https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

माणूस व निसर्ग!

माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार झाला आणि निसर्ग हात चोळत बसला?

सृष्टीला रचतानाच सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी सृष्टी व्यवस्था निर्माण करून तुमचे जीवन-तुमची जबाबदारी असे सजीवांना सांगून निसर्ग हात झटकून मोकळा झाला. मग माणसाने पुढे होऊन ती जबाबदारी अंगावर घेत निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी व सृष्टी व्यवस्था स्वतःच्या दावणीला बांधत स्वतःला सोयीस्कर वाटणारा स्वतःच्या फायद्याचा कायदा त्या मूळ व्यवस्थेतूनच निर्माण केला व त्या कायद्याच्या जिवावर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे म्हणत हा माणूस निसर्गाला वाकुल्या दाखवत बसला. हे बघून, कशाला हा असला माणूस मी बनवला असे म्हणत निसर्ग हात चोळत बसला असेल. वैतागून हात चोळता चोळता निसर्गाला स्वतःच्याच चुकीचा राग आला की मग अवर्षण, अतीवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा मारा निसर्ग त्यानेच निर्माण केलेल्या माणसांवर करतो. कोरोना विषाणू हा त्यातलाच एक प्रकार! पण माणूस महावस्ताद! तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर असल्या नैसर्गिक आपत्तींनाही तोंड देतो व फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने झेप घेतो. खरंच काय बरे वाटत असेल निसर्गाला की निसर्गातील देवाला या असल्या माणसाकडे बघून?

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा