https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

तन, मन, धन फॉर्म्युला!

तन, मन, धनाचा फॉर्म्युला वापरा व मैत्री जुळवा आणि टिकवा!

माणसांचे संबंध का दुरावतात या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मानवी संबंध का जुळतात व टिकतात या प्रश्नाकडे वळले पाहिजे. अधिक खोलात जाऊन विचार केला तर बहुतांशी संबंध हे उपयुक्ततेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. आता या संबंधाचा काय फायदा म्हणजे काय उपयोग असा सोयीचा विचार बहुतेक माणसे करतात की नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे. एखाद्या आकर्षणातून एकत्र आलेली माणसे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे आकर्षण हे नव्याचे नऊ दिवस अशा तात्कालिक स्वरूपाचे असते. मग मानवी संबंध कसे जुळतात व ते कसे टिकतात हा विषय महत्त्वाचा ठरतो. मानवी संबंध जुळणे व टिकणे ही एक प्रक्रिया आहे व त्या प्रक्रियेला एक मूलभूत पाया, आधार आहे. हा पाया तीन मूलभूत तत्वांनी बनला आहे. तन-मन-धन हीच ती मूलभूत तत्वे! तन (शरीर) अर्थात शारीरिक उपयुक्तता. उदा. शारीरिक श्रम. मन म्हणजे भावना व बुद्धी यांचे मिश्रण. पण या मिश्रणात  उपयुक्ततेच्या दृष्टीने भावनेपेक्षा बुद्धी वरचढ ठरते. मानवी बुद्धीची उपयुक्तता म्हणजे ज्ञान व बौद्धिक हुशारीची उपयुक्तता. धन म्हणजे पैसा! पैशाने बऱ्याच गोष्टी बाजारातून विकत घेता येतात ज्या गोष्टी मानवी जीवनाला आवश्यक असतात. म्हणून मानवी जीवनात पैशाचे फार महत्व आहे. पण पैशाने मानवी संबंध जुळतात तसे ते बिघडतातही. याचे मुख्य कारण म्हणजे पैशाची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण न होणे. शारीरिक श्रम विकणारे मजूर व बौद्धिक श्रम विकणारे व्यावसायिक अशी तन व मनाची सामाजिक विभागणी करता येईल. या दोन्ही श्रमांना जोडणारा दुवा म्हणजे पैसा अर्थात धन! या तिन्ही गोष्टी जेंव्हा एकत्र येऊन त्यांची व्यावहारिक देवाणघेवाण कायम स्थिर राहते तेंव्हा मानवी संबंध जुळतात व टिकतातही. पण मन म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारख्या व्यावसायिकांचे विशेष ज्ञान व बौद्धिक कौशल्य किंवा हुशारी नव्हे. मानवी संबंधात व्यावहारिक ज्ञान व अक्कलहुशारी ज्याला इंग्रजीत कॉमन सेन्स म्हणतात हाही बुद्धीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या व्यक्तीकडे बुद्धीचा हा मूलभूत भागच नसेल तर मग अशा व्यक्ती बरोबर संबंध जुळणेच कठीण असते, मग ते टिकण्याची तर बातच नाही. हे सत्य आहे की फक्त हवापाण्याच्या मनोरंजक गप्पा मारण्यासाठी एकत्र आलेली मंडळी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. नीट बारकाईने बघितले तर समाज माध्यमांवर अशा मंडळींचा राबता असल्याचे दिसून येते. पण हे संबंध फार तकलादू असतात. म्हणून माझ्या मते फेसबुक मैत्री हा कायम टिकणारा प्रकार नव्हे! तन, मन व धन या तीन गोष्टींना वैवाहिक संसारात सुद्धा खूप महत्त्व आहे. गृहिणी असलेली पत्नी घरात संसारासाठी शारीरिक कष्ट उपसतेय व पती मात्र घराबाहेर जाऊन घरखर्च चालवण्यासाठी पैशाची थोडीही कमाई करीत नाही असा संसार किती दिवस टिकेल? या ठिकाणी मनातील प्रेम भावनेचा (ज्याला सोयीसाठी हृदय असा शब्द वापरलाय) प्रश्न निर्माण होतो. ज्या संबंधात तन (शरीर), मन (बुद्धी) व धन (पैसा) यांची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण सुरळीतपणे व तसेच सातत्याने चालू आहे तिथेच हृदयस्पर्शी प्रेम व त्या प्रेमावर आधारित हृदयस्पर्शी मैत्री निर्माण होऊ शकते व अशी मैत्री कायम टिकूही शकते. अशी मैत्री मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी तन, मन व धनाचा फॉर्म्युला वापरा!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा