https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

उतावीळपणा, चिंतातुरपणा!

उतावीळपणा व चिंतातुरपणा, कारणे व उपाय!

ज्या माणसाला तरूण, प्रौढ व वृद्ध वयातही लहान मुलासारखे जगता येते त्या माणसासारखे सुंदर जीवन नाही. लहानपणी भूक लागली तरी आईवडील भाकरी देणार याची खात्री असते. त्यामुळे काळजीचे कारण नसते. लहानपणात लैंगिक वासना नसते त्यामुळे वासनेने व्याकुळ, उतावीळ होण्याची गोष्ट नसते. शालेय शिक्षणातून काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद असतो. त्यामुळे त्याचा ताण जाणवत नाही. त्यामुळे लहानपणी आनंद, शांती, स्थिरता, एकाग्रता, निरागसता या सगळ्याच गोष्टी अत्युच्च शिखरावर असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतशा वासना वाढतात व त्याबरोबर जबाबदाऱ्याही. मग मन वासनेने उतावीळ व जबाबदारीच्या भितीने चिंतातुर होते. उतावीळपणा व चिंतातुरपणा ही दोन्ही मनाच्या भावनिक उद्रेकाची, मानसिक आजाराची लक्षणे आहेत. पण या दोन्ही मागची कारणे वेगळी आहेत. उतावीळपणा वासना काबूत ठेवता न आल्याने निर्माण होतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण यातूनच निर्माण झाली असावी. तर चिंतातुरपणा भितीवर मात करता न आल्याने निर्माण होतो. भावनिक उद्रेकाची ही दोन्ही लक्षणे फार त्रासदायक असतात. एकाग्रता कमी होणे, मन अस्थिर, अशांत राहणे हे मानसिक क्लेश, वेदना भावनिक उद्रेकाच्या या दोन लक्षणांमुळे मनाला होतात. या लक्षणांमुळे जीवनाचा आनंद कमी होतो. जो माणूस वासनेने उतावीळ व भितीने चिंतातुर होत नाही तो माणूस लहान मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा