https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

मनाचे सरकार!

सदसद्विवेकबुद्धी हेच मानवी मनातील सरकार!

निसर्ग निर्मित पर्यावरणीय परिस्थिती ही झाली  सर्वसाधारण गोष्ट व त्या परिस्थितीतील विशिष्ट वस्तुस्थिती ही झाली विशेष गोष्ट! उदाहरणार्थ कोरोनाची जागतिक साथ ही झाली निसर्गाची सर्वसाधारण गोष्ट तर आपल्या राज्य सरकारची कोरोना नियंत्रणासाठी चाललेली कायदेशीर धडपड ही झाली निसर्गातील आपल्या जवळ असलेल्या समाजाची विशेष गोष्ट! या दोन्ही गोष्टींना म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीला व विशेष वस्तुस्थितीला माणसाने योग्य नैसर्गिक प्रतिसाद कसा द्यायचा हे कोण ठरवणार तर एका बाजूने माणसाचे वैयक्तिक मन व दुसऱ्या बाजूने समाजाचे सामूहिक मन (समाजमन)! योग्य नैसर्गिक प्रतिसादातील योग्य हा शब्द महत्त्वाचा! याचे कारण म्हणजे योग्य काय व अयोग्य काय हा प्रश्न फक्त मनुष्याच्या मेंदूलाच पडतो. तो इतर प्राण्यांना पडत नाही. मनुष्य सोडून इतर प्राण्यांना योग्य तेच कळते. त्यांना अयोग्य हा शब्दच माहित नाही. मग हा प्रश्न फक्त मानवी मनालाच का पडावा? याचे कारण म्हणजे मानवी मनाला भौतिक वासनांबरोबर नैतिक भावनाही चिकटलेल्या आहेत. मानवी मनात असलेल्या प्रेम, करूणा, परोपकार इ. उदात्त भावना याच त्या नैतिक भावना होत. या भावनांना आध्यात्मिक भावना असेही म्हणता येईल. त्यासाठी मानवी मनात आत्मा असतो व त्या आत्म्याचा आतला आवाज म्हणजेच या नैतिक भावना अशीही कल्पना करता येईल. मानवी मनात मूलभूत भौतिक वासना व पूरक नैतिक भावना एकत्र निवास करतात. पण या वासना व भावनांचे गुणधर्म समान नाहीत. मग एकाच मनात असलेल्या या विविध गुणधर्मी वासना व भावनांत एकता (विविधतेत एकता) कशी निर्माण करायची? त्यासाठी मानवी मनात  असते सरकार! सदसद्विवेकबुद्धी हेच ते मानवी मनातील सरकार! हे सरकार भौतिक वासनांवर नैतिक भावनांचे संस्कार करीत त्या वासनांना पवित्र अर्थात सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय करते तर गोड शिरा या खाण्याच्या पदार्थाला आध्यात्मिक भावनेचा स्पर्श करून त्या नैसर्गिक पदार्थाला देवाचा प्रसाद करते. हे कर्म म्हणजे भौतिक निसर्ग व आध्यात्मिक देव यांना एक करण्याचे मोठे कर्म! हा कर्म प्रयोग म्हणजे कर्मकांड म्हणून काहीजण त्याला नावे ठेवतीलही. पण हे कर्मकांड वैज्ञानिक आहे व त्यात मानवी मनाची नैसर्गिक सहजता आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भौतिक वासना व नैतिक भावना यात ताळमेळ ठेवून त्यांच्यात संतुलन साधण्याचा मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी सतत प्रयत्न करीत असते. वासना व भावना यांच्यात ज्या बिंदूवर स्थिर होण्याचा हे मानवी मनातील सरकार प्रयत्न करते त्या मध्य बिंदूला आपण विवेक बिंदू असे म्हणूया! या मध्यवर्ती विवेक बिंदूवर स्थिर होऊन मनुष्याने वासना व भावना मिश्रित कर्म करणे म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाला योग्य प्रतिसाद देणे होय. पण इथेच पुन्हा गोची होते कारण समाजातील सर्व माणसांची मने व त्या मनातील त्यांचे मध्यवर्ती विवेक बिंदू सारखे नसतात. म्हणून मग योग्य काय व अयोग्य काय हा पुढे सामाजिक प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी मानव समाजाने मग संपूर्ण समाजमनाचे एक स्वतंत्र समाज सरकार निर्माण केले व त्या सरकारचा स्वतंत्र कायदा निर्माण केला. या कायद्यावर न्यायनिर्णय देण्यासाठी मग समाज सरकारचा भाग असलेली समाज न्यायालये निर्माण केली गेली. माझा स्वतःचा विवेक बिंदू हा दुसऱ्या माणसाच्या विवेक बिंदू पेक्षा श्रेष्ठ आहे असा समज जेंव्हा माणसाच्या मनात निर्माण होतो तेंव्हा त्या विवेक बिंदूला अहंकार चिकटलेला असतो. मग माणसा माणसांमधील अहंकारी विवेक बिंदू एकमेकांशी वाद घालीत बसतात. कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन हिंसक होतात. शेवटी हे विवेक बिंदूचे वाद समाज न्यायालयात न्याय निर्णयासाठी जातात. मग समाज न्यायालय समाज कायद्यावर बोट ठेवून स्वतःचा विवेक बिंदू (ज्याला न्याय बिंदू म्हणता येईल) वापरून अशा वादांवर न्याय निर्णय देते. खालच्या कोर्टाचा न्यायनिर्णय वाद घालणाऱ्या माणसांच्या विवेक बिंदूंना पटला नाही तर मग असमाधानी राहिलेला विवेक बिंदू हा वरच्या कोर्टात दाद मागतो. सगळ्यात शेवटी समाजाचे सर्वोच्च न्यायालय अंतिम न्याय निर्णय देते व मग अहंकारी विवेक बिंदूंच्या वादावर पडदा पडतो. केवढी भलीमोठी लांबलचक प्रक्रिया आहे ही विवेकी न्यायाची म्हणजेच योग्य या शब्दाची! सर्वांना समान फौजदारी कायदा आहे तसा सर्वांसाठी एकच समान नागरी कायदा असावा, वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असू नयेत अशी विविधतेत एकता साधू पाहणाऱ्या मानव समाजाची एक मागणी आहे. पण त्यासाठी सगळ्यांची सदसद्विवेकबुद्धी व सगळ्यांचा विवेक बिंदू एक व्हायला हवा. खरं तर सगळ्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी व तिचा विवेक बिंदू जर एक होण्यासाठी सर्वांनी आपल्या अहंकाराचा त्याग करण्याची गरज आहे. अशी नैसर्गिक जाणीव जेंव्हा सगळ्या माणसांच्या मनात निर्माण होईल तेंव्हा सर्वांचे विवेक बिंदू अहंकार मुक्त होतील व त्यातून माणसा माणसांतील अहंकारी वाद कमी होऊन समाज न्यायालयांना अशा वादग्रस्त केसेसची वाट बघत बसावे लागेल. असे झाले तर मग वकिलांना काम उरणार नाही. इतकेच नव्हे तर समाज सरकारचा भाग असलेल्या पोलीस व लष्करांची कामेही कमी होतील आणि शेवटी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकारणाला फाटे फुटणार नाहीत!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा