https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

या पितरांनो या!

या पितरांनो या!

(१) आज गुरूवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२० हा भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस! आज आहे सर्वपित्री अमावास्या म्हणजे आपल्या पितरांचे सार्वत्रिक श्राद्ध घालण्याचा दिवस! श्राद्ध या शब्दात श्रद्धा हा शब्द आहे व श्रध्देत असते ती शुद्ध भावना! आपले पितर म्हणजे आपले दिवंगत आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा व अन्य नातेवाईक जे मृत पावले आहेत त्या सर्वांचे  आदरयुक्त स्मरण व पूजन करण्याचा आज दिवस! पितर म्हणजे पूर्वज!

(२) देवापुढे भक्ती भावाने ठेवलेला प्रसादाचा नैवेद्य देव खात नाही व पितरांपुढे आदर भावाने ठेवलेला श्राद्धाचा नैवेद्य पितर खात नाहीत हे सांगायला आम्हाला कोणत्याही पंडिताची गरज नाही. आम्हाला ते माहीत नाही असे जर या पंडितांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही हे सर्व का करतो हे जरा आम्हाला नावे ठेवणाऱ्या अशा लोकांनी नीट समजून घ्यावे. आपण भारतीय लोक आता जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यामागे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग आहे. त्यांच्या स्मृतिदिनाला त्यांचे स्मरण करून त्यांना आपण आदरांजली वाहतो की नाही? ती जर अंधश्रध्दा नाही तर मग आम्ही आमच्या पितरांना भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात व शेवटी सर्वपित्री अमावास्येला आमच्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जर आदरांजली वाहण्याचे कर्तव्य पार पाडीत असू तर ती अंधश्रद्धा कशी? हे मात्र खरे की जिवंतपणी आईवडिलांना त्रास देऊन ते मृत झाल्यावर त्यांना अशी धार्मिक आदरांजली वाहणे हा शुद्ध दांभिकपणा झाला.

(३) आम्ही आज जे जीवन जगत आहोत, ज्या काही थोड्याफार सुखसोयी उपभोगत आहोत त्यामागे आमच्या पितरांचे कष्ट आहेत, त्याग आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पितरांविषयी कृतज्ञ आहोत. त्याच कृतज्ञतेपोटी आज आम्ही  सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आमच्या सर्व पितरांचे स्मरण करून त्यांचे आदराने मनोभावे पूजन करून भावनिक श्रध्देने त्यांना श्राद्धाचा नैवेद्य दाखवत आहोत. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांचे स्मरण व पूजन करणे हे तर वंशजांचे कर्तव्यच आहे असे जर आमचे हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगत असेल तर त्यात चुकीचे काय आहे?

(४) मला माझे आजी-आजोबा आठवत नाहीत तसे माझ्या पत्नीलाही तिचे आजी-आजोबा आठवत नाहीत. त्यांचे फोटोही नाहीत. आम्हा दोघांच्या स्मरणात आमचे आईवडील आहेत, त्यांचा संसार आहे, त्यांनी आम्हाला मोठ्या कष्टाने कसे वाढवले हे सर्व आहे. या आठवणी आम्ही विसरूच शकत नाही. त्या अधूनमधून येतच असतात. पण हिंदू धर्मशास्त्राने पूर्वजांचे स्मरण व पूजन करण्यासाठी वर्षातून ठराविक काळ व त्या काळातला सर्वपित्री अमावास्येचा दिवस ही जी काय वंशजांसाठी सोय करून ठेवली आहे ती चांगलीच आहे.

(५) ही सर्व कारणमीमांसा माझ्या तार्किक मेंदूचे बौद्धिक आहे, पण त्यासोबत माझ्या आईवडिलांबद्दल असलेली माझी कृतज्ञतेची भावनाही आहे. माझ्या पत्नीला मात्र माझ्या बौद्धिक तर्कशास्त्राशी काहीही घेणेदेणे नाही. तिच्याजवळ आहे ती फक्त शुद्ध भावना! म्हणून तिने बाजारातून दाराला लावण्यासाठी आज हार आणला व दारात रांगोळी काढली. याच शुद्ध भावनेने की जणुकाही तिचे आईवडील व माझे आईवडील आज आमच्या घरी येणार आहेत. त्यांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे. मग तिने तिचे आईवडील व माझे आईवडील या चौघांसाठी एकच श्राद्धाचा नैवेद्य बनवला. त्यामागे पुन्हा एकत्र कुटुंबाची भावना! आम्ही तो नैवेद्य आमच्या सदनिकेच्या गॕलरीत त्यांचे स्मरण करीत आदर भावाने ठेवला. उदबत्ती लावून त्या नैवेद्याचे पूजन केले. ते करताना असे वाटत होते की जणूकाही आम्ही आमच्या घरी आलेल्या आमच्या आईवडिलांना घास भरवत आहोत. ही भावना फार महत्त्वाची आहे. याच आदर भावनेला हिंदू धर्मशास्त्राने धार्मिक अधिष्ठान दिले आहे. एवढी साधी गोष्ट काही लोकांना कळत नाही याचे आश्चर्य वाटते.

(६) आज आमच्या आईवडिलांच्या आठवणींने आमचे मन हेलावून गेले व मग माझ्या तोंडून पुष्पांजली या जुन्या हिंदी चित्रपटातील मुकेश या महान गायकाने गायलेले, आनंद बक्षी या मोठ्या गीतकाराने शब्दबद्ध केलेले, लक्ष्मीकांत प्यारेलाल या मोठ्या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले हे दर्दभरे गीत आपोआप बाहेर पडले "दुनिया से जानेवाले, जाने चले जाते है कहाँ"!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०
https://youtu.be/OstZ_yFGa1I

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा