https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

पितृ पंधरवडा!

पितृ पंधरवडा व सर्वपित्री अमावास्याच्या मागे असलेल्या भावना जेंव्हा रडतात!

जेंव्हा पासून या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली तेंव्हा पासून विविध जीव या पृथ्वीवर सतत पुनरूत्पादन करून आपआपली पिढी जतन करण्याचा प्रयत्नात आहेत. निरनिराळ्या  वनस्पती, मानवेतर प्राणी व मनुष्य प्राणी हेच कार्य करून या पृथ्वीतलावर स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा खरं तर निसर्ग निर्मित प्रचंड मोठा छापखाना आहे. हे बोलायला, लिहायला सोपे आहे पण मनुष्याच्या  भावनिक मनाला हे सहन करणे कठीण आहे. जुनी पिढी मरते व नवीन पिढी जुन्याची जागा घेते हा या छापखान्याचा भाग! पण जुनी पिढी नष्ट होते तेंव्हा जुन्या पिढीतल्या लोकांचे उभे संसार नष्ट होतात, राहतात फक्त त्या संपलेल्या संसाराच्या आठवणी व त्याही काही काळच! सध्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू आहे. सालाबाद प्रमाणे आलेला हा पितृ श्राद्ध पंधरवडा! येत्या गुरूवारी १७ सप्टेंबर, २०२० सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी आपल्या मृत झालेल्या आईवडिलाची, आजीआजोबाची आठवण म्हणून त्यांच्या स्मृतीला नैवेद्य द्यायचा. भले हा नैवेद्य त्यांना पोहोचत नसेल, भले काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील पण या वार्षिक आठवण क्रियेमागे भावना आहेत हे विसरून कसे चालेल? का पुनरूत्पादन हा नैसर्गिक छापखाना आहे म्हणून या भावनांची चेष्टा करायची? मृत आईवडील, आजीआजोबा यांना दाखवलेला नैवेद्य कावळ्यानेच खाल्ला पाहिजे असे काही नसते. ही झाली अंधश्रद्धा. कोणाच्याही मुखात तो गेला तरी काही फरक पडत नाही. मी जेंव्हा माझ्या सद्याच्या ६४ वयात माझे आईवडील आठवतो तेंव्हा त्यांचा संपूर्ण संसार माझ्यापुढे उभा राहतो. त्यांच्या त्या संसारातील त्यांची ती धडपड, लगबग माझ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. काय भयंकर सत्य आहे या निसर्गाचे! माझे वडील अगोदर गेले तेंव्हाच त्यांचा तो संसार मोडला. मग आईही गेली आणि मग तो संसारच बघता बघता नष्ट झाला. आजीआजोबा यांचा संसारच काय त्यांचे चेहरेही मला नीट आठवत नाहीत. हा त्या निसर्गाचा खेळ! आता मी ६४ वयाचा तर माझी बायको ६० वयाची. आमची मुलगी मोठी होऊन तिच्या संसारात व्यस्त झालेली. पण आम्हा नवरा बायकोचा संसारही हळूहळू लयाला चालला आहे, तो एक दिवस माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या मृत्यूने संपणार आहे याची जाणीव झालीय. मध्येच हा दुष्ट कोरोना थयथयाट घालतोय. त्यामुळे वातावरण तसेही भयावह झालेय. पण भावना रडतात हो! या पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा