https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

साथी!

साथी चित्रपटाने करून दिली प्रेम धर्माची जाणीव!

(१) कालच्या मध्यरात्री (३० अॉगष्टची रात्र व ३१ अॉगष्टची पहाट, २०२०) राजेंद्रकुमार व वैजयंती माला यांचा १९६८ सालचा जुना चित्रपट टी.व्ही. वर पाहिला. मनाला खूपच भावला हा चित्रपट! गाणी तर सुंदर आहेतच, पण कथानक सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. या चित्रपटाचा शेवट सिमी गरेवाल हिने वैजयंती मालास म्हटलेल्या एका वाक्याने होतो. त्या अर्थपूर्ण वाक्यातूनच हा लेख बनला. "लो शांती, संभाल लो अपना पती, संभाल लो अपना धर्म" हेच ते वाक्य!

(२) प्रेमाला धर्म चिकटलेला असतो हेच या वाक्यातून कळते. तुम्ही जेंव्हा एखादी व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी वर मनापासून खरे प्रेम करता तेंव्हा त्या व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी विषयी प्रेमाचा धर्म निर्माण होतो. याच प्रेम धर्माला तुम्ही प्रेम कायदा असेही म्हणू शकाल. या प्रेम धर्मात तुम्ही ज्या व्यक्तीवर, भाषेवर किंवा राष्ट्रावर प्रेम करता त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राकडून तुम्हाला जसे काही प्रेमाचे हक्क प्राप्त होतात तशी तुमची त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राविषयी काही प्रेम कर्तव्येही निर्माण होतात ज्या कर्तव्यांत तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग असतो. उलट अशा प्रेम धर्मात हक्क कमी व त्यागाची कर्तव्येच जास्त असतात. थोडक्यात प्रेमात हक्क कमी व कर्तव्ये, त्याग, जबाबदाऱ्या जास्त असतात.

(३) तुम्ही जेंव्हा विवाह करता तेंव्हा तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून काही हक्क प्राप्त होतात. पण या हक्कांबरोबरच त्या जीवनसाथी विषयी तुमची काही कर्तव्येही निर्माण होतात. अशा कर्तव्यांत तुम्हाला तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग करून जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. जीवनसाथी कडून मिळणाऱ्या नुसत्या सुखातच नाही तर तिच्या दुःखातही सहभागी होण्यालाच विवाह धर्म म्हणतात व हा विवाह धर्म हाच प्रेम धर्म असतो. काल साथी चित्रपट पाहताना या विवाह धर्माची, प्रेम धर्माची, प्रेम कायद्याची नैसर्गिक जाणीव झाली.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा