https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

निर्जीव पदार्थांना त्यांचे गुणधर्मच कळतात, त्या पलिकडचे त्यांना कळत नाही. वनस्पतींना जगण्यापलिकडचे काही कळत नाही. पण जगताना स्वसंरक्षण करण्यासाठी त्या असमर्थ असतात. त्या बाबतीत त्या अपंगच! मनुष्य सोडून इतर सजीव प्राणी, पक्षी यांनाही त्यांच्या जगण्यापलिकडचे काही कळत नाही. मात्र जगताना स्वसंरक्षण करण्याची शक्ती व बुद्धी त्यांना प्राप्त असते. माणूस हाही एक सजीव प्राणी असला तरी तो इतर सजीवांपासून वेगळा आहे. इतर सजीवांना स्वतःच्याच जगण्याचा व स्वसंरक्षणाचा स्वार्थ कळतो. माणूस मात्र याला अपवाद आहे. त्याला स्वार्थाबरोबर परमार्थही कळतो. मानवी मनाला चिकटलेल्या उदात्त नैतिक भावना या मनुष्याला परमार्थाचा मार्ग दाखवतात. लैंगिकता, तहान, भूक, झोप इ. जैविक वासना माणसाला स्वार्थ शिकवितात तर प्रेम, करूणा, परोपकार इ. नैतिक भावना त्याला परमार्थ शिकवितात. आस्तिक माणसे देवावर श्रद्धा ठेवतात. त्या श्रध्देतून केलेली देवभक्ती हा सुद्धा त्यांच्या परमार्थाचा विशेष भाग असतो. वासनिक स्वार्थ व भावनिक परमार्थ यांच्यात संतुलन साधण्यासाठी मानवी मनात सदसद्विवेकबुद्धी असते. खरं तर, उदात्त मानवी भावना व सदसद्विवेकबुद्धी या मानवी मनाच्या खास वैशिष्ट्यांमुळे तर माणूस हा इतर सजीवांपासून वेगळा होतो. सदसद्विवेकबुद्धी ही मनुष्याची मार्गदर्शक आहे. जर बुद्धीपासून सदसद्विवेक (सत् सत् विवेक) अलग झाला तर बुद्धी भ्रष्ट होते. ती वासना व भावना यांच्यात नीट संतुलन साधू शकत नाही. ती भरकटते. अंमली पदार्थ सेवन केल्यानंतर हे पदार्थ मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा घेतात व मग बुद्धीला चिकटलेल्या सदसद्विवेकाला बुद्धी पासून अलग करून बुद्धीला एकटे पाडतात. बुद्धी एकटी पडली की तिला नैतिक भावनांचा विसर पडतो व ती वासनांध होते. वासनेच्या आहारी जाऊन ती हिंसकही होते. अशाप्रकारे हे अंमली पदार्थ माणसाचे रूपांतर जनावरात करतात. म्हणून माणसाने नशा आणणाऱ्या या अंमली पदार्थांपासून नेहमी दूर रहावे. अंमली पदार्थ टाळले तरी सदसद्विवेकबुद्धी इतर काही  कारणांमुळे अस्थिर होऊ शकते. उदा. उपद्रवी माणसे व त्यांनी निर्माण केलेली आव्हानात्मक परिस्थिती. अशावेळी देवश्रद्धा उपयोगाला येऊ शकते. निसर्गात देव आहे व देवाची महाशक्ती आपल्याला संकटातून वाचवेल हीच ती श्रद्धा! जेंव्हा आस्तिक माणसाची सदसद्विवेकबुद्धी संकटकाळी अस्थिर होते तेंव्हा आस्तिक तिला देवापुढे घेऊन जातो व देवापुढे नतमस्तक, लीन होऊन त्या सदसद्विवेकबुद्धीला शक्ती, स्थिरता मिळवतो आणि मग स्थिर होऊन संकटाशी सामना करतो. शिवरायांचे मावळे हरहर महादेव म्हणून असेच शत्रूवर तुटून पडायचे. या श्रध्देला कोणी अंधश्रद्धा म्हणणे हे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मानवी मनाला देवाचा  आधार वाटणे यात चुकीचे ते काय? नास्तिक माणसांचा त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रचंड मोठा आत्मविश्वास असणे ही कौतुकास्पद गोष्ट असली तरी त्यांनी आस्तिक मनांना कमकुवत समजू नये किंवा आस्तिकांच्या देवश्रद्धेची चेष्टा करू नये.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा