https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २७ जुलै, २०२०

देव भावनेला देवाचा आधार!

देव भावनांना देवाचा आधार!

सजीव मनाची नैसर्गिक वासना जनावरांना जशी असते तशी माणसांनाही असते आणि मनाच्या या वासनेला मनाच्याच बुद्धीचे जे बळ लाभलेले असते त्याला बुद्धीबळ म्हणतात. जनावरे याच बुद्धीबळावर स्वार होऊन त्यांचा शरीर घोडा पळवतात व त्यांच्या मूळ वासनांची तृप्ती करतात. तहान, भूक, झोप, लैंगिकता या त्या मूळ नैसर्गिक वासना होत. पण माणसांचे गणित निसर्गाने थोडे वेगळे बनवले आहे. ते तसे का बनवले याचे कारण त्या निसर्गालाच ठाऊक! पण एवढे मात्र खरे की या वेगळ्या गणितामुळेच माणूस इतर जनावरांपासून वेगळा झाला. जनावरांमध्ये माणसांपासून वेगळे असलेले प्राणी व पक्षी हे दोघेही आले. हे गणित एकाच गोष्टीने झाले आणि ती म्हणजे माणसांना जनावरांच्या वासनांसोबत दिलेली उच्च मानवी भावना! प्रेम, करूणा, परोपकार, कृतज्ञता इत्यादी उच्च भावना या माणसांनाच असतात. निसर्गात देव आहे अशी श्रद्धाच नव्हे तर तसा ठाम विश्वास असणारे आस्तिक लोक या उच्च मानवी भावनांना देव भावना असेही म्हणू शकतील. मानवी मनात जनावरांच्या मूळ नैसर्गिक वासना व या देव भावना ज्या सुद्धा नैसर्गिकच आहेत यांचे मिश्रण आहे. ते जर संयुग झाले असते तर वासना व भावना यांचा वेगळा विचार करण्याचा प्रश्नच मानवी मनात निर्माण झाला नसता. पण मानवी मनात संयुग न होता ते मिश्रण झाले व मग मानवी बुद्धीपुढे प्रश्न निर्माण झाला की वाईट वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना मनात ठेऊनच वागायचे की चांगले वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना व मानवी भावना या दोन्ही मध्ये संतुलन ठेवीत विवेकाने वागायचे? जी मानवी बुद्धी वासना व भावना यांच्या संतुलनावर लक्ष केंद्रित करून त्या संतुलनाची तृप्ती करण्यालाच स्वतःचे बळ अर्थात बुद्धीबळ देते अशा बुद्धीला विवेकबुद्धी म्हणतात. पण कधीकधी असे होते की मानवी मनात असलेल्या वासना व भावनांचे मिश्रण थोडे इकडेतिकडे होते, त्यांच्यातील संतुलन बिघडते व मग मानवी बुद्धी थोडीशी भ्रमिष्ट होऊन बुद्धीबळाचा शरीरावरील ताबा सुटतो व शरीर रूपी घोडा उधळतो. भरकटलेली बुद्धी व उधळलेला शरीर रूपी घोडा माणसाला कधी जनावर बनवून टाकतो हे कळतच नाही. या विश्लेषणातून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे मानवी बुद्धीचे चांगले वागणे म्हणजे काय तर वासना व भावना यांच्या मिश्रणात संतुलन ठेवीत विवेकाने वागणे. असे विवेकी वागण्यासाठी मनातील देव भावनांना बळ प्राप्त होणे आवश्यक असते. देव भावनांना देव शक्ती मिळण्यासाठी मग आस्तिक लोक देवाचा आधार घेतात. देवावर श्रद्धा, विश्वास ठेऊन मिळविलेला तो आधार खूप मोठे काम करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व त्यांचे मर्द मावळे जेंव्हा शत्रूवर चढाई करीत तेंव्हा हर हर महादेव अशी आध्यात्मिक आरोळी देत चढाई करीत. महादेवावर असलेली श्रद्धा, विश्वास त्या मर्द मावळ्यांत अशी चेतना निर्माण करीत असे की आपण देव भावनेच्या रक्षणासाठीच म्हणजेच धर्मासाठी जनावरांच्या वासनेने जगणाऱ्या दुष्ट शत्रूवर महादेवाचे रौद्र रूप अंगात संचारून घेत चढाई करीत आहोत. देव भावनांचा वासनांमुळे चोळामोळा होऊ नये म्हणून आस्तिक माणसे देवाचा आधार घेतात व यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा