https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

देवत्वाची अनुभूती!

चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती!

मानवी जीवन विलक्षण आनंददायी आहे कारण याच जीवनात मनुष्य सकारात्मक, कल्याणकारी, चांगल्या भावनांचा अनुभव घेऊ शकतो. हा विशेष अनुभव हीच देवत्वाची श्रेष्ठ अनुभूती होय. मी देव पाहिला असे म्हणणारी व्यक्ती देवत्वाची हीच श्रेष्ठ अनुभूती घेत असते.

हे समजण्याची निसर्गाने पृथ्वीवर रचलेली सृष्टीची पर्यावरणीय रचना विज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासली पाहिजे. या रचनेच्या पायाशी आहेत निर्जीव पदार्थ. या पदार्थांचे गुणधर्म  अजैविक व त्यांची या गुणधर्मांशी निगडीत असलेली बुद्धी यांत्रिक. मानवाने शोधलेली व उपयोगात आणलेली निर्जीव पदार्थांची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या निर्जीवांची यांत्रिक बुद्धी. निर्जीव पदार्थांचे अजैविक गुणधर्म व त्यांची यांत्रिक बुद्धी तंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तळ मजला होय.

या पायावरील पहिली पायरी उत्क्रांत झालीय ती अर्धसजीव वनस्पतींची. अर्धसजीव वनस्पतींना जीव असतो, म्हणून त्यांना वासना, भावना व बुद्धी या तिन्ही गोष्टी असतात. पण त्या अर्ध विकसित पातळीवर असतात. या वनस्पतींचे अर्धजैविक गुणधर्म व या गुणधर्मांशी निगडीत असलेली या वनस्पतींची बुद्धी अर्ध यांत्रिक व अर्ध जैविक असते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा पहिला मजला होय.

वनस्पतींच्या नंतर उत्क्रांत झालेली दुसरी पायरी सजीव पशूपक्षांची. या सजीव पशूपक्षांचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्यांची पूर्ण सजीव जैविक बुद्धी ही वनस्पतींपेक्षा जास्त विकसित पण अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा दुसरा मजला होय.

पशूपक्षांच्या नंतर उत्क्रांत झालेली तिसरी पायरी म्हणजे पूर्ण विकसित झालेल्या सजीव माणसांची. मनुष्य  प्राण्याचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्याची पूर्ण सजीव जैविक बुद्धी सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे मानवी गुणधर्म व ही मानवी बुद्धी श्रेष्ठ असली तरी ती तंतोतंत नसते कारण निर्जीव पदार्थांप्रमाणे ती यांत्रिक नसते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तिसरा मजला होय. अशा रीतीने तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला अशी चार मजल्यांची ही पर्यावरणीय सृष्टी रचनेची इमारत निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांती करीत बांधली आहे.

या इमारतीच्या अगदी वरच्या म्हणजे तळ मजला (पाया) धरून चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या (जगणाऱ्या) माणसाच्या मूलभूत जैविक वासना (बेसिक इन्सटिन्क्टस) यांना ज्या पूरक भावना निसर्गाने चिकटवल्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. या भावनांचा एक प्रकार आहे तो देव भावनांचा म्हणजे सकारात्मक किंवा चांगल्या, विधायक भावनांचा (उदा. प्रेम, करूणा) व दुसरा प्रकार आहे तो दैत्य/राक्षस भावनांचा म्हणजे नकारात्मक किंवा वाईट, विध्वंसक भावनांचा (उदा. राग, लोभ).

मूलभूत जैविक वासनांचे समाधान करण्याच्या प्रक्रियेत दैत्य/राक्षस भावनांना चांगले, विधायक वळण लावण्याचे काम देव भावना करीत असतात. अशाप्रकारे मेंदूमनाला चांगले वळण लावण्याच्या कामात जी मानवी बुद्धी योग्य साथ देते तिला सुबुद्धी म्हणतात व जी मानवी बुद्धी दैत्य/राक्षस भावनांना अयोग्य साथ देते तिला कुबुद्धी म्हणतात. सुबुद्धी मनुष्याच्या हातून देवकार्य म्हणजे चांगले कर्म घडवते तर कुबुद्धी मनुष्याच्या हातून दैत्यकार्य म्हणजे वाईट कर्म घडवते. मानवी जगात देव व दैत्यांचे हे युद्ध सतत चालू असते. माझ्या मते, मानवी जीवनात चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती. नीट अभ्यास केला तर सर्व धर्म, धम्मात याच मंगलाची प्रार्थना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा