https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

कोरोना जोमात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात आहे. आमच्या सोसायटीतले दोघे कोरोनाने मेले. लोकल ट्रेन्स चालू होऊन मी पूर्ववत पार्ट टाईम वकिली कामानिमित्त मुंबईला जात नाही तोपर्यंत मी कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवले आहे. तसेच मी व्हॉटसअप बंद केले आहे. जाम टरकलोय मी! सद्या फेसबुकवर फुसफुस करणे एवढेच माझे काम! अजून तरी घरी बसून दोन वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत व कोणत्याही औषधाशिवाय तंदुरूस्त आहे हे नशीब! आज एका श्रीमंत क्लायंटने फोन करून सांगितले की त्यांच्या हायफाय सोसायटीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बहुतेक जण खाजगी लॕब्सकडून कोरोना चाचणी करून घेत आहेत. एका व्यक्ती साठी एका चाचणीचा दर सात हजार रूपये. म्हणजे घरात पाच माणसे असतील तर पाच जणांनी मिळून ७०००×५ = ३५,०००/- रूपये एका घरामागे द्यायचे. त्या सोसायटीत समजा एकूण घरे १०० असतील तर त्या खाजगी लॕबची कमाई १०० घरांच्या एका सोसायटीमागे पस्तीस लाख रूपये. श्रीमंतांच्या या हायफाय सोसायट्या त्या सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाला गाठून खाजगी कोरोना टेस्टसाठी तयार करायच्या असा धंदा जर सुरू असेल तर मग कोरोनापेक्षा हा धंदाच जोरात असे म्हणावे लागेल. खरे खोटे तो निसर्गच जाणो! पण या श्रीमंत क्लायंटच्या फोनमुळे साधारण अंदाज आला. या श्रीमंत क्लायंटला माहित आहे की मी गेली सहा महिने वकिलीतून एकही पैसा मिळविला नाही. शेवटी वैतागून मी बायकोचे मंगळसूत्र मोडले. ते पैसे संपल्यावर गेल्या महिन्यापासून माझी विवाहित मुलगी आम्हा नवरा बायकोला पोटासाठी पैसा देत आहे. इथे माझी खाण्यापिण्याची पंचायत आहे आणि हा श्रीमंत क्लायंट मला घाबरवून मीही त्यांच्या हायफाय सोसायटी प्रमाणे सात हजार रूपये वाली खाजगी कोरोना टेस्ट करून घ्यावी व बायकोचीही तशी टेस्ट करून घ्यावी हा सल्ला मला देत आहे. मग हे लचांड एकदा का मागे लावून घेतले की मग ते खाजगी लॕबवाले पुन्हा हात धुवून मागे लागणार नाहीत याची काय शास्वती? मला त्या श्रीमंत क्लायंटच्या श्रीमंत सल्ल्याचा खूप राग आला. त्याला मग आडवे घ्यावेच लागले फोनवरून! त्याला मी सरळ सांगितले की मी मरण्याची जय्यत तयारी केली आहे. कालच माझ्याच मरण तिरडीची पोस्ट मी फेसबुक वर टाकलीय. आमचीच टेस्ट काय तर संपूर्ण गरीब भारतीय जनतेच्या टेस्टस करणे व त्यांना सरकारी रूग्णालयात योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट देणे ही भारतीय संविधानाने सरकारची जबाबदारी आहे. कारण भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क बहाल करते. तो अधिकार सरकारला देता येत नसेल तर आमचे नशीब! हे त्या क्लायंटला  सुनावल्यावर त्या श्रीमंत क्लायंटला माझा खूप रागआला. त्याचा अहंकार जागृत झाल्याचे फोनवरून कळले. म्हणजे यापुढे त्या श्रीमंत  क्लायंटकडून पुढची कामे मिळणे बंद! बंद तर बंद, पण फालतू श्रीमंती सल्ले ऐकून घेणार नाही. काय वैताग आणलाय या कोरोनाच्या अर्धवट ज्ञानाने! तो कोरोना प्रत्यक्षात तर दूरच राहिलाय अजून तरी माझ्यापासून, पण ही असली माणसे आजूबाजूला आहेत त्यांचे हे असले मोठे सल्ले ऐकून अंगात खरंच कोरोना घुसलाय की काय असे क्षणभर वाटले. अरे बाबांनो, तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही गरीब! तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे? तुमची परिस्थिती काय आणि आमची परिस्थिती काय? आणि असले श्रीमंती सल्ले तुम्ही गरिबांना देता! यापूर्वीच मी व्हॉटसअप बंद करून टाकलेय. आता तर कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवलेय. नशिबाने जगलो, वाचलो व पुन्हा लोकल ट्रेनने मुंबईला पार्ट टाईम वकिलीसाठी जाऊ लागलो तर तोंडाला मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून भेटेनही. पण असले श्रीमंती सल्ले देणाऱ्या लोकांना बिलकुल भेटणार नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा