https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १० जुलै, २०२४

जिवाभावाची मैत्री!

जिवाभावाची मैत्री!

व्यावहारिक संबंध व वैयक्तिक मैत्री यात फरक असतो. व्यावहारिक संबंधातील माणसे व्यवहारात स्वतःच्या फायद्याचाच जास्त विचार करतात. याउलट वैयक्तिक मैत्रीत एकमेकांच्या हिताचा जास्त विचार केला जातो. वैयक्तिक मैत्रीत थोडाफार व्यवहार असूही शकतो व नसूही शकतो. अशा मैत्रीत व्यवहार असला तरी त्यात नुसत्या स्वतःच्या फायद्याचाच विचार नसतो तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ असा एकमेकांच्या हिताचा विचार असतो. अशी मैत्री व्यावहारिक तथा भावनिक अशी संमिश्र असते. पण काही नाती अशी असतात की तिथे एकमेकांचे हित जपण्याचाच विचार होतो. अशी मैत्री ही खूप भावनिक असते. उदा. आईवडिलांचे आपल्या मुलांवरील व मुलांचे आपल्या आईवडिलांवरील प्रेम हे भावनिक असते. त्यामध्ये व्यवहार जवळजवळ नसतोच. असे प्रेम नैसर्गिक असते व अशी मैत्री नैसर्गिक असते. अशी नैसर्गिक मैत्री दीर्घकालीन सहवासाने पती पत्नीतही निर्माण होते. कुटुंबातही थोडाफार व्यवहार असतो. आईवडिलांनी मुलांचे नीट संगोपन केले नाही किंवा पती पत्नीने त्यांची वैवाहिक कर्तव्ये नीट पार पाडली नाहीत तर त्यांच्यात मायाप्रेम, आपुलकीची भावनिक जवळीक कशी निर्माण होईल? कुटुंबाबाहेरील व्यक्तीशी व्यावहारिक संबंध प्रस्थापित झाला नाही तरी वैचारिक मैत्री होऊ शकते. अशा मैत्रीत ज्ञानांक व बुद्ध्यांक समान पातळीवर असणे आवश्यक असते. अशा वैचारिक मैत्रीचे रूपांतर पुढे भावनिक मैत्रीतही होऊ शकते. पण वैचारिक मैत्रीत भावनांक जुळून भावनिक जवळीक निर्माण होणे व ती टिकणे हे तसे दुर्मिळच असते. याचा अर्थ हाच आहे की, कुटुंब सदस्यांबरोबर असलेल्या भावनिक मैत्री एवढी घट्ट भावनिक मैत्री कुटुंबाबाहेरच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी होईलच असे नसते. कुटुंबातील घट्ट भावनिक मैत्रीचा अनुभव अनोखा असतो. अशा मैत्रीत कुटुंब सदस्यांनी एकमेकांवर काही कारणास्तव रागावणे, चिडणे, रूसणे, फुगणे, अबोला धरणे असे अधूनमधून होत असले तरी ते थोडा काळ, क्षणिक असते. कुटुंबात रागावणे, चिडणे, रूसणे, फुगणे यातून निर्माण होणारा दुरावा फार काळ टिकत नाही. अशा जवळच्या नात्यात दुरावा सहन होत नाही. एकमेकांचा सहवास सतत हवाहवासा वाटतो. अशा नात्यात एकमेकांशिवाय करमत नाही. कारण अशा मैत्रीत दोन्ही बाजूंनी अतूट प्रेम असते. मुळात फायदा व हित या दोन शब्दांतच फरक आहे. फायद्यात स्वार्थी वासना असते तर हितात निःस्वार्थी भावना असते. भावनिक जवळीक हे एक वेगळेच रसायन आहे. तिथे भावनांक जुळणे महत्वाचे असते. असा भावनांक जिथे जुळतो तिथे जिवाभावाची मैत्री निर्माण होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा