https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अनंत चतुर्दशी!

अनंत चतुर्दशी, आज गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देताना!

आज मंगळवार दिनांक १ सप्टेंबर, २०२० हा अनंत चतुर्दशीचा दिवस! कोरोनाची जागतिक साथ नसती तर लालबागच्या राजासह मुंबई, पुणे व इतर शहरांतील मोठे गणपती आज वाजत गाजत विसर्जनासाठी निघाले असते. रस्ते गणेश भक्तांनी ओसंडून वाहिले असते. मुंबईतील मोठ्या गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. केवढा मोठा जनसागर लोटतो तिथे! मी माझ्या शालेय व कॉलेज जीवनात बाप्पाची मोठी विसर्जन मिरवणूक लॕमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या गेटवर बसून बघायचो. कारण त्या पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस चाळीत आमच्या ओळखीचे पोलीस मित्र राहात होते. त्यामुळे तिथे त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यांबरोबर त्या गेटवर बसून हळूहळू पुढे सरकणारे मोठे गणपती बघायचो. समोरच असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक जाडजूड मुलगा एकेक गणपती तिथे येऊन थांबला की मग मस्त नृत्य करायचा. त्याच्या नृत्याकडे बघत गणेशोत्सव मंडळाची माणसेही नाचायची. आता तो मुलगा माझ्या सारखाच  वृद्ध झालाय. दोन वर्षापूर्वी गणपती विसर्जन मिरवणूकीत तिकडे गेलो होतो तेंव्हा तो वृद्ध झालेला मुलगा आजारी असून अंथरूणावर खिळला असल्याचे कळले. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. पण मी त्यावेळी वयाची लाज न बाळगता लहान होऊन विसर्जन मिरवणूकीत नाचलो होतो. कोणी काही का म्हणेना पण गणपती बाप्पा जाताना मनाला वाईट वाटते हे मात्र नक्की! यामागे खूप मोठी आध्यात्मिक भावना आहे. दरवर्षी माणसे जन्म घेतात व मरतात. मरतात म्हणजे ती अनंतात विलीन होतात. ब्रम्हांड म्हणा नाहीतर अंतराळ म्हणा ते अनंत आहे. मेल्यावर त्या अनंतात विलीन व्हायचे. अनंत चतुर्दशी मधला अनंत शब्द हा त्या अनंताचेच प्रतीक असावा. गणेश मूर्तीचे विसर्जन म्हणजे या जगात जे जे नित्य नियमाने निर्माण होते त्याचा हळूहळू ऱ्हास होत नित्य नियमाने ते अनंतात विलीन होते असा अर्थ घेता येईल. त्याच निसर्ग नियमाने गणपती बाप्पा येतो, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याबरोबर राहतो व शेवटी आपला निरोप घेऊन अनंत चतुर्दशी दिवशी अनंतात विलीन होतो तो कायमचा नाही तर पुन्हा पुढील वर्षी परत येण्यासाठी! निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारी किती छान आध्यात्मिक कल्पना व श्रद्धा! यातला अर्थ ज्यांना कळत नाही त्यांनी या श्रद्धेला अंधश्रध्दा म्हटले तरी त्याची लाखो गणेश भक्तांना पर्वा नसते. ही आध्यात्मिक देव श्रद्धा पिढ्यानपिढ्या अशीच चालू राहणार यात शंकाच नाही. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील गावी छोटे गणपती सुद्धा अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जित होतात. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला माझी एवढीच प्रार्थना आहे की बाबा रे, तू जाताना तुझ्याबरोबर त्या विषारी कोरोनाला घेऊन जा व त्याला अनंतातच गाडून टाक म्हणजे मग आम्हाला मोकळा श्वास घेता येईल. मग पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला तुझे मस्त स्वागत करू. तुझ्या पुढे नाचू, गाऊ! हे २०२० वर्ष या कोरोना विषाणूने पार विषारी करून टाकले रे! तू विघ्नहर्ता आहेस! तूच या विषाणूचा नाश करशील अशी आमची श्रद्धा आहे. तुला निरोप देताना वाईट वाटतेय. पण पुढच्या वर्षी मात्र तुझा उत्सव जंगी होणार हे नक्की!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

साथी!

साथी चित्रपटाने करून दिली प्रेम धर्माची जाणीव!

(१) कालच्या मध्यरात्री (३० अॉगष्टची रात्र व ३१ अॉगष्टची पहाट, २०२०) राजेंद्रकुमार व वैजयंती माला यांचा १९६८ सालचा जुना चित्रपट टी.व्ही. वर पाहिला. मनाला खूपच भावला हा चित्रपट! गाणी तर सुंदर आहेतच, पण कथानक सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. या चित्रपटाचा शेवट सिमी गरेवाल हिने वैजयंती मालास म्हटलेल्या एका वाक्याने होतो. त्या अर्थपूर्ण वाक्यातूनच हा लेख बनला. "लो शांती, संभाल लो अपना पती, संभाल लो अपना धर्म" हेच ते वाक्य!

(२) प्रेमाला धर्म चिकटलेला असतो हेच या वाक्यातून कळते. तुम्ही जेंव्हा एखादी व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी वर मनापासून खरे प्रेम करता तेंव्हा त्या व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी विषयी प्रेमाचा धर्म निर्माण होतो. याच प्रेम धर्माला तुम्ही प्रेम कायदा असेही म्हणू शकाल. या प्रेम धर्मात तुम्ही ज्या व्यक्तीवर, भाषेवर किंवा राष्ट्रावर प्रेम करता त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राकडून तुम्हाला जसे काही प्रेमाचे हक्क प्राप्त होतात तशी तुमची त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राविषयी काही प्रेम कर्तव्येही निर्माण होतात ज्या कर्तव्यांत तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग असतो. उलट अशा प्रेम धर्मात हक्क कमी व त्यागाची कर्तव्येच जास्त असतात. थोडक्यात प्रेमात हक्क कमी व कर्तव्ये, त्याग, जबाबदाऱ्या जास्त असतात.

(३) तुम्ही जेंव्हा विवाह करता तेंव्हा तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून काही हक्क प्राप्त होतात. पण या हक्कांबरोबरच त्या जीवनसाथी विषयी तुमची काही कर्तव्येही निर्माण होतात. अशा कर्तव्यांत तुम्हाला तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग करून जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. जीवनसाथी कडून मिळणाऱ्या नुसत्या सुखातच नाही तर तिच्या दुःखातही सहभागी होण्यालाच विवाह धर्म म्हणतात व हा विवाह धर्म हाच प्रेम धर्म असतो. काल साथी चित्रपट पाहताना या विवाह धर्माची, प्रेम धर्माची, प्रेम कायद्याची नैसर्गिक जाणीव झाली.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.८.२०२०

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

मोहरम (ताजिया)

मोहरम (ताजिया)!

आज रविवार दिनांक ३० अॉगष्ट २०२० मोहरम (ताजिया) निमित्त मुस्लिम बंधू भगिनींना इमाम हुसेन यांचा मानवतावादी शांती संदेश! मी बालपणात पंढरपूरला असताना आजच्या दिवशी मुस्लिम मित्रांबरोबर ताजिया बनवायचो व ताजिया (डोले) जुलूस मध्ये सामील व्हायचो. सलीम शेख हा माझा शाळेतला मुस्लिम मित्र होता. त्याच्या बरोबर मी सांगोला रोडवरील संतपेठ (पंढरपूर) येथील मशिदीत ताजिया बनवायला मदत करायचो. आम्ही दोघे पंढरपूर मधील सगळे ताजिये (डोले) चंद्रभागा नदीत विसर्जित होईपर्यंत नदीकाठी थांबायचो. खूप छान वाटत असे. ताजिया बनवणे हे खूप सुंदर कलाकृतीचे काम असते. पंढरपूरात हिंदू व मुस्लिम एकमेकांच्या सण व उत्सवात सहभागी होतात. दोन्ही समाजात तिथे खूप भाईचारा आहे. आज ती आठवण आली.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर!

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर/देव!

(१) निसर्ग कशाला म्हणायचे? निसर्गाची संपूर्ण व्याख्या काय? पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टी व ग्रह, ताऱ्यांसह असलेल्या विश्वाच्या संपूर्ण  पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे का? विश्वाच्या पर्यावरणाचे मानवी मेंदूला आकलन होण्याच्या आतच माणूस मरतो. कारण मानवी आयुष्य खूप लहान आहे. नुसते लहानच नव्हे तर ते क्षणभंगुरही आहे. काही माणसांच्या वाट्याला ७० ते ८० वर्षांचे परिपक्व आयुष्यही येत नाही. आयुष्याचे पान ७० ते ८० वर्षांत पिकायच्या आतच काही माणसे विविध आजारांनी, खून किंवा आत्महत्येने किंवा अपघाताने मरतात. पण जी माणसे ७० ते ८० वयापर्यंत जगतात (अपवादात्मक बाब म्हणून काही थोडी माणसे आयुष्याची शंभरी सुद्धा गाठतात) त्यांना साधे पृथ्वीवरील पर्यावरण नीट लक्षात येत नाही मग त्यांना विश्वाचे पर्यावरण काय कळणार? याचा अर्थ हाच की पृथ्वीवर जन्मलेला कोणताही माणूस हा पूर्ण ज्ञानी होऊन मरत नाही. 

(२) जर विश्वाच्या संपूर्ण पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे तर मग या निसर्गाचे ज्ञान हे अगाध आहे. नुसते पृथ्वीवरील सजीव, निर्जीव सृष्टीचे पर्यावरणच समजणे कठीण आहे मग विश्वाच्या पर्यावरणाची तर गोष्टच वेगळी! म्हणजे निसर्ग हा मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर आहे. पण हा निसर्ग असा कसा तयार झाला? त्याच्या मागे ईश्वर/देव म्हणून कोणती तरी अद्भुत शक्ती आहे का या प्रश्नावर माणसाचा मेंदू ठाम होऊ शकत नाही. मग नास्तिक देव नाही म्हणोत की आस्तिक देव आहे म्हणोत. पण माणसांना जसे आईबाप असतात तसा निसर्गात ईश्वर/देव आहे असे मानून चालले तर मग हा ईश्वर/देव आपल्या पृथ्वीवरच किती विविध रूपात व गुणांत अवतीर्ण झालाय याची गोळाबेरीज केली तरी डोके गरगर फिरायला लागते.

(३) पृथ्वीला लाभलेला सूर्य हा तारा तर चंद्र हा उपग्रह, पृथ्वीवरील हवा, पाणी, जमीन व त्यात असलेले विविध निर्जीव पदार्थ, या सर्वांवर जगणाऱ्या पृथ्वीवरील विविध वनस्पती, विविध पक्षी, प्राणी व माणसे! केवढी ही विविधता या पृथ्वीवर! या विविधतेतच राहणारा निसर्गातील ईश्वर/देव! या सर्व विविध गोष्टी या जणू त्या ईश्वराचेच विविध अवतार ही सुद्धा एक वेगळी कल्पना! म्हणजे देव सूर्य, चंद्रात आहे, देव हवा, पाणी, जमीन यात आहे, देव झाडांत आहे, देव फुलाफळांत आहे, देव पक्षांत आहे, देव प्राण्यांत आहे व देव माणसांतही आहे. मग अशी जर कल्पना करून चालायचे तर मग कशा कशाच्या व कोणा कोणाच्या म्हणून पाया पडायचे?

(४) पृथ्वीवर असलेल्या पर्यावरणात निर्जीव व सजीव पदार्थांची परिवर्तनशील चक्रे आहेत. उदाहरणार्थ, मानवी जीवनाचे जन्म, जीवन व मृत्यू हे चक्र! पृथ्वीवरील निसर्गाच्या विविधतेत माणसांची विविधता समाविष्ट आहे. सर्व माणसांसाठी माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीने बनविलेला कायदा जरी समान असला तरी माणसे पूर्णपणे समान नाहीत. त्यांच्यात कला व गुणांची, बौद्धिक सामर्थ्याची विविधता आहे. अशी ही विविध प्रकारची माणसे या पृथ्वीवर जन्मतात, जीवन जगतात, जगताना सृष्टीतील व त्यांच्याकडील विविधतेची खास देवाणघेवाण करतात व शेवटी मरतात. हे जीवन चक्र असेच पिढ्यानपिढ्या चालू आहे.

(५) मानवी मन फार वेगळे आहे. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा असतो. हे आव्हान पेलताना मनातील सदसद्विवेकबुद्धी मनुष्याच्या मदतीला धावून येते. पण मानवी सदसद्विवेकबुद्धी सगळ्या माणसांत सारखी असत नाही. याला ज्ञान व बौद्धिक सामर्थ्यात असलेला फरक या कारणांबरोबर पृथ्वीवरील प्रादेशिक विविधतेतील विषमता वगैरे सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे सर्व माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सामूहिक कायदा असणे आवश्यक ठरते. हा सामूहिक कायदा समाजाच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धी मधून निर्माण होतो. पण कायद्याची ही प्रक्रिया खूप कठीण आहे. 

(६) आता प्रश्न निर्माण होतो की जर निसर्गाच्या विविधतेत विविध रूप, गुणांत ईश्वर वावरतोय तर मग तो मानव समाजाच्या सदसद्विवेकबुद्धी मधून तयार झालेल्या कायद्यातही असलाच पाहिजे. पण या कायद्याचे ज्ञान व समज किती जणांना असते? मग वकील व न्यायाधीशांना कायदा जास्त समजतो म्हणून त्यांनाच देव मानायचे का? असे अनेक प्रश्न निसर्गातील देव निर्माण करतो.

(७) महत्त्वाची गोष्ट हीही आहे की, प्रादेशिक विविधतेत प्रादेशिक विषमताही आहे. त्यामुळे निरनिराळ्या राष्ट्रांची प्रादेशिक संस्कृती सारखी नाही. या संस्कृतीत धर्म संस्कृती, देव संस्कृती, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती इत्यादी गोष्टी येतात. या सगळीकडे सारख्या नाहीत. आपण भारतीय भारतात जन्मलो, इथेच वाढलो म्हणून  आपल्या मनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. पण समजा आपण इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, चीन या ठिकाणी जन्म घेऊन तिथेच वाढलो असतो तर आपले धर्म कोणते असते व आपले देव कोणते असते? आपण काय खाल्ले असते? चीनमध्ये जन्मलो असतो व तिथेच वाढलो असतो तर आपणही तिथल्या खाद्य संस्कृती प्रमाणे साप, पाली, उंदरे, झुरळे, कुत्री यासारखे प्राणी बिनधास्त खाल्ले असते का? हे प्रश्न आपल्या बुद्धीला पडले पाहिजेत. तरच आपल्याला निसर्ग, देव या संकल्पना नीट समजतील. एवढे मात्र खरे की निसर्गातील विविधतेमुळे (निसर्ग विविधा) निसर्गातील ईश्वर/देव मात्र अनाकलनीय झाला आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

टीपः 

माझे ज्ञान व माझा अनुभव यांच्याशी माझ्या मनातील सदसद्विवेकबुद्धीचा सतत चाललेला सुसंवाद म्हणजेच माझे सातत्यपूर्ण विचार! हा लेख या विचारांतूनच तयार झाला आहे. तो माझ्या वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीवर आधारित असल्याने तो सर्वांनाच पटेल असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की, त्यांना या लेखातील काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांचे योग्य ते परीक्षण करून योग्य कारणमीमांसेसह टीका करावी पण कुचेष्टेने हास्य किंवा रागाच्या तयार इमोजी वगैरे टाकून माझ्या लेखाची चेष्टा करू नये किंवा वाद घालू नयेत.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सगळेच ज्ञान व्यवहारात उपयोगी येत नाही!

सगळेच ज्ञान व्यावहारिक होत नाही!

आपला मोठा मेंदू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खूप काही ज्ञान साचवत जातो. या ज्ञानात माणसेही असतात. पण सगळ्याच ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येत नाही. व्यवहार म्हटले की पैसा आला. पैसा नसेल तिथे कसला व्यवहार? पण काही व्यवहार हे पैशाशिवाय असू शकतात. अशा व्यवहारात पैशाची नसली तरी प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होत असते. पण शेवटी असे संबंध भौतिक संपत्तीशी निगडीत असल्याने ते व्यावहारिकच असतात. पण आपण मिळविलेले सगळेच ज्ञान व्यावहारिक होऊ शकत नाही. माझी मूलभूत पदवी कॉमर्सची. पण सुरूवातीला अकाऊंटस क्लार्क म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी कंपनी सेक्रेटरी कोर्सचे इंटर पर्यंतचे शिक्षण घेतले. काही महिनेच कंपनी सेक्रेटरी सहाय्यक म्हणून काम केले व नंतर ते बंद झाले. त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी एलएल. बी. करून वकिली सुरू केली. मूलभूत बी.कॉम. पदवी नंतरच्या तीन वर्षाच्या कायद्याच्या मोठ्या  अभ्यासक्रमात अनेक कायद्यांचा अभ्यास केला पण वकिली सगळ्या कायद्यांत करता आली नाही. आता तर फक्त मालमत्ता कायद्यातच वकिली करतोय व तीही पार्ट टाईम. म्हणजे कायद्याच्या एकूण ज्ञानापैकी फक्त पाच ते दहा टक्के ज्ञानाचाच पैसे कमावण्यासाठी मला सद्या उपयोग होतोय. म्हणजे कायद्याचे बाकीचे ९० टक्के ज्ञान व्यवहारशून्य झाले. जी गोष्ट माझ्या शैक्षणिक ज्ञानाची तीच गोष्ट माणसांची. माझ्या आयुष्यात खूप माणसे आली. पण खूप मोठ्या कष्टाने मिळविलेल्या माझ्या शैक्षणिक ज्ञानाला आर्थिक किंमत देऊन मला पैसा कमवू देणारी माणसे किती मिळाली तर पाच टक्के सुद्धा नाहीत. या पाच टक्के माणसांचाच व्यावहारिक उपयोग झाला. बाकीची ९५ टक्के माणसे ही व्यावहारिक बनू शकली नाहीत. या माणसांत आईवडील, बहीणभाऊ, बायको व मुलगी व इतर नातेवाईक यांना वगळले आहे. कारण अशा जवळच्या नात्यांत व्यवहारापेक्षा माया, प्रेमाला जास्त महत्व असते. माझ्याशी मैत्री केलेले मित्र हळूहळू दूर झाले. म्हणजे दहा ते वीस मित्रांपैकी आता फक्त दोन ते पाचच मित्र शिल्लक राहिले. तेही आता माझ्या सारखे वृद्ध होऊन आपआपल्या संसारात, त्यांच्या मुला मुलींच्या संसारात, नातवंडात मग्न आहेत. मला अधूनमधून फोन करून तब्बेतीची चौकशी करतात एवढीच काय ती त्यांची आता मैत्री उरलीय. या सर्वाचा सार काय तर माणूस जे काही ज्ञान मिळवतो ज्यात माणसेही आली त्याचा व्यावहारिक उपयोग फार म्हणजे फारच कमी होत असतो. मग मोठ्या मेंदूत साचलेल्या इतर ९० ते ९५ टक्के ज्ञानाचे करायचे काय? तर त्या ज्ञानाचा आवडता छंद जपण्यासाठी उपयोग करून त्यातून स्वतःसाठी मानसिक समाधान, आनंद मिळवायचा. माझे फेसबुक लिखाण हे माझ्या त्या छंदाचा, आनंदाचा भाग आहे जिथे मी माझे ९५ टक्के ज्ञान फुकट शेअर  करीत आहे. फुकटच म्हणायचे कारण या मुक्त लिखाणातून मला पैसा मिळत नाही. अर्थात माझ्या लिखाणाचा व्यावहारिक उपयोग शून्य आहे. पण तरीही माझे हे लिखाण मला आनंद देत असल्याने ते व्यर्थ जात आहे असे सुद्धा  म्हणता येणार नाही. कारण मानसिक आनंद, समाधानाची पैशात किंमत करता येत नाही. तीच गोष्ट माणसांची! माझ्या ओळखीची जी काही माणसे आहेत त्यापैकी आता फार थोडी माणसे व्यावहारिक उपयोगासाठी शिल्लक राहिली आहेत. बाकीची फक्त अधूनमधून हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शिल्लक आहेत. त्यातूनही काही माणसे गप्पा मारता मारता स्वतःचेच काहीतरी पुढे दामटतात. हे दामटणे अती झाले की मग त्या गप्पांचा उपद्रव होतो. मग अशा माणसांना मला हळूच बाजूला करावे लागते, नव्हे कायमचे ब्लॉकच करावे लागते. धड व्यवहार नाही, धड मानसिक आनंद नाही, उलट उपद्रवच! कशाला हवीत अशी उपद्रवी माणसे केवळ ओळख म्हणून जवळ? ज्ञानाचा वारंवार उपयोग झाला नाही तर मोठा मेंदू असे निरूपयोगी ज्ञान हळूहळू डिलीट करतो. तेच काम तो माणसांविषयीही करतो कारण माणसे ही सुद्धा ज्ञानाचाच एक भाग असतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.८.२०२० 


कोरोना जोमात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात, आम्ही कोमात!

कोरोना जोरात आहे. आमच्या सोसायटीतले दोघे कोरोनाने मेले. लोकल ट्रेन्स चालू होऊन मी पूर्ववत पार्ट टाईम वकिली कामानिमित्त मुंबईला जात नाही तोपर्यंत मी कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवले आहे. तसेच मी व्हॉटसअप बंद केले आहे. जाम टरकलोय मी! सद्या फेसबुकवर फुसफुस करणे एवढेच माझे काम! अजून तरी घरी बसून दोन वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत व कोणत्याही औषधाशिवाय तंदुरूस्त आहे हे नशीब! आज एका श्रीमंत क्लायंटने फोन करून सांगितले की त्यांच्या हायफाय सोसायटीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बहुतेक जण खाजगी लॕब्सकडून कोरोना चाचणी करून घेत आहेत. एका व्यक्ती साठी एका चाचणीचा दर सात हजार रूपये. म्हणजे घरात पाच माणसे असतील तर पाच जणांनी मिळून ७०००×५ = ३५,०००/- रूपये एका घरामागे द्यायचे. त्या सोसायटीत समजा एकूण घरे १०० असतील तर त्या खाजगी लॕबची कमाई १०० घरांच्या एका सोसायटीमागे पस्तीस लाख रूपये. श्रीमंतांच्या या हायफाय सोसायट्या त्या सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाला गाठून खाजगी कोरोना टेस्टसाठी तयार करायच्या असा धंदा जर सुरू असेल तर मग कोरोनापेक्षा हा धंदाच जोरात असे म्हणावे लागेल. खरे खोटे तो निसर्गच जाणो! पण या श्रीमंत क्लायंटच्या फोनमुळे साधारण अंदाज आला. या श्रीमंत क्लायंटला माहित आहे की मी गेली सहा महिने वकिलीतून एकही पैसा मिळविला नाही. शेवटी वैतागून मी बायकोचे मंगळसूत्र मोडले. ते पैसे संपल्यावर गेल्या महिन्यापासून माझी विवाहित मुलगी आम्हा नवरा बायकोला पोटासाठी पैसा देत आहे. इथे माझी खाण्यापिण्याची पंचायत आहे आणि हा श्रीमंत क्लायंट मला घाबरवून मीही त्यांच्या हायफाय सोसायटी प्रमाणे सात हजार रूपये वाली खाजगी कोरोना टेस्ट करून घ्यावी व बायकोचीही तशी टेस्ट करून घ्यावी हा सल्ला मला देत आहे. मग हे लचांड एकदा का मागे लावून घेतले की मग ते खाजगी लॕबवाले पुन्हा हात धुवून मागे लागणार नाहीत याची काय शास्वती? मला त्या श्रीमंत क्लायंटच्या श्रीमंत सल्ल्याचा खूप राग आला. त्याला मग आडवे घ्यावेच लागले फोनवरून! त्याला मी सरळ सांगितले की मी मरण्याची जय्यत तयारी केली आहे. कालच माझ्याच मरण तिरडीची पोस्ट मी फेसबुक वर टाकलीय. आमचीच टेस्ट काय तर संपूर्ण गरीब भारतीय जनतेच्या टेस्टस करणे व त्यांना सरकारी रूग्णालयात योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट देणे ही भारतीय संविधानाने सरकारची जबाबदारी आहे. कारण भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क बहाल करते. तो अधिकार सरकारला देता येत नसेल तर आमचे नशीब! हे त्या क्लायंटला  सुनावल्यावर त्या श्रीमंत क्लायंटला माझा खूप रागआला. त्याचा अहंकार जागृत झाल्याचे फोनवरून कळले. म्हणजे यापुढे त्या श्रीमंत  क्लायंटकडून पुढची कामे मिळणे बंद! बंद तर बंद, पण फालतू श्रीमंती सल्ले ऐकून घेणार नाही. काय वैताग आणलाय या कोरोनाच्या अर्धवट ज्ञानाने! तो कोरोना प्रत्यक्षात तर दूरच राहिलाय अजून तरी माझ्यापासून, पण ही असली माणसे आजूबाजूला आहेत त्यांचे हे असले मोठे सल्ले ऐकून अंगात खरंच कोरोना घुसलाय की काय असे क्षणभर वाटले. अरे बाबांनो, तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही गरीब! तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे? तुमची परिस्थिती काय आणि आमची परिस्थिती काय? आणि असले श्रीमंती सल्ले तुम्ही गरिबांना देता! यापूर्वीच मी व्हॉटसअप बंद करून टाकलेय. आता तर कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवलेय. नशिबाने जगलो, वाचलो व पुन्हा लोकल ट्रेनने मुंबईला पार्ट टाईम वकिलीसाठी जाऊ लागलो तर तोंडाला मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून भेटेनही. पण असले श्रीमंती सल्ले देणाऱ्या लोकांना बिलकुल भेटणार नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०

बुध्दंम् सरणम् गच्छामी!

 *!! भवतु सब्ब मंगलम् !!*
  (सगळ्यांचे कल्याण होवो)

       *" बुध्दं सरणं गच्छामि "*
(मी बुद्धास अर्थात माझ्या सदसद्विवेकबुद्धीस
  शरण जात आहे)

       *" धम्मं सरणं गच्छामि "*
(मी बुद्ध विचारांच्या तत्वज्ञानास शरण जात 
  आहे)

        *" संघं सरणं गच्छामि  "*
  (मी सदसद्विवेकबुद्धीला शरण जाऊन मनावर             
   विजय प्राप्त करीत जगाचे कल्याण व 
   जगात शांती प्रस्थापित करू शकणाऱ्या
   सबळ मनाच्या आदर्श लोकसमूहाला शरण
   जात आहे)

🌹🌹🌹सबका मंगल हो🌹🌹🌹

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

मरण कसे यावे?

मरण कसे यावे?

मरण म्हणजे जगण्याच्या संघर्षातून सुटका अर्थात मुक्ती आणि पुढे चिरशांती! मग ते शांत नको का असायला? जन्माला यायच्या अगोदर  बाळ आईच्या पोटात असते तेंव्हा किती शांतता उपभोगत असेल नाही! आईच्या अन्नातून अन्न, पाण्यातून पाणी व श्वासातूनच श्वास आणि तो आईच्या पोटातच घ्यायचा म्हणजे जगण्यासाठी लागणारी कसली कटकटच नाही. मेल्यावर आपल्या मनाची कवाडे कायमची बंद होतात व आपले मृत शरीर अनंतात विलीन होते. अनंत असलेले विश्व हे जणू काही आईचे पोटच! त्या पोटात शिरायचे व तिथेच विलीन व्हायचे आणि चिरशांती उपभोगायची! किती छान कल्पना! आत्मा नाही, स्वर्ग नाही की नरक नाही. फक्त चिरशांती! मेल्यावर ही चिरशांती सगळ्यांनाच म्हणजे पापी व पुण्यवान दोघांनाही मिळते असे मला वाटते. पुण्यवान माणसांना स्वर्ग व पापी माणसांना नरक असे असते काय? माझा तरी या कल्पनेवर विश्वास नाही. पुण्य कर्माचे चांगले फळ मिळवायचे व पाप कर्माची वाईट शिक्षा भोगायची या दोन्हीही गोष्टी याच इहलोकात! या लेखाचा विषय मरण कसे यावे हा आहे. जसा जन्म सहज व्हावा तसे मरण सुद्धा सहज यावे. हल्ली उठसूठ सिझेरियन बाळंतपणे करतात. बाळ अडले वगैरे तर सिझेरियन करणे ठीक! पण हल्ली सिझेरियनची बाळंतपणे खूप होऊ लागल्याचे दिसत आहे. माझ्या आईची चार बाळंतपणे झाली पण अगदी सहज! एक बहीण तर घरातच झाली. माझ्या बायकोचे बाळंतपण कुर्डुवाडी सारख्या छोट्या खेडे शहरात सहज झाले. मी हे म्हणतोय की जन्म सहज व्हावा व मरणही सहज यावे. बाकी जीवन जगायचा संघर्ष हा तर पाचवीलाच पुजलेला! मरण सहज यावे म्हणजे कसे यावे? तर झाडाची पिकलेली पाने जशी सहज गळून पडतात तसे सत्तरी ओलांडल्यावर पिकल्या पानासारखे मरण यावे. काय ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, कृत्रिम श्वासावर जगवण्याचा प्रयत्न करणे! वृध्दावस्था आणि त्यावर पुन्हा अशी हॉस्पिटल वारी! मला तर धडकीच भरते या गोष्टी बघून! सिझेरियन शिवाय जन्म व्हावा व हॉस्पिटलशिवाय घरीच पिकल्या पानासारखे नैसर्गिक मरण यावे. तसेच मेल्यावर मृतदेहावर जे अंत्यसंस्कार केले जातात ते सुद्धा अगदी साग्रसंगीत केले जावेत ही माझी वैयक्तिक इच्छा! माझे वडील २००९ साली गेले तेंव्हा त्यांना स्मशानात घेऊन जाण्यासाठी खूप नातेवाईक व मित्र मंडळी जमा झाली होती. ते गिरणी कामगारांचे पुढारी होते म्हणून असेल. पण त्यांच्या मृत शरीराला पाण्याने धुणे, त्यावर हार फुले घालणे, लाकडाच्या ताठीवर झोपवणे, मग नातेवाईकांपैकी चार खांदेकऱ्यांनी खांदा देऊन ताठी खांद्यावर घेऊन अंत्ययात्रा हळूहळू चालत चालत स्मशानभूमीत नेणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या बाबतीत झाल्या. पण माझ्या आईला व धाकट्या भावाला मात्र अशी खांदे देणारी अंत्ययात्रा नशिबी आली नाही. हारफुले, ताठी होती. पण ती ताठी ॲम्ब्युलन्समधून बदलापूरच्या स्मशानभूमीत न्यावी लागली. याचे कारण काय तर राहण्याचे ठिकाण बदलापूर पूर्वेकडील एका लांबच्या कोपऱ्यात तर ती स्मशानभूमी बदलापूर पश्चिमेकडील नदीकाठी असलेल्या दुसऱ्या लांबच्या कोपऱ्यात! एवढे लांब चालणारे खांदेकरी मिळायला हवेत ना! मृत शरीराचे वजन किती हाही महत्त्वाचा भाग असतोच खांदे देताना. म्हणून निवासस्थान हे स्मशान भूमीपासून जवळ असले तर ते सोयीचे होते अशा खांदे देणाऱ्या अंत्ययात्रेसाठी! हल्ली तर काय कोरोनाने मरणाची व अंत्यसंस्काराची पुरती वाटच लावून टाकली आहे. कोरोना झालाय या भीतीनेच रूग्ण अर्धमेला होतो व नातेवाईक गर्भगळित होतात. मग असा रूग्ण मेला की त्याला प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्याची रवानगी ॲम्ब्युलन्समधून सरळ इलेक्ट्रिक स्मशानभूमीत! तिथे कोणी जवळचे नातेवाईक हजर नसतात. मग तो मृतदेह त्या प्लास्टिक कव्हरसह विद्युत दाहिनीत ढकलला जातो. पुढे त्या भट्टीत तो मृतदेह प्लास्टिक कव्हरसह जळतो. त्यानंतर त्या मृतदेहाची हाडे व राख गोळा केली जाते का? नदीत किंवा समुद्रात त्या हाडांचे, राखेचे विसर्जन करण्याचा तर प्रश्नच उरत नाही अशा परिस्थितीत! पण मला कळत नाही की, जर कोरोना विषाणू हा कोरोनाग्रस्त जिवंत माणसाच्या श्वासातून, शिंकण्यातून इतरांना होतो तर मग कोरोनाग्रस्त माणूस मेल्यावर त्याचा मृतदेह असा श्वास सोडत नसताना, शिंकत नसताना त्या मृत देहाला लोक एवढे घाबरतात का? सामान्य माणसे सोडा, पण डॉक्टर्स, नर्स सुद्धा? हे सगळं समजण्याच्या पलिकडे गेलेय. काय ही त्या मृतदेहाची हेळसांड व चेष्टा! एवढी जबरदस्त भीती निर्माण केली गेलीय की नातेवाईकांना जवळही जाता येत नाही त्या मृतदेहाजवळ! आता मी माझ्या मरणाकडे वळतो. माझे ६४ वय झालेय. माझे वडील ७९ वर्षे जगले. मीही तेवढा जगलोच पाहिजे अशी काही माझी तीव्र इच्छा नाही. पण माणूस पिकल्या पानासारखा सहज नैसर्गिक मेला पाहिजे या मतावर मात्र मी ठाम आहे. आता ६४ वयात माझे पान हे ७५ टक्के पिकलेय व २५ टक्के हिरवे आहे. माझ्या पानाचा देठ तर मस्त हिरवागार आहे. मग मी या वयात पिकल्या पानासारखा अगदी सहज कसा मरू शकतो? मला तर अगदी पिकल्या पानासारखेच मरायचेय! दुसरी इच्छा ही की, माझे पिकले पान सहज गळून पडल्यावर मग माझ्या मृतदेहाला माझ्या वडिलाप्रमाणेच काही जवळच्या नातेवाईकांनी खांद्यावर उचलून स्मशान भूमीत घेऊन जावे. डोंबिवली (पूर्व) येथील माझे निवासस्थान इथल्या स्मशानभूमी पासून तसे फार दूर नाही. खांद्यावर अंत्ययात्रा जाण्याला सुद्धा मोठे नशीब असावे लागते काय? पंढरपूरला प्राथमिक शाळेत असताना मी शाळेला दांड्या मारून चंद्रभागा नदीकाठी उनाडक्या करायला जायचो तेंव्हा शिक्षकांच्या हुकूमावरून वर्गमित्र मला त्यांच्या खांद्यावर माझ्या शरीराची जिवंत तिरडी करून शाळेत घेऊन जायचे. मग मी मेल्यावर माझी तशी तिरडी का नको? मला कोणी तसे खांदेकरी मिळणारच नाहीत का?

-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०

मी सद्या काय करतोय?

सद्या मी काय करतोय?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गाव ज्या गावचे ग्राम दैवत कोडलिंग आहे ते माझे वडील कै. सोपान मारूती मोरे यांचे मूळ गाव. अजूनही मी ते गाव बघितले नाही. कारण नंतर आम्ही पंढरपूरला स्थायिक झालो व पंढरपूर आमचे गाव झाले. माझी आई कै. चंद्रभागा मोरे ही कुर्डुवाडी केम जवळील ढवळस गावची ज्या गावचे ग्रामदैवत आहे माळावरची अंबाबाई. मी तिथे लहानपणी गेलो होतो. माझी सासुरवाडी कुर्डुवाडी. आता मी मुंबई पासून ६० कि.मी. लांब असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील डोंबिवली शहरी स्थायिक आहे. माझे वय ६४ आहे. सद्या मुंबईत कंपनी कायदा सल्लागार ही पार्ट टाईम वकिली चालू. त्यातून दरमहा जेमतेम २०,००० (वीस हजार) रूपये कायदा सल्ला फी मिळवत होतो. पण कोरोना लॉकडाऊनने त्या पार्ट टाईम वकिलीलाही ग्रहण लावलेय. वाईट वाटते की, कोरोनाने काही माणसे लवकर गेली, जिवंत आहेत त्यांचे आर्थिक नुकसान खूप झाले, यातून जाताना मी माझ्या आयुष्याची उजळणी केली, उगाच कवटाळलेल्या निरर्थक गोष्टी दूर केल्या, त्यातून ज्ञान उजळून निघाले!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.८.२०२०

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

मोठ्या मेंदूची कवाडे उघडी करा!

मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!

ज्ञानेंद्रियांचा संपर्क निसर्गाशी प्रस्थापित झाला की मग मोठ्या मेंदूच्या जाणिवा खुल्या होतात. मोठ्या मेंदूच्या जाणिवा पूर्ण खुल्या होत नाहीत तोपर्यंत त्या मेंदूला निसर्गाचे सत्य आहे त्याच स्वरूपात कळत नाही. पण ज्ञानेंद्रियांचा संपर्क  निसर्गाशी प्रस्थापित झाल्यावरही मोठा मेंदू पूर्ण जाणिवेने खुला होत नाही. अशा अर्धजागृत मेंदूला निसर्गाचे पूर्ण सत्य कळू शकत नाही. अशा अर्धजागृत मेंदूत काही जागा रिकाम्या राहतात. अशा रिकाम्या जागा काही काल्पनिक मिथ्ये, आभास यांनी भरल्या जातात आणि मग अर्धजागृत मेंदू अर्धसत्याबरोबर जगू लागतो. असा मेंदू म्हणजे अर्धज्ञानी मेंदू! अशा मेंदूला निसर्गाचे सत्य वेगळ्या आभासी स्वरूपात दिसू शकते. उदा. अंधारात हवेने खालीवर होणाऱ्या झाडाच्या फांद्या अशा मेंदूला लोंबकळणाऱ्या भुतांसारख्या भासू शकतात. पण हा निव्वळ भास आहे हे अशा अर्धजागृत, अर्धज्ञानी मेंदूला कळत नाही. नैसर्गिक सत्याविषयीच्या अर्ध्या ज्ञानाचा व अर्ध्या अज्ञानाचा हा दुष्परिणाम असतो. मोठा मेंदू हा जाणीवपूर्वक ऐच्छिक क्रिया करणारा मेंदू तर छोटा मेंदू हा मोठ्या मेंदूला थांगपत्ता लागू न देता गुपचूप अनैच्छिक क्रिया करणारा मेंदू. खरं तर, हे एकाच मेंदूचे दोन भाग पण त्यांच्या कार्यानुसार त्यांना मोठा मेंदू व छोटा मेंदू अशी नावे मेंदू शास्त्रज्ञांनी दिली आहेत. निसर्गाला निसर्ग म्हणूनच अनुभवायचे असेल तर मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.८.२०२०

वैज्ञानिक दृष्ट्या मृत्यू म्हणजे काय?

मृत्यूचा वैज्ञानिक अर्थ!

मृत्यूच्या भीती ऐवजी मृत्यूचा अभ्यास करायला या कोरोनाने मला भाग पाडले. मृत्यू तर येणार आहेच, मग त्याला सामोरे जायची तयारी नको का करायला? उगाच काल्पनिक अध्यात्माला किंवा एखाद्या भविष्यवेत्त्याला जवळ करीत आभासात राहून मृत्यूला जवळ करायचे की निसर्गाचे विज्ञान समजून घेऊन सत्य स्वरूपात मृत्यूला जवळ करायचे या दोन्ही पर्यायांत मी विज्ञानाचा पर्याय स्वीकारलाय. कारण मेंदूचे कार्य हे भावनांच्या, कल्पनांच्या, आभासाच्या पलिकडचे आहे. हवेतला प्राणवायू व अन्न, पाण्यातील पोषक द्रव्ये रक्त शोषण करते. याच रक्ताच्या ताकदीने माणूस जगतो. माणसाची फुफ्फुसे व त्याचे हृदय हे अवयव या रक्ताशी संबंधित कार्य करतात. कोरोना विषाणू एकदा का फुफ्फुसांत घुसला की तो हे रक्ताचे मूलभूत कार्यच बिघडवतो. या विषाणूमुळे रक्तच जर खराब म्हणजे विषारी झाले तर मग जीवन कसे शक्य होणार? म्हणून मग रक्त शुद्धीकरणाची औषधे दिली जात असावीत. मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही म्हणून असावीत हा शब्द वापरला आहे. मानवी मेंदू हा दोन भागात विभागला गेलाय. जाणिवेने ऐच्छिक कामे करणारा मोठा मेंदू हा एक भाग व शरीर सुरळीत चालण्यासाठी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनैच्छिक कामे करीत असलेला छोटा मेंदू हा दुसरा भाग! मोठ्या मेंदूला इजा पोहोचून त्या मेंदूची जाणीव नष्ट झाल्यामुळे माणूस कोमात गेला तरी माणूस  जिवंत राहू शकतो. पण ते जगणे जाणीव नसलेले असते. अशा जगण्यात फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य चालू असते. कारण त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा छोटा मेंदू व्यवस्थित कार्य करीत असतो. म्हणजे माणूस मोठा मेंदू मृत झाल्याने मरत नाही तर छोटा मेंदू मृत झाल्याने मरतो. कारण छोटा मेंदू मृत झाला की फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य पुढे चालूच शकत नाही. याचा अर्थ हा की, कोरोना फुफ्फुसांतून हृदयाच्या मार्फत रक्तात मिसळतो. मग त्या विषाणूमुळे विषारी झालेले रक्त मोठ्या मेंदूला बाद करते व शेवटी छोट्या मेंदूला बाद करून कोरोनाग्रस्त रूग्णाला मारते. हा माझा अभ्यास आहे. पण मी वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याने असे ठामपणे म्हणू शकत नाही. तरीही माझा हा अभ्यास हवेतला नाही. डॉ. प्रेमानंद रामाणी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मेंदू सर्जनने लिहिलेले मेंदूची ओळख हे पुस्तक माझ्या अभ्यासाचा आधार आहे. कालच न्यायवैद्यक शास्त्रावरील रायबहादूर जयसिंग पी. मोदी या माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकात वेडेपणा म्हणजे काय ही जी माहिती लिहिलीय ती मी फेसबुक पोस्टने वाचकांना सांगितली. आज माझ्या संग्रहातील या दुसऱ्या वैज्ञानिक पुस्तकावर आधारित ही मेंदू व मृत्यू संबंधीची महत्त्वाची माहिती मी आजच्या फेसबुक पोस्टने वाचकांना समाज प्रबोधनाच्या दृष्टीने सांगत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२५.८.२०२०

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

वर्गीकरण!

वेडेपणा म्हणजे काय?

कायद्याच्या भाषेत वेडेपणा (insanity) कशाला म्हणतात?

(१) भ्रम (delusion)
(२) खोटी कल्पना (hallucination)
(३) भास (illusion)
(४) आवेश (impulse)
(५) कल्पनेने पछाडणे, घेरणे (obsession)
(६) खूळ, मूर्खपणा, विक्षिप्तपणा, उन्माद 
     (lunacy, lucid interval)  

संदर्भः Medical Jurisprudence and Toxicology by Rai Bahadur Jaising P. Modi

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

बुद्धी दे!

गणपती बाप्पा, वाचव रे बुद्धीला निर्बुद्धांच्या तावडीतून!

बुद्धीमान लोकांनी बनविलेले सरकारी नियम बुद्धीमान लोकांनीच अंमलात आणायला हवेत की नकोत? त्यांची अंमलबजावणी जर निर्बुद्ध लोकांच्या हातात दिली तर त्या नियमांचे तीन तेरा वाजतील नाहीतर काय होईल? यालाच म्हणतात माकडाच्या हातात कोलीत देणे. हे असे लिहिण्यालाही तसेच कारण घडतेय. सुका व ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबीन्स मध्ये ठेवला नाही तर तो उचलला जाणार नाही असा सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियम आला. पर्यावरण रक्षणासाठी हे ठीकच आहे. पण या कोरोना लॉकडाऊन काळात होते काय की सोसायटीत कचरा उचलायला घाबरून कोणी येतच नाही. मग होते काय की, प्रत्येकजण सुक्या व ओल्या कचऱ्याचे ते दोन डस्टबीन्स स्वतःच उचलून घेऊन जवळच्याच एखाद्या  कचरा पॉईंटवर जातात व तिथे ते दोन्हीही डस्टबीन्स एकत्र ओतून घरी परत येतात. याचा अर्थ असा की, त्या कचरा पॉईंटवर सुका व ओला कचरा एक होतो. मग तिथे पालिकेची घंटा गाडी येऊन सुक्या व ओल्या कचऱ्याचा तो एकच ढीग उचलून घेऊन जाते. असेच जर करायचे होते तर मग हा कचरा विभाजनाचा नियम केलाच कशाला? खरं तर त्या कचरा पॉईंटवर पालिकेने एका ऐवजी दोन कचरा कुंड्या (सिमेंटचे दोन मोठे हौद) ठेवल्या पाहिजेत व एका कुंडीवर सुका कचरा व तसेच  दुसऱ्या कुंडीवर ओला कचरा अशी मोठी अक्षरे रंगविली पाहिजेत व तसे न करणाऱ्यास मोठा दंड ठोठावला जाईल असा ठळक अक्षरात तिथे बोर्ड लावला पाहिजेत. पण या नियमाची वाट दोन्ही बाजूंकडून ही अशी लावली जाते. कचऱ्याच्या बाबतीत जर हे असे होत असेल तर कोरोना उपचार व नियमांच्या बाबतीत काय होत असेल? बापरे, कल्पनाच करवत नाही! निर्बुद्ध माणसांच्या घोळक्यात बुद्धीमानांनी आपली बुद्धी पाजळू नये. बुद्धीमान लोकांना  जगायचे असेल तर त्यांनीही निर्बुद्धांबरोबर  निर्बुद्ध व्हावे असाच धडा या अनुभवातून मिळतो. गणपती बाप्पा, अरे काय चाललेय हे! तू तर बुद्धीचे दैवत पण इथे बुद्धीच संकटात सापडलीय! वाचव रे बाबा तुझ्या बुद्धीला या निर्बुद्धांच्या तावडीतून!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

टीपः

हा निर्बुद्धपणा काय एकाच पालिकेकडून होतो का? तर नाही हेच उत्तर आहे. कारण असा सावळागोंधळ सगळीकडेच चालू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही पोस्ट सर्वसाधारण निरीक्षण म्हणून वाचावी. माझे काही चुकले असेल तर चुकभूल द्यावी घ्यावी!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज शनिवार दिनांक २२ अॉगष्ट २०२० रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे. गेल्या वर्षी २०१९ साली ती २ सप्टेंबरला आली होती तर २०१८ साली ती १३ सप्टेंबरला आली होती. अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही हिंदू कालगणना तारीख इंग्रजी कॕलेंडरच्या पुढे मागे होते. गणपतीला हिंदू धर्मात बुद्धीचे दैवत मानले आहे. हे दैवत सुखकर्ता व दुःखहर्ता/विघ्नहर्ता ही असल्याने या दैवताची आराधना चांगल्या कार्याचा आरंभ करण्यापूर्वी करतात. शिवपार्वती हे या दैवताचे उगमस्थान! म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेची पूजा, व्रत करतात. निसर्ग सृष्टीची रचना व व्यवस्था समजून घेऊन त्या नुसार वर्तन व्हावे म्हणून योग्य मार्गदर्शनाची गरज असते व ते काम बुद्धी करते. निसर्ग व्यवस्थेनुसार योग्य वर्तन होण्यासाठी मानवी मनातील वासना व भावना यावर नियंत्रण व त्यात संतुलन ठेवण्यासाठीही बुद्धीचा उपयोग होतो. आज या बुद्धी देवतेचे आगमन झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचे संकट/विघ्न चालू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव डामडौलात साजरा करता येत नाही. तरीही साध्या पद्धतीने का होईना पण लोक श्रीगणेश मूर्ती घेऊन आले आहेत व श्री गणेशाची यथासांग पूजा अर्चा करीत आहेत. गौरी गणपतीचा सण खरंच खूप आनंदाचा! या सणातील श्रद्धा व उत्साह मला खूप भावतो कारण तो लोकांना जवळ करतो! श्रीगणेश चरणी एवढीच प्रार्थना की, बाबारे हे कोरोनाचे संकट आता लवकरात लवकर दूर कर कारण तू विघ्नहर्ता आहेस व सरकार नावाच्या व्यवस्थेला चांगली बुद्धी देऊन ही टाळेबंदी लवकर उठवायला सांग व मुंबईच्या लोकल ट्रेन्स लवकर सुरू होऊ देत. गणपती बाप्पा मोरया!

-ॲड.बी.एस.मोरे©२२.८.२०२०

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कायदा व धर्म वेगळे नाहीत!

कायदा व धर्म यांना वेगळे समजणे मुळातच चुकीचे!

मानव समाज हा निसर्ग सृष्टीचाच एक छोटा भाग आहे. त्यामुळे फुले व काटे या दोन्ही गोष्टी जशा निसर्गाच्या भाग आहेत तशाच त्या मानव समाजाच्याही भाग आहेत. या दोन्ही भागांतील फुलांचा आस्वाद कसा घ्यायचा याचे आर्थिक नियम व या दोन्ही भागांतील काट्यांना बाजूला कसे करायचे याचे राजकीय नियम निसर्गाच्या मूलभूत कायद्यात आहेत व हा नैसर्गिक कायदा निसर्गाच्या विज्ञानाचा भाग आहे. निसर्गातील व समाजातील फुलांचे आकर्षण व निसर्गातील व समाजातील काट्यांची भीती प्रत्येक मनुष्याला असते. प्रत्येक माणूस या सर्व फुलांना एकटाच ओरबाडू लागला व सर्व काट्यांशी एकटाच लढू लागला तर त्यातून समाजातील एकही माणूस आर्थिकदृष्ट्या सुखी व राजकीयदृष्ट्या शांत, सुरक्षित होऊ शकणार नाही. म्हणून निसर्गाच्या आर्थिक व राजकीय कायद्याचाच पूरक भाग असलेला समाजाचा आर्थिक व राजकीय कायदा बुद्धीमान माणसांनी शोधला व त्या सामाजिक कायद्याच्या अंमलबजावणी साठी मानव समाजातूनच एक स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. समाजाचे नीतीनियम पाळले नाहीत तर समाजाकडून कोणालाच फुलांचे सुख मिळणार नाही व कोणालाच काट्यांपासून संरक्षण मिळणार नाही असा या सामाजिक कायद्याचा दंडक असतो. निसर्गाच्या व मानव समाजाच्या कायद्यांत समाविष्ट असलेल्या नीतीनियमांनाच नीतीधर्म म्हणता येईल. म्हणून कायदा व धर्म यांना वेगळे समजणे हे मुळातच चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मी सायन्स लॉ एक्सप्रेस नावाचे फेसबुक पेज सुरू केले व माझ्या फेसबुक खात्याचेही तेच नाव आहे. निसर्ग, निसर्गाचे विज्ञान, त्या विज्ञानात असलेला कायदा व त्या कायद्याचाच धर्म असा माझ्या ज्ञान, विचारांचा सारांश आहे. तो सर्वांना तसा पटेलच असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की या लेखातील पटेल तेवढेच घ्यावे व बाकीचे सोडून द्यावे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.८.२०२०

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

आध्यात्मिकतेची मर्यादा!

आध्यात्मिकतेच्या मर्यादा!

लहानपणीचा सगळा अनुभवच वेगळा! देव, धर्म, धार्मिक सण, उत्सव या गोष्टी गोडधोड खाण्यापुरत्याच मर्यादित होत्या. मस्त खायला मिळतेय ना मग त्या सर्व गोष्टी हव्या हव्याशा वाटायच्या. पण त्यामागचा अर्थ कळत नव्हता  व म्हणूनच लहान मुलांमुलीत वाद, भांडणेच होत नसायची. आजूबाजूला माणसे मरायची. पण त्याचेही काही वाटत नसायचे. कारण घरातील आईवडील, भाऊ, बहिणी, चुलते, मामा वगैरे जवळची मंडळी जिवंत असायची. अर्थात मृत्यूचा अर्थच कळत नसायचा. त्यामुळे मनात विरक्ती वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता सगळं कळतंय आणि हे कळणेच फार त्रासदायक झालेय. आजूबाजूला चाललेली जगण्याची प्रचंड मोठी स्पर्धा, अनेक धर्म, पंथ, जातीपाती, हेवेदावे, त्यात पुन्हा प्रत्येकाचे ज्ञान वेगळे, अनुभव वेगळा, परिस्थिती वेगळी, तसेच ताकद वेगळी आणि तरीही समानतेचे तुणतुणे वाजवत भांडत बसायचे! कसली समानता आणि कुठे आहे समानता? त्यात पुन्हा काही वजनदार मंडळींची अघोषित हुकूमशाही सहन करीत लोकशाहीचे गुणगाण गात रहायचे. मग मध्येच कोरोनासारखा विषाणू काय उठतो व  सहा सहा महिने सगळ्यांच्या नाड्या आवळत मोकाट सुटतो, सगळे जनजीवन विस्कळीत करतो आणि आमचे प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान त्यावर उलटसुलट चर्चा करीत राहते. मग पुढे धार्मिक सण काय, उत्सव काय या सगळ्याच गोष्टी थंड होतात. जिथे देवाला शोधायचे ती मंदिरे, त्या मशिदी, ती चर्चेस कड्या, कुलूपे लावून बंद होतात. आणि तरीही आम्ही घरात बसून गो करोना, गो करोना असे म्हणत देवाची प्रार्थना करीत रहायचे. या आध्यात्मिकतेवर स्वतःच बराच अभ्यास केला, स्वतःच स्वतःशी चिंतन, मनन केले, पण ठोस असे काहीच सापडले नाही. शेवटी कळून चुकले की आपले आयुष्यच मर्यादित आहे तर मग या गोष्टीही मर्यादित असणारच! आध्यात्मिकतेलाही मर्यादा आहेत ही गोष्ट कळली हेही नसे थोडके! माझा हा लेख वाचकांना मूळ सत्याची जाणीव करून देणारा न वाटता नकारात्मकता निर्माण करणारा वाटला तर कृपया तो कचरापेटीत फेकून द्यावा. पण त्यावरून मी नैराश्येत म्हणजे इंग्रजीत डिप्रेशन मध्ये वगैरे गेलोय असा कृपया कयास काढू नये. या असल्या गोष्टींची मला आता चांगली सवय झालीय. मी माझी काळजी घेतोय, आपणही आपली काळजी घ्या! आणि हो, माझ्या दृष्टिकोनातून या जगात नकारात्मक, सकारात्मक वगैरे काही नसते! सत्य हे सत्य असते आणि त्याकडे सत्य म्हणूनच बघायला हवे. गुलाबाला गुलाब म्हणून व काट्यांना काटे म्हणूनच बघितले पाहिजे. यासंदर्भात मी इयत्ता सातवीसाठी असलेल्या हिंदी सुलभभारती या पुस्तकातील फूल और काँटे कवितेचा अभ्यास केला असता मला हा अर्थबोध झाला की निसर्ग गुलाबाच्या रोपट्याला समानतेच्या न्यायाने जमिनीतील अन्नद्रव्ये, हवा, पाणी, सूर्यप्रकाश देतो पण त्या रोपट्यातून गुलाबाची फुले व काटे अशा दोन विभिन्न गुणधर्मांचे दोन वेगवेगळे पदार्थ बाहेर काढतो. गुलाबाचे गुण चांगले तर काट्याचे गुण वाईट! कवितेचा सारांश हा की माणसांनी गुलाबाप्रमाणे चांगले वागावे. काट्यां प्रमाणे वाईट वागू नये. पण माझे म्हणणे हे की, निसर्ग माणसांना गुलाबाप्रमाणे चांगले वागू देतो का? माणसाच्या आयुष्यात काटे पेरून निसर्ग माणसाला काय सांगतो की, बघ तुला गुलाबाचे सुख हवे असेल तर अगोदर मार्गातले काटे बाजूला काढ व त्यासाठी हातात शस्त्र घे! ही कसली परीक्षा आणि शिकवण निसर्गाची? यात काय सकारात्मकता व नकारात्मकता घ्यायची निसर्गाकडून? हे माझे वैयक्तिक मत आहे व ते मत इतरांनी पटवून घ्यावे असा माझा बिलकुल आग्रह नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.८.२०२०