https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २३ जून, २०२४

दुनियादारी!

दुनियादारी!

प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब असतेच. अगदी अविवाहित माणसाचे सुद्धा. एकटा जीव सदाशिव ही गोष्ट चित्रपटात ठीक. वास्तवात कुटुंब ही गोष्ट जवळजवळ अनिवार्य आहे. अविवाहित व्यक्तीलाही जीवनाचा काही काळ तरी जन्म देणाऱ्या आईवडिलांचे कुटुंब लाभतेच. कुटुंब आले की मग कुटुंबाची जबाबदारी आलीच. या कौटुंबिक जबाबदारीचा गाडा हाकण्यासाठी माणसाला कुटुंबाबाहेर दुनियादारी करावी लागते. ही दुनियादारी सहजसोपी नाही. त्यात निसर्गाने व मानव समाजाने निर्माण केलेले अनेक खाचखळगे, अडथळे आहेत. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्ती, वाढत्या वयानुसार थकणारे शरीर, क्षीण होत जाणारी शक्ती व त्या सोबत येणारे आजार इत्यादी गोष्टी हे निसर्गाने निर्माण केलेले अडथळे होत. तर समाजातील अनेक धर्म, अनेक जातीपाती, वांशिक फरक इ. गोष्टींनी निर्माण केलेली सामाजिक फाटाफूट, काही मूठभर श्रीमंतांनी निसर्गाच्या साधन संपत्तीवर निर्माण केलेली मक्तेदारी, राजकारणातील भ्रष्टाचार व गुंडगिरी, लोकसंख्या वाढीमुळे वाढत चाललेली जीवघेणी आंतरमानवी स्पर्धा इ. गोष्टी हे समाजाने निर्माण केलेले अडथळे होत. या सर्व अडथळ्यांची माहिती करून घेत त्यावर मात कशी करावी याचे ज्ञान घ्यायचे व मग कौशल्याने सर्व अडथळ्यांशी संघर्ष करीत मरेपर्यंत ही दुनियादारी करायची हे तरूण, मध्यम व काही अंशी वृद्ध व्यक्तींवर असलेले दुनियादारीचे ओझे लहानपणी जवळजवळ नसतेच. कारण लहान मुलांच्या डोक्यावर जबाबदार आईवडिलांचे छत्र असते. हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी बालपण काही निराधार मुलांच्या नशिबी नसते व याला कारण त्यांचे बेजबाबदार किंवा अत्यंत दरिद्री आईबाप असतात. एकंदरीत काय तर दुनियादारी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा