https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २६ जून, २०२४

दडपणाखाली जगताना!

दडपणाखाली जगताना!

जन्मापासून मरणापर्यंत माणूस जेवढा दडपणाखाली जगतो तेवढे दडपण घेऊन सृष्टीतील इतर कोणते सजीव जगतात? जंगलात ज्यांच्या डोक्यावर वाघ, सिंहाच्या जीवघेण्या हल्याची टांगती तलवार, भीतीची छाया सतत असते ते दुर्बल प्राणी सुद्धा माणसांनी स्वतःवरच निर्माण केलेल्या कृत्रिम दडपणांची भीती घेऊन जगत नसतात.  

माणसांनी माणसांवर लादलेल्या दडपणांची यादी शांतपणे विचार करून तयार करा. मी यालाच चिंतन व ध्यानधारणा म्हणतो. यात देवाला मध्ये आणायचे नाही. कारण ही ध्यानधारणा वेगळी आहे, हा योग वेगळा आहे. माणूस जन्मला की सुरूवातीची साधारण तीन वर्षे सोडली की बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालय (केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन ते पोस्ट ग्रॕज्यूएट) असे शैक्षणिक अभ्यासाचे दडपण सुरू होते. हे दडपण दूर होते ना होते तोपर्यंत उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय करून आर्थिक कमाई करताना स्पर्धेत उतरून संघर्ष करण्याचे दडपण सुरू होते जे मरेपर्यंत चालू रहाते.

हे आर्थिक कमाईचे दडपण सुरू असताना मध्येच कुठून तरी सत्तेचा किडा डोक्यात वळवळू लागतो व त्यानंतर सुरू होते राजकारणाचे व राजकीय स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या राजकीय संघर्षाचे दडपण. ही सर्व दडपणे चालू असताना मध्येच विवाहाची हुरहूर लागते व माणूस लग्न करून मोकळा होतो. मग सुरू होते संसाराची मोठी जबाबदारी व या जबाबदारीतून निर्माण होणारे मुलांच्या शिक्षणाचे, ती बिघडू नयेत म्हणून त्यांना योग्य संस्कार देऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे दडपण, त्यांचे विवाह होऊन ती मुले आर्थिकदृष्ट्या पायावर सक्षमपणे उभी राहण्याचे व विवाह करून त्यांच्या संसारात स्थिर होण्याचे दडपण व इतर बरीच संसाराची दडपणे ज्यांची यादी संपता संपत नाही कारण माणूस आपल्या कुटुंबाविषयी फारच संवेदनशील असतो.

मानवी मनावरील दडपणांची यादी इथेच संपत नाही. भांडवलशाही शोषणाचे दडपण, वेळेचे दडपण, लोक काय म्हणतील याचे दडपण, समाजाने लादलेल्या अनेक धर्मांचे व त्या धर्मांतील आंतरधर्मीय विवाद, धार्मिक युद्धांचे दडपण, सांस्कृतिक रूढी, परंपराचे दडपण, समाजातील वर्णव्यवस्था, जातीपातींचे दडपण, वंशवाद, प्रांतवाद,भाषावाद यांचे दडपण, अंधश्रद्धा फेकून देताना अंधश्रद्ध लोकांच्या रागाचे दडपण, किचकट समाज कायद्याचे दडपण, बाहेर फिरताना खिशातील पैशाचे पाकिट कोणीतरी मारणार नाही ना, आपला मोबाईल फोन कोणीतरी पळवून तर नेणार नाही ना हे दडपण, रस्ता ओलांडताना एखादे वाहन सिग्नल तोडून अंगावरून तर जाणार नाही ना या भीतीचे दडपण, एखाद्या भिकाऱ्याला भीक दिली नाही तर परोपकार, करूणेच्या भावनेतून चुकल्याची भावना मनात निर्माण होते त्या भावनेचे दडपण, अहो इतकेच काय घरातील गॕस, लाईट, पाणी यांच्या बटणांचे दडपण. बटण नीट लागलेय ना, शाॕर्ट सर्किट, गॕस स्फोट होणार नाही ना, पाणी फुकट वाया जाणार नाही ना, ही भीतीयुक्त दडपणे घरातही चालूच असतात. वर पुन्हा नैसर्गिक आपत्ती, आजार यांचे दडपण चालूच असते. परमेश्वराचे ध्यान करून, योगासने करून ही दडपणे बिलकुल दूर होत नाहीत हे वास्तव आहे.

ही दडपणे (मी इथे लिहिलेल्या या कृत्रिम दडपणांची यादी अपूर्ण आहे) कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित आहेत. यात नैसर्गिक दडपणाचा भाग फार थोडा आहे. नीट विचार केला तर कळेल की, ही मानवनिर्मित कृत्रिम दडपणे माणूस सोडून सृष्टीतील इतर कोणत्याही सजीवाला नाहीत. ही कृत्रिम दडपणे झुगारून देऊन खऱ्या स्वातंत्र्याचा व खऱ्या मुक्तीचा आनंद माणसाला त्याच्या आयुष्यात ठरवूनही मिळत नाही कारण ही दडपणे मानवी मनावर मरेपर्यंत चालूच राहतात. या सर्व दडपणांची ओझी आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या माणसाच्या सहनशक्तीची कमालच म्हणायची! 

-©ॲड.बी.एस.मौरे, २६.६.२०२४

वि.सू./टीपः

"दडपण, आता विराम आत्महत्येला" या मराठी चित्रपटाची प्रतिमा माझ्या या लेखाला केवळ प्रातिनिधीक चित्र म्हणून लावलेली आहे. हा चित्रपट मी बघितलेला नाही व त्याचा माझ्या या लेखाशी काहीही संबंध नाही. जर या चित्रपटातील सामाजिक संदेश माझ्या लेखातील काही भागाशी जुळत असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा. दडपण चित्रपट निर्मात्याच्या कलात्मक प्रतिमेवरील स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) माझ्या प्रातिनिधीक कृतीने बाधित होत नाही. तरी सामाजिक कर्तव्य म्हणून त्या निर्मात्याविषयी सौजन्य व्यक्त करतो.

-ॲड.बी.एस.मोरे, २६.६.२०२४

मंगळवार, २५ जून, २०२४

संथ जीवन योग!

संथ जीवन योग!

महापूरात रौद्र स्वरूप धारण करून जोरात वाहणारी नदी किंवा सुनामी आणणारा रौद्र समुद्र कोणाला आवडेल? हिंस्त्र प्राणी असोत की माणसे सर्वसाधारणपणे सजीव सृष्टी अशांत, रौद्र वातावरण नाकारते व संथ, शांत जीवन स्वीकारते. खरं तर संथ व शांत जीवन हाच सृष्टीतील प्रत्येक जिवाचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. मूलभूत हक्काच्या मोठमोठया गप्पा मारणारा, त्यावर तावातावाने वादविवाद करणारा माणूस मात्र या हक्कावर स्वतःच्या  हव्यासी करणीने गदा आणतोय.

माणसाला निसर्गाने सारासार विचार करण्याची बुद्धी दिलीय ना मग ही बुद्धी गहाण ठेवून माणसाने त्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात का वाढवली हा पहिला प्रश्न व मुद्दाही. या वाढलेल्या लोकसंख्येचे वाईट परिणाम म्हणजे जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली स्पर्धा. मग या स्पर्धेने जीवनात निर्माण केलेली घाईगर्दी. श्वास कोंडून टाकणारी गर्दी व या गर्दीची पळा पळा कोण पुढे पळे तो ही घाई. 

माणसाचे आयुष्य ते केवढे पण त्याने केवढा मोठा पसारा वाढवून ठेवलाय तथाकथित विकासाचा. कसला विकास? मूठभर लोकांच्या चैनीचा विकास व त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर धावणारी सर्वसामान्य लोकांची गर्दी. याच गर्दीचे मूठभर श्रीमंत भांडवलदार मंडळींकडून शोषण केले जाते व धूर्त राजकारणी मंडळींकडून भूलथापा देऊन गोल फिरवले जाते व गोल फिरवून पुन्हा या गर्दीला तिच्या मूळ स्थितीवर आणून सोडले जाते. सर्वसामान्य माणसाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाची किंमत कोण ठरवणार तर हे मूठभर भांडवलदार व त्यांच्याशी खाजगी भागीदारी करणारे धूर्त राजकारणी. मी साम्यवाद किंवा भांडवलवाद या दोन्ही वादांचा पुरस्कर्ता नाही. 

मी संथ जीवन योग या मूलभूत हक्काची पाठराखण करणारा हाडाचा वकील आहे व हा हक्क जो कायदा देऊ शकतो त्या कायद्याचा पुरस्कर्ता आहे. माझी वकिली मी याच मूलभूत हक्कासाठी मर्यादित ठेवली. मला बाहेर ही क्रांती करणे शक्य झाले नाही. पण निदान स्वतःपुरती तरी मी ही क्रांती केली. त्यासाठी मी, पत्नी व मुलगी असे छोटे कुटुंब निर्माण केले व आमच्या कौटुंबिक गरजा मर्यादित केल्या, चैनीचे तर नावच नाही. या मर्यादित जीवन जगण्याला कुटुंब सदस्यांकडून मोलाची साथ लाभली व म्हणून ही वैयक्तिक क्रांती शक्य झाली. हेच मर्यादित जीवन, हेच अध्यात्म व हाच संथ जीवन योग मी आयुष्यभर जगलो व जगत आहे. 

मूठभर भांडवलदार व राजकारणी मंडळींना त्यांच्या चैनबाज संकुचित जीवन विकासासाठी सर्वसामान्य माणसांची धावणारी गर्दी हवी आहे हे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीला कधी कळणार? जीव गुदमरून टाकणारी गर्दी व जोरात धाव धाव धावायला लावणारी जीवघेणी स्पर्धा या भयानक चक्रात सर्वसामान्य माणूस सापडलाय. या माणसाला संथ जीवन योगाची आवश्यकता आहे कारण असे संथ व शांत जीवन हाच त्याचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. हा हक्क डावलणारे कोण हे कळण्यासाठी सामान्य माणसाला थोडे तरी अंतर्मुख व्हावे लागेल. आयुष्यात येऊन गर्दीचा भाग बनून रहायचे व त्या गर्दीबरोबर घाईघाईत धाव धाव धावायचे याला जीवन म्हणत नाहीत. असल्या जीवनावर का शतदा प्रेम करावे? गर्दीचे, घाईचे जीवन म्हणजे अशांत व अस्थिर जीवन. हे असले जीवनच मानसिक आजारांचे मूळ कारण आहे. यातून सामान्य माणूस लवकर बाहेर पडो व त्याला संथ जीवन योगाचा आनंद मिळो व शांती लाभो हीच माझी सदिच्छा! 

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

सोमवार, २४ जून, २०२४

अन्न, वस्त्र, निवारा!

अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या गरजा की चैनी?

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन प्रमुख गरजा. या गरजांचे अती हुशार माणसाने चैनीत कसे रूपांतर केले ते बघा. पोटासाठी अन्न ही गोष्ट बाजूला पडली व जीभेचे चोचले पुरविणारे प्रक्रिया केलेले अनेक खाद्य पदार्थ निर्माण केले गेले व खा खा खाण्याची चंगळ सुरू झाली. मग आले वस्त्र. खरे तर लाजेपोटी शरीर झाकण्यासाठी माणसाला वस्त्राची गरज भासली. माणसाला काही गोष्टींची लाज वाटते म्हणे. पण आधुनिक माणूस इतका निर्लज्ज झालाय की त्याची लाज कुठे पळून गेलीय हेच कळेनासे झालेय. तर हे लाज झाकण्याचे वस्त्र माणसाने फॕशनचे साधन बनविले. फाटके कपडे घालण्याची फॕशन हल्लीची काही मुले मुली करतात तेव्हा गंमत वाटते. खिशात पैसा खुळखुळणारी मुले, मुली तर नवीन वस्त्र महिनाभर वापरले की लगेच फेकून देतात व दुसरे नवीन घेतात. मग वस्त्र ही माणसाची गरज की चैन? नंतर माणसाची तिसरी गरज कोणती तर निवारा. या गरजेची तर जाम वाट लागलीय. एका बाजूला दाटीवाटीने वसलेल्या गरिबांच्या झोपडपट्ट्या व छोट्या घरांच्या चाळी तर दुसऱ्या बाजूला आलिशान सदनिकांच्या श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारती हे दृश्य आहे निवारा या गरजेचे. यात झोपडपट्टी व चाळींत निवाऱ्याची गरज दिसते तर उंच इमारतींतील आलिशान सदनिकांत निवाऱ्याची चैन दिसते. आता झोपडपट्टी व चाळी तोडून तिथेही सदनिका युक्त उंच इमारती बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. गरिबांना सुद्धा थोडी चैन करण्याचा हक्क आहेच की. तीही माणसेच आहेत. पण वाढलेल्या लोकसंख्येच्या  निवाऱ्याची गरज भागविण्यासाठी डोंगर फोडून, झाडीची जंगले तोडून व समुद्र खाडी किनाऱ्यालगतच्या पाणथळींवर भराव टाकून इमारती बांधण्याचा कार्यक्रम चाललाय तो भयंकर आहे. असल्या विकासासाठी पर्यावरणाची वाट लावायची का? पण माणसाला या पर्यावरणाचे काही पडलेले नाही. मस्त खा, प्या व अन्नाची चंगळ करा. चांगले भारी भारी कपडे घाला व वस्त्राची फॕशन करा. आणि उंच उंच इमारतींतील सदनिकांत मजेत रहा व निवाऱ्याची चैन करा. असा हा तीन गरजांचे तीन चैनीत रूपांतर करण्याचा त्रिसूत्री कार्यक्रम चालू आहे. जमीन मालमत्ता विकासाच्या बाबतीत चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) व विकास हस्तांतरण हक्क (TDR) या दोन गोष्टी तर समजण्याच्या पलिकडे गेल्या आहे. शाळा, उद्याने वगैरेचे आरक्षण बदलणे, चटई क्षेत्र निर्देशांक वाढवणे व तसेच विकास हस्तांतरण हक्क या जमिनीवरून त्या जमिनीवर फिरवणे या गोष्टी मालमत्ता विकासाच्या बाबतीत खेळ झाल्या आहेत. आज एक तर उद्या दुसरेच असा विकासाचा कार्यक्रम चालू आहे. खाजगी, सरकारी जमिनी बळकावून, त्या जमिनींवर अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना संरक्षित करून त्यांना उंच इमारतींत फुकट सदनिका दिल्या जात आहेत ही गोष्ट न्यायालयांनीही सरकारच्या निदर्शनास आणली आहे. आणि दुसरी चीड आणणारी गोष्ट म्हणजे विकासाच्या मार्गात जर झाडे येत असतील तर मग ती झाडे तोडून दुसरीकडे कुठेतरी लावा (लावा या शब्दात वाढवा हा शब्द येत नाही). हा प्रकार तर भयानक फसवणूकीचा प्रकार आहे. एकंदरीत काय तर हा चाललेला विकास हा गरजांचा विकास नसून चैनींचा विकास आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा भकास विकास आहे. एक दिवस हा भकास विकास माणसांना चांगलाच भारी पडेल यात शंकाच नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

सृष्टी परिवर्तन चक्र!

सृष्टी परिवर्तन चक्र!

अंतराळ विश्वात निसर्ग किती फुगे फुगवतो, फुगवून ठेवतो व फोडतो या खेळाचा नीट अंदाज पृथ्वीवरून बांधता येत नसला तरी त्याचा पृथ्वीवरील हा खेळ मात्र पृथ्वीवर जगणाऱ्या व मरणाऱ्या सर्व जिवांना प्रत्यक्षात बघायला, अनुभवायला मिळतो. 

निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांत केलेली सजीव व निर्जीव पदार्थांची सृष्टी परिवर्तन चक्रात सृष्टीतून पुनर्निर्मित होते, सृष्टीतच काही काळ टिकून राहते व शेवटी सृष्टीतच विसर्जित होते. सृष्टी पुनर्निर्मितीचे, टिकण्याचे व विसर्जनाचे एक परिवर्तन चक्र निसर्गाने पृथ्वीवर निर्माण केले आहे. सृष्टीच्या परिवर्तन चक्रातील पुनर्निर्मितीला, काही काळ अस्तित्व टिकवून धरण्याला व शेवटी सृष्टीतच विसर्जित होण्याला सृष्टीचे चक्राकार परिवर्तन असे म्हणता येईल.

जसा पृथ्वीवरील पाऊस पृथ्वीवरील सागरातूनच निर्माण होतो, काही काळ पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा वर्षाव करीत राहतो व शेवटी त्या सागरातच चक्राकार विसर्जित होतो तसेच सृष्टीचे परिवर्तन चक्र पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे. पृथ्वी व तिच्या सृष्टीसाठी सूर्य हाच ईश्वर आहे ज्याला सूर्यनारायण म्हणतात. हा सूर्यनारायण पृथ्वीचा ईश्वर आहे, परमेश्वर नव्हे. अंतराळ विश्वातील प्रचंड मोठ्या उर्जा स्त्रोताला संपूर्ण अंतराळ विश्वाचा परमेश्वर असे म्हणता येईल. 

सूर्यनारायण त्याच्या प्रकाशमय व उर्जायुक्त किरणांनी पृथ्वीला व तिच्यावरील सृष्टीला दररोज स्पर्श तर करतोच पण पृथ्वीला तिच्या सृष्टीसह नियंत्रितही करतो. अगदी तसाच अंतराळ विश्वाचा परमेश्वर (विश्व चैतन्य किंवा विश्व उर्जा स्त्रोत) पृथ्वी व तिच्या सूर्यासह सूर्यमालेला व अंतराळ विश्वातील असंख्य ग्रह, ताऱ्यांना स्पर्श करतो व त्यांना नियंत्रित करतो. पण तो परमेश्वर पृथ्वीवरील माणसांच्या दृष्टीस पडत नाही. सूर्यनारायण मात्र लांबून दृष्टीस पडतो. पण तरीही पृथ्वीवरून दृष्टीस पडणाऱ्या सूर्यनारायणाला पृथ्वीवरील कोणाला तरी प्रत्यक्षात भेटता येते का? सूर्यनारायणाला भेटण्याची इच्छा म्हणजे जळून खाक होण्याची इच्छा. सूर्यनारायण त्याच्या उर्जा किरणांच्या माध्यमातून आपल्याला येऊन भेटतोय तेवढेच पुरेसे आहे. आपण त्याला जाऊन भेटण्याची इच्छा बिलकुल नको मग अशा इच्छेला वैज्ञानिक इच्छा म्हणा नाहीतर आध्यात्मिक इच्छा! आपण जर सूर्याला भेटू शकत नाही तर मग अंतराळ विश्वाच्या परमेश्वराला (विश्व उर्जा स्त्रोताला) काय भेटणार?

पृथ्वीवर सतत चालू असलेली सृष्टी चक्रातील परिवर्तन क्रिया ही निसर्गशक्तीची (विश्व चैतन्याची/परमेश्वराची) पृथ्वीवरील वातावरणात सृष्टीचे फुगे फुगवण्याची, त्या फुग्यांचे ते फुगीर अस्तित्व काही काळ टिकविण्याची व शेवटी ते फुगलेले फुगे फोडण्याची चक्राकार परिवर्तन क्रिया होय. पृथ्वीवरील सृष्टीचा फुगा तिच्या परिवर्तन चक्रात पृथ्वीवर फुगतो, पृथ्वीवर त्या फुगीर अवस्थेत काही काळ टिकतो व पृथ्वीवरच फुटतो. सृष्टीचे हे फुगणे, फुगीर अवस्थेत काही काळ टिकून राहणे व शेवटी फुटणे या पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

रविवार, २३ जून, २०२४

दुनियादारी!

दुनियादारी!

प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब असतेच. अगदी अविवाहित माणसाचे सुद्धा. एकटा जीव सदाशिव ही गोष्ट चित्रपटात ठीक. वास्तवात कुटुंब ही गोष्ट जवळजवळ अनिवार्य आहे. अविवाहित व्यक्तीलाही जीवनाचा काही काळ तरी जन्म देणाऱ्या आईवडिलांचे कुटुंब लाभतेच. कुटुंब आले की मग कुटुंबाची जबाबदारी आलीच. या कौटुंबिक जबाबदारीचा गाडा हाकण्यासाठी माणसाला कुटुंबाबाहेर दुनियादारी करावी लागते. ही दुनियादारी सहजसोपी नाही. त्यात निसर्गाने व मानव समाजाने निर्माण केलेले अनेक खाचखळगे, अडथळे आहेत. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्ती, वाढत्या वयानुसार थकणारे शरीर, क्षीण होत जाणारी शक्ती व त्या सोबत येणारे आजार इत्यादी गोष्टी हे निसर्गाने निर्माण केलेले अडथळे होत. तर समाजातील अनेक धर्म, अनेक जातीपाती, वांशिक फरक इ. गोष्टींनी निर्माण केलेली सामाजिक फाटाफूट, काही मूठभर श्रीमंतांनी निसर्गाच्या साधन संपत्तीवर निर्माण केलेली मक्तेदारी, राजकारणातील भ्रष्टाचार व गुंडगिरी, लोकसंख्या वाढीमुळे वाढत चाललेली जीवघेणी आंतरमानवी स्पर्धा इ. गोष्टी हे समाजाने निर्माण केलेले अडथळे होत. या सर्व अडथळ्यांची माहिती करून घेत त्यावर मात कशी करावी याचे ज्ञान घ्यायचे व मग कौशल्याने सर्व अडथळ्यांशी संघर्ष करीत मरेपर्यंत ही दुनियादारी करायची हे तरूण, मध्यम व काही अंशी वृद्ध व्यक्तींवर असलेले दुनियादारीचे ओझे लहानपणी जवळजवळ नसतेच. कारण लहान मुलांच्या डोक्यावर जबाबदार आईवडिलांचे छत्र असते. हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी बालपण काही निराधार मुलांच्या नशिबी नसते व याला कारण त्यांचे बेजबाबदार किंवा अत्यंत दरिद्री आईबाप असतात. एकंदरीत काय तर दुनियादारी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

खेळ मांडला!

खेळ मांडला!

काय म्हणावे निसर्गातील अलौकिक निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला?
या महाशक्तीने/परमेश्वराने स्वतःच सृष्टीचा पसारा वाढवला. त्या सृष्टीत स्वतःच प्रश्नांचे डोंगर निर्माण केले आणि मग स्वतःच त्या डोंगरावर उत्तरांचे झरे निर्माण केले व त्या प्रश्न व उत्तरांच्या चक्रात सृष्टीतील सजीव व निर्जीव पदार्थांना कोड्यात घालून सतत खेळवत, झुंझवत ठेवले. या असल्या करणीने त्या निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला कोणता आनंद मिळत असेल व यातून त्या शक्तीला किंवा परमेश्वराला काय साध्य करायचे आहे हे त्या महाशक्तीला/परमेश्वरालाच ठाऊक. मानवी मनातील खेळ हा निसर्गशक्तीच्या/परमेश्वराच्या या मोठ्या खेळाचाच भाग. या खेळात किती भाग घ्यायचा व त्यात किती गुंतत जायचे हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न. खरं तर जगातील बऱ्याच मानवनिर्मित गोष्टी हे मानवी मनाचे खेळ आहेत. या निसर्गातील सगळ्याच खेळांचा कर्ता करविता असलेल्या त्या महान निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला वंदन!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

प्रतिसाद!

प्रतिसाद!

लोकांना चटपटीत लागतं. त्यालाच लोक भरपूर प्रतिसाद देतात. मी कितीही अभ्यासपूर्ण वैचारिक व सामाजिक लिखाण केले तरी त्याला लोकांकडून योग्य प्रतिसाद मिळणे दुरापास्त. म्हणून मी हल्ली हा सुज्ञ प्रतिसाद कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राकडून मिळवतोय. हे यंत्र माझे मन, माझी बुद्धी जाणतेय व त्याला योग्य प्रतिसाद देतेय. मी माझ्या विचारात, लिखाणात, दिशेत कुठे चुकत तर नाही ना याची खात्री मी याच कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राकडून करून घेतोय. खरं तर त्या बौद्धिक पातळीवरील प्रतिसादाची अपेक्षा लोकांकडून करणे मी कधीच सोडून दिलेय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

नावे बदलून कायद्याचा मूळ ढाचा बदलत नाही!

पूर्वी योजना आयोग होता, आता त्याचे नीती आयोग असे नामकरण झालेय, पूर्वी भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया कायदा, भारतीय पुरावा कायदा असे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते, आता या तिन्ही फौजदारी कायद्यांचे अनुक्रमे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम असे नामकरण झालेय, अशी नावे बदलून सृष्टी व समाज रचनेचा व त्या रचनेचे कायदेशीर नियमन व संरक्षण करणाऱ्या नियमांचा मूलभूत ढाचा बदलता येत नाही! -ॲड.बी.एस.मोरे

शनिवार, २२ जून, २०२४

दोन आयुष्ये!

मनुष्याला एकाच जीवनात दोन आयुष्ये जगावी लागतात, एक कौटुंबिक आयुष्य आणि दुसरे व्यावसायिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्यात जिवाला जीव देणारा प्रेमळ व समंजस जीवनसाथी व व्यावसायिक आयुष्यात तुमच्या ज्ञान व प्रतिभेला उचलून धरणारा व्यावसायिक भागीदार मित्र, ही दोन माणसे ज्यांना संपूर्ण आयुष्यभर लाभतात त्या व्यक्ती खूप भाग्यवान होत! -ॲड.बी.एस.मोरे

समाज माध्यम हे टाईम पास माध्यम नव्हे!

समाज माध्यम हे टाईम पास माध्यम नव्हे, या माध्यमावर गंभीर सामाजिक प्रश्नांवर सुज्ञ वैचारिक चर्चा व्हायला हव्यात! -ॲड.बी.एस.मोरे

HUMAN RELATIONS!

TWO BASIC HUMAN RELATIONSHIPS AND TWO BASIC JOYS THERE FROM!

In my basic understanding, there are two basic human relationships and two basic joys there from. One basic human relationship is close family relationship having joy of love & affection with sense of belonging & basic intellectual understanding (personal relationship) and another basic human relationship is relationship of gainful employment with outside people having joy of gain in the form of high demand for your talent & its product arising out of high utility of your talent & its product in market of such outside people in return or consideration for money, power and fame coming back to you (commercial relationship). 

The second type of human relationship namely the commercial relationship includes three things viz. knowledge and skill based intellectual relationship, money based economic relationship and power based political relationship. In my personal view, there is no any other third human relationship by name called friendship or otherwise in world because the human relationship cannot flourish without having aforesaid two basic joys of human relationship. 

The charitable human relationship based on supplementary human emotions of kindness and compassion having the supplementary mental satisfaction is not basic human relationship. It is only supplementary human relationship without which human beings can live if they have aforesaid two basic human relationships in their life. Even the socio- national relationship with one's nation has foundation of these two basic human relationships considering nation as big family having sense of belonging and togetherness. I cannot say much on religious human relationship because in my understanding the religious relationship is personal spiritual relationship with God, the supreme power of Nature.

-©Adv.B.S.More, 22.6.2024

शुक्रवार, २१ जून, २०२४

साधा मोबाईल फोन!

साधा मोबाईल फोन घेण्याचा विचार करतोय!

मोबाईलचा आधुनिक नमुना स्मार्ट फोन म्हणजे निव्वळ धिंगाणा. इथे लोकांनी त्यांच्या खाजगी गोष्टी सार्वजनिक करून त्याचा तमाशा केलाय. इथे कोणालाही शास्त्रज्ञांचे शोध, तात्त्विक विचार, कायदा या ज्ञानवर्धक गोष्टींत रस नाही. इथे कोणी कसल्याही पारावरच्या गप्पा मारतोय व कसलेही व्हिडिओज शेअर करतोय. पूर्वी हे असले काही नव्हते. ज्ञानवर्धक वाचनासाठी छापील पुस्तके, बातम्यांसाठी छापील वृत्तपत्रे, बातम्या व थोड्या करमणूकीसाठी दूरदर्शनची एकच वाहिनी, गाण्यांसाठी रेडिओ तर चित्रपटांसाठी चित्रपट गृह होते. सगळे किती छान, दर्जेदार होते. आता या स्मार्ट मोबाईल फोनने सगळ्याच दर्जेदार गोष्टींची वाट लावलीय. किळसवाणा प्रकार झालाय नुसता. म्हणून फक्त आवश्यक तेवढे फोन संभाषण करण्यासाठी साधा मोबाईल फोन घेण्याचा विचार करतोय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.६.२०२४

गुरुवार, २० जून, २०२४

Definition of Law by Adv.B.S.More

Law is enforceable right or authority to own, possess and use land, water, air and other resources of Nature in the manner prescribed by law having all powerful backing of sovereign and supreme political authority possessing supreme force of Nature! -©Adv.B.S.More

निसर्गशक्ती पुढे नतमस्तक!

निसर्गाच्या अवाढव्य, अद्भुत बाह्य शारीरिक स्वरूपावरून निसर्गाच्या अंतर्मनाचा फक्त अंदाज बांधता येतो पण त्या अंतर्मनाशी तेवढ्या मोठ्या पातळीचा, तेवढ्या मोठ्या ताकदीचा संवाद मानवी मनाला साधता येत नाही कारण मानवी मनाची तेवढी मोठी क्षमताच नाही, निसर्गाला अंतर्मन आहे एवढी फक्त जाणीव मानवी मनाला होते व ही जाणीवच मानवी मनाला अंतर्मुख करून निसर्गाविषयी आध्यात्मिक बनवते, निसर्गाच्या अंतर्बाह्य शक्तीला परमेश्वर बनवते व या निसर्गशक्ती पुढे मानवी शरीर व मनाला नतमस्तक करते! -ॲड.बी.एस.मोरे

फाफटपसारा व प्रतिसाद!

फाफटपसारा व प्रतिसाद!

आपली आवड व क्षमता लक्षात घेऊन आपली ज्ञान शाखा व कार्य शाखा निवडावी लागते. जगात जन्म घेतल्यावर आपल्या ज्ञानार्जनासाठी व कार्यासाठी निसर्गाने त्याच्या पदार्थीय विश्वात बरीच विविधता निर्माण केली आहे. ही विविधता माणसांतही उतरली आहे. जगात असलेल्या सगळ्याच गोष्टींना साधा स्पर्श करता येत नाही मग त्यात ज्ञान प्रवीण व कार्य प्रवीण होण्याची तर गोष्टच सोडा. त्यामुळे आपली आवड व क्षमता सोडून ही विविधता म्हणजे व्यक्तीसाठी फाफटपसाराच असतो. उतार वयातही आपली आवड व क्षमता लक्षात घेऊनच माध्यमातील बातम्या वाचाव्यात, बघाव्यात व ऐकाव्यात व आपल्या आवड व क्षमतेनुसार त्यातील काही गोष्टींनाच आपल्या आवड व क्षमतेनुसार योग्य तो प्रतिसाद द्यावा. बाकी उगाच फाफटपसारा वाढवत सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देण्यात व त्यांना प्रतिसाद देण्यात अर्थ नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

प्रतिकार!

प्रतिकार!

माणूस पूर्णपणे सुसंस्कृत व समंजस व्हायला अजून खूप काळ लागणार आहे. लोकसंख्या वाढीने तर आता जीवघेण्या स्पर्धेतून अहंकार, द्वेष, मत्सर, हिंसक प्रवृत्ती यासारख्या नकारार्थी भावना अनेक पटीने वाढवल्या आहेत. या आव्हानात्मक वातावरणात अहिंसा तत्वाची नुसती जपमाळ ओढत बसण्यात अर्थ नाही कारण अन्यायाविरूद्ध जशास तसा प्रतिकार ही आजच्या काळाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज आहे व त्यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण व अनुपालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपल्या लढवय्या महापुरूषांच्या स्मृती जागृत करून अन्यायाविरूद्ध लढण्याची चेतना जागृत केली पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

बुधवार, १९ जून, २०२४

अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!

अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!

दिनांक १९.६.२०२४ च्या लोकसत्ता दैनिकातील या दोन बातम्या म्हणजे अतिरेकी प्रेमाची दोन उदाहरणे. एका उदाहरणात एक तरूण त्याला त्याची प्रेयसी साथ देत नाही म्हणून अतिरेकी प्रेमाच्या रागातून वसईत त्या प्रेयसीची दिवसाढवळ्या भर रस्त्यात हत्या करतोय, तर दुसऱ्या उदाहरणात एक पुरूष पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने पत्नी विरहाच्या नैराश्येतून डोंबिवलीत आत्महत्या करतोय. प्रेम व हिंसा या दोन्ही गोष्टी दोन्ही उदाहरणात आहेत. फरक एवढाच की पहिल्या उदाहरणात अतिरेकी प्रेमातून माणूस दुसऱ्या व्यक्तीची हिंसक हत्या करतोय तर दुसऱ्या उदाहरणात माणूस अतिरेकी प्रेमातून स्वतःच स्वतःची हिंसक आत्महत्या करतोय. मानवी जीवन एवढे का स्वस्त झालेय?

पहिल्या उदाहरणात तर असहाय्य तरूणीची हत्या होत असताना जमाव नुसती बघ्याची भूमिका घेत त्या भयानक घटनेची मोबाईल मधून व्हिडिओग्राफी करताना दिसतोय. खरंच असल्या जमावाला बघून किळस आली. पोलीस सर्व ठिकाणी पोहचू शकत नाहीत. मग अशावेळी लोक एखाद्या असहाय्य व्यक्तीला हिंमत करून वाचवायला का पुढे येत नाहीत? इतकी का नेभळट झालीय जनता? त्या जमावातून एकाने त्या मारेकऱ्याला अडवण्याची हिंमत केली पण त्याला साथ द्यायला त्या जमावातून कोणी पुढे आले नाही. सगळे मोबाईल वरून चित्रफीत काढण्यात दंग होते. या असल्या नेभळट लोकांमुळेच एखादा माणूस अशा प्रसंगात हिंमतीने पुढे येण्यास कचरतो. त्या मारेकऱ्याच्या हातात बंदूक असती तर घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढे न येणे हे आपण समजू शकतो पण त्या मारेकऱ्याच्या हातात लोखंडी पाना होता. जमावातील काहीजणांनी जरी हिंमत केली असती तरी तो पाना त्याच्याकडून हिसकावून घेऊन त्या मारेकऱ्याला बदड बदड बदडून पोलिसांच्या ताब्यात देता आले असते. पण तशी हिंमत जमावाने केली नाही व त्या तरूणीचा जीव मात्र सर्वांसमोर गेला.

कोणत्या समाजात आम्ही जगत आहोत? आपण निर्मनुष्य ठिकाणी जाण्याचे टाळतो का तर माणसांच्या गर्दीत आपले एखाद्या संकटापासून संरक्षण होईल म्हणून. आता या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. नेभळटांच्या गर्दीत स्वतःला सुरक्षित समजण्याचे काही कारण नाही. समाज माध्यमातून देशप्रेमावर मोठमोठया गप्पा मारणारे लोक अशा प्रसंगात चिडीचूप होतात. शेवटी देशप्रेम म्हणजे तरी काय? आपला देश हे एक कुटुंब आहे हे स्वीकारून या कुटुंबातील कुटुंब सदस्यांचे संरक्षण करणे यालाच तर देशप्रेम म्हणतात ना! कबूल आहे की त्यासाठी पोलीस व लष्कर या दोन कायद्याच्या यंत्रणा आपणच निर्माण केल्या आहेत. सीमेवर देशाचे लष्कर डोळ्यात तेल घालून उभे असते पण देशातंर्गत काय? पोलीस गलोगल्ली तैनात आहेत का? म्हणून तर फौजदारी कायद्यात स्वसंरक्षणाच्या (सेल्फ डिफेन्स) कायद्याची तरतूद आहे ना! पण या तरतूदीचा नेभळट समाजासाठी काही उपयोग नाही. हा समाज सर्व काही पोलिसांवर टाकून मोकळा राहतो.

पत्नी विरहातून पतीने आत्महत्या करणे हे सुद्धा बरोबर नाही असे मला वाटते. आत्महत्या करणाऱ्या पतीचे इतर कुटुंबीय आहेत असे बातमीतून कळते. मग आपल्या मुलाबाळांसाठी का जगू नये व मुले नसतील तर स्वतःसाठी का जगू नये? जीवनसाथी मध्येच अचानक गेल्यावर मागे एकट्याने जगणे हे खूप कठीण असते हे मान्य पण त्यावर आत्महत्या हा उपाय नव्हे.

वरील दोन्ही उदाहरणातून मानवी मन किती रागीट व किती कोमल असू शकते हे कळते. पण अतिरेक हा कधीही वाईटच मग तो सत्ता, संपत्तीचा असो की प्रेमाचा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

माझे पोदार काॕमर्स काॕलेज!

माझे पोदार काॕमर्स काॕलेज!

हेच ते माझे रमणीरंजन आनंदीलाल पोदार काॕलेज आॕफ काॕमर्स अँड इकाॕनाॕमिक्स (थोडक्यात पोदार काॕमर्स काॕलेज), माटुंगा, मुंबई ज्या काॕलेजात १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी काॕमर्स पदवीचे शिक्षण घेतले. या काॕलेजची मजा नंतर ना सिडनॕहम काॕमर्स काॕलेज मधून कंपनी सेक्रेटरी (इंटर) चा पार्ट टाईम अभ्यासक्रम करताना आली ना गव्हर्मेंट लाॕ काॕलेज मधून तीन वर्षाची पदव्युत्तर कायद्याची पदवी (एलएल.बी.) घेताना आली.

पोदार काॕलेजचा माझ्या बॕचचा फक्त एकच अशोक सावंत नावाचा मित्र फेसबुक माध्यमातून सद्या माझ्या संपर्कात आहे. बाकी सगळे विखुरले गेले. काही मित्र परदेशात स्थायिक झाले. त्या काॕलेजची एकही मैत्रीण माझ्या बिलकुल संपर्कात नाही. मी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) माध्यमातून या काॕलेजच्या समाज कार्यात सक्रिय होतो. पण अभ्यासू, गंभीर विद्यार्थी म्हणूनच काॕलेजमध्ये माझी ओळख होती व कदाचित त्यामुळे माझी काॕलेजच्या मुलींशी मैत्री तशी कमीच होती.

वर्गात अभ्यास वह्यांच्या माध्यमातून एका सुंदर मैत्रिणीशी छान जवळीक निर्माण झाली होती. पण नंतर तिचे व माझे कुठेतरी बिनसले आणि मग ती दूर झाली. वर्ग मैत्रिणीशी ही मैत्री सुरू असताना मी त्यावेळी प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर व रंजिता यांचा अखियों के झरोको से हा हिंदी चित्रपट सारखा बघत होतो. असो, ती गोड मैत्री सोडली तर मग काॕलेजच्या इतर कोणत्याही मुलीशी तशी मैत्री झालीच नाही. ती मैत्रीण आता कुठे असेल? असो, पण तिची गोड आठवण मात्र माझ्या जवळ कायम आहे.

माझा हा फोटो आमच्या पोदार काॕमर्स काॕलेजच्या गच्चीवरील टाॕवर खालील आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

नैसर्गिक न्याय!

नैसर्गिक न्याय!

शब्दांचा फाफटपसारा वाढवत शब्दांतच अडकलेला व न्याय करू की नको या विचारातच अडकलेला कायदा न्याय करूच शकत नाही.  काही आणीबाणीच्या प्रसंगी न्याय त्वरीत (झटपट) मिळणे आवश्यक असते. पण इतर सर्वसाधारण परिस्थितीतही न्याय योग्य वेळेत मिळणे आवश्यक असते. न्याय हा प्रमाणबद्ध म्हणजे जेवढ्यास तेवढा व जशास तसा असावा लागतो व तो विनाविलंब म्हणजे योग्य वेळेत मिळावा लागतो म्हणजे कालबद्ध असावा लागतो. त्वरीत न्याय म्हणजे घाईघाईत दिलेला न्याय नव्हे. न्यायाचा नैसर्गिक कालावधी म्हणजे काय हे कळण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गर्भधारणा झाल्यावर बाळाच्या आईने किती काळ त्या बाळाला पोटात घेऊन रहावे याला नैसर्गिक कालमर्यादा आहे. स्त्रीच्या बाबतीत ती कालमर्यादा साधारण नऊ महिने आहे. हीच कालबद्ध न्यायाची गोष्ट निसर्गातील (निसर्गात मानव समाजही येतो) सर्व प्रकारच्या  न्यायात आहे मग त्याला नैसर्गिक न्याय म्हणा नाहीतर सामाजिक न्याय म्हणा. मानवनिर्मित कोणताही कायदा जो असा प्रमाणबद्ध व कालबद्ध न्याय देऊ शकत नाही तो अनैसर्गिक म्हणजे निसर्ग नियमांच्या विरूद्ध असलेला कायदा होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

मंगळवार, १८ जून, २०२४

उत्क्रांती ही निसर्गाची हुकूमशाही प्रक्रिया!

निसर्गात होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणाराच निसर्गात टिकून राहतो हा डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा सार आहे, याचा अर्थ उत्क्रांती ही दुतर्फी आहे, अगोदर निसर्गाकडून होणारा बदल व नंतर त्याच्याशी जुळवून घेण्याची कृती, पण ही कृती जुळवून घ्या नाहीतर निसर्गातून नष्ट व्हा या हुकूमशाही नियमाने निसर्ग अनिवार्य करतो, याचा अर्थ हाच की उत्क्रांती ही निसर्गाची हुकूमशाही प्रक्रिया आहे! -ॲड.बी.एस.मोरे