https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ जुलै, २०२०

भुतांचा बाजार!

भुतांचा बाजार!

(१) हल्ली थोडी चांगली सवय लागत चाललीय व ती म्हणजे रात्री झोपून सकाळी उठायची सवय. घुबडासारखे रात्रभर जागून दिवसाची झोप घेणे हा प्रकार माणसासाठी विचित्रच! पण मी आयुष्यात थोडा विचित्र म्हणजे जरा हटकेच वागलो. त्यामुळे थोडे नुकसानही झाले. पण त्या वेगळे वागण्यातली वेगळी मजाही घेता आली.

(२) तर काय झाले की, काल रात्री मला कायदा नीट समजावून सांगणारे एक स्वप्न पडले. मला झोपेत स्वप्ने पडतात व झोपेतून उठल्यावर ती बरोबर लक्षातही राहतात हे विशेष! कालच्या स्वप्नात मी रात्रीच्या वेळी चालू असलेल्या एका  फार मोठ्या भुतांच्या बाजारात फिरत होतो. त्या मोठ्या बाजारात ती भुते जी देवाणघेवाण करीत होती ती विचित्रच होती. थोडक्यात सुसंस्कृत मानवी मनासाठी ती घाणेरडी होती. पण त्या विचित्र, घाणेरड्या व्यवहारांच्या, देवाणघेवाणीच्या पाठीमागे भुतांचे एक बळ होते आणि ते म्हणजे हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरणाऱ्या काही आंडदांड भुतांचे. काही ठिकाणी या देवाणघेवाणीत थोडी जरी गडबड होताना दिसली की ही आंडदांड तलवारधारी, बंदूकधारी भुते तिथे पोहोचायची व मग तिथला व्यवहार शांतपणे पार पडायचा. त्या बाजारात मीही न घाबरता त्या भुतांप्रमाणेच बिनधास्त फिरत असल्याने मला त्या भुतांनी अडवले नाही. विशेष म्हणजे ती भुते माणसांसारखीच दिसत होती. पण वागत मात्र विचित्र होती. त्या बाजारात ज्या मोठमोठया जाहिराती लावल्या होत्या त्या बघून तर माझे डोके फिरायची वेळ आली होती. मी जर भुतांच्या त्या बाजारातील भुतांचे ते व्यवहार, भुतांची ती विचित्र, घाणेरडी देवाणघेवाण, त्यांच्या त्या भयंकर जाहिराती इथे शब्दांत वर्णन करू लागलो तर लोक सहन करूच शकणार नाहीत इतका विचित्र प्रकार होता तो. नरक नरक ज्याला म्हणतात ना तोच मला त्या बाजारात दिसला.

(३) मी ठरवले होते की रात्रभर त्या भुतांच्या बाजारात फिरायचे व सकाळ झाली की काय होतेय ते बघायचे. जसजशी पहाट सुरू झाली तसतशी त्या बाजारात सावरासावर सुरू झाली. सामानाची बांधाबांधी, जाहिराती काढून टाकणे हे प्रकार सुरू झाले. सकाळ होताना तो बाजार शांत होऊ लागला, ती भुते गायब होऊ लागली. आणि एकदाची सकाळ झाली, सूर्यकिरणांचा प्रकाश पडला. तो भुतांचा बाजार तिथून नष्ट झाला होता. आता तिथून पाय काढता घ्यावा असे वाटत असतानाच तिथे दुसरी वर्दळ सुरू झाली. दुसरा बाजार सुरू झाला. तो होता खऱ्या माणसांचा बाजार! ज्या ओट्यांवर रात्री भलतेच व्यवहार चालू होते तिथे छान टेबल, खुर्च्या आल्या. त्यावर मस्त स्वच्छ कपड्यातील माणसे हळूहळू येऊन बसू लागली. टेबलावर संगणक आले. त्यावर टायपिंगचे काम सुरू झाले. माझ्या मनाजोगते सुसंस्कृत मानवी व्यवहार त्या दिवसाच्या बाजारात सुरू झाले ज्या ठिकाणी काल रात्री तो भुतांचा बाजार भरला होता.

(४) मी या माणसांच्या बाजाराचे निरीक्षण करीत पुन्हा तिथे फिरू लागलो. हळूच काही ठिकाणी लक्ष गेले तर तिथे काल रात्री जी काही आंडदांड भुते हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरत होती त्यापैकी काही थोडी भुते हळूच त्या टायपिस्ट लोकांच्या मागे असलेल्या दारात येऊन उभी राहिली व त्यांच्या तलवारीचा धाक त्या टायपिस्टना दाखवू लागली. खरं म्हणजे तो धाक होता की खोडसाळपणा होता हेच मला कळेनासे झाले. कारण ती भुते हळूच त्यांच्या तलवारीचे पुढचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या शर्टाच्या कॉलर्स मध्ये घुसवायची व टायपिस्ट लोकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करायची. ते टायपिस्ट लोक पण त्या भुतांना ओळखत होते असेच वाटू लागले. कारण त्या भुतांनी त्यांच्या तलवारीचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या कॉलर्स मध्ये घुसवून त्यांची कॉलर इकडेतिकडे फिरवली की ते टायपिस्टस मागे वळून हातानेच त्या भुतांना खुणवायचे व बाबांनो तुमचे काय ते नंतर देतो असे नजरेनेच खुणवायचे. हा प्रकारच मला कळेनासा झाला. भुतांचे आणि माणसांचे हे असे गुपचूप संबंध असू शकतात? मनाला ते पटत नव्हते. पण प्रत्यक्षात तर मी माझ्या डोळ्यांनी ते बघत होतो.

(५) माझी झोप पूर्ण झाली व माझे ते स्वप्न भंग पावले. खरं सांगतोय की, हा लेख त्या स्वप्नावर आधारित आहे व झोपेतून उठल्यावर अंघोळ न करताच लिहित आहे. पडलेले स्वप्न विसरून जाईल या भीतीने मी असे स्वप्न जागा झालो की एका कागदावर कच्चे लिहून ठेवतो व नंतर त्याचा लेख बनवतो. आज मी तसे न करता डायरेक्ट लेख लिहायलाच बसलोय. प्रत्येक स्वप्न मला काहीतरी शिकवते, संदेश देते. मला त्या स्वप्नातून जे कळते ते मी माझ्या लेखात उतरवतो व तो लेख वाचकांसाठी फेसबुक वर प्रसिद्ध करतो.

(६) कालच्या स्वप्नाने डार्विनने सांगितलेला बळी तो कानपिळी हा नियम समोर आला. रात्री  चालू असलेला भुतांचा बाजार म्हणजे जंगली व्यवहार जे वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना शोभतात, पण माणसांना नाहीत. हेच दिवसा चालू झालेल्या माणसांच्या सुसंस्कृत बाजाराने सिद्ध झाले. आता बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही बाजारांना लागू पण वेगळ्या पद्धतीने! भुतांच्या जंगली बाजारात तलवारी, बंदूका यांच्या दहशतखोर बळावरच आर्थिक व्यवहार सुरू होते. पण माणसांच्या सुसंस्कृत बाजारात त्या दहशतखोर बळाचाच कान माणसांनी पिरगळून टाकला होता. कशाच्या जोरावर तर सूर्यप्रकाशाच्या जोरावर! सूर्यप्रकाशाची ताकद एवढी मोठी की रात्री मोकळ्या फिरणाऱ्या  तलवारी, बंदूका दिवसा लपून बसतात. पण स्वप्नातली काही भुते ज्याप्रमाणे दिवसाच्या सुसंस्कृत मानवी बाजारात त्यांच्या तलवारीने खोडसाळपणा करीत होती अगदी त्याचप्रमाणे "बळी तो कानपिळी" हा जंगली प्राण्यांसाठी असलेला निसर्ग नियम माणसांतही आणू पाहणारी काही दहशतखोर माणसे त्या रात्रीच्या  भुतांप्रमाणे माणसांतही फिरत आहेत हेच त्या स्वप्नातल्या दृश्याने स्पष्ट केले.

(७) पण त्या स्वप्नातली विशेष गोष्ट ही होती की, हातात तलवार, बंदूक नसलेली टायपिस्टस मंडळी त्या तलवारधारी भुतांना न घाबरता "गप्प बसताय की नाही आता, नंतर तुमची ती शिते तुम्हाला देण्यात येतील, तोपर्यंत आम्हाला आमची कामे करू द्या" अशी एका ताकदीच्या जोरावर सांगत होती आणि ती ताकद म्हणजे सूर्यप्रकाशाची ताकद! सूर्यप्रकाश ही अंधाराचे जाळे नाहीसे करणारी प्रचंड मोठी ताकद आहे. त्यात सत्य ज्ञानाचीही ताकद आहे. हीच ताकद "बळी तो कानपिळी" या नियमालाही योग्य मार्ग शिकवते. बळाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवते. ही विशेष अक्कल फक्त माणसांनाच निसर्गाने दिली आहे. म्हणून बळी तो कानपिळी हा जंगली नियम माणसांना पूर्णपणे लागू नाही. तो अयोग्य वर्तन करणाऱ्या काही माणसांना धडा शिकविण्यासाठीच काही अंशी लागू आहे हेच मला काल रात्रीच्या स्वप्नाने अधोरेखित करून दाखविले. काल रात्रीच्या स्वप्नाने मला कायदा पुन्हा शिकवला. जमलेच तर तुम्हीही शिका!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.७.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा