https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वराचे सगुण अस्तित्व म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या भौतिक विविधतेला परमेश्वराचे विविध अंश चिकटलेले आहेत ज्यांना ईश्वरी अंश म्हणता येईल. हिंदू धर्मातील विविध देवदेवता म्हणजे निसर्गातील विविध ईश्वरी अंश. हे अंश सगुण आहेत व ते निसर्गाच्या भौतिकतेला ईश्वरी आध्यात्मिकतेने नियंत्रित करतात. या ईश्वरी अंशानाच देवकण (गाॕड पार्टिकल) असे म्हणता येईल जे देवकण असंख्य आहेत. हिंदू धर्मात असलेल्या तेहतीस कोटी देवदेवता म्हणजे हे असंख्य ईश्वरी अंश किंवा देवकण. निर्गुण परमेश्वर एक आहे पण सगुण देवकण अनेक आहेत. कोणताही देवकण सर्वगुणसंपन्न नाही. पण त्यातला एखादा देवकण  जर बहुगुणसंपन्न म्हणून निसर्गात अवतीर्ण झाला तर त्याला हिंदू धर्मात निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप किंवा सगुण अवतार मानतात. हिंदू धर्मातील असंख्य देवदेवतांपैकी फक्त काही देवदेवताच बहुगुणसंपन्न आहेत. तीन मुख्य देव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या स्त्री शक्तींसह, श्री गणेश, राम, कृष्ण, गुरूदेव दत्त हे सर्व देवकण असे बहुगुणसंपन्न देवदेवता व देवावतार होत. सारांश हाच की, परमेश्वर निर्गुण परमात्मा आहे तर ईश्वर हा त्या परमात्म्याचा सगुण ईश्वरी अंश किंवा देवात्मा आहे. निर्गुण परमात्मा कायम आहे तर सगुण देवात्मे येतात, जातात म्हणजे ते तात्पुरते आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.१.२०२४

रविवार, २८ जानेवारी, २०२४

भारत संघराज्य राष्ट्र

भारत एक संघराज्यीय राष्ट्र!

भारत हे संघराज्यीय राष्ट्र आहे. या संघराज्यातील प्रत्येक राज्याच्या वेगळ्या प्रादेशिक अस्मिता व वेगळी भाषिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत.  हीच परिस्थिती या संघराज्यातील जनतेची आहे. ही भारतीय जनता विविध धार्मिक व जातीय समाज गटात विभागलेली आहे. प्रत्येक समाज गटाची वेगळी धार्मिक व जातीय अस्मिता, संस्कृती आहे. या विविधतेमुळे या संघराज्याला एकच धर्म व एकच जात नाही. तरीही सर्व भारतीय एक राष्ट्र म्हणून एक आहेत हे विविधतेतील एकतेचे जगातील एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारताला कोणताही एक धर्म किंवा जात नाही हे वास्तव हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१.२०२४

भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे!

भौतिक स्पर्धा व मानसिक आरोग्य!

या पदार्थीय सृष्टीतील विविध निर्जीव वस्तू पदार्थ व सजीव वनस्पती, प्राणी, माणसे या सर्वांबरोबर वैज्ञानिक निसर्ग नियमांनुसार प्रमाणबद्ध व मर्यादित देवाणघेवाणीचे संबंध प्रस्थापित करण्याऐवजी मानवी मन त्यांच्याशी स्पर्धा करते, ईर्षा करते व त्यातून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवते. इतरांशी तुलनात्मक स्पर्धा सोडा पण मानवी मन स्वतःशीही स्पर्धा करते. भौतिक यशासाठी ठराविक मर्यादेपर्यंत स्पर्धा ठीक आहे. पण मानवी मन या स्पर्धेचा अतिरेक करते व स्वतःबरोबर इतरांचेही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवते.

जीवनात स्वतःच्या मर्यादा ओळखून  त्या मर्यादेतील शक्य तेवढे भौतिक यश मर्यादित स्पर्धेतून मिळवल्या नंतर स्पर्धेतून बाजूला व्हायला हवे. अर्थात स्पर्धेतून निवृत्ती घ्यायला हवी. अशी निवृत्ती घेतल्यानंतर आपण जगाच्या भौतिक स्पर्धेत नाही आहोत याची खंत न बाळगता इतरांची स्पर्धा त्या स्पर्धेपासून अलिप्त राहून लांबून बघायची असते. मोह झाला तरी त्यात भाग घ्यायचा नसतो व त्याचा विचारही करायचा नसतो.

अशी अवस्था प्राप्त केल्यानंतर प्रवास सुरू होतो तो परमेश्वराच्या अध्यात्माचा. ज्याने हे सर्व विविध पदार्थ निर्माण केले व त्यांच्यापासून ही विज्ञानबद्ध भौतिक पदार्थीय सृष्टी रचली त्या निर्माता, नियंता, परमेश्वराबरोबर मानवी मनाला भौतिक स्पर्धा करता येईल का? परमेश्वराबरोबर भौतिक स्पर्धाच काय पण त्याच्याबरोबर भौतिक देवाणघेवाणही शक्य नाही. मग त्याच्यापुढे भौतिक स्पर्धेतील भौतिक यशाची मागणी का करावी?

मग मानवी मन काय करू शकते? तर परमेश्वरापुढे आध्यात्मिक मनाने लीन होऊ शकते. आध्यात्मिक मन म्हणजे भौतिक भावना व भौतिक विचार यांचा त्याग केलेले, या सर्व भावना व हे सर्व विचार परमेश्वर चरणी अर्पण केलेले मन. असे आध्यात्मिक मनच परमेश्वराशी एकरूप होऊ शकते. आणि अशी आध्यात्मिक एकरूपता मनुष्याला जिवंतपणीही साधता येते व त्यातून आध्यात्मिक आनंद व शांतीची अनुभूती मिळवता येते.

या आध्यात्मिक अनुभूतीसाठी मला हिंदू धर्मातील सगुण ईश्वरापासून निर्गुण परमेश्वरापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास आवडतो जो मी खालील आध्यात्मिक प्रार्थनेने दररोज करतो.

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री रामकृष्णाय नमः !
ओम नमः शिवाय !
ओम श्री गुरूदेव दत्ताय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम शरणम गच्छामी !
ओम सर्वम सुखीनम भवती !
ओम शांती !

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१.२०२४
https://youtu.be/E-NqjMfZeMk?si=fRC0-xfLkD6rOncV

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निवृत्ती!

वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या बौद्धिक व शारीरिक कष्टावरील मर्यादा व निवृत्ती!

मानवी मेंदूमनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या सुशिक्षित-सुसंस्कृत करणारे ज्ञान  सतत देण्याचा कार्यक्रम राबवणारा शिक्षणाचा कारखाना अविरतपणे सतत चालू आहे. त्याला क्षणभरही विश्रांती नाही. या कारखान्यात लहानपणापासून सतत काम करून करून मानवी मेंदू थकतो. कारण या कारखान्याला शेवट नाही पण नश्वर मानवी आयुष्याला शेवट आहे.

शिक्षणाच्या कारखान्यात हळूहळू  ज्ञान प्रगल्भ होत जाणारे मेंदूमन त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग म्हणजे सराव करण्याचा प्रयत्न सुरू करते. म्हणजे एकीकडून सतत सुरू असलेला ज्ञानाचा ओघ तर दुसरीकडून सतत त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सराव व त्यासाठी मेंदू बुद्धीला व शरीर अवयवांना सतत कार्यरत ठेवण्याचा दुहेरी कार्यक्रम म्हणजे बौध्दिक व शारीरिक कष्टाचा दुहेरी कार्यक्रम आयुष्यभर सुरू राहतो.

मेंदूमनावर झालेले ज्ञानसंस्कार मनुष्याला गप्प बसू देत नाहीत. या ज्ञानसंस्काराचा वापर सातत्याने व्यवहारात करण्यासाठी मेंदूमन सारखे पुढे पुढे करते. अशाप्रकारे मानवी आयुष्यात शिक्षणाचा व व्यवहाराचा असे दोन्ही कारखाने सतत सुरू राहतात. पण या दोन्ही  कारखान्यात काम करताना बौद्धिक व शारीरिक कष्ट करण्यावर वाढत्या वयानुसार नैसर्गिक मर्यादा पडतात. या मर्यादा लक्षात घेऊन कालानुरूप शरीर, मनाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाच्या विश्रांतीचा काळ उतार वयात वाढवत जाण्यालाच निवृत्ती असे म्हणतात जी निवृत्ती नुसती नोकरीतच नव्हे तर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, राजकारण, समाजकारण यातूनही घ्यावी लागते व या नैसर्गिक निवृत्तीला वैद्यकीय, वकिली किंवा इतर कोणतेही व्यवसाय, उद्योगधंदे किंवा राजकारण, समाजकारण हे अपवाद होऊ शकत नाहीत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१.२०२४

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

NATION!

NATION!

The nation is an artificial institution created by union of people under the law of nation called constitution. This institution remains the notional owner and director of the wealth and resources of nation including people who continue as members of this institution. These members are allowed to own and enjoy the national wealth and resources of nation privately but subject to the restrictions and  conditions of the law of nation called constitution. The united maintenance & protection of such wealth & resources is the condition precedent for this private ownership and enjoyment. The people may come by birth and go by death but the nation remains alive & constant all time. This is the truth with any artificial institution. The institution created by people can be dissolved only by people and this happens when there is a breakdown in the union of people.

-©Adv.B.S.More, 26.1.2024

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

निरक्षरांची लोकशाही?

निरक्षरांची लोकशाही?

कसेही करून विशेषतः बळी तो कानपिळी नियमाने जगणे हा मनुष्य सोडून इतर सर्व प्राणीमात्रांचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे तर मनुष्याच्या विशेष नैसर्गिक बुद्धीमुळे सन्माननीय जीवन (डिग्नीफाईड लाईफ) हा मनुष्याचा व एकंदरीत मानव समाजाचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे. या हक्काची जाणीव जेव्हा कधीकाळी मनुष्याला झाली व त्याचे मनुष्याला भान आले तेव्हापासून या विशेष मानवी हक्काचा विकास व्हायला सुरूवात झाली. ही विकास प्रक्रिया अजूनही पिढ्यानपिढ्या चालूच आहे.

राजेशाही, हुकूमशाही, लोकशाही हे याच मूलभूत मानवी हक्काच्या संक्रमणाचे टप्पे आहेत. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही जे वरील विशेष मानवी हक्कासाठी म्हणजे सन्माननीय जीवन या मूलभूत हक्कासाठी चालविलेले राज्य. तसे तर निसर्गात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जीवन कसे जगायचे हे सामान्य ज्ञान (काॕमन सेन्स) निसर्ग जन्मापासून ते मरेपर्यंत निसर्गाच्या खुल्या शाळेत देत असतो. अर्थात या सामान्य ज्ञानासाठी मानवनिर्मित शाळा, काॕलेजात जाऊन सुशिक्षित होण्याची गरज नसते. पण मनुष्य प्राण्याचा सन्माननीय जीवनाचा हक्क काय व तो कसा जगायचा हे कळण्यासाठी मात्र खास शिक्षणाची गरज असते कारण मुळात हा हक्क मनुष्याला निसर्गाकडून विशेष हक्क म्हणून प्राप्त झाला आहे पण त्या हक्काचे विशेष संगोपन करण्याची जबाबदारी मात्र निसर्गाने मानव समाजावरच टाकून दिली आहे.

या विशेष मानवी हक्काविषयी जागरूक होण्यासाठी व तो विशेष नैसर्गिक-सामाजिक पद्धतीने जगण्यासाठी विशेष शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी अक्षर ओळख ही मूलभूत गोष्ट आहे. अक्षर ओळखी शिवाय माणूस सामान्य ज्ञानी होऊ शकतो पण तो सुशिक्षित होऊ शकत नाही. ज्या समाजात बहुसंख्य लोक निरक्षर म्हणजे अशिक्षित आहेत अशा समाजात लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होणे फार कठीण आहे. बहुसंख्य निरक्षर  लोकांचे बहुमत यालाच लोकशाही म्हणायचे तर अशा लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत व्हायला वेळ लागत नाही. कारण अशा निरक्षरी बहुमतावर सन्माननीय जीवन हक्क म्हणजे काय हे लिखित स्वरूपात सांगणाऱ्या अक्षरी संविधानाची हुकूमत चालत नाही. याचा अर्थ हाच की निरक्षरी बहुमताची लोकशाही ही सांविधानिक लोकशाही होऊ शकत नाही. बहुतेक हाच विचार करून म. गांधीनी "साक्षर लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा" असे हरिजन मध्ये लिहिले होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.१.२०२४

मराठा आरक्षण, माझी भूमिका!

मराठा आरक्षण, माझी भूमिका!

मराठा लोक किती शिकलेत व दर महिन्याला त्यांची आर्थिक कमाई कोणत्या उद्योग, व्यवसायातून किती एवढे दोनच प्रश्न मराठ्यांना विचारून शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व मराठा लोकांना सरकारने शैक्षणिक, आर्थिक व राजकीय असे तिन्ही प्रकारचे आरक्षण देऊन मोकळे व्हावे, उगाच फाफट पसारा वाढवू नये ही मायबाप सरकारला एक ९६ कुळी उच्च शिक्षित मराठा म्हणून माझी कळकळीची नम्र विनंती आहे. मी वकील आहे म्हणजे उच्च शिक्षित असल्याने व महिन्याला पोटापुरता म्हणजे माझ्या किमान गरजांपुरता व्यवस्थित पैसा कमावत असल्याने व तसेच मला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, संत्री बनण्याची राजकीय महत्वाकांक्षा नसल्याने मला आरक्षण बिलकुल नको. मराठा सर्वेक्षण करताना आमच्या घरातील स्त्रिया कुंकू लावतात का, मंगळसूत्र घालतात का असले अपमानास्पद प्रश्न सर्वेक्षणाच्या नावाने बिलकुल विचारू नयेत. या असल्या प्रश्नांना एक वकील म्हणून माझी कडक हरकत राहील. गरीब, अशिक्षित/अल्पशिक्षित मराठ्यांना सरकारने आरक्षण देऊन टाकावे व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब करून घ्यावे. त्यासाठी कायदेशीर युक्तिवाद हा असावा की शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण हाही सामाजिक मागासलेपणाचा निकष आहे. केवळ मागासलेली जात हाच फक्त आरक्षणाचा निकष  होऊ शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठे हे  आपोआप सामाजिक दृष्ट्या मागासलेले होतात हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाला पटवून द्यावा लागेल. अशा मराठ्यांच्या सन्माननीय जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी आरक्षण आवश्यक आहे ही गोष्ट सरकारने लक्षात घेऊन ती सर्वोच्च न्यायालयात मांडावी व संकुचित आरक्षणाची टक्केवारी मराठा आरक्षणासाठी वाढवून घ्यावी. त्यामुळे ओ.बी.सी. विरूद्ध मराठा हा वाद होणार नाही. 

-©ॲड.बी.एस.मोरे, ९६ कुळी उच्च शिक्षित मराठा, २५.१.२०२४

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व विधीवत शब्दाचा अर्थ!

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून विधीवत शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला!

सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्या येथील नवीन मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. कोणत्याही गोष्टीचा विचार मी कायद्याच्या दृष्टिकोनातून करतो. कायद्याची चौकट म्हणजे मर्यादेची चौकट आणि प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात मर्यादा पुरूषोत्तम. त्यामुळे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हे एक जिज्ञासू वकील म्हणून ओघाओघाने आलेच. खरं तर या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून विधीवत या शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला.

कायदा हा तीन गोष्टींनी बनतो. कल्याणकारी, मंगल निर्माणाचे विशिष्ट ध्येय हा कायद्याचा पाया असतो. या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी एक विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते ती दिशा किंवा चौकट हा कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा असतो. विशिष्ट धोरणात्मक चौकटीने एक विशिष्ट तात्विक/ तांत्रिक प्रक्रिया निश्चित केली जाते ती प्रक्रिया म्हणजे कायद्याचा प्रत्यक्ष  विधी असतो. या तिन्ही गोष्टींचा मिळून कायदा बनतो. कायद्यानुसार सर्वकाही व्यवस्थित पार पडणे म्हणजे एखादे विशिष्ट कार्य विधीवत  पार पडणे.

एखादी इमारत उभी करताना अशी इमारत उभारणे हे ध्येय असते. अशा इमारतीचा आराखडा ही इमारतीची धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते. या आराखड्यानुसार इमारत बांधकाम तंत्रज्ञानाने इमारतीचे बांधकाम करणे ही अशा इमारतीची विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. इमारत निर्मितीचे ध्येय, इमारतीचा आराखडा व इमारतीचे बांधकाम या तिन्ही गोष्टी जुळून आल्या की अशी इमारत विधीवत बांधली गेली असे म्हणायचे.

अयोध्या येथील श्रीरामाच्या नवीन मंदिराचे बांधकाम असेच विधीवत पार पडले. या मंदिरात सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली याचा अर्थ हाच की ती हिंदू धर्म शास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. ईश्वर मूर्तीला मंदिरात स्थानापन्न करताना प्राणप्रतिष्ठेचा हिंदू धर्मशास्त्रीय विधी हा धार्मिक कायदाच आहे. या कायद्यात वर उल्लेखित तिन्ही गोष्टी येतात. त्या म्हणजे ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे ध्येय. या प्राणप्रतिष्ठेची म्हणजे ईश्वर मूर्तीच्या विधीवत स्थानापन्नतेची विशिष्ट दिशा/चौकट म्हणजे विशिष्ट शुभ मुहुर्त वगैरे. त्यानंतर त्या विशिष्ट चौकटीतील प्राणप्रतिष्ठेची विशिष्ट पद्धत/कायदेशीर प्रक्रिया म्हणजे मंत्रोपचार वगैरे. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे व्यवस्थित पार पडल्या की ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही विधीवत पार पडली असे म्हणायचे. अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशीच विधीवत पार पडली.

अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशाप्रकारे विधीवत पार पडल्यावर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी जमलेल्या मान्यवरांसमोर जे भाषण केले ते भाषण विधीवत या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगते. या भाषणाद्वारे पंतप्रधानांनी एक संकल्प सोडला. भारताचे नवनिर्माण (नया भारत) हाच तो संकल्प. पुढील  एक हजार वर्षांत पवित्र म्हणजे मंगल, कल्याणकारी भारत व कणखर म्हणजे स्वसंरक्षणासाठी खंबीर व शस्त्रसज्ज भारत, अशा भारताची पायाभरणी आता करून त्या ध्येयाने पुढे वाटचाल करायची हा संकल्प, हे ध्येय हा नवीन भारत निर्माण करण्याच्या कायद्याचा पाया झाला. या ध्येयपूर्तीसाठी आता विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट आखली जाईल, निश्चित केली जाईल. तो असेल नवभारत निर्माण कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा. या धोरणात्मक चौकटी अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यात बसणारी जी प्रक्रिया राबवली जाईल ती असेल या नवभारताची विशिष्ट  कायदेशीर प्रक्रिया. अशाप्रकारे नवभारताच्या कायद्याचे तीन घटक, तीन गोष्टी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्येतील भाषणात थोडक्यात स्पष्ट केल्या.

विधीवत या शब्दाचा अर्थ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून मला वरील प्रमाणे अधिक स्पष्ट झाला.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

जशास तसे तत्वज्ञान!

देवाची जपमाळ ओढत बसायचे की जशास तसे वागायचे?

डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा नुसता निसर्ग विज्ञानापुरताच मर्यादित नाही तर तो परमेश्वराच्या अध्यात्म धर्माची चिकित्सा करण्यासाठीही उपयुक्त आहे. पुराणे ही घडली की रचली यावर वाद आहेत. इतिहासाला पुरावे आहेत पण पुराणांना पुरावे नाहीत. पुराण कथा या बोध कथा म्हणून घ्यायच्या की सत्य कथा म्हणून घ्यायच्या यावर सत्याचे पुरावे हाच निकष आहे. 

प्रश्न हा आहे की निसर्गापासून परमेश्वराला वेगळा करून त्याची आध्यात्मिक उपासना करण्याची कल्पना प्राचीन, अर्वाचीन समाजात का व कशी निर्माण झाली? मुद्दा हा आहे की सजीव शरीरापासून जसे मनाला वेगळे करता येत नाही तसे निसर्गाच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला किंवा परमेश्वराला वेगळे करता येत नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या कशा असू शकतात? निसर्गाला विज्ञानात जगायचे व त्याच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला, परमेश्वराला मात्र अध्यात्मात भजायचे, पूजायचे ही मानवी मनाची संभ्रमावस्था नव्हे काय?

पूर्वी लोक टोळ्यांनी जगायचे. नंतर सुद्धा टोळ्या संपल्या नाहीत. सद्या सुद्धा अंडरवर्ल्ड मध्ये अधूनमधून टोळी युद्धे होतच असतात. अशाच काही परकीय टोळ्यांनी आपल्या भारतावर अनेकदा आक्रमणे केली. ब्रिटिश ही सुद्धा व्यापाराचे निमित्त करून हळूच भारतात घुसलेली व नंतर भारतालाच गुलाम करून राज्य केलेली धूर्त परकीय टोळीच होय. मग भले त्याला राष्ट्र हे आधुनिक नाव द्या. अशा या परकीय टोळ्यांचे हल्ले परतवून लावता न आल्याने, त्यांच्या आक्रमणापुढे टिकाव लागू न शकल्याने, बराच काळ त्यांचे गुलाम होऊन रहावे लागल्याने पराभूत मानसिकतेतून गुलाम लोकांकडून निसर्गात परमेश्वराचा दैवी आधार शोधला गेला असावा का? त्यातूनच पुढे सगुण-निर्गुण परमेश्वराची कल्पना उदयास येऊन त्याची आध्यात्मिक उपासना सुरू झाली असावी का? पण हळूहळू पुढे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव जसजसे जनमानसाला कळत गेले तसतसे अध्यात्म धर्मातील अंधश्रद्धा दूर होत जाऊन चांगल्यास चांगले, वाईटास वाईट, म्हणजे जशास तसे हे निसर्ग वास्तववादी तत्वज्ञान उदयास आले असावे का? हे जशास तसे तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतील बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाशी जुळते. जगातील राष्ट्रांनी निर्माण केलेली लष्करे व शस्त्रसज्जता याच बळी तो कानपिळी निसर्ग नियमावर आधारित आहेत. त्यात परमेश्वर व त्याचे अध्यात्म कुठे येते? जशास तसे हे वास्तववादी तत्वज्ञानच आधुनिक नीतीधर्म व कायदेकानून, नियमांचा आधार आहे. आता या नैसर्गिक वास्तवातून परमेश्वराला बाजूला करून त्याची जपमाळ किती ओढत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१.२०२४

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

नाशिकच्या डाॕक्टर बरोबर ठाण्याची महिला एवढया लांबून मैत्री करते काय, जवळीक निर्माण झाल्यावर त्याच्याकडून ५० लाख रूपयांची खंडणी मागते काय आणि डाॕक्टर मित्राने खंडणी देण्यास नकार दिला म्हणून त्याच्या हत्येचा कट रचते काय, सगळेच भयंकर (बातमी, लोकसत्ता दि. २३.१.२०२४). बापरे, मैत्री एवढी भयंकर, खतरनाक असू असते? मी पैशाने जाम गरीब आहे पण तरीही कोणाचे कधी आणि कशावरून डोके फिरेल याचा काही नेम नाही. म्हणून तर मी फेसबुक इनबाॕक्स चॕटिंग टाळतो. ओळख ना पारख आणि मग कशाला हवी ही असली इलेक्ट्रॉनिक जवळीक किंवा आॕनलाईन मैत्री? वैचारिक मैत्री वैचारिक पोस्टसपुरती मर्यादित ठेवलेली बरी. आणि खरंच काही कायद्याचे काम असेल तर, तेही चार पाचशे फेसबुक मित्रांमधून एखाद्या कडून कधीतरी निघते व बऱ्याचदा फुकटात असते, प्रत्यक्ष भेटून केलेले बरे. या समाज माध्यमातून वास्तव लिखाण करताना सांभाळून करावे लागते. काही जणांनी तर माझी ३५ वर्षाची वकिली व ६७ वर्षाचे वय याचा मुलाहिजा न ठेवता मला बिनधास्त शिव्या हासडल्यात माझ्या काही सरळमार्गी वास्तव पोस्टस वरून. असल्या फेसबुकी मित्रांना मी जाम टरकतो आणि घाबरून त्यांना लगेच ब्लॉक करून टाकतो. कशाला उगाच म्हातारपणी नसते लचांड मागे लावून घ्यायचे? 

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४

समाजवाद!

समाजवादात बसवता येईल का भांडवलशाही व साम्यवादाची संमिश्र अर्थव्यवस्था?

संपूर्ण समाजाचा जगण्याचा अधिकार तोच समाजवाद! फक्त एकाच समूहाचा म्हणजे गटाचा असा जगण्याचा अधिकार समाजवाद होऊ शकत नाही. ती कंपूगिरी झाली. कंपूगिरी मक्तेदारी निर्माण करते. समाजवाद हा संपूर्ण समाजाला जगवण्याचा वाद! भांडवलशाही व साम्यवाद एकत्र नांदवायचा म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग समाजवादात अपेक्षित आहे. समाजवादात म्हणजे एकूणच समाज जगवण्याच्या वादात फक्त भांडवलशाही किंवा फक्त साम्यवाद हा एकसूरी, एककल्ली प्रयोग होय. हे माझे वैयक्तिक मत आहे. मतमतांतरे असू शकतात!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०

निसर्गापासून अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल, मानवी मनाचे अंतरंग हेच तर मानवी शरीराचे बाह्यरंग असतात, शारीरिक हालचालीतून ते प्रकट होतात, मनाचे अंतरंग व शरीराचे बाह्यरंग हे जर वेगळे नाहीत तर निसर्ग व निसर्गाचा अंतरात्मा किंवा परमात्मा हे वेगळे कसे, याच तर्काने निसर्गाचे विज्ञान व अंतरात्म्याचे किंवा परमात्म्याचे अध्यात्म हे वेगळे कसे, आम्ही निसर्ग व निसर्गाचे विज्ञान जगतो पण परमात्मा व त्याचे अध्यात्म पूजतो व त्यातून आम्ही वास्तवालाच काल्पनिक बनवतो! -ॲड.बी.एस.मोरे

भानासाठी ज्ञान!

भानासाठी ज्ञान!

शिक्षण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणाचे व त्यात असलेल्या स्वतःचे ज्ञान. ज्ञान हे मर्यादेचे भान देते. शिक्षणातून मिळवलेले ज्ञान हे पैसे कमावण्याचे व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकत नाही. त्या ज्ञानात मिळवलेले विशेष प्रावीण्य, कौशल्य हे पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकते. असे कौशल्य विशिष्ट ज्ञानावर केलेल्या प्रयत्नातून, सरावातून प्राप्त होते. असा सराव म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकार असतो. पण ज्ञानाच्या अनेक शाखा असल्याने त्या प्रत्येक शाखेत सराव करून सर्व शाखांत प्रावीण्य मिळवता येत नाही. अर्थात ज्ञानाच्या खाणीतील सर्व हिऱ्यांना एकटा माणूस पैलू पाडू शकत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे. मुळात शिक्षण व ज्ञानाला पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल समजणेच चूक आहे. सर्व ज्ञान शाखांचे, क्षेत्रांचे थोडे थोडे जुजबी ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान जे सर्वांना असणे आवश्यक असते. हे सामान्य ज्ञान शालेय शिक्षणातून मिळते. या सामान्य ज्ञानाशिवाय माणसाला सामान्य भान येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला निदान इयत्ता दहावी पर्यंत तरी शिक्षण हे असलेच पाहिजे. एवढेही शिक्षण नसलेली माणसे राजकारणात यशस्वी होऊ शकतात पण कधी तर समाज बहुसंख्येने अशिक्षित असेल तर. बहुसंख्य जनता जर सुशिक्षित असेल तर अशिक्षित (म्हणजे कमीतकमी सामान्य ज्ञानाचे शालेय शिक्षण नसलेल्या) माणसांची राजकारणात डाळ शिजणार नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की मर्यादा भानासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण ते पैसा व सत्ता मिळविण्याचे भांडवल होऊ शकत नाही. मी अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण, नंतर बी.काॕम. चे पदवी शिक्षण, पुढे पदव्युत्तर कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षण व शेवटी कायद्याचे पदव्युत्तर एलएल.बी. शिक्षण एवढे उच्च शिक्षण घेतले. पण या एवढ्या ज्ञान पसाऱ्यातून मी उदरनिर्वाहासाठी वकिली व्यवसाय स्वीकारला व तो करताना कायदा ज्ञानाच्या विशाल सागरातील काही थेंबांवरच प्रभुत्व मिळवले, त्यात कौशल्य प्राप्त केले. ते कौशल्य माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या एक टक्का (१%) एवढेही नाही. अर्थात माझे एक टक्का ज्ञान एवढेच माझे पैसा कमावण्याचे भांडवल झाले. त्या भांडवलावर मी फक्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सामान्य गरजांपुरता थोडाच पैसा कमवू शकलो. ही झाली अर्थकारण क्षेत्राची गोष्ट. राजकारण क्षेत्रात मला गतीच नाही कारण त्या क्षेत्रात मला कौशल्य प्राप्त करता आले नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा मला गंधही नाही. ज्ञानाने माझ्यावर खूप उपकार केलेत. मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी जास्त उंच उड्या मारू नयेत याचे भान मला सतत याच ज्ञानाने दिले व मला भानावर ठेवले. थोडक्यात, मर्यादा भानासाठी ज्ञान हाच ज्ञानाचा मुख्य हेतू एवढेच मला या लेखातून सांगायचे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.१.२०२४

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे!

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे लागते!

श्री. रविंद्र मालुसरे, अध्यक्ष, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, आपण रामायणावर हे छान लिहिले आहे ते मी समाज माध्यमावर शेअर करतो. पण धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हे कितपत रूचेल? सद्या वाल्मिकी रामायणाचाच गाजावाजा होताना दिसत आहे. तुलसीदासांचे रामायण पण आहे. भृगू ऋषी यांनी पण टीकात्मक रामायण लिहिले आहे असे कुठेतरी वाचण्यात आले. पण बहुसंख्य लोकांना धार्मिक भावनांवर डोलताना भौतिक वास्तवाचा अर्थात आकाशात उडताना पृथ्वीवरील जमिनीचा विसर पडताना दिसतो. लोकांच्या याच भावनिक मानसिकतेचा राजकारणी लोक फायदा उठवतात व धर्माला राजकारणाच्या दावणीला बांधतात. पण राजकारण्यांचा हा धूर्तपणा लोकांना कळत नाही. धर्माचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे कितीही वाटले व ते असंविधानिक असले तरी तसा वापर होतोच. यावर रोखठोक बौद्धिक विचार मांडण्याची सोय नाही. कारण धर्मभावनेने बेभान  झालेले लोक अंगावरून चवताळून येतात. त्यांना वास्तव लेखन आवडत नाही. मला सुद्धा समाज माध्यमावर फार सांभाळून लेखन करावे लागते. खूप बौद्धिक कष्टाने मिळवलेले वकील पद व वयाचे ज्येष्ठत्व याची बिलकुल पर्वा न करता ओळख पाळख नसलेले पण स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र झालेले फेसबुकी मित्र अशा स्पष्ट लिखाणावर सरळ सरळ शिव्या द्यायला कमी करत नाहीत. मला असे अनुभव अधूनमधून येतात. मग खालची बौद्धिक पातळी असलेल्या चुकून माझे मित्र झालेल्या लोकांना मला ब्लॉक करावे लागते. म्हणून तर मी माझे फेसबुक खाते निवडक वैचारिक मित्रांसाठी मर्यादित ठेवले आहे. आपले लेखन छान असते. धन्यवाद!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१.२०२४
https://poladpuraasmita.blogspot.com/2024/01/blog-post_21.html

व्यायाम व जीवन योग!

झोप अर्थात निद्रितावस्था ही जिवंत शरीर व मनाची तात्पुरती विश्रांती होय, झोप पुरी झाल्यानंतर सुरू होते जागृतावस्था ज्यात शरीराच्या शारीरिक हालचालीचा व मनाच्या भावनिक, बौद्धिक क्रियेचा व्यायाम सुरू असतो, दृढ निश्चय, मनोनिग्रह हा मनाच्या व्यायामाचा प्रमुख भाग असतो, शारीरिक व मानसिक व्यायाम ही समांतर प्रक्रिया आहे व दोन्ही व्यायाम प्रक्रियेत संतुलन हाच जीवन योग असतो! -ॲड.बी.एस.मोरे

राजेशाही, लोकशाही!

राजेशाही ही वारसा हक्काने घराण्यातच राहिली (तेव्हाची घराणेशाही) व पेशवाई (तेव्हाचे पंतप्रधान पद) ही कर्तबगारीवर चालू राहिली. पण जेव्हा पेशवेच राजे म्हणजे सत्ताधीश झाले तेव्हा पेशवाई सुद्धा वारसा हक्काने पेशवा घराण्यातच राहिली व अशाप्रकारे पेशवाईत घराणेशाही घुसली. आताच्या लोकशाहीतील सर्वसामान्य जनता ही त्यावेळच्या राजेशाहीतील सर्वसामान्य प्रजा होती. -ॲड.बी.एस.मोरे (मला थोडक्यात समजलेला राजेशाही इतिहास)

FREE ADVOCACY?

FREE ADVOCACY?

One being advocate in his housing society may turn irritating if society takes such advocate for granted for free legal advice not just on few occasions but always. If this is the case of advocate's own society where he live what about other social &/or political organizations if advocate proposes to go free without any gain in return. The advocates are specially learned in special branch of knowledge called law and so if advocates are not free for professional service to business organizations then they should not be free for other organizations too. The exceptional free legal service to any poor, needy individual is different from such service to any group of people, social or political. The selfless social service is degrading and foolish act in selfish human society. If an advocate is specially learned in special branch of knowledge called law, then he has to be truly professional!

-©Adv.B.S.More, 21.1.2024

ईश्वर एक पण धर्म अनेक!

ईश्वर एक, पण त्याच्या धार्मिक मान्यता अनेक (अनेक धर्म व पंथ) याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले ईश्वराचे विराट विश्वरूप. हा झाला विश्वाचा आध्यात्मिक अर्थ. याचा वैज्ञानिक अर्थ हा की, निसर्ग एक पण निसर्गाची विविधता अनेक (अनेकविध). हे असे की एकाच घड्याळाचे सेकंद काटा, मिनिट काटा व तास काटा हे तीन काटे वेगळे पण ते गोल चक्राकार फिरणाऱ्या वेळेचे संयुक्त भान देतात.  -ॲड.बी.एस.मोरे

सुशिक्षित वर्ग असुरक्षित वर्ग!

मानव समाजात मला आर्थिक शक्ती  एकवटलेले भांडवलदार, राजकीय शक्ती एकवटलेले राजकारणी, दहशतवादी शक्ती एकवटलेले डॉन, कला-क्रीडेत सिद्धी प्राप्त केलेले कलाकार-खेळाडू व धर्म शक्ती एकवटलेले धर्म पंडित हे पाच प्रमुख गट दिसतात, हे पाच गट प्रचंड सामर्थ्यशाली आहेत व म्हणूनच समाजावर ते प्रचंड मोठा प्रभाव टाकून आहेत, समाजातील या पाच महाशक्तींपुढे ज्ञान, विज्ञान लाचार आहे, त्यांचे गुलाम आहे कारण ते एकवटलेले नसून विखुरलेले आहे, बौद्धिक कष्टकरी सुशिक्षित वर्ग हा समाजातील सगळ्यात अल्पसंख्य व असुरक्षित वर्ग होय! -ॲड.बी.एस.मोरे 

रामायण व महाभारत!

रामायण व महाभारत!

हिंदू धर्मात लोकप्रिय असलेले महाभारत हे महाकाव्य महर्षी वेदव्यास यांनी रचले व बुद्धी देवता श्रीगणेश यांनी लिहिले अशी मान्यता आहे. या महाभारतात कौरव पांडवांचे जे महायुद्ध झाले त्या युद्धाच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली. ती संजय यांनी त्या काळात प्रगत असलेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने (दूरदर्शन) ऐकली व ती धृतराष्ट्राला सांगितली. ती धृतराष्ट्र यांनी ऐकली ती त्यांची झाली श्रुती (कानाने श्रवण करणे) व ती त्यांनी स्मरणात ठेवली. मग पुढे त्या श्रुती, स्मृतीच्या माध्यमातून महाभारत कथा व त्यातील गीतेचे तत्वज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे सरकत गेले. हिंदू धर्मग्रंथांचा आधारच मुळात श्रुती व स्मृती आहे व म्हणून हिंदू ही एक सांस्कृतिक जीवनशैली बनून पुढे चालत आली आहे. मूळ कायद्यावर जसे वकील कारणमीमांसा देत विश्लेषणात्मक ग्रंथ (कमेंटरी) लिहितात तसाच ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला टीकात्मक (म्हणजे विश्लेषणात्मक) हिंदू ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ किंवा विनोबा भावे यांचा गिताई हा ग्रंथ हे असेच गीतेवरील विश्लेषणात्मक ग्रंथ आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, लो. टिळक, विनोबा भावे यांना गीतेचे भाष्यकार असे म्हणता येईल. पण महाभारत व गीता या दोन्हींचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. त्यांचे मूळ श्रुती व स्मृती हेच आहे.

हिंदू धर्मात प्रिय असलेले रामायण हे आणखी एक महाकाव्य आहे. या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली व ते लिहिलेही त्यांनीच असे मानावे लागेल. कारण लेखक म्हणून श्रीगणेश वाल्मिकी ऋषींच्या मदतीला होते का याचा उल्लेख माझ्या तरी वाचनात आला नाही. रामायण वाल्मिकींनी रचले, लिहिले पण ते श्रीराम सीतेची मुली लव व कुश यांनी जनमानसात सांगून पसरवले. त्यामुळे लव कुश यांनाच रामायणाचे मूळ भाष्यकार म्हणता येईल. पण रामायण महाकाव्याचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. म्हणजे इथेही श्रुती व स्मृती या गोष्टी आल्या ज्यातून रामायण पिढ्यानपिढ्या पुढे सरकले. पण रामायण या महाकाव्याचे पुढील टीकाकार (विश्लेषणात्मक भाष्य करणारे लेखक) कोण हे सापडत नाही. पण महर्षी वाल्मिकी या मूळ रचनाकाराबरोबर भृगु ऋषी यांनीही रामायणावर टीकात्मक म्हणजे  विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला असे सहज वाचण्यात आले होते. पण मी भृगु ऋषी लिखित रामायणाचा एक शब्दही वाचलेला नाही.

रामायण अगोदर घडले व त्यानंतर महाभारत घडले असे म्हणतात. दोन्ही महाकाव्यात धनुष्य बाण, गदा, तलवारी ही आयुधे व घोडे, रथ ही वाहने बघायला मिळतात. आता रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ झाले असून ते हिंदू जीवनशैलीचा भाग झाले आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

गरिबी!

गरीब गरीबच का राहतात?

गरिबांना बचतीचे सल्ले कोणी देऊ नयेत. कसली बचत? त्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडून खर्च केले जातात हे गरिबांच्या गरिबीचे कारण नाही. त्यापेक्षा फार मोठे कारण आहे ते म्हणजे जगातील मूठभर श्रीमंतांची जगातील बहुतांश संपत्तीवरील मक्तेदारी व तेच समाजातील आर्थिक विषमतेचे प्रमुख कारण आहे. काटकसर कसली करणार गरीब माणूस? कष्टाने मिळविलेल्या थोड्या पैशात त्याचे साधेसुधे जगणे तरी शक्य आहे काय? खरं तर त्याचा कष्टाचा पैसा महिन्याचा खर्च भागवता भागवता संपून जातो. बचत कसली करणार? त्या मूठभर श्रीमंतांची श्रीमंती गरिबांकडे तेव्हाच वळेल जेव्हा गरिबांच्या कष्टाचे आर्थिक मूल्य वाढेल. कोण वाढवणार हे मूल्य, गरीब कष्टकरी, श्रीमंत भांडवलदार की मायबाप सरकार?

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

MY POOR ADVOCACY!

*MY POOR ADVOCACY!*

Oh my God, so much legal fee of Sr. Advocates (lakhs of rupees) just on legal opinion. I give big big legal advices to big big builders and corporates and draft big big documents for said big rich clients but my fee is ONLY Rs.1000 for one hour of my professional engagement by them. If this is degradation of my law knowledge and skill then it is simply because I am visiting lawyer to these clients offices and could not have my independent office and also being fully  dependant on my legal profession for earning livelihood for me and my family and I think this may be the case of every  advocate born in poor families without having born with golden or silver spoon in mouth. Having  poor & uneducated family background of textile mill worker I had to run from one rich corporate client to another as visiting lawyer (degraded name) and being fed up I had to reduce my court practice and reverse my daily time schedule. This resulted in reverse biological clock meaning sleeping from morning to afternoon and working only as part time evening legal consultant to rich clients visiting their offices in Mumbai by long distance local train travel from Dombivli to Mumbai. I do NOT blame rich clients for this. I blame my own failure to overcome this testing situation and big thanks to this wonderful advocacy!

- *Adv.B.S.More,* Mumbai (17.01.2024)

समाजमाध्यमी मैत्री!

समाज माध्यमावरील मित्रांशी असलेली वैचारिक मैत्री ही फक्त हवेतली मैत्री, शेवटी प्रत्यक्ष व्यवहार व मदतीसाठी जवळ कोण आहे याला महत्त्व असते, मुले तिकडे परदेशात व आईवडील इकडे भारतात, त्यांनी दररोज कितीही आॕनलाईन गुजगोष्टी करोत, पण दूर परदेशात स्वतःच्या मुलांवर आलेले संकट दूर करायला भारतातील आईवडील तिकडे प्रत्यक्षात धावून जाऊ शकत नाहीत व भारतात आईवडिलांवर आलेले संकट दूर करायला परदेशातील मुले इकडे प्रत्यक्षात धावून येऊ शकत नाहीत, शेवटी प्रत्यक्षात जवळ काय आहे याला महत्व असते! -ॲड.बी.एस.मोरे

श्रीमंती!

अबब, केवढी ही श्रीमंती!

जगातील मूठभर नव्हे तर फक्त ५ श्रीमंतांनी जगातील बहुसंख्य लोकांना गरीब ठेवलेय. एवढी प्रचंड संपत्ती या ५ जणांकडे एकवटलीच कशी? लोकांच्या मतांवर निवडून येणारी सरकारे काय करीत आहेत? या ५ जणांची श्रीमंती जसजशी पुढे वाढत जाईल तसतशी जगातील गरिबी वाढत जाईल. आपल्या महान परमेश्वराला फक्त हे ५ श्रीमंत लोकच अत्यंत प्रिय झालेले दिसत आहेत. मग आपण काय करायचे? काही नाही आपण ईश्वर नाम सत्य है असे म्हणत आपल्या महान परमेश्वराचा जप करीत बसायचे व हेच आपले प्रारब्ध म्हणून जमेल तेवढे आनंदात जगायचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१.२०२४

(संदर्भः आॕक्सफॕम संस्थेचा वार्षिक विषमता अहवाल, बातमी लोकसत्ता दिनांक १६.१.२०२४)

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

नात्यांतील मानसिक संतुलन!

कोणती नाती जास्त जवळची, रक्ताची नाती की लग्नाची नाती?

आधी रक्ताचे नाते की लग्नाचे नाते? कारण पुरूष व स्त्री लग्न करून नवरा व बायको होतात व लैंगिक संबंधातून मुलांना जन्म देतात. अशा मुलांना औरस मुले म्हणतात. लग्न न करता स्त्री पुरूष मुलांना जन्म देतात तेंव्हा त्यांना अनौरस मुले म्हणतात. मुले औरस असोत किंवा अनौरस त्यांचे त्यांच्या आईवडिलांशी नाते असते ते रक्ताचे नाते असते. रक्ताचे नाते म्हणजे जैविक नाते. पती पत्नी यांचे नाते लग्नाचे असते. ते जैविक नाते नसून सामाजिक नाते असते. पण या लग्नाच्या सामाजिक नात्यातही लैंगिक संबंधामुळे पती पत्नीत जैविक संबंध प्रस्थापित होत असतात व त्यामुळे नवरा बायकोचे नाते नैसर्गिक-सामाजिक असे मिश्र नाते असते. पण आईवडील व मुले व त्यांच्या मुलांतील भाऊ, बहीण ही नाती रक्ताची (जैविक) असतात.

मला जवळची, सरळसोपी नाती पटकन कळतात. पण गुंतागुंतीची नाती कळायला थोडा वेळ जातो. वडील, आई, सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, आजोबा (वडिलाचे वडील व आईचे वडील), आजी (वडिलाची आई व आईची आई) ही नाती फार जवळची रक्ताची नाती व म्हणून कळायला सोपी. पण पंजोबा, पंजी, खापर पंजोबा, खापर पंजी ही नाती तशी रक्ताची असली तरी फार लांबची. मी तर आजोबा, आजी (वडिलाकडचे व आईकडचे) यांना बघितले नाही तर पंजोबा, पंजी यांना बघण्याचा प्रश्नच नाही.

जवळच्या रक्ताच्या नात्यांना चिकटलेली लांबच्या रक्ताची नाती असतात ती म्हणजे चुलता (काका किंवा नाना), चुलती (काकी/काकू किंवा नानी), चुलत भाऊ, चुलत बहीण, मावशीचा नवरा (काका), मावशी, मावस भाऊ, मावस बहीण, मावशीतही आईची सख्खी बहीण ही सख्खी मावशी तर आईची मावस बहीण ही मावस मावशी, वडिलांची बहीण म्हणजे आत्या व आत्याच्या मुलाला आतेभाऊ तर आत्याच्या मुलीला आतेबहीण म्हणतात, आईचा भाऊ तो मामा तर मामाच्या मुलाला मामेभाऊ व मामाच्या मुलीला मामेबहीण म्हणतात. पण लांबच्या रक्ताच्या नात्यांतही लग्न हाच दुवा असतो. एकंदरीत नाती रक्ताची व वैवाहिक अशी मिश्र असतात. या मिश्र नात्यांतून निर्माण होणारी इतर नाती म्हणजे जावई, सून, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी, नातू, नात वगैरे. या नात्यांना संलग्न अशी इतर बरीच नाती असतात. अशी ही नात्यांची लांबलचक माळ असते. नातीगोती म्हणजे नात्यांची ही अशी लांबलचक माळ.

असे म्हणतात की वडिलाकडील नात्यांपेक्षा मुलांना आईकडील नाती जास्त जवळची वाटतात. माझ्या नात्यांच्या बाबतीत म्हटले माझी जवळच्या रक्ताची नाती पाच व ती म्हणजे माझे आईवडील, माझ्या दोन धाकटया बहिणी व माझा एक धाकटा भाऊ. या पाच जणांत मला धरले तर एकूण कुटुंब सहा जणांचे. माझ्या वडिलांना तीन भाऊ व एक बहीण म्हणजे मला तीन चुलते व एक आत्या. चुलते (काका/नाना) आले म्हणजे चुलत्या (काकी/नानी) आल्याच. मग त्यांची मुले म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहिणी आल्या. माझ्या आत्याला दोन मुले म्हणजे मला दोन आतेभाऊ व तीन मुली म्हणजे तीन आतेबहिणी. ही सर्व वडिलाकडील नाती. माझ्या आईला एकच सख्खी थोरली बहीण. ती माझी सख्खी मावशी. या सख्ख्या मावशीला एकच एकुलती एक मुलगी (जशी मलाही एकुलती एक मुलगी आहे). सख्ख्या मावशीची ही एकुलती एक मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण. माझी सख्खी मावशी व माझी सख्खी मावस बहीण वरळीला आमच्याच घरी रहात असल्याने ती सख्खी मावशी मला माझ्या आईसारखी तर तिची मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण मला सख्ख्या बहिणीसारखी. माझ्या सख्ख्या बहिणींच्या पतीशी (सख्ख्या मेहुण्यांशी) जवळीक तशी माझ्या या मावस बहिणीच्या पतीशी (सख्ख्या मावस मेहुण्याशी) सुद्धा जवळीक. माझ्या आईची सोलापूर येथे एक मावस बहीण होती. ती माझी मावस मावशी. त्या मावस मावशीलाही एकच एकुलती एक मुलगी. ती माझी मावस मावस बहीण. मावस मावस बहिणीचे पती म्हणजे माझे मावस मावस मेहुणे. आता हे मावस मावस नाते जरी आईकडील असले तरी ते थोडे लांब पडले. तसे हे नाते रहायलाही लांब म्हणजे पंढरपूरला. त्यामुळे सख्ख्या मावस बहिणीचे नाते व मावस मावस बहिणीचे नाते यात थोडे अंतर पडले. पण तरीही पंढरपूरची माझी मावस मावस बहीण ही खूप प्रेमळ होती. ती पंढरपूरला प्राथमिक शिक्षिका होती. तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता की मी पंढरपूरला असताना तिच्या घरी सारखा जात असे व मुंबईला आल्यावरही तिचा व माझा सारखा पत्र व्यवहार चालू असे. मावस मावस बहिणीचे नाते सख्ख्या बहिणीच्या नात्यापेक्षाही जवळ झाले होते ते केवळ त्या बहिणीच्या प्रेमळ स्वभावामुळे. आता असे मायाप्रेम जवळच्या नात्यांतही अनुभवायला मिळत नाही याचे वाईट वाटते.

आईकडील नात्यांप्रमाणे माझ्या वडिलाकडील नात्यांशी म्हणजे चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, आत्या, आतेभाऊ, आते बहिणी यांच्याशी माझी फार जवळीक का निर्माण झाली नाही याला कारण हेच असावे की ही सर्व नाती वडिलाकडील नाती पडली. पण माझ्या एका धाकटया चुलत्या बरोबर (नाना) व चुलती बरोबर (नानी) मला लहानपणी खूप म्हणजे  खूपच जवळीक निर्माण झाली होती कारण ते दोघेही माझे खूप लाड करीत होते. तसेच माझ्या वडिलाचे पंढरपूरला काका व मावशी होते तेही मी पंढरपूरला असताना माझे खूप लाड करीत होते. त्यांचाही मला लळा लागला होता.

माझ्या बायकोकडील नाती म्हणजे माझ्या लग्नाची नाती. ही नाती म्हणजे माझे सासू, सासरे, मेहुणे, मेहुण्या, त्या मेहुण्यांचे पती म्हणजे माझे साडू, त्यांची मुले. या नात्यांशी सासू, सासरे सोडून माझे एवढे सूर जुळले नाहीत. या सर्वांपैकी माझी एक थोरली मेहुणी व धाकटा मेहुणा यांच्याशी माझी जास्त जवळीक आहे कारण या दोघांशी माझ्या बायकोची जास्त जवळीक आहे व हेच त्यांच्याशी असलेल्या माझ्या जवळीकीचे कारण असावे. बाकी माझ्या लग्नाकडची इतर नाती असून नसून सारखीच. माझ्या मुलीचा विवाह हल्ली म्हणजे तीन वर्षांपूर्वी झाला आहे त्यामुळे माझ्या मुलीमुळे माझ्या जावयाशी माझे नाते मुलासारखे जुळून आले असले तरी मुलीचे सासू, सासरे, मुलीची नणंद यांच्याशी अजून तरी तितकेसे संबंध जुळले नाहीत.

माझ्या वरील नातेसाखळीचा जर अभ्यास केला तर असे दिसून येईल की माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (बायको, मुलगी व जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून, त्यात मुलगी रक्ताच्या नात्याची) माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या रक्ताच्या नात्यांचीच (रक्त जवळचे व लांबचेही) साखळी फार मोठी आहे व तीच मला जास्त जवळची आहे. अर्थात माझ्यापुरती तरी माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (माझी बायको, मुलगी, जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून त्यात मुलगी ही रक्ताच्या नात्याची) मला माझ्या रक्ताचीच म्हणजे माझ्या आईवडिलांच्या माध्यमातील नातीच जास्त जवळची आहेत. पण याबाबतीत माझे वडील खरंच ग्रेट होते. त्यांनी रक्ताच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडील नात्यांना म्हणजे त्यांचे भाऊ, बहीण, काका, मावशा या सर्वांना जवळ केले होते व त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांच्या बायको कडील नात्यांना म्हणजे माझा चुलत मामा (माझ्या आईला सख्खा भाऊ नव्हता, आई व मावशी या दोन सख्ख्या बहिणी हीच दोन अपत्ये), माझी मावशी, माझी मावस बहीण, तसेच माझी मावस मावशी, माझी मावस मावस बहीण या सर्वांना जवळ केले होते. दोन्हीकडे असे संतुलन साधणे सगळ्यांनाच जमत नाही. मला ते जमले नाही. पण माझ्या वडिलांना ते जमले. तरीही प्रश्न हा आहेच की ज्या नात्यांमुळे आपले मानसिक संतुलन बिघडते अशी नाती जपावी का?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१.२०२४


शनिवार, १३ जानेवारी, २०२४

जीवन कर (लाईफ टॕक्स)

जगण्याचा जीवन कर (लाईफ टॕक्स)!

माणसांना जगण्यासाठी निसर्गाने दिलेली विविध साधने तशी फुकटच. पण ही साधने निसर्गाने फुकट दिली असली तरी ती माणसांच्या हाती निसर्ग सहजासहजी लागू देत नाही. त्यासाठी माणसांना निसर्गाला दोन प्रकारचे जीवन कर (लाईफ टॕक्स) द्यावे लागतात. एक कर म्हणजे कष्ट (बौद्धिक व शारीरिक) आणि दुसरा कर म्हणजे धोके (जे कधीकधी माणसांचा जीव घेतात). पाण्यात मासे भरपूर आहेत. जा आणि मासे फुकट पकडा व खा. पण हे मासे माणसांच्या हातात सहजासहजी येत नाहीत. ते निसटतात. म्हणून मग पाण्यात जाळे फेका आणि मग माशांना जाळ्यात पकडा. आला ना कष्ट नावाचा जीवन कर. दुसरी गोष्ट म्हणजे या मासेमारीत धोका हा असतोच. खोल पाण्यात नावेने जावे लागते. नाव बुडण्याचा धोका असतो. आला ना धोका नावाचा जीवन कर. जी गोष्ट मासेमारीची तीच गोष्ट शेतात धान्य पिकवण्याची. शेतात राबावे लागते (कष्ट). लहरी पाऊस कधीकधी दगा देतो (धोका). शेतात कष्ट करताना साप, विंचवाची भीती (धोका).

कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला दिल्यानंतर हातात जे येईल ते खा व शिल्लक राहिलेले बाजारात विका. म्हणजे पुन्हा बाजारात मालाची विक्री करण्याचे कष्टच. हा जीवन कर (कष्ट) मात्र समाजाला द्यावा लागतो. त्यात पुन्हा बाजारभावाची शास्वती नाही कारण ते कमीजास्त होतात (धोका). कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला देऊन भागत नाही. तर हे दोन्ही कर अशाप्रकारे पुन्हा समाजाला द्यावेच लागतात. पण यात समाजातील दुष्ट माणसांकडून फसवणूक किंवा लूटमार होण्याचा धोका असतो (हा एक विचित्र उपद्रवी समाज कर). मग या विचित्र उपद्रवी करापासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून समाजाने नेमलेल्या सरकारला राजकीय कर हा द्यावाच लागतो.

अशाप्रकारे निसर्ग, समाज व समाज पुरस्कृत सरकार या तिघांना वरील कर दिल्यावर हातात जे शिल्लक राहील ते खा, संसारात खर्च करा व त्यातून थोडीफार बचत करा जी म्हातारपणी उपयोगी येईल (बचत नाही केली तर ज्या मुलांचे नीट संगोपन केले त्याच मुलांकडून लाथ बसण्याचा धोका) आणि मग या बचतीतून जी काही शिल्लक राहील ती मुलांना सुपुर्द करून या भौतिक जगाचा कायमचा निरोप घ्या. या करयुक्त जगण्याला जीवन ऐसे नाव!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१.२०२४

देवत्वाची अनुभूती!

चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती!

मानवी जीवन विलक्षण आनंददायी आहे कारण याच जीवनात मनुष्य सकारात्मक, कल्याणकारी, चांगल्या भावनांचा अनुभव घेऊ शकतो. हा विशेष अनुभव हीच देवत्वाची श्रेष्ठ अनुभूती होय. मी देव पाहिला असे म्हणणारी व्यक्ती देवत्वाची हीच श्रेष्ठ अनुभूती घेत असते.

हे समजण्याची निसर्गाने पृथ्वीवर रचलेली सृष्टीची पर्यावरणीय रचना विज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासली पाहिजे. या रचनेच्या पायाशी आहेत निर्जीव पदार्थ. या पदार्थांचे गुणधर्म  अजैविक व त्यांची या गुणधर्मांशी निगडीत असलेली बुद्धी यांत्रिक. मानवाने शोधलेली व उपयोगात आणलेली निर्जीव पदार्थांची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या निर्जीवांची यांत्रिक बुद्धी. निर्जीव पदार्थांचे अजैविक गुणधर्म व त्यांची यांत्रिक बुद्धी तंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तळ मजला होय.

या पायावरील पहिली पायरी उत्क्रांत झालीय ती अर्धसजीव वनस्पतींची. अर्धसजीव वनस्पतींना जीव असतो, म्हणून त्यांना वासना, भावना व बुद्धी या तिन्ही गोष्टी असतात. पण त्या अर्ध विकसित पातळीवर असतात. या वनस्पतींचे अर्धजैविक गुणधर्म व या गुणधर्मांशी निगडीत असलेली या वनस्पतींची बुद्धी अर्ध यांत्रिक व अर्ध जैविक असते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा पहिला मजला होय.

वनस्पतींच्या नंतर उत्क्रांत झालेली दुसरी पायरी सजीव पशूपक्षांची. या सजीव पशूपक्षांचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्यांची पूर्ण सजीव जैविक बुद्धी ही वनस्पतींपेक्षा जास्त विकसित पण अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा दुसरा मजला होय.

पशूपक्षांच्या नंतर उत्क्रांत झालेली तिसरी पायरी म्हणजे पूर्ण विकसित झालेल्या सजीव माणसांची. मनुष्य  प्राण्याचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्याची पूर्ण सजीव जैविक बुद्धी सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे मानवी गुणधर्म व ही मानवी बुद्धी श्रेष्ठ असली तरी ती तंतोतंत नसते कारण निर्जीव पदार्थांप्रमाणे ती यांत्रिक नसते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तिसरा मजला होय. अशा रीतीने तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला अशी चार मजल्यांची ही पर्यावरणीय सृष्टी रचनेची इमारत निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांती करीत बांधली आहे.

या इमारतीच्या अगदी वरच्या म्हणजे तळ मजला (पाया) धरून चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या (जगणाऱ्या) माणसाच्या मूलभूत जैविक वासना (बेसिक इन्सटिन्क्टस) यांना ज्या पूरक भावना निसर्गाने चिकटवल्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. या भावनांचा एक प्रकार आहे तो देव भावनांचा म्हणजे सकारात्मक किंवा चांगल्या, विधायक भावनांचा (उदा. प्रेम, करूणा) व दुसरा प्रकार आहे तो दैत्य/राक्षस भावनांचा म्हणजे नकारात्मक किंवा वाईट, विध्वंसक भावनांचा (उदा. राग, लोभ).

मूलभूत जैविक वासनांचे समाधान करण्याच्या प्रक्रियेत दैत्य/राक्षस भावनांना चांगले, विधायक वळण लावण्याचे काम देव भावना करीत असतात. अशाप्रकारे मेंदूमनाला चांगले वळण लावण्याच्या कामात जी मानवी बुद्धी योग्य साथ देते तिला सुबुद्धी म्हणतात व जी मानवी बुद्धी दैत्य/राक्षस भावनांना अयोग्य साथ देते तिला कुबुद्धी म्हणतात. सुबुद्धी मनुष्याच्या हातून देवकार्य म्हणजे चांगले कर्म घडवते तर कुबुद्धी मनुष्याच्या हातून दैत्यकार्य म्हणजे वाईट कर्म घडवते. मानवी जगात देव व दैत्यांचे हे युद्ध सतत चालू असते. माझ्या मते, मानवी जीवनात चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती. नीट अभ्यास केला तर सर्व धर्म, धम्मात याच मंगलाची प्रार्थना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

उतावीळपणा, चिंतातुरपणा!

उतावीळपणा व चिंतातुरपणा, कारणे व उपाय!

ज्या माणसाला तरूण, प्रौढ व वृद्ध वयातही लहान मुलासारखे जगता येते त्या माणसासारखे सुंदर जीवन नाही. लहानपणी भूक लागली तरी आईवडील भाकरी देणार याची खात्री असते. त्यामुळे काळजीचे कारण नसते. लहानपणात लैंगिक वासना नसते त्यामुळे वासनेने व्याकुळ, उतावीळ होण्याची गोष्ट नसते. शालेय शिक्षणातून काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद असतो. त्यामुळे त्याचा ताण जाणवत नाही. त्यामुळे लहानपणी आनंद, शांती, स्थिरता, एकाग्रता, निरागसता या सगळ्याच गोष्टी अत्युच्च शिखरावर असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतशा वासना वाढतात व त्याबरोबर जबाबदाऱ्याही. मग मन वासनेने उतावीळ व जबाबदारीच्या भितीने चिंतातुर होते. उतावीळपणा व चिंतातुरपणा ही दोन्ही मनाच्या भावनिक उद्रेकाची, मानसिक आजाराची लक्षणे आहेत. पण या दोन्ही मागची कारणे वेगळी आहेत. उतावीळपणा वासना काबूत ठेवता न आल्याने निर्माण होतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण यातूनच निर्माण झाली असावी. तर चिंतातुरपणा भितीवर मात करता न आल्याने निर्माण होतो. भावनिक उद्रेकाची ही दोन्ही लक्षणे फार त्रासदायक असतात. एकाग्रता कमी होणे, मन अस्थिर, अशांत राहणे हे मानसिक क्लेश, वेदना भावनिक उद्रेकाच्या या दोन लक्षणांमुळे मनाला होतात. या लक्षणांमुळे जीवनाचा आनंद कमी होतो. जो माणूस वासनेने उतावीळ व भितीने चिंतातुर होत नाही तो माणूस लहान मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोकादायक?

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोक्याचे?

काही निरर्थक गोष्टी केवळ लोक काय म्हणतील या लोकांच्या दबावामुळे आपण करीत असतो. निसर्ग विज्ञानाच्या दृष्टीने अवास्तव असणाऱ्या काही प्रथा, परंपरा केवळ पिढ्यानपिढ्या चालत आल्यात व लोकही आंधळेपणाने त्या पाळतात म्हणून त्या मनाला पटल्या नाहीत तरी पाळायच्या म्हणजे स्वतःच्या मनाने स्वतःलाच फसवणे होय. सखोल अभ्यासाच्या बौद्धिक कष्टातून मनाला कळलेली काही गुपीते सत्य असली तरी ती लोकांना सांगायची नसतात. लोक असे सत्य स्वीकारण्याची गोष्ट तर सोडाच पण ते सहन न झाल्याने लोकांना वास्तवाचे असे ज्ञानामृत पाजणाऱ्यालाच लोक जबरदस्तीने विष प्यायला भाग पाडतील. महान ग्रीक तत्वज्ञ साॕक्रेटिस हे याचे ठळक उदाहरण आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा नियम!

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम!

निसर्गाने त्याच्या उत्क्रांतीतून काय पण नमुने बनवून ठेवलेत या जगात. या नमुन्यांची विविधता नुसती वरवर बघितली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. मग ती तपासायला गेल्यावर तर काय मेंदूचा पार भुगाच होऊन जातो.

या जगात निर्जीव पदार्थांचे नमुने किती, अर्धसजीव वनस्पतींचे नमुने किती, सजीव प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मासे, हवेत उडणारे पक्षी, किटक, जमिनीवर सरपटणारे प्राणी, जमिनीवरील शाकाहारी, मांसाहारी चार पायांचे प्राणी, दोन पायांची व दोन हातांची माणसे यांचे नमुने किती, बापरे या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांबरोबर राहणे म्हणजे केवढे कठीण काम.

वरील नमुनेदार पदार्थ, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार या जगात नमुनेदार हालचाल करीत असतात. या सर्वात माणूस हा खास नमुनेदार प्राणी. हा खास नमुना निसर्गाने काय विचार करून बनवला असेल (उत्क्रांत केला असेल) हे कळायला मार्ग नाही आणि निसर्गाला मन, बुद्धी आहे का व तो विचार करतो का हे कळायला पण मार्ग नाही.

निसर्गाचा खास नमुना असलेल्या बुद्धिमान माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याचे जीवन खास नमुनेदार बनविलेले आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या जीवनाला वैज्ञानिक व तांत्रिक, कलात्मक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, शासकीय, कायदेशीर, सांस्कृतिक, आध्यात्मिक आकार दिला आहे जो आकार खास नमुनेदार आहे.

मनुष्याने त्याच्या जीवनाला विशेष आकार देताना निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम ओळखला. या नियमानुसार जो बलवान तोच श्रेष्ठ हे त्याला कळले. मग श्रेष्ठ नव्हे तर सर्वश्रेष्ठ होण्यासाठी त्याने इतर प्राण्यांपेक्षा अधिक बलवान व्हायचे ठरवले. त्यासाठी त्याने सामाजिक जीवन स्वीकारून समूहाने रहायचे ठरवले. त्यातून कुटुंबे, समाज गट, निरनिराळी राज्ये, राष्ट्रे निर्माण झाली. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये महाशक्ती (सुपर पाॕवर) बनण्याची स्पर्धा सुरू झाली आणि या सर्वांचा मूळ पाया काय तर बळी तो कानपिळी हा मूलभूत निसर्ग नियम.

गंमत ही की बळी तो कानपिळी या नियमाला बुद्धिमान माणसाने देव कल्पनेतून आध्यात्मिक रंग दिला. म्हणजे काय तर मनुष्य जीवनाला त्रासदायक असलेल्या नमुनेदार जगातील ज्या ज्या उपद्रवी गोष्टी असतील त्यांना मनुष्याने दुष्ट राक्षस अशी उपमा देऊन टाकली. त्यातून वाईट, विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांवरही राक्षस असा शिक्का बसला. मग या दुष्ट राक्षसांचा संपूर्ण विनाश करण्यासाठी किंवा त्यांचा विनाश होत नाही म्हणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मानवी जीवन कल्याणकारी व संरक्षक शक्ती ज्या ज्या माणसांनी सिद्ध केल्या त्या त्या बलवान माणसांना देवत्व प्राप्त झाले. असे देवराज्य स्थापन करणारे महान राजे पूजनीय झाले. असे राजेच काय पण समाज कल्याणकारी काम करणारे महापुरूष सुद्धा वंदनीय झाले. लोक त्यांना वंदन करू लागले. मग पुढे लोकांनी त्यांचे पुतळे निर्माण केले. देव व राक्षस यांच्यातील युद्धाच्या मुळाशी शेवटी आहे काय तर निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम. असे आहे हे नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

विश्वनिर्मितीचा वैज्ञानिक सिद्धांत किती जणांनी अभ्यासलाय व किती जणांना कळलाय? या सिद्धांताला इंग्रजीत बिग बँग थिअरी म्हणतात. अंतराळ पोकळीत कोणत्या तरी सूक्ष्म कणाचा महास्फोट झाला व मग त्या कणाचे अनेक कण बनून विश्वनिर्मितीला सुरूवात झाली व या कणांचे हळूहळू प्रसरण होत पदार्थ कणांचे विश्व निर्माण झाले जे आता अस्तित्वात आहे असा काहीसा हा ढोबळ सिद्धांत.

विश्वाचा निर्माता व नियंता परमेश्वर आहे असे मानणारे लोक म्हणजे देवश्रद्ध आस्तिक लोक. ईश्वराचे अस्तित्व मानून आस्तिकांनी जगात अनेक देवधर्म निर्माण केले. पण परमेश्वर जर विश्व निर्माता व नियंता असे मानले तर मग देवधर्म व निसर्ग विज्ञान यांची सांगड घालावी लागते. अशी सांगड घालताना मनात विचार येतो की ज्या सूक्ष्म कणाने त्याच्या महास्फोटातून विश्व निर्माण केले तो कण म्हणजे रंग, रूप, गुण, आकार नसलेला ईश्वर कण (गाॕड पार्टिकल) तर नसेल? तो ईश्वर कण म्हणजेच निर्गुण निराकार परमेश्वर असे मानायचे का? कण कण में है भगवान म्हणजे कणा कणात ईश्वर आहे असे मानले जाते. पण मानणे व असणे यात फरक आहे हे सांगायला नको.

बरं तो निर्गुण निराकार ईश्वर कण अंतराळ पोकळीत असाच फिरत असेल का? फिरताना त्याला भान नसेल का? मग त्याला अचानक भान येऊन स्वतःचा महास्फोट करून विश्वाची निर्मिती करावे असे का वाटले असेल? भानात येणे याचा अर्थ अगोदर भानात नसणे असा होतो. मग त्या ईश्वर कणाला त्याच्या महास्फोटापूर्वी कसलेच भान नसेल का?

हे अनेक प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे जर त्या निर्गुण निराकार ईश्वर कणाने विश्वरूपी शरीर धारण केले असे मानले तर मग या शरीरात त्याने एकीकडून देवत्वाचे चांगले गुण तर दुसरीकडून राक्षसत्वाचे वाईट गुण घुसवून त्या दोन विरोधी गुणांत कायमचे युद्ध लावून का दिले असावे? बरं या युद्धात तो निर्गुण निराकार ईश्वर कण म्हणजे परमेश्वर कोणाची बाजू घेतो हेच खरं तर कळायला मार्ग नाही. कारण दुष्ट प्रवृत्ती जगातून संपता संपत नाहीत. खरं तर चांगल्या व वाईट या दोन्ही प्रवृत्ती त्या एकाच निर्गुण निराकार परमेश्वराच्या (ईश्वर कणाच्या) दोन विभिन्न आवृत्त्या असल्याने तो परमेश्वर त्यातील वाईट आवृत्तीचा संपूर्ण विनाश करेल अशी भाबडी आशा करण्यात काय अर्थ आहे? आणि शेवटचा प्रश्न हा की अशी भाबडी आशा मनात धरून त्या निर्गुण निराकार ईश्वर कणास (परमेश्वरास) प्रार्थना करून काय उपयोग आहे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

जास्त खोलात जाऊ नये!

जास्त खोलात जाऊ नये!

सागराची खोली व आकाशाची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये. अती खोलात जाऊन विचार करू नये. कारण जास्त खोलात गेल्यास हाती गाळच येतो. निसर्ग विज्ञानाच्या जास्त खोलात गेले तर अंतराळ पोकळीत चाचपडत बसावे लागते व ईश्वर अध्यात्माच्या जास्त खोलात गेले तर ईश्वर तर सापडतच नाही पण वेड लागण्याची पाळी येते. त्या अनाकलनीय ईश्वराचे ध्यान केल्यास मिथ्या कल्पना वाढतच जातात व आध्यात्मिक शांती मिळण्याऐवजी माणूस भ्रमिष्ट होण्याची शक्यता असते. मग काय करावे? तर भानात यावे व वास्तवाचे ध्यान करून त्यात रमावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

DO NOT TRY TO EXPLAIN OR CONVINCE!

Do not try to explain or convince in general and/or in specific your thoughts on science and/or law with people who are not learned even in basic framework of science and/or law.

First of all such people will not understand what you say and even if they understand little bit of your saying they will trouble you by asking you hundreds of questions without any fee consideration in return or may even oppose you with their half knowledge.

So be professional and do not get emotional about peoples ignorance in what you have learned by your hard and smart intellectual exercise and efforts.

If you are truly learned in any branch of science and/or law then just practice that branch of knowledge by sharing said valuable knowledge with the people who really need your said knowledge and your said professional service in said branch of knowledge in return for your reasonable fee consideration and that is all!

-©Adv.B.S.More, 10.1.2024

तुलना नको!

तुलना नको!

प्रसिद्ध वकील श्री. राम जेठमलानी ९४ वयापर्यंत सुप्रीम कोर्टात वकिली करीत होते. आताही मुंबई हायकोर्ट व इतर कोर्टात नव्वदी पार केलेले वकील कोर्टाच्या केसेसमध्ये सक्रिय आहेत. पण वय लांबले व जीवन सक्रियता लांबली म्हणून निसर्ग कोणाला सोडत नाही. शेवटी निसर्ग त्याचा इंगा दाखवतोच. गानसम्राज्ञी लता मंगेशकर दीर्घकाळ जगल्या व दीर्घकाळ गात होत्या. पण एक काळ असा आला की त्यांना त्यांनी गायलेलेच एखादे गाणे थोडे गायला विनंती केली तरी त्या हात जोडून नम्रपणे नकार द्यायच्या. देवानंद खूप वर्षे जगला व चित्रपट क्षेत्रात सक्रिय राहिला पण शेवटी त्याला माघार घेऊन गप्प बसावेच लागले. प्रसिद्ध किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा तो आवाज किती गोड व खणखणीत होता. नुसते ऐकतच रहावे. पण तो आवाजही हळूहळू निसर्गाने क्षीण केला. निसर्ग हा असा वयानुसार प्रत्येकाला गप्प बसवतो. जास्त वय जगणे म्हणजे वय लांबणे व ऐंशी, नव्वदी नंतरही सक्रिय राहता येणे हे निसर्गाचे अपवाद आहेत. त्या अपवादांची तुलना सर्वसाधारण नियमांशी करू नये. अपवाद हे शेवटी अपवादच असतात. उगवता सूर्य निरागस बाळासारखा, दुपारचा तळपता सूर्य तरूणांच्या सळसळत्या रक्ताचा व त्यांच्या प्रचंड मोठ्या उत्साहाचा तर मावळतीचा सूर्य आता पूर्वीसारखी हालचाल जमत नाही म्हणून केवळ नाईलाजास्तव गप्प बसाव्या लागणाऱ्या वृद्धांचा. काही वृद्धांच्या मावळतीच्या कळा थोड्याफार लांबतात म्हणून त्यांनी सत्तरीतच गळाटलेल्या वृद्धांसमोर त्यांचे ते आभासी तरूणपण व त्यातला तो आभासी आनंद नाचवू नये. त्यांची पण ती गप्प बसण्याची वेळ येणार असते. एका तरूण फेसबुक मित्राने माझी थोडी मरगळ बघून मला एक सूचना केली की मी गाण्यावर नाच करून आपले तारूण्य दाखवित व्हिडिओ बनवणाऱ्या ग्रुपला जाॕईन व्हावे. माझ्या वैचारिक पोस्टस न वाचताच असले सल्ले देणाऱ्या फेसबुकी मित्रांना काय म्हणावे. मी ज्येष्ठ वकील आहे. माझा वकील मित्रांचा व मनसे पक्षातील महाराष्ट्र सैनिकांचा मोठा ग्रूप आहे. पण तिथे वयानुसार मी जमेल तेवढाच सक्रिय असतो. या समाज गटांना संलग्न असणे हे ज्ञानाचे व सन्मानाचे काम आहे. गाणी गाणे किंवा नाच करणे या गोष्टी माझ्यासाठी नाहीत हे यांना कळत कसे नाही? तात्पर्य काय की कोणीही कोणाशी तुलना करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

रविवार, ७ जानेवारी, २०२४

अनाकलनीय ईश्वर म्हणून का वाटेल ते करायचे?

अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

अनाकलनीय निर्मिकाने (ईश्वराने) रचलेली सृष्टीची भौतिक रचना (विज्ञान या रचनेला निसर्गाची उत्क्रांती म्हणते) विधायक आहे. त्या निर्मिकाच्या मनात आले तर एका क्षणात तो या सृष्टी रचनेचा विनाश करू शकतो. पण त्या निर्मिकाची मानसिकता विधायक आहे, विध्वंसक नाही. ही साधी गोष्ट काही अर्धवट, मूर्ख माणसांना कळत नाही. म्हणून तर निर्मिकाच्या नावानेच विस्फोटक विधाने करून समाजमनाला अशांत करून ते पेटवण्याचा अधार्मिक उद्योग अशी माणसे करीत असतात. निर्मिकाचा धर्म कोणता हे नीट समजून न घेता स्वतःसाठी सोयीच्या असलेल्या धर्मात त्या निर्मिकाला (ईश्वराला) बसवून त्याच्या नावाने विध्वंसक कृत्यांचे समर्थन करायचे, तसेच अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बुवा, बाबा, बायांचे व तसेच वरून धर्म आतून अधर्म करणाऱ्या समाजकंटकांचे राजकीय फायद्यासाठी उदात्तीकरण करायचे ही असली मानवी कृत्ये बघून त्या अनाकलनीय निर्मिकाला काय वाटत असेल हे सुद्धा अनाकलनीय! प्रश्न हा आहे की अनाकलनीय ईश्वर कळत नाही म्हणून वाटेल ते करायचे का?

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.१.२०२४

एकटक रोखून बघू नका!

एकटक रोखून बघणे किती त्रासदायक?

एखाद्या व्यक्तीकडेच नव्हे तर एखाद्या वस्तूकडे, गोष्टीकडे जास्त वेळ अर्थात एकटक रोखून बघत बसणे हे किती त्रासदायक होऊ शकते हा पुन्हा माझ्या चिकित्सक वृत्तीचा विषय. पण मला आता कळून चुकलेय की माझी ही असली चिकित्सक वृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिच्या खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती हा सुद्धा एकटक रोखून बघण्याचाच एक प्रकार. या वृत्तीचा माझ्या मलाच त्रास होतो हेही खरे आहे. याला अती विचारी वृत्ती असेही म्हणता येईल. अती तिथे माती या म्हणी नुसार अती विचार सुद्धा मनात तणाव निर्माण करून स्वतःलाच त्रास देतात.

एखाद्या गोष्टीकडे सहज बघायला निसर्गाची हरकत नसते, पण एकटक रोखून बघायला निसर्ग हरकत घेतो. सहज बघणे म्हणजे मवाळ, अहिंसक नजरेने बघणे व एकटक रोखून बघणे म्हणजे कडक, हिंसक नजरेने बघणे. उदा. एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर बोट ठेवणे, दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच जास्त डोकावून बघणे किंवा उगाच फालतू लुडबूड करणे, एखाद्या गोष्टीकडे अती चिकित्सक नजरेने म्हणजे अती खोलात जाऊन बघणे ही एकटक रोखून बघण्याची काही उदाहरणे आहेत.

निसर्ग नियमानुसार एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडे एकटक रोखून बघितले तर त्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीकडून सहज, तालबद्ध देवाणघेवाण होण्यासाठी योग्य प्रतिसाद, सहकार्य मिळणे तर सोडाच पण समोरून एकदम हिंसक प्रतिक्रिया मिळू शकते. उदा. एखादा पुरूष एखाद्या स्त्री कडे जास्त वेळ एकटक रोखून बघत बसला तर त्या स्त्री कडून त्या पुरूषाच्या थोबाडीत बसू शकते. यालाच एकदम हिंसक प्रतिक्रिया म्हणतात. एकटक रोखून बघणे हेच या प्रतिक्रियेला कारण असते.

जगाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जगाकडे सहज बघणे फायद्याचे असते. जगाविषयी अती अपेक्षा, अती लालच हा जगाकडे एकटक रोखून बघण्याचाच प्रकार. या अशा एकटक  रोखून बघण्यातूनच मनात अहंभाव, मोह, मद, मत्सर, क्रोध, भ्रष्टाचार, व्यभिचार व हिंसाचार या नकारात्मक गोष्टी तयार होतात. मी तर असे म्हणेल की, जगाकडे, इतरांकडे एकटक रोखून बघणे हे तर चुकीचे आहेच, पण स्वतःच स्वतःकडे एकटक रोखून बघणे हे सुद्धा चुकीचे आहे. जगाकडे सहज बघून जगाचा सहजानंद घेतला पाहिजे हे मला म्हातारपणी उशिरा सुचलेले शहाणपण!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१.२०२४

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

मानवी जीवन सर्वोत्तम का?

मानवी जीवन सर्वोत्तम का?

निसर्गाची भौतिकता अशुद्ध आहे, प्रदूषित आहे. निसर्गाच्या भौतिकतेत हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे. निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेने भारलेले मानवी शरीर व मानवी मन भोगी आहे, वासनांध आहे. हे भौतिक मानवी मन त्याच्या  आतल्या अंतरात्म्याचे म्हणजे शुद्ध आध्यात्मिक आत्म्याचे अस्तित्वच नाकारते. अंतरात्म्याचे अस्तिव नाकारणारे भौतिक मन निसर्गातील  परमात्म्याचे म्हणजे शुद्ध चैतन्याचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व नाकारते आणि म्हणून अशा भौतिक मनाला परमेश्वराच्या शुद्ध अध्यात्माचे वावडे असते. मानवी जीवन सर्वोत्तम आहे कारण अनेक मूलद्रव्ये, अनेक पदार्थ यांची भेसळ असलेल्या निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेतही शुद्ध अंतरात्म्याची व त्याबरोबर शुद्ध परमात्म्याची आध्यात्मिक अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे, इतर पदार्थ, प्राणीमात्रांना नाही ज्यांना या शुद्ध चैतन्याची जाणीवही नसते. जिथे जाणीवच नाही तिथे अनुभूती कसली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१.२०२४

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते!

धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी खालील अवस्था बघू.

(१) तरूणपणी सहजसोप्या व वजनाला हलक्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे वय वाढल्यावर अवघड व वजनाला जड होऊनही त्या कराव्या लागणे, नीट न पेलवणाऱ्या, नीट न झेपणाऱ्या गोष्टी व्यवस्थित जमत नसूनही हळूहळू का होईना पण बळेच कराव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(२) जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तीन दृश्ये जरूर दिसतील. एक लहान मुलांना हाताला धरून शाळेत सोडणारे त्यांचे तरूण आईवडील, दोन पैसा व जमलेच तर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोशात (होश कमी असला तरी) धावणारी तरूण, प्रौढ मंडळी व तीन सक्रिय जीवनाच्या व्यासपीठावरून खाली उतरून लांब कुठेतरी कोपऱ्यात बसलेली (ज्येष्ठ नागरिक कट्टा) वृद्ध मंडळी. कुठेही जा, ही तीन दृश्ये हमखास दिसतात. गौतम बुद्धांना आजारी माणूस, म्हातारा माणूस व प्रेत अशी तीन दृश्ये दिसली होती जी त्यांच्या आत्मचिंतनास कारणीभूत ठरली. पण इथे मी नमूद केलेली तीन दृश्ये सर्वांना नेहमीच दिसतात पण त्यावर किती जण आत्मचिंतन करतात? पण शेवटी हे दृश्य वास्तव आहे, ते टाळता येत नाही, मग त्यावर काय आणि कसले आत्मचिंतन करायचे असा सर्वसाधारण विचार लोक करतात. हे वास्तव कंटाळवाणे वाटले तरीही ते स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(३) कोणालाही निसर्ग विज्ञानाच्या व समाजशास्त्राच्या अनेकविध ज्ञान शाखांत प्रावीण्य मिळवून त्या सर्व ज्ञान शाखांत तज्ज्ञ होता येत नाही त्यामुळे परावलंबीत्व येते. आंधळे पणाने डाॕक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. सारख्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवता येत नाही व सामान्य ज्ञानाच्या जोरावर त्यांचे सल्ले सर्वसामान्यांना  खोडूनही काढता येत नाहीत. मग सुरू होते ती मनात चूक की बरोबर यांची घालमेल. तरीही हे इतरांवरील हे परावलंबीत्व स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(४) होश असो नसो पण तरीही जोशात असलेल्या तरूण, प्रौढ पिढीबरोबर वृद्धांना नीट मिसळता न येणे व त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्तही होता न येणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(५) वृद्धापकाळात शरीराचे अवयव झिजून झिजून थकलेले, खचलेले असल्याने पूर्वीचा आत्मविश्वास रहात नाही, तरीही डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाने जीवनाची गाडी म्हातारपणी चालवावी लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(६) राजकारणी कितीही भ्रष्ट वागले तरी त्यांच्याशिवाय कायद्याचे राज्य पुढे सरकत नाही म्हणून गरजेपोटी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून द्यावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

(७) कायद्याच्या राज्यात कायद्याने न्याय मिळण्यासाठी न्यायालयांत कितीही वेळ लागला व तारीख पे तारीख असे कितीही वेळा झाले तरी शेवटी गरजेपोटी अंतिम न्यायासाठी न्यायालयांत सारख्या खेटा घालाव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.

मला जवळून कळलेल्या धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव देणाऱ्या काही मोजक्या अवस्था मी वर दिल्या आहेत. जिवाची घालमेल करणाऱ्या आणखी अशा बऱ्याच इतर अवस्था असू शकतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४


बी.डी.डी. चाळी!

पुनर्विकासानंतर मुंबईतील सर्व बी.डी.डी. चाळी इतिहासजमा होणार!

मित्रांनो, ही आहे परळ, दादर जवळील नायगावची एक बी.डी.डी. चाळ. मी तिचा बाहेरून व आतून फोटो घेतला कारण बी.डी.डी. चाळीशी माझे बालपण व थोडेसे तरूणपण जोडले गेले आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजे वरळी, डिलाईल रोड, नायगाव वगैरे ठिकाणी बांधल्या गेलेल्या या चाळी सगळीकडे अगदी एकसारख्या आहेत. या चाळीतील एकेक खोली एकदम छोटी म्हणजे १०×१२ म्हणजे १२० चौ.फूटाची. तळ, पहिला, दुसरा, तिसरा अशा चार मजल्यांच्या या चाळीत प्रत्येक मजल्यावर २० खोल्यांनुसार एकूण ८० खोल्या. प्रत्येक मजल्यावर इकडून १० व तिकडून १० अशा खोल्यांच्या मधोमध ऐसपैस व्हरांडा ज्याला वटण असेही म्हणतात. या वटणात आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील खोलीच्या बाहेर मी माझे अंथरूण टाकून झोपायचो. आई सकाळी शाळेत जाण्यासाठी व नंतर काॕलेजला जाण्यासाठी मला ६ वाजता झोपलेले शरीर अलगद हलवून उठवायची. मजल्यावर मधल्या भागात २० खोल्यांच्या सामूहिक वापरासाठी मधला नळ व शौचविधी साठी स्त्रियांसाठी ३ व पुरूषांसाठी ३ असे दोन्ही बाजूला सार्वजनिक संडास. एकेका खोलीत एक कुटुंब म्हणजे आईवडील व साधारण ४ मुले असा गरीब गिरणी कामगाराचा संसार गिरणगावातील बी.डी.डी. चाळीत थाटलेला. तो अनुभवच फार वेगळा होता जो मला माझ्या वृद्धापकाळीही विसरता येत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी,

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी?

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम शांती !

(१) श्री गणेशाय नमः !
बुद्धीदेवतेचे प्रथम स्मरण, मेंदूचे बौद्धिक इंजिन नीट चालावे म्हणून.

(२) श्री परमेश्वराय नमः !
परमेश्वराचे द्वितीय स्मरण, भौतिक जगातील काही काळच असलेला तात्पुरता प्रवास अडथळे न येता किंवा येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून सुखाचा व्हावा यासाठी मनाला एक भरभक्कम, कणखर आधार लागतो म्हणून. परमेश्वर कोणत्याही शब्दात, दस्तऐवजात, प्रतिमेत, मूर्तीत पूर्णपणे साठवता येत नाही कारण तो अनाकलनीय व प्रवाही आहे. म्हणून मी जगातील कोणत्याही देवधर्मात व कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमांत, मूर्तींत एकच परमेश्वर बघतो. तिथे मला एकच परमेश्वर दिसत असल्याने माझे हात तिथे नम्रपणे जोडले जातात. माझ्या दृष्टिकोनातून, आंतरधर्मीय संघर्ष हा मानवनिर्मित संघर्ष आहे, नक्कीच तो परमेश्वर निर्मित संघर्ष नव्हे. म्हणून मी या संघर्षापासून स्वतःला अलिप्त ठेवून संपूर्ण चराचर सृष्टीत सर्वांसाठी एकच असलेला परमेश्वर समोर ठेवून त्याच्यापुढे लीन होतो.

(३) श्री स्वामी समर्थाय नमः !
साधुसंतांचे तृतीय स्मरण, जगात होऊन गेलेल्या सर्व धर्मातील सर्व साधुसंतांचे प्रातिनिधीक प्रतीक व देवत्वाचे प्रत्यक्ष गुणात्मक रूप म्हणून मी श्री स्वामी समर्थांकडे बघतो व त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून परमेश्वर जवळ असल्याची अनुभूती मिळते.

(४) ओम शांती !
शेवटी मनःशांतीची प्रार्थना गणेश, परमेश्वर व स्वामी समर्थ या तिघांना एकत्र, कारण म्हातारपणी उतार वयामुळे शरीर झिजलेले, थकलेले असते. ते पूर्वीसारखे भौतिक कार्य करू शकत नाही. शरीराचे जडत्व वाढून शरीराच्या हालचालींची गती संथ झालेली असते.

उतार वयाची हालचाल म्हणजे परतीचा पाऊस. जन्म म्हणजे नव्या नवतीचा पाऊस, जीवन म्हणजे पावसाचे काही काळ स्थिरावणे व मृत्यूपंथाला लागलेला वृद्धापकाळ म्हणजे जिथून आला त्या ठिकाणी पुन्हा माघारी परतणारा परतीचा पाऊस. याच काळात म्हणजे म्हातारपणीच परमेश्वरी अध्यात्माची जास्त गरज असते.

याचे मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे वृद्धापकाळात आयुष्याच्या परतीचा पाऊस सुरू झालेला असतो आणि तरीही थकलेल्या, झिजलेल्या, जीर्ण झालेल्या शरीरात असलेले मेंदूमन ते वास्तव न स्वीकारता स्वतःला उगाच चिरतरूण समजत असते. त्याला वाटते की वृद्धापकाळातही आपण तरूण शरीरातच आहोत. म्हणून आपण जशा उड्या मारतो तशा उड्या या जीर्ण शरीरानेही मारल्या पाहिजेत. म्हणून ते मेंदूमन हट्टाने थकलेल्या वृद्ध शरीरालाही स्वतःच्या कलाने नाच म्हणते. ज्याप्रमाणे लहान नातवंडे वृद्ध, थकलेल्या आजी आजोबांना बोकांडी बसून त्यांना घोडा करून धाव म्हणतात व त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीराची चाळण करतात तसेच वृद्ध शरीरात उड्या मारणाऱ्या मेंदूमनाचे असते. काही आजी आजोबांना ही नातवंडी धमाल, मस्ती आवडते तसेच काही म्हाताऱ्यांना आपण अजूनही तरूण आहोत असेच वाटत असते.

मी या अवास्तव गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवतो. माझे मेंदूमनही मला नाच म्हणते, पूर्वीसारखे धाव म्हणते. पण माझे थकलेले शरीर माझ्या मनाला बिलकुल जुमानत नाही. पूर्वी मन शरीरावर राज्य करायचे. आता उतार वयात शरीर मनावर राज्य करीत आहे. ते राज्य स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नाही. पण माझे मन हे वास्तव स्वीकारायला तयार होत नाही. या कटू वास्तवामुळे ते नाराज, हिरमुसले होऊन अशांत होते. अशा या अशांत मनाला शांत करण्यासाठी म्हणजे माझ्या मनःशांतीसाठी मला परमेश्वरी अध्यात्माची गरज भासते. अर्थात उतार वयात अध्यात्म ही माझी चैन नसून गरज आहे. ही गरज मी माझ्या वरील आध्यात्मिक पद्धतीने भागवतो. या लेखातून माझी आध्यात्मिकता का (गरज म्हणून), कुठे (परमेश्वरापाशी) व कशी तर (ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री परमेश्वराय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः,ओम शांती) या पद्धतीने. या अध्यात्म पद्धतीत मी सुरूवात ओम ने करतो कारण ओम मधूनच विश्व निर्माण झाले व ओम मध्येच सारे विश्व सामावलेले आहे व या ओम विश्वाचे मूळ परमेश्वर आहे ही हिंदू धर्मीय संकल्पना, धारणा मी स्वीकारली आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१.२०२४

Copyright Disclaimer!

COPYRIGHT DISCLAIMER!

All please know it well that this videographed film song is within public domain and being open for public watching on public platform, its public sharing by members of public cannot be claimed as the exclusive copyright of its original creator provided its original artistic form is not changed and is not claimed to be original creation of one who shares it in public meaning the name & credit of original creator remains reserved with such original creator only.

I do respect the copyright of original creator of any art such as music, writing etc. I being myself a writer. I have shared this musical video without any change or modification in its original content with my facebook friends purely for the purpose of enjoying its music in its original form within friend circle and not with commercial purpose of making any profit out of such sharing. 

I am not at all claiming it as my own creation & original creation remains with the original creator of artistic creation or musical video. The copying simply means imitation of others creation as creation of copy master. I have shared this musical video with my facebook friends for FAIR USE for purpose of enjoying it within friend circle. This FAIR USE is  permitted by Copyright Act and there is no infringment of copyright of original creator. It is non-profit sharing only for personal entertainment purpose within friend circle and such use is FAIR USE. I disclaim my ownership  right over this creation and I disclaim that I have infringed with copyright of its original creator. Thank you!

-©Adv.B.S.More