https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

समाजकार्याचा जेंव्हा पोपट होतो!

#couplechallenge एक बाजार कल्पना!

स्त्रियांना काय आवडते, त्या कोणता ड्रेस घालतात व त्यांच्या पुरूष जोडीदारांनाही काय आवडते वगैरेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या तरी मार्केटिंग कंपनीने बहुतेक ही #couplechallenge ची भन्नाट कल्पना काढलीय की काय असे या सकाळ (सांगली परिसर) वृत्तपत्रातील बातमीतून दिसत आहे. या लोकांचे हे असे धंदेवाईक डोके चालते व मी उगाच असल्या गोष्टींना महत्व देऊन लोकांना सावध करण्याचे समाजकार्य हाती घेतले. या बातमीने माझ्या या उतावळ्या समाजकार्याचा पुरता पोपट झाला. काय अर्थ राहिला नाही या फेसबुकवर गंभीर, वैचारिक लेखन करण्याला!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.९.२०२०

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

देवा, सर्वांना सुखी व शांत ठेव!

देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव!

(१) निसर्गात देव आहे व तो निसर्गाचा निर्माता व नियंता आहे असे मानून "देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव" अशी सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना कितीजण करत असतील? मुद्दा हा आहे की, अशी प्रार्थना करून सर्व जग व त्या जगातील सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे सुखी व शांत होऊ शकतात का?

(२) वनस्पतीजन्य प्राण्यांना मारून मांसाहारी हिंस्त्र प्राणी वनस्पतीजन्य प्राण्यांच्या मांसावर जगतात तेंव्हा वरील प्रार्थना अशी हिंसा रोखू शकत नाही हे सत्य आहे. तसेच तुम्ही दुसऱ्यांचे कितीही भले चिंता, दुसरी माणसे तुमचे हित जपतीलच याची शास्वती नाही. तुम्ही इतरांच्या शांतीची प्रार्थना कराल, पण तुमच्या अशांतीचे कारण बनणाऱ्या उपद्रवी माणसांचे तुम्ही काय कराल?

(३) माणूस हळूहळू उत्क्रांत झाला व मानवी संस्कृतीही हळूहळू विकसित झाली. उत्क्रांती ही झटपट क्रांतीची प्रक्रिया नव्हे. निसर्गाच्या विज्ञानाविषयी सुशिक्षित झालेला माणूस हा निसर्गाच्या व समाजाच्या पर्यावरणाविषयी सुसंस्कृत असेलच असे नाही. तसे असते तर मग मानव समाजाला पर्यावरणीय रक्षणाचे व सामाजिक सुसंस्कृतपणाचे कायदे करावेच लागले नसते.

(४) तुमच्या चांगुलपणाकडे अर्थात तुमच्या सुसंस्कृतपणाकडे पाठ फिरवून असंस्कृतपणा इतकेच नव्हे तर हिंसक गुन्हेगारीपणा दाखवून तुमच्यावर उलटणाऱ्या माणसांबरोबर तुमचे वर्तन कसे असेल? मानसिक समाधान म्हणून सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना ठीक, पण प्रत्यक्ष व्यवहार हे अशा आध्यात्मिक देव प्रार्थनेवर आधारित असू शकत नाहीत.

(५) खरं तर, निसर्गात देव आहे असे मानून चालले तरी तो देव तुम्हाला देवभोळे व्हा असे सांगत नाही तर व्यवहारी व्हा असेच सांगतो. या व्यवहाराचे मूलभूत नैसर्गिक तत्व काय तर जशास तसे वागणे. तुमच्यावर अन्याय करून सुसंस्कृतपणाने जगण्याचा तुमचा हक्क जर कोणी बळाने हिसकावून घेऊ लागला तर तुम्ही त्याच्यापुढे देवाची प्रार्थना करीत बसणार की त्याला तुमचा जशास तशाचा हिसका दाखवून वठणीवर आणणार? फौजदारी कायदा तर हेच शिकवतो ना!

(६) स्वभाव गुणधर्मानुसार समाजात सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. आंतरमानवी संबंधातून निर्माण होणाऱ्या नात्यांचेही तीन प्रकार निरीक्षण व अभ्यासातून माझ्या लक्षात आले आहेत. पहिला प्रकार म्हणजे वीट येऊन संपृक्त अवस्था प्राप्त झालेली मृत नाती, दुसरा प्रकार म्हणजे सद्या अचल पण भविष्यात चल होऊ शकणारी संभाव्य उर्जेची अचल नाती व तिसरा प्रकार म्हणजे प्रेम व व्यवहाराच्या संततधारेने खेळती राहिलेली वाहत्या उर्जेची चल नाती!

(७) आंतरमानवी नातेसंबंधातील वरील तीन प्रकारचे वर्गीकरण मी मनुष्य स्वभावाच्या गुणधर्मानुसार केले आहे. पदार्थांच्या गुणधर्मा नुसार वागणे म्हणजे जशास तसे वागणे. असे गुणधर्मीय वर्तन हेच जर निसर्गाचे नैसर्गिकत्व आहे तर मग तेच निसर्गातील देवाचे देवत्व आहे असे तार्किक अनुमान निघते.

(८) या निसर्ग नियमाला जर निर्जीव पदार्थ, मानवेतर सजीव पदार्थ व माणूस हे सगळेच जण बांधील आहेत तर मग निसर्गातील देव या नियमापासून कसा मुक्त राहील? देवाची भक्ती किंवा अध्यात्म हे सुद्धा या नियमापासून मुक्त होऊ शकत नाही किंवा अपवाद होऊ शकत नाही असे मला वाटते.

(९) म्हणून प्रभो गुणधर्मा असेच निसर्गातील देवाचे नामस्मरण करीत जशास तसे नियमाने गुणधर्मीय वर्तन करणे हीच निसर्गातील देवाची भक्ती होय, देवपूजा होय असे माझे वैयक्तिक मत आहे. मी निसर्गातील देवाला निसर्गाचा आधार मानत असल्याने निसर्गाच्या विज्ञानातच मी देवाचा धर्म बघतो. माझ्या या वैयक्तिक मताशी सगळेजण सहमत होणार नाहीत हे मला माहित आहे. पण हे माझे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वादविवाद घालू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.९.२०२०

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

व्यवहारज्ञान घेऊन व्यवहारी बना!

व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

अन्न, वस्त्र, निवारा ही मनुष्याच्या जीवनावश्यक  गरजा भागविणारी मूलभूत साधने! ही साधने निसर्गात कच्च्या स्वरूपात सापडतात. म्हणजे जमीन, हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांच्या सोबत नैसर्गिक बी बियाणे या गोष्टी निसर्गात फुकट सापडतात ज्यातून अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत साधनांची पक्क्या स्वरूपात निर्मिती करता येते. म्हणजे निसर्ग माणसाला कच्चे भांडवल फुकट पुरवतो. त्याबदल्यात निसर्गाला हवे असतात ते माणसाचे बौद्धिक व शारीरिक श्रम. मानवी श्रम व निसर्गाकडून मिळणारे फुकटचे कच्चे भांडवल यांच्यात भौतिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असते व ती व्यावहारिक देवाणघेवाण नैसर्गिक असते ज्यात व्यवहार असतो. निसर्गाबरोबरचा हा मूलभूत भौतिक व्यवहार पार पाडल्यानंतर पुढे सुरू होते ती आंतरमानवी व्यावहारिक देवाणघेवाण व या देवाणघेवाणीचे सामाजिक माध्यम असते तो म्हणजे पैसा. आंतरमानवी भौतिक व्यवहार हा मुख्यत्वे पैशाच्या माध्यमातून होतो. निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार व माणूस व माणूस यांच्यातील पूरक भौतिक व्यवहार यांचे नियमन दोन कायद्यांकडून होते ते म्हणजे निसर्गाचा मूलभूत नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा. मानवी जीवन टिकून राहण्यासाठी स्री व पुरूष यांच्यातील लैंगिक पुनरूत्पादन हा सुद्धा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. कारण स्त्री व पुरूष निसर्गानेच निर्माण केले आहेत व त्यांच्यात लैंगिक वासना ही सुद्धा निसर्गानेच निर्माण केली आहे म्हणजे कच्चे भांडवल हे निसर्गानेच पुरवले आहे. या कच्च्या भांडवलावर होणारा स्त्रीपुरूषातील लैंगिक व्यवहार हा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. पण याच निसर्ग प्रेरित मूलभूत भौतिक व्यवहारातून मानव समाजाची निर्मिती झाली. मग पुढे या मूलभूत भौतिक लैंगिक व्यवहाराचे सामाजिक नियमन करणे गरजेचे झाले. त्यातून वैवाहिक संबंध यासारखे पूरक भौतिक व्यवहार निर्माण झाले व मग या पूरक भौतिक व्यवहारांचे नियमन करण्यासाठी त्याप्रकारचे पूरक सामाजिक कायदे निर्माण झाले. निसर्गाचा मूलभूत भौतिक कायदा काय किंवा समाजाचा पूरक भौतिक कायदा काय हे कायदे निसर्ग व माणूस व त्याबरोबर माणूस आणि माणूस यांच्यातील भौतिक व्यवहारांचे अर्थात भौतिक व्यावहारिक देवाणघेवाणीचे नियमन करतात. या भौतिक व्यवहारांत जे काही देवाचे अध्यात्म घुसले आहे ते आभार प्रदर्शनाचे अध्यात्म आहे म्हणजे निसर्गाकडून मनुष्याला जे आयते, फुकट कच्चे भांडवल मिळते त्याबद्दल निसर्गराजा किंवा निसर्गातील देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अध्यात्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण शेवटी या सगळ्याच्या पाठीमागे निसर्गाचा भौतिक व्यवहार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.९.२०२०

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

जंगली जनावरांच्या हिंस्त्र वर्तनाचा हळूहळू त्याग करीत जाऊन मानवी वर्तन सुधारत गेले व ते सुसंस्कृत झाले. निसर्ग विज्ञानाविषयी सुशिक्षित होणे व सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे यात फरक आहे. सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत असतोच असे नसते. तसे असते तर सुशिक्षित माणसांनी सामाजिक गुन्हे केलेच नसते. सामाजिक सुसंस्कृतपणाचे मी तीन भाग पाडले आहेत. पहिला भाग हा उच्च श्रेणीचा स्वर्गीय भाग म्हणजे सुसंस्कृत भाग, दुसरा भाग हा मध्यम श्रेणीचा अर्ध स्वर्गीय व अर्ध नरकीय भाग म्हणजे असंस्कृत भाग व तिसरा भाग हा कनिष्ठ श्रेणीचा नरकीय भाग म्हणजे गुन्हेगारी भाग! यातील सुसंस्कृत भागाला प्रोत्साहन देण्याचे व असंस्कृत भागाचे नियंत्रण करण्याचे काम दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) करतो तर गुन्हेगारी भागाचे नियंत्रण करण्याचे काम फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) करतो. आता हे तीन भाग पुढील तीन उदाहरणांसह स्पष्ट करतो. स्वैराचारी लैंगिक वृत्तीला लगाम घालून विवाह बंधनात राहणारी किंवा एकटे राहूनही स्वैराचार न करणारी माणसे सुसंस्कृत होत, विवाह करूनही जोडीदाराला फसवून विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणारी माणसे असंस्कृत होत व एखाद्याच्या इच्छेविरूद्ध लैंगिक बलात्कार करणारी माणसे गुन्हेगार होत. सामाजिक सुसंस्कृतपणा हा नरकापासून स्वर्गापर्यंतचा अत्यंत अवघड प्रवास असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण सुसंस्कृतपणा हा कधीही एकतर्फी असू शकत नाही, जसे प्रेम हे एकतर्फी असू शकत नाही. सुसंस्कृतपणाची मैत्री असंस्कृतपणाशी कधीही होऊ शकत नाही मग सुसंस्कृतपणाने गुन्हेगारीला जवळ करणे हा तर टोकाचा प्रश्न जो तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा सुसंस्कृतपणाच्या चांगुलपणाला हिंस्त्र गुन्हेगारीचे आव्हान निर्माण होते. मानव समाज हा सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगार अशा तीन वर्गात विभागला गेला आहे. तसे नसते तर मग दिवाणी कायद्याबरोबर फौजदारी कायद्याची गरज मानव समाजाला भासलीच नसती. वरील तीन वर्गात विभागल्या गेलेल्या मानव समाजात राहताना जशास तसे या धोरणाचा नाइलाजाने अवलंब करावा लागतो. या धोरणानुसार कधी कोमल तर कधी कठोर वागावे लागते. संपूर्ण सुसंस्कृतपणा असलेली आदर्श समाजव्यवस्था अजून खूप दूर आहे. अर्थात स्वर्ग अजून खूप लांब आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

आयुष्याच्या ओंजळीत निसर्गाचे दान?

आयुष्याच्या ओंजळीत विविधतेने नटलेल्या अवाढव्य निसर्गाचे काय आणि किती भरून घेणार?

निसर्गाचा प्रचंड मोठा पसारा हा विविधतेच्या अनेक तुकड्यांत विखुरलेला आहे. यातील एकेक तुकडाच इतका मोठा आहे की या सर्व तुकड्यांनी बनलेला निसर्ग प्रचंड मोठा झाला आहे. किती प्रकारचे विविध सजीव व निर्जीव पदार्थ आणि या पदार्थांच्या किती ज्ञान शाखा! बापरे, यातील काय म्हणून व किती उचलणार? निसर्गाने भरभरून दिले पण दुबळी मनुष्याची झोळी! ही झोळी खरं तर निसर्गानेच दुबळी बनविली आहे ओंजळीएवढे आयुष्य मनुष्याला देऊन! या छोट्याशा ओंजळीत काय आणि किती मावणार अवाढव्य निसर्गाच्या विविध तुकड्यांचे? उपाशी माणसाला जेवणाचे ताट न देता अन्नधान्याचे कोठार व मोठी फळबागच दान दिली तर तो काय आणि किती खाईल? एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे अन्नपदार्थ बघून त्या माणसाला त्या पदार्थांविषयी नक्कीच वीट, किळस, मळमळ, तिटकारा निर्माण होईल.  म्हणून मग निसर्गातील किती गोष्टींच्या मागे लागायचे, त्यांचा किती लोभ करायचा अर्थात कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे. तसे नाही कळले तरी निसर्ग थांबवतो! उदाहरणार्थ, उपाशी माणसाला खायला बिस्कीटचा मोठा पुडा दिला तर पहिले बिस्कीट खाताना त्याला जो आनंद मिळेल तो हळूहळू पुढील बिस्कीटे खाताना कमी कमी होत जाईल व पुढे पुढे तर बिस्कीट खाण्याची त्याची इच्छाच नष्ट होईल. अशा अती तृप्त अवस्थेला संपृक्तता म्हणतात. तृप्ती, समाधान अवस्था ठीक पण त्यापलिकडे असलेली अती तृप्ती, अती समाधानाची स्थिती  किळसवाणी होय. एखाद्या निवडक गोष्टीचा ध्यास घेऊन तिचा अभ्यास करणे वेगळे व त्या गोष्टीचा लोभ जडून तिचे वेड लागणे वेगळे! कुठे थांबायचे ही अक्कल माणसाला आली नाही तर ती अक्कल निसर्ग शिकवतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

अनैतिकतेच्या पायावर उभा नैतिकतेचा डोलारा!

अनैतिकतेच्या पायावर उभा मानवी नैतिकतेचा डोलारा!

(१) सृष्टीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्याशिवाय मानवी संस्कृतीचा अभ्यास अपूर्ण होय. मनुष्य प्राणी हा पर्यावरणीय साखळीचा कळस होय. या कळसाचा पाया काय तर निर्जीव पदार्थ, मग अर्धसजीव वनस्पती, मग वनस्पतीवर जगणारे शाकाहारी सजीव प्राणी, मग शाकाहारी सजीव प्राण्यांवर जगणारे मांसाहारी सजीव प्राणी व सर्वात शेवटी या सगळ्यांचे मिश्रण असलेला मनुष्य प्राणी जो शाकाहारी व मांसाहारी असा दोन्हीही आहे.

(२) ही पर्यावरणीय साखळी कशी उत्क्रांत होत गेली तो सृष्टीचा इतिहासही मोठा रोमांचकारक आहे. पण मनुष्यापर्यंतची उत्क्रांती पूर्ण झाली म्हणजे ती संपली असे नाही. ती चालूच आहे. पण आतापर्यंतच्या उत्क्रांतीतून तयार झालेल्या  पर्यावरणीय साखळीतील विविध सजीव व निर्जीव पदार्थ तरी कुठे परिपूर्ण, निश्चित वागत आहेत. नाहीतर पावसाचा लहरीपणा दिसलाच नसता. सृष्टीच्या पर्यावरणीय साखळीतील मानवेतर प्राणी व निर्जीव पदार्थ जर अधूनमधून लहरीपणाने वागतात, तर मग त्यांच्या मूलभूत पायावर उभा असलेला माणूस अधूनमधून लहरीपणाने वागला नाही तर नवलच! सृष्टीतील लहरीपणा व अनिश्चितता मानवी जीवनातही उतरली आहे.

(३) मानवी जीवनाचा व मानवी संस्कृतीचा मूलभूत पाया काय तर पर्यावरणीय साखळी! या साखळीच्या तळाला व मध्यवर्ती भागात काय आहे तर दलदल, हिंस्त्रपणा! चिखलात कमळ उमलते म्हणून चिखलाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मानवी जीवनाचे कमळ हे चिखलातून उमललेले आहे आणि या कमळाचे बंध चिखलाशी कायम आहेत. पर्यावरणीय साखळीतून मनुष्य उत्क्रांत झाल्यावर त्याची पुढील प्रगती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे चाललेला अविरत प्रवास! सृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे असला तरी प्रकाशाचा पायाच मुळी अंधार आहे म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे हे विसरून कसे बरे चालेल?

(४) पण माणूस जरी प्रकाशात आला असला तरी अंधाराने त्याची पाठ सोडलेली नाही. हे म्हणजे चिखलाने कमळाची पाठ न सोडणे असे आहे. हे असे आहे की, निसर्गातील देवाने मनुष्याला स्वर्गात आणून सोडले तरी त्याला नरकापासून मुक्त केले नाही, प्रकाशात आणले तरी अंधारापासून मुक्त केले नाही व नैतिकतेचा सुगंध दिला तरी अनैतिकतेच्या दुर्गंधीपासून मुक्त केले नाही. तसे नसते तर मग आपल्या समाजाची रचना जातीपातीच्या उतरंडीवर उभी राहिली नसती, कायदेशीर अर्थव्यवस्थेबरोबर बेकायदेशीर समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली नसती व सुसंस्कृत समाजात अंडरवर्ल्डची उपस्थिती दिसली नसती.

(५) मानवी वस्तीची निर्मिती जंगलाशेजारीच झाली आहे. मानवी वस्तीला स्वर्ग व जंगलाला नरक मानले तर मग नरक हाच स्वर्गाचा शेजारी आहे असे मान्य करावे लागेल. पण जंगलांना नरक मानून जंगले नष्ट करता येतील का? तसे केले तर जंगलातील जैव विविधता नष्ट होईल व हवेतील प्राणवायू व पाऊसपाणी नष्ट होऊन मनुष्याचे जगणेच अशक्य होईल. सत्य काय तर अंधाराशिवाय प्रकाश नाही, जंगलाशिवाय मनुष्य जीवन नाही, चिखलाशिवाय कमळ नाही व अनैतिकतेशिवाय नैतिकता नाही. म्हणजेच नरकाशिवाय स्वर्ग नाही. स्वर्गाची वाट नरकातून जाते जशी गुलाबाची वाट काट्यांतून जाते. हेच तर निसर्गाचे वैज्ञानिक सत्य आहे. नरक हाच स्वर्गाचा पाया हेच ते आश्चर्यकारक नैसर्गिक सत्य!

(६) नरकापासून जशी स्वर्गाची मुक्ती नाही तशी अनैतिकतेपासून नैतिकतेची मुक्ती नाही. खरं तर अनैतिकतेच्या पायावरच मानवी नैतिकतेचा डोलारा उभा आहे. अर्थात मानवी नैतिकतेची इमारत अनैतिकतेच्या मूलभूत पायापासून अलग करता येणार नाही जसे मनुष्य जीवन हे जंगलापासून अलग करता येणार नाही. पण नरक व स्वर्ग, जंगल व मनुष्य जीवन व तसेच अनैतिकता व नैतिकता यांना आपआपल्या मर्यादा आहेत. निसर्गातील देवाने कोणालाही अमर्यादित स्वातंत्र्य बहाल केलेले नाही. प्रत्येक  जण वाजवी मर्यादांच्या बंधनात आहे.

(७) निसर्गातील देवाने घालून दिलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा जो कोणी ओलांडेल त्याचा विनाश अटळ आहे. त्यापासून स्वर्ग व नरक, प्रकाश व अंधार, नैतिकता व अनैतिकता या दोन्ही गोष्टी मुक्त नाहीत. म्हणून मानवी वस्तीने जंगले तोडू नयेत, जंगलावर अतिक्रमण करू नये. पण मानवी वस्तीच्या शेजारी जंगल कायम राहणार हे नक्की! कारण जंगल हाच मनुष्य जीवनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या शेजारी शेजारी राहणार. त्यातून माणसे अधूनमधून जंगलात जाण्याचे धाडस करणार व जंगली जनावरे सुद्धा मानवी वस्त्यांत येण्याचे धाडस करणार. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या यांच्या सीमारेषा निश्चित करून मध्ये कुंपण हे घातलेच पाहिजे. असे कुंपण हीच दोन्हीमधील मर्यादेची लक्ष्मणरेषा असेल.

(८) या लेखाचे तात्पर्य काय, तर मनुष्याला त्याच्या आयुष्यात पूर्ण सुख व शांती लाभूच शकत नाही. कारण स्वर्गाचा पायाच मुळी नरक आहे. या पायाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कमळाला चिखलाकडे दुर्लक्ष करून चालेल का? पण म्हणून काय कमळाने चिखलाला सतत घाबरून रहावे? तसेच सद्या आलेल्या कोरोना महामारीचे आहे. हा कोरोना विषाणू कुठून आला? जंगलातून आला की मानवी वस्त्यांतच तयार झाला याचा शोध घेताना हेही ध्यानात ठेवले पाहिजे की सद्याचा कोविड-१९ हा कोरोना विषाणू निघून गेला किंवा नष्ट केला गेला तरी पुन्हा अशा प्रकारचे विषाणू निर्माण होणारच नाहीत असे नाही. याचे कारण म्हणजे  स्वर्गाला कायम नरकाची सोबत आहे व मानवी वस्त्यांना कायम जंगलाची सोबत आहे.

(९) सद्या तरी कोरोनाची दहशत भयंकर आहे. मास्क लावून बाजारात फिरताना माणसे पूर्वीसारखी आनंदी दिसत नाहीत. वातावरणात उदासीनता आहे. कारण कोरोनाचा दंश भयंकर आहे. त्याचे विष उतरून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना निगेटिव्ह झाला तरी अशा रूग्णाला सोडून जाताना कोरोना रूग्णाचे अवयव फार अशक्त करून जातो. एकप्रकारचे अपंगत्वच ते! काही माणसे कोरोनातून मुक्त झाल्यावरही अवयव अशक्त व पुढे निकामी झाल्याने मृत्यू पावतात. प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे काल ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले ते कोरोनामुक्त झाल्यानंतर! का तर कोरोना दंशाने त्यांची फुफ्फुसे व इतर अवयव निकामी झाले म्हणून. हे सर्व भयंकर आहे.

(१०) निसर्गातील देवाने मनुष्याला पर्यावरणीय साखळीच्या सर्वोच्च पदावर आणून खरंच स्वर्ग दाखवला म्हणून त्या देवाचे आभार मानणे हे योग्यच होय. पण याच देवाने या स्वर्गाचा पाया नरक आहे हे निश्चित करून नरकापासून स्वर्ग मुक्त नाही हे मनुष्याला बजावले आहे. हा देव याच पायाभूत नरकातून मनुष्यापुढे कायमच काहीना काहीतरी जगण्याची आव्हाने, संकटे निर्माण करीत असतो. त्याबद्दल या देवाला काय म्हणावे? मनुष्याने त्याचे आभार मानावेत की अशा संकटांशी लढण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना करावी?

-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

#कपलचॕलेंज एक हलकट कल्पना!

#couplechallenge एक हलकट कल्पना!

दुसऱ्यांच्या बायका बघून समाधान मानणाऱ्या कोणत्या तरी भुक्कड आंबट शौकिनाने ही #couplechallenge ची भन्नाट कल्पना काढलेली दिसतेय! लोकांना कोरोनाने आणि लॉकडाऊनच्या बेकारीने त्रस्त केलेय आणि काही लोकांना असल्या कल्पना सुचतात आणि काहीजण त्याला बळीही पडतात. कसले #challenge आणि कसले काय!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०

मी तसा भित्राच!

मी तसा भित्राच!

पुरूषांनी घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकताना काळजी घ्यावी व शक्यतो असे फोटो टाकू नयेत याविषयी मी आज दोन पोस्टस फेसबुकवर लिहिल्या. त्यावर पाठिंबा व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या कमेंटस आल्याने माझ्या या दोन्ही पोस्टस स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरल्या. या दोन्ही पोस्टसमुळे मी मागासलेला, जुनाट विचाराचा आहे असाही समज निर्माण झाला. याविषयी मला एवढेच म्हणायचे आहे की, मला जे योग्य वाटले ते मी लिहिले. कोणत्याही स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा घालणे हा जर भित्रेपणा असेल तर तो मी माझ्यापुरता जरूर करणार व मी तसा भित्रा आहे असे जाहीरपणे लोकांना सांगणार. मग लोकच ठरवतील की माझ्याशी मैत्री करायची की नाही व केली असेल तर ती ठेवायची की नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

फेसबुकवर घरातील स्त्रियांचे फोटो?

#challenge
फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो पुरूषांनी शेअर करावेत की करू नयेत, एक आव्हान!

ज्या लोकांना आपल्या बायको, मुली, सूना, आया बहिणींचे फोटो फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर एक आव्हान व मर्दुमकी म्हणून बिनधास्त टाकायचेत त्यांनी ते खुशाल टाकावे. कोणी फेसबुक इनबॉक्स मध्ये काय केले हे बघण्यापेक्षा अशा व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी पटतायत का बुद्धीला ही गोष्ट महत्त्वाची. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हलकट टोळीच्या हनी ट्रॕपमध्ये मीही एकदा सापडलो. आता लोक म्हणतील काका पण चाबरट आहेत. मग कशाला मोठ्या गोष्टी करतात आणि लोकांना शहाणपण शिकवतात. पण मीही माणूस आहे. मी फसलो, चुकलो पण घाबरलो नाही. भले भले चुकतात त्यात माझे काय? चुकलो म्हणजे चुकलो? पण मी आता आदळाआपट करीत नाही तर माझ्या चुकीतून लोकांना सावध करतो. काय केले असेल त्या हनी ट्रॕप टोळीने! माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझे बायको बरोबरचे जे फोटो फेसबुकवर टाकले होते तेच मला व्हॉटसॲपवर पाठवून देऊन मला पैसे मागितले. मग मी ते संभाषण वगैरेचे स्क्रीन शॉटस घेऊन डोंबिवली पोलीस स्टेशन व ठाणे सायबर गुन्हे शाखेस लगेच ईमेलने लेखी तक्रार केली. आता ती टोळी मी त्यांच्या धमकीला जुमानले नाही म्हणून माझ्या बायकोच्या फोटोंचा कदाचित गैरवापरही करतील. मग विचार आला की बायकोचे फोटो फेसबुकवर टाकले नसते तर बरे झाले असते. मी नंतर माझ्या बायकोचे ते सगळे फोटो फेसबुकवरून डिलिट केले. माझ्या मुलीने तर मला सक्त ताकीद दिलीय की तिचे फोटो कधीही फेसबुक किंवा कोणत्याच समाज माध्यमावर टाकायचे नाहीत म्हणून. मुलगी एम.बी.ए. व मोठ्या कंपनीची व्यवस्थापक आहे. पण ती जेंव्हा मला हे सांगते तेंव्हा ती मागासलेल्या विचाराची झाली का? फेसबुकवर काही नासके आंबे घुसले आहेत. एक नासका आंबा खरंच आंब्याची अख्खी करंडी नासवतो. विषाची परीक्षा का घ्या? तरीही जर कोणाला आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकण्यात कौतुक वाटत असेल तर त्यांनी घरातील त्या स्त्रियांची परवानगी घेऊन खुशाल टाकावेत. पण तत्पूर्वी फेसबुकवर अशाही गोष्टी चालतात याचीही त्यांना कल्पना द्यावी. बाकी आपण सूज्ञ आहातच!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

#कपलचॕलेंज!

#challenge 
तुमची बायको दाखवा,
तुमची सुंदर मुलगी दाखवा,
अशा रिकाम्या परंतु #भविष्यात_घातक_ठरू_शकणाऱ्या_चॅलेंजस चा महापूर सध्या FB वर पहायला मिळतो आहे.#आपलं_प्रदर्शन_जगात_जाते_कृपया हे आपण टाळले पाहिजे F.B वर चांगले लोक जेवढे  आहेत तेवढे  वाईट आहेत हॅकर्स आहेत 
FB वरून मुलींचे व स्त्रियांचे फोटो घेऊन घाणेरड्या पेजेस वर टाकण्याचे नीच प्रकार सातत्याने होत असताना, असले प्रकार होत आहे. आणि यात सुशिक्षित म्हणवणारे  लोकच दिसून येतात..

आपल्या घरातील लक्ष्मी, स्त्रिया प्रदर्शनाची वस्तू आहेत का? 
उद्या आपल्या घरातील स्त्रीच्या फोटो सह चुकीची पोस्ट दिसली तर दोष कुणाला द्यायचा..?
याचा ही विचार करायला हवा...
 
अशी रिकामे आव्हाने घेऊन काय दाखविले जाते..??

आव्हान स्वीकारायचे तर,
स्वच्छतेचे, 
कोरोना विरुद्ध लढण्याचे,
या अवघड काळात अन्न, वस्त्र वाटपाचे
किमान चार विद्यार्थ्यांना वही पुस्तक देण्याचे घ्यायला हवे....

कृपया जरा तरी विचार करा....

(फेसबुक वरून साभार)

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

देव भौतिक आहे!

निसर्गातला देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे!

(१) मानवी शरीर हे जर भौतिक आहे तर मग निसर्गाची रचना व व्यवस्थाही ही सुद्धा भौतिक मानण्याशिवाय पर्याय नाही. याच तर्काने मानवी शरीराचा राजा (मेंदू) हा जर भौतिक तर मग निसर्गाचा राजा (देव) हा सुद्धा भौतिक आहे असेच मानावे लागेल. तसे भौतिक आहे म्हणून तर मानवी मेंदू हा निसर्गातून दोन मुख्य भौतिक गोष्टी वसूल करण्यात सतत व्यस्त आहे. त्या म्हणजे भौतिक सुखाचे आर्थिक लाभ आणि भौतिक शांतीची राजकीय सुरक्षितता!

(२) कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळण्यासाठी जर देवापुढे प्रार्थना केली जात असेल तर अशी प्रार्थना ही राजकीय सुरक्षिततेतून भौतिक शांती मिळावी म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय व अशा मुक्तीसोबत अर्थचक्र चालू होऊन भौतिक गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची सोय व्हावी अशी अपेक्षा देवाकडून करीत तशी प्रार्थना जर देवापुढे केली जात असेल तर तीही आर्थिक लाभातून भौतिक सुख मिळावे म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय. आता या दोन्ही प्रार्थनेमध्ये जर मनुष्याचा भौतिक स्वार्थ दडला आहे तर मग अशा देव प्रार्थनेत कोणती आध्यात्मिकता आहे? भौतिक सुख व शांतीचा ध्यास असलेली देव प्रार्थना ही कदापि आध्यात्मिक होऊ शकत नाही.

(३) भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसे अशी आहेत की त्यांना प्रेम, करूणा यासारख्या भावनांचा ओलावा देत (या ओल्या भावनांना हृदय असे संबोधण्यात येते) दिवाणी (सिव्हिल) बुद्धीचा (शांत डोक्याचा) हळूवार, हलका धक्का देत त्यांच्याबरोबर आर्थिक सुखाची देवाणघेवाण करावी लागते अर्थात असे आर्थिक व्यवहार करावे लागतात. पण अशा आर्थिक व्यवहारांत केवळ माणुसकीचा भावनिक ओलावा (हृदय) दडलाय म्हणून असे व्यवहार हे आध्यात्मिक होऊ शकत नाहीत. ते भौतिकच होत! त्यांना फार तर कोमल भौतिक आर्थिक व्यवहार म्हणता येईल.

(४) पण भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसांना माणुसकीचा ओलावाच कळत नाही. त्यांची वृत्ती हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे जंगली झालेली असते. उदा. खून, बलात्कार यासारखे गुन्हे करण्यात पटाईत झालेले सराईत गुन्हेगार. अशा गुन्हेगारांना दिवाणी (सिव्हिल) स्वरूपाचा आर्थिक व्यवहार काय कळणार? अशा जंगली  लोकांना फौजदारी (क्रिमिनल) बुद्धीचा (तापट डोक्याचा) जड हातोडा जोरात मारूनच चांगले  वठणीवर आणावे लागते. असे व्यवहार कठोर भौतिक राजकीय व्यवहार होत.

(५) निसर्गातील भौतिक देवाने निर्माण केलेली निसर्गाची भौतिक रचना व भौतिक व्यवस्था आध्यात्मिक नसून ती भौतिक आहे कारण तो देवच (निसर्गराजा) भौतिक आहे! नावे बदलून अर्थात भौतिकतेला आध्यात्मिकता चिकटवून मनुष्य जर मानसिक समाधान मिळवू पहात असेल तर ते समाधान खोटे आहे. हा प्रकारच मुळी सत्यापासून फारकत घेऊन आभासात जगण्याचा प्रकार होय. मनुष्याच्या आभासी आध्यात्मिकतेत भौतिक सुख व शांतीसाठी चालणारी त्याची धडपड आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

(६) निसर्ग व भौतिकता यांना एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. पण तरीही निर्जीव पदार्थांची भौतिकता, अर्धसजीव वनस्पतींची भौतिकता, मानवेतर सजीव पक्षी, प्राण्यांची भौतिकता व पर्यावरणाच्या सर्वोच्च पातळीवर उत्क्रांत झालेल्या मनुष्याची भौतिकता यात फरक आहे. मानवी भौतिकता ही मानवेतर सजीवांप्रमाणे फक्त वासनांध भौतिकता नव्हे. कारण मनुष्याच्या मूळ भौतिक वासनांना प्रेम, करूणा यासारख्या पूरक अशा कोमल, नैतिक भावना चिकटलेल्या आहेत. या पूरक नैतिक भावनांचे नामकरण आध्यात्मिक भावना असे केल्याने त्यांना चिकटलेली मूळ भौतिक वासना नष्ट होत नाही. त्यामुळे असे नामकरण करणे चुकीचे होय. अर्थात मानवी मनातील नैतिक भावना या सुद्धा भौतिकच होत हे विसरता कामा नये.

(७) निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा व्यवस्थापक आणि नियंत्रक असल्याशिवाय म्हणजे निसर्गात देव असल्याशिवाय हे भौतिक जग आपोआप निर्माण होऊच शकत नाही व ते आपोआप चालूच शकणार नाही असे माझे तार्किक मत असल्याने निसर्गात देव आहे या मतावर मी ठाम आहे. पण निसर्गातला हा देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे असेही माझे वैयक्तिक मत आहे. ते मत आहे त्यामुळे इतर लोक त्याच्याशी सहमत होतीलच असे नाही. कारण मतमतांतरे असू शकतात.

-ॲड.बी.एस.मोरे©२३.९.२०२०

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

मुगल बादशहा औरंगजेब १७०७ ते १६१८ असे एकूण ८८ वर्षे आयुष्य जगला तर छत्रपती  शिवाजी महाराज हे १६३० ते ते १६८० म्हणजे फक्त ५० वर्षे आयुष्य जगले. औरंगजेबाच्या आयुष्याची लांबी जास्त पण जगण्याची उंची खूप कमी. याउलट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याची लांबी खूपच कमी म्हणजे फक्त ५० वर्षे (१६३०-१६८०) पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानत! तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पण फक्त ६४ वर्षे जगले (१८९१-१९५६) म्हणजे त्यांच्या आयुष्याची लांबी तशी कमीच पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण डॉ.आंबेडकर यांना महामानव मानत! अर्थात माणूस किती वर्षे जगला याला महत्व नाही तर तो कसा जगला याला महत्व आहे. आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्नाच्या तोंडून या संदर्भात एक अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडलेय "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये"! मनुष्य जीवन खूप अनमोल आहे. त्या जीवनाचे मनुष्याने सार्थक केले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

आत्म्याचे परमात्म्याशी मिलन!

निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची, पण तरीही आत्म्याचे परमात्म्याशी मिलन शक्य!

(१) निसर्ग म्हणजे तरी काय? विश्वातील ग्रह, ताऱ्यांचा समुच्चय (अवकाश) व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या विविध सजीव व निर्जीव पदार्थांचा समुच्चय (सृष्टी) यांची गोळाबेरीज अर्थात संपूर्ण अवकाश व संपूर्ण सृष्टी व या अवकाश व सृष्टीची रचना व व्यवस्था अर्थात संपूर्ण विश्व व सृष्टीचे पर्यावरण असा निसर्गाचा अर्थ घेता येईल.

(२) अशा या निसर्गाची रचना व व्यवस्था फार गुंतागुंतीची आहे. पण ती अनाकलनीय आहे असेही म्हणता येणार नाही. कारण विज्ञानाने अर्थात मानवी बुद्धीच्या संशोधनातून मानवाला प्राप्त झालेल्या ज्ञानाने निसर्ग रचनेचे व निसर्ग व्यवस्थेचे गूढ बऱ्याच अंशी उघड केले आहे. पण विज्ञानाने निसर्गातील सगळ्याच गोष्टी उघड केलेल्या नाहीत. निसर्गात अजून बरीच गुपिते दडली आहेत. ती गुपिते उलघडण्याच्या मार्गावर विज्ञानाचा खडतर व लांबचा प्रवास चालू आहे.

(३) हेही खरे आहे की, विज्ञानाला आतापर्यंत गवसलेले निसर्गाचे सत्य हे अचंबित करून टाकणारे आहे. निसर्गातील आश्चर्ये बघून नुसते कौतुकच वाटत नाही तर आश्चर्यचकित व्हायला होते. कौतुक व आश्चर्य यांचे मिश्र भाव निर्माण करणाऱ्या निसर्गाच्या या सत्यात स्वर्गसुखाचा आनंद आहे तशा नरकयातनांचे दुःखही आहे. स्वर्गसुखाचा आनंद देणाऱ्या सहज व सुंदर आर्थिक देवाणघेवाणीच्या कोमल बागा आहेत तशी नरकयातनांचे दुःख देणारी काटेरी जंगले सुद्धा आहेत.

(४) या काटेरी जंगलातूनच सहज, सुंदर अशा आर्थिक देवाणघेवाणीचा मार्ग जात असल्याने अर्थात नरकातून स्वर्गाचा मार्ग जात असल्याने सुख देणाऱ्या स्वर्गाच्या वाटेवरील जंगली काटे दूर करण्याचे आव्हान म्हणजे संकटातून सुटका करून घेण्याचे राजकीय आव्हान यशस्वीपणे  पेलल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. म्हणजेच खडतर राजकारणाशिवाय सहज आनंद देणारे अर्थकारण नाही असा याचा सरळसाधा अर्थ!

(५) मनुष्य जीवनाचे अर्थकारण हे गुलाबाच्या  फुलाप्रमाणे कोमल आहे तर मनुष्य जीवनाचे राजकारण हे त्या फुलाला चिकटलेल्या काट्यां प्रमाणे कठोर आहे. निसर्गाचे हे दुहेरी सत्य अनुभवताना मानवी मनाला निसर्गातील देव आठवला नाही तर नवलच! मग या अदृश्य देवाची आध्यात्मिक भक्ती करताना मानवी मन दोन गोष्टी करते. एक म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद दिल्याबद्दल देवाचे आर्थिक आभार मानणे व दोन म्हणजे नरकयातनांचे दुःख सहन होत नाही म्हणून या यातनांतून अर्थात स्वर्गाच्या आर्थिक मार्गावरील संकटांच्या आव्हानातून सुटका होण्यासाठी देवाची राजकीय प्रार्थना करणे.

(६) म्हणजे देवाची मानवी भक्ती आध्यात्मिक असत नाही तर ती स्वार्थी, भौतिक, आर्थिक व राजकीय असते. सद्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून मुक्तता करून घेण्यासाठी जर मनुष्य   देव प्रार्थना करेल तर ती भौतिक-राजकीय प्रार्थना असेल. अशाप्रकारे निसर्गाची भौतिकता हीच मनुष्याला देवाची आध्यात्मिकता शिकवते असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत वैयक्तिक असल्याने त्यावर कृपया धार्मिक वादविवाद नकोत!

(७) आता पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग निसर्गात देव आहे हे मान्य करायचे की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मी मनुष्याच्या शरीर रचनेचे उदाहरण समोर ठेवतो. आपले शरीर अनेक मांस पेशींचा समुच्चय असलेल्या अनेक मांसल अवयवांनी बनलेले आहे. या बहु अवयवी शरीराच्या इमारतीला हाडांचा आधार आहे. म्हणजे हाडांच्या सांगाड्यावर आपल्या शरीराची इमारत उभी आहे. आता या शरीर इमारतीचा राजा कोण तर आपला मेंदू! याच तर्काने गुंतागुंतीच्या मानवी शरीराला जर मेंदू नावाचा राजा आहे तर मग गुंतागुंतीच्या निसर्ग शरीराला देव नावाचा राजा का असू नये? हा देव राजाच निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा नियंत्रक किंवा व्यवस्थापक असे का मानू नये? केवळ हा निसर्गराजा (देव) दिसत नाही म्हणून?

(८) याच वैज्ञानिक तर्काने मी निसर्गात देवाचे अस्तित्व मानतो. पण शरीराच्या राजाचे अर्थात मेंदूचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येते तसे निसर्गाच्या राजाचे अर्थात देवाचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येत नाही हे खरे आहे. पण जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुराव्याने सिद्ध करता येत नाहीत. पण त्या नसतातच असे नसते. केवळ पुरावा नाही म्हणून संशयाचा फायदा देऊन कोर्टातून निर्दोष सुटलेले आरोपी हे गुन्हेगार नसतातच असे ठामपणे म्हणता येईल का? मग नास्तिक लोक केवळ पुराव्याचे तुणतुणे वाजवीत निसर्गात देव नाहीच असे ठामपणे कसे म्हणू शकतात? माझी देवाविषयीची आस्तिकता ही अशी वैज्ञानिक तर्कावर आधारित आहे व हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून त्याला कोणी कचराकुंडीत टाकून देईल तर तो त्याचा निर्णय असेल. माझ्या या वैज्ञानिक तर्काला कोणी कचराकुंडी दाखवली म्हणून मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी वैज्ञानिक आस्तिक आहे.

(९) आपल्या शरीराची रचना व व्यवस्था जशी गुंतागुंतीची आहे तशीच निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीर व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना आपल्या मेंदूला किती त्रास होतो याचा अनुभव आपण प्रत्येकजण पदोपदी घेत असतो. मेंदू आपल्या शरीर अवयवांचे नियंत्रण करू शकतो कारण हे अवयव त्यांच्या ठिकाणी नीट कार्य करीत असतात म्हणून! पण शरीराचे बहुतेक अवयव नीट काम करेनासे झाले म्हणजे जर आपल्या शरीराला बहुअवयव बिघाडाचा मोठा आजार (मल्टिपल अॉर्गन डिसअॉर्डर) झाला तर आपल्या मेंदूची स्थिती काय होईल? याला शारीरिक आणीबाणी म्हणतात.

(१०) देशाच्या निरनिराळ्या राज्यांत व देशाच्या नागरिकांत योग्य समन्वय राहिला नाही की मग देशातही अराजक निर्माण होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा कस लागतो. याच न्यायाने निसर्गाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना निसर्गाच्या राजाचा म्हणजे देवाचा कस लागत असेल का? जर आपल्या शरीराच्या बहुतेक अवयवांचे नटबोल्टस सैल झाले तर ते घट्ट करायला आपला मेंदू कुठेकुठे म्हणून धावेल? तो एकाग्र मनाने, एकचित्ताने कार्य करू शकेल का? आपल्या मेंदूची ही एवढी अवघड स्थिती तर देवाची स्थिती काय असेल?

(११) मला एवढे कळते की, मनुष्य जीवन अनमोल आहे. त्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर भौतिक वासना,आध्यात्मिक भावना व दोन्हीत संतुलन ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी या तिन्हीचे मिश्रण असलेला मानवी मेंदू जो मानवी शरीराचा राजा आहे तो म्हणजेच मानवी आत्मा व निसर्गाचा राजा म्हणजे देव तो म्हणजे  परमात्मा यांचे म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे मिलन हे मनुष्याच्या जिवंतपणीच शक्य आहे, मनुष्य मेल्यावर नाही. मनुष्य मरतो म्हणजेच त्याचा मेंदू मरतो. मनुष्य मेल्यावर जर त्याचा आत्माच शिल्लक रहात नाही तर त्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन कसे शक्य आहे? म्हणून जिवंतपणीच मनुष्याने त्याचे माणूसपण जपले पाहिजे. आत्मा (स्वतःचा मेंदू) व परमात्मा (निसर्गाचा मेंदू) यांच्यातील समन्वयाचा अर्थात  मिलनाचा अनुभव घेत हे माणूसपण जपणे सर्व माणसांना शक्य आहे असे मला वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

सापाची भीती!

सापाचा प्रत्यक्ष अनुभव!

साप म्हटला की भीती ही वाटतेच. १९७६-७७ सालची ही घटना आहे. मी पोदार कॉलेजच्या एन.एस.एस. कँप साठी ठाणे जिल्ह्यातील बऱ्हाणपूर गावातील आदिवासी पाड्यावर गेलो होतो तेंव्हा मला अचानक संडास लागली होती. तिथल्या आदिवासीने एक छोटे चिनपाट पाणी भरून दिले व लांब तिकडे जाऊन संडास करायला सांगितले. आजूबाजूला भातशेती होती. मी दोन मोठ्या दगडांवर माझे पाय ठेऊन संडासला बसलो. तर काही वेळाने एक भलामोठा साप (या पोस्टसोबत असलेल्या प्रतिमेत दिसतोय ना अगदी तसाच व तेवढा मोठा साप) बरोबर माझ्या खालून सरपटत आला आणि माझ्या समोरच्या भातशेतीच्या गवतात गुडूप झाला. तो साप खाली आणि मी बरोबर त्या सापाच्या वर दोन दगडांवर पाय ठेऊन बसलेलो. जरा जरी हललो असतो तर माझ्या ढुंगणालाच तो साप कडकडून चावला असता. तो प्रसंग, तो थरार मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

परमेश्वरा, सुख शांती!

परमेश्वरा, सुख शांती!

परमेश्वर = निसर्ग/विश्व शरीराचा मेंदू (राजा),

सुख = सहज, सुंदर आर्थिक देवाणघेवाण,

शांती = क्लेशकारक आव्हाने/संकटे यातून
राजकीय सुटका.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

मुंबई लोकलसाठी मनसे आंदोलन!

मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी मनसेचे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन!

आज सोमवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२० च्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या मनातील खळबळ उघड करून मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी सविनय कायदेभंगाचे अनोखे आंदोलन केले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू ठेवलेल्या मुंबई लोकल ट्रेन्समधून विनापरवानगी प्रवास करून व काही ठिकाणी शांततामय मार्गाने तो प्रयत्न करून महात्मा गांधीच्या मार्गाने सत्याग्रह केला व अन्यायकारक कायद्याच्या विरोधी सविनय कायदेभंग करण्याच्या महात्मा गांधीनी आम्हा भारतीयांना शिकवलेल्या मार्गाचा छान अवलंब केला. खरं तर, मनसेच्या खास खळ्ळ खट्याक स्टाईल आंदोलन करण्याच्या पद्धतीला बाजूला करणारे मनसेचे हे आंदोलन खरंच कौतुकास्पद आहे. एक वकील म्हणून मी या प्रश्नावर माझे कायदेशीर मत यापूर्वीच्या माझ्या दोन फेसबुक पोस्टसने जाहीरपणे मांडले होते. तसेच मी मा. राजसाहेब ठाकरे यांचा मनसे चाहता असल्याने या दोन्ही पोस्टस मी मनसेच्या फेसबुक पेज/  ग्रूप्सवर टाकल्या होत्या. माझी ती हाक मनसे नेतृत्वापर्यंत कुठेतरी पोहोचली असावी. तसेच मनसेने या प्रश्नावर जो जाहीर सर्व्हे घेतला होता त्यातही मी माझे मत हेच मांडले होते की आता बस्स झाले, लोकल ट्रेन्स चालू करा. लोकांनीही या मनसे सर्व्हेला भरभरून प्रतिसाद देऊन माझ्या मताप्रमाणेच मते मांडली होती. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे मनसेचे आजचे हे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन! मी स्वतः वकील असल्याने या आंदोलनात सामील झालो नाही. परंतु या आंदोलनातील मनसे मागणी ही पूर्णपणे कायदेशीर असल्याने माझा तिला पूर्ण  म्हणजे १००% जाहीर पाठिंबा आहे. या मनसे मागणीत कोणता कायदा दडला आहे हे जर कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्यांनी  माझे याविषयी लिहिलेले पूर्वीचे दोन फेसबुक लेख जरूर वाचावेत जे मी याखाली पुनःप्रसिद्ध करीत आहे. मला आशा आहे की, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सरकार योग्य ती दखल घेईल व मुंबई लोकल प्रवास योग्य त्या नियमांनुसार सर्वसामान्यांसाठी लवकरच निदान या महिनाअखेर तरी खुला करील.

जय महाराष्ट्र! जय मनसे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

एक राजकीय कालखंड संपला!

एक मोठा राजकीय कालखंड संपला!

(१) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (एस.ए.डांगे) व त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते! ही नावे आजच्या पिढीतील किती लोकांना माहित आहेत? कॉम्रेड एस.ए.डांगे हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य. त्यांचे संबंध रशियाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत होते. कॉ. एस.ए.डांगे ९१ वर्षे जगले तर त्यांच्या कन्या कॉ. रोझा देशपांडे या ९२ वर्षे जगल्या. म्हणजे दोघांनीही आयुष्याची नव्वदी पार केली.

(२) ही दोन नावे माझ्या विशेष लक्षात राहिली कारण वरळी बी.डी.डी. चाळीत बालपण व तरूणपण जगत असताना मी गिरणगावातील कामगार चळवळीचा साक्षीदार आहे. खरं तर मुंबईतील गिरणी कामगारांची चळवळ म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चळवळ. त्याकाळी वरळीतील जांबोरी मैदानात मी कॉम्रेड डांगे यांची भाषणे ऐकलीत. नंतर त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांनाही जवळून पाहिले आहे.

(३) तो काळच वेगळा होता. काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सलोखा हा भारत व रशिया यांच्या मैत्रीला कारणीभूत होता. याचे कारण म्हणजे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एस.ए. डांगे यांची मैत्री! १९७६ मध्ये काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली घटना दुरूस्ती केली आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द घातला. यालाही काँग्रेसची कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली जवळीक  कारणीभूत होती. अर्थात त्यावेळी काँग्रेसचे राजकारण डावीकडे वळले होते.

(४) कॉम्रेड रोझा देशपांडे, मृणाल गोरे यांच्या एकत्रित चळवळी मी जवळून पाहिल्या आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेने कम्युनिस्ट पक्षाला गिरणगावातून संपवले. कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून झाला आणि गिरणी कामगार चळवळीतून कम्युनिस्ट पक्ष हद्दपार झाला.

(५) काल दिनांक १९.९.२०२० रोजी कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे दुःखद निधन झाले आणि एक मोठा राजकीय कालखंड संपला. त्यांच्या निधनाने तो सर्व इतिहास पुन्हा डोळ्यासमोरून सरकला. तो इतिहास आजच्या पिढीतील लोकांना कळावा म्हणून हा लेख लिहिला आहे. कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

(१) कोरोना लॉकडाऊनचा मार्च २०२० पासून सुरू असलेला मोठा काळ हा माझ्या ज्ञानाच्या पुनर्विचाराचा, माझ्या मनात साचलेल्या खोट्या समजूती दूर करण्याचा, माझ्या पुनर्जन्माचा अर्थात मीच मला नव्याने भेटण्याचा, म्हणजेच  माझ्या आत्मपरीक्षणाचा, आत्मचिंतनाचा मोठा काळ!

(२) या काळात निसर्ग व देव, विज्ञान व धर्म, भौतिकता व आध्यात्मिकता या गहन विषयांवर सखोल आत्मचिंतन झाले. या आत्मचिंतनातून मला निसर्गातच देव गवसला व विज्ञानातच धर्म कळला. हेही कळले की, मी आतापर्यंतच्या आयुष्यात देवाला मंदिरात व देव प्रतिमांमध्ये बघत होतो व तिथे आध्यात्मिक भावनेने माझ्या हृदयाला झोकून देत होतो. पण प्रत्यक्षात मात्र  माझ्या जवळ असलेल्या देवाकडे दुर्लक्ष करीत होतो.

(३) या आत्मचिंतनातून हे कळले की, खरं तर मनुष्य जीवन हे इतर प्राणीमात्रांपासून वेगळ्या असलेल्या उच्च भौतिक कर्मांनीच बहुतांशी व्यापले आहे. या मानवी भौतिक कर्मांना उच्च शब्द चिकटल्याने ही कर्मे केवळ भौतिक न राहता भौतिक-आध्यात्मिक, वैज्ञानिक-धार्मिक अशी संमिश्र नैसर्गिक झाली आहेत. ही भौतिक कर्मे केवळ भौतिक वासनांच्या दबावाखाली व वासनांध घिसाडघाईने पार पाडावयाची नसून ती उच्च आध्यात्मिक दर्जाने पार पाडावयाची आहेत. विवाहसंस्था हा लैंगिकतेत आध्यात्मिक भावविश्वाचा अनुभव घेण्याचा एक उत्तम नमुना आहे.

(४) मनुष्याने त्याच्या जीवनात पार पाडावयाची उच्च दर्जेदार भौतिक कर्मे हा खरं तर निसर्गात असलेल्या देवाचाच आदेश आहे हे मला माझ्या आत्मचिंतनातून कळले. या भौतिक कर्मांनाच आध्यात्मिक दर्जा देऊन त्या कर्मांत मनुष्याने आपले हृदय झोकून दिले पाहिजे. हृदय झोकून देणे म्हणजे मनापासून, आंतरिक समाधानाने भौतिक कर्म पार पाडणे. अर्थात निसर्गाची भौतिक कर्मे आध्यात्मिक दर्जाने लक्षपूर्वक व हृदयापासून पार पाडली पाहिजेत.

(५) या आत्मचिंतनातून मानवी अर्थकारणात व राजकारणात सुद्धा अध्यात्म आहे हे मला छान कळले. उदाहरणार्थ, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्यकारभार हा लोकांचे विश्वस्त म्हणूनच पार पाडला पाहिजे. कारण लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो व या विश्वासात उच्च दर्जाचा आध्यात्मिक भाव असतो.

(६) खरं तर, अध्यात्म हा मिथ्या कल्पनांच्या आभासात, स्वप्नवत जगात जगण्याचा, निव्वळ भावनिक श्रद्धेनेच देवाकडे बघण्याचा, किंवा मानवी बुद्धीने कल्पनेबरोबर मैत्री करून तिच्या भोवती रूंजी घालत तिच्या संगतीत स्वतःची बौद्धिक करमणूक, मनोरंजन करून घेण्याचा वरवरचा विषय नसून तो निसर्गाच्या सत्यात जगण्याचा व निसर्गातच देवाला बघण्याचा खोल विषय आहे. निसर्गाच्या विज्ञानाला देवाचा धर्म करून ते विज्ञान धर्माने जगत श्रेष्ठ मनुष्य जीवनाचे सार्थक करण्याचे मोठे आव्हान या अध्यात्मात आहे. माझे या गहन विषयावरील आत्मचिंतन पूर्ण झाले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o

टीपः

माझ्या वरील आत्मचिंतनाला समर्पक असे एक अत्यंत सुंदर असे मराठी गीत मला आठवले. या गीताचे बोल आहेत "शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी". हे गीत शब्दबद्ध केलेय गीतकार वंदना विटणकर यांनी व गायलेय महान गायक मोहम्मद रफी यांनी. विशेष म्हणजे या गीताला संगीत दिलेय ते मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी. अर्थात या गीताशी संबंधित तीनही व्यक्ती  या महान कलाकार. त्यांच्या नखाजवळही मी बसू शकत नाही. परंतु या कोरोना लॉकडाऊन काळात ईश्वरावर मी जे आत्मचिंतन केलेय व त्याच आत्मचिंतनावर आधारित वर जो काही लेख लिहिला आहे त्याचे व या अर्थपूर्ण गीताचे सूर जवळजवळ जुळत असल्याने मी हे गीत माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या गीतात माझ्या ईश्वरी आत्मचिंतनाचा आत्मा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o