुम्ही हनी ट्रॕप मध्ये असे कसे हो सापडलात? त्यामुळे मित्रांनो, आता माझ्याशी फेसबुक इनबॉक्स, व्हॉटसअप वर संवाद करू नका. माझ्या पोस्टस आवडल्या तर लाईक करा. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. म्हणून मी फेसबुक सारख्या समाज माध्यमावर आहे. पण मला अॉनलाईन जग हे आता खूपच आभासी वाटू लागलेय. औपचारिकता खूपच भरलीय या जगात! इथे निर्मळ मैत्री हे केवळ मृगजळ आहे.

(५) पण याच फेसबुकने मला काही चांगले मित्र दिले. कालच्या घडलेल्या प्रसंगात हेच मित्र पुढे आले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला आधार दिला. दोन वकिलांनी तर प्रत्यक्ष फोन करून मला स्थानिक पोलीस स्टेशन, सायबर क्राईम सेल चे ईमेल आयडी पाठवून ईमेलने पोलीस तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले, धीर दिला. माझे काही मनसैनिक मित्र, मैत्रिणींनी त्या हनी ट्रॕपवाल्या फेक फेसबुक अकाऊंटसचा पाठलाग केला. हे खरे प्रेमही मला याच अॉनलाईन जगातील फेसबुक वर मिळाले. त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी वाईट  नाहीत व सगळीच माणसे ढोंगी नाहीत. पण इथे सावधानता ही खूप महत्त्वाची!

(६) माझ्या या तिसऱ्या फेसबुक अकाऊंटसवर या कोरोना लॉकडाऊन काळात पटापट झालेले माझे मित्र किती तर जवळजवळ ३४०० व मला माझ्या कालच्या हनी ट्रॕप प्रसंगात माझ्या त्या जाहीर पोस्टवर मला जाहीर पाठिंबा देणारे मित्र  किती तर जवळपास फक्त १५० च! म्हणजे फेसबुकवर माझे खरे मित्र किती तर फक्त ४ टक्केच! मग बाकीच्या ९६ टक्के  लोकांना मित्र म्हणून उगाच का मिरवत बसू? या ९६ टक्के तथाकथित मित्रांना हळूहळू रामराम करायला हवा! वेळ मिळेल तसे ते काम करणे आवश्यक झालेय. आता यापुढे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे हेच आव्हान असणार आहे. कारण बरीच मंडळी माझ्या पोस्टस, माझे विचार वाचून फ्रेंड रिक्वेस्टस पाठवत असताना दिसत नाहीत.

(७) महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारून काहीही वैचारिक सुसंवाद निर्माण होत नाही. एकतर माझे ९५ टक्के लिखाण हे मराठीत असते. मी काय लिहितोय हेच त्यांना कळत नाही. आता परप्रांतातील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना वकील हाच निकष ठेवावा तर त्यातही भाषेची अडचण येतेच. शेवटी माझी मातृभाषा मराठी! म्हणून मायबोली मराठी हीच माझ्या लिखाणासाठी मला योग्य व सोपी भाषा आहे. इंग्रजी भाषा ही फक्त काही कायदेशीर व्यवहारासाठी वापरायची. बाकी इतर ठिकाणी फक्त आणि फक्त मराठी भाषाच वापरायची! बाकी या तथाकथित ९६ टक्के मित्रांना हळूहळू रामराम कसा करायचा ही आणखी एक नवीन डोकेदुखी! कारण जर कोणाला अनफ्रेंड करायचे असेल तर प्रत्येक खात्याला स्पर्श करावा लागतो. आता एवढ्या खात्यांना स्पर्श करणे म्हणजे महादिव्यच! मग या खोट्या, वरवरच्या फेसबुक मित्रांना असेच नावाला ठेऊन पुढच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना काळजी घेणे एवढेच सद्या तरी ठीक वाटतेय! माझे काही निवडक चांगले फेसबुक मित्र इथे आहेत. त्यांच्या मैत्रीसाठी माझे हे फेसबुक खाते चालू ठेवावे असे म्हणतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा