https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

उडणारे पक्षी!

राजकीय नेते म्हणजे हवेत उडणारे पक्षी!

खूप हेवा वाटतो मला त्या पक्षांचा जे हवेत उडतात व त्या राजकीय नेत्यांचा जे विमानात बसून आकाशात विहार करतात. आपल्याला पण असे हवेत उडता आले असते तर किती मज्जा आली असती असा विचार अधूनमधून मनात येतो. पण नुसत्या विचारांवर हवेत उडता येत नाही हे कळल्यावर त्या विचारांना खाली बसवतो, त्यांना शांत रसात विश्रांती घ्यायला भाग पाडतो. आज असाच आकाशात पक्षांना न्याहाळत बसलो होतो. पण त्यांचे निरीक्षण करता असे लक्षात आले की हे पक्षी जास्त काळ हवेत उडू शकत नाहीत. वर उडून उडून एकतर ते थकतात व मग अन्न, पाण्यासाठी जमिनीवर येतात. हे पक्षी हवेत अंडी घालू शकत नाहीत व हवेत त्यांच्या पिलांना जन्म देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना जमिनीचा किंवा जमिनीवरील झाडांचा आसरा घ्यावाच लागतो. राजकीय नेत्यांचे सुद्धा तसेच असते. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, चक्रीवादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी झालेल्या लोकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी जेंव्हा हे नेते विमानात बसून आकाशातून उडत उडत आपत्तीग्रस्त भागात जातात तेंव्हा त्यांना तिथे विमानातून उतरावेच लागते, स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत, तिथल्या लोकांत मिसळावेच लागते. सांगायचे तात्पर्य काय तर लोकच नसतील, पक्ष कार्यकर्तेच नसतील तर राजकीय नेत्यांना कोण विचारेल? खाली जमीनच नसेल तर उडणारे पक्षी हवेत किती तग धरून राहतील? इथे प्रश्न पक्षांनी हवेत उडण्याचा नाही तर जमिनीने तिची किंमत  ओळखण्याचा आहे. तसेच इथे प्रश्न राजकीय नेत्यांनी रूबाबात राहण्याचा नाही तर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी व लोकांनी स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

वकिली व्यवसायाचे राजेपण!

वकिली व्यवसाय म्हणजे सर्व व्यवसायांचा, सर्व क्षेत्रांचा राजा व्यवसाय!

गरीब कुटुंबातील मुलामुलींना वकील होऊन या अत्यंत आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहणे कठीण असले तरी ते अशक्य नाही. यासाठी मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना माझे स्वतःचे जिवंत उदाहरण बिनधास्त देतो. मी मुंबईतील कापड गिरणी कामगाराचा मुलगा आहे. वडील सातवी शिकलेले, गिरणी कामगार, आई पूर्ण अशिक्षित अंगठेबहाद्दर, एक भाऊ व दोन बहिणी ही माझी सख्खी भावंडे फक्त एस.एस.सी. पर्यंत कशीबशी येऊन तिथेच ठप्प झालेली, घरी अत्यंत गरिबी, शिक्षणात मार्गदर्शन करायला कोणी सुद्धा नाही, वकिली क्षेत्र काय असते याविषयीची माहिती देणारा, त्यातले बारकावे, खाचखळगे समजावून सांगणारा कोणी नाही, आजूबाजूची बहुतेक सगळीच मंडळी माझ्या शैक्षणिक प्रगतीवर जळणारी. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी जिद्दीने वकील झालो व पैशाची तंगी, चेष्टा, अपमान या सगळ्या गोष्टी सहन करीत वकिलीत टिकून राहिलो व बायको बारावी शिकलेली गृहिणी व मुलगी शाळेत, पुढे कॉलेजात, मग पुढे एम.बी.ए. साठी मोठ्या मॕनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ही सर्व आर्थिक जबाबदारी एकट्याने डोक्यावर घेऊन वकिलीत राहूनच यशस्वीपणे संसार केला. आज माझी एकुलती एक मुलगी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत मॕनेजर म्हणून उच्च पदावर आहे. तिला तिचा आयुष्याचा जोडीदार स्वतःच निवडण्याचे मी व माझ्या पत्नीने पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मुलीनेही त्या स्वातंत्र्याचे सोने केले. तिचे पती हे सुद्धा लंडनचे एम.बी.ए. आहेत. जावई व मुलगी दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत. हे सर्व मला माझ्या वकिली व्यवसायात राहून प्राप्त करता आले. माझे हे यश म्हणजे देशाचे पंतप्रधान होण्याएवढे मोठे यश आहे असे मी स्वतः मानतो. कारण खडतर मेहनत करीत, अपमान सहन करीत मिळविलेल्या माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा व माझ्या वकिली पदाचा मला गर्व नसला तरी स्वाभिमान मात्र निश्चित आहे. बाकी इतर जळकुटे लोक माझ्या या कणखर मनावर व मोठ्या आत्मविश्वासावर हसून चेष्टा करतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देणार नाही. गरीब कुटुंबात जन्मून कायदा शिकणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनो तुमच्यात जर हिंमत असेल तर कुणाचीही व कशाचीही पर्वा न करता जरूर वकील बना! वकिलीसारखा दुसरा व्यवसाय नाही, अगदी डॉक्टरकी सुद्धा नाही. कारण इतर सगळे व्यवसाय कोणत्या तरी एकाच ज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवून त्या संकुचित ज्ञानावर प्रॕक्टिस करण्याचे व्यवसाय आहेत. पण वकिली हा असा एकमेव व्यवसाय आहे जो जगातील सर्व ज्ञान क्षेत्रांवर राज्य करतो. मग कला, क्रीडा, डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., कंपनी सेक्रेटरी, एम.बी.ए., उद्योगपती, राजकारणी कोणीही असो. या सर्वांवर राज्य करणारा एकमेव व्यवसाय म्हणजेच वकिली व्यवसाय! राजेपण असलेल्या या वकिली व्यवसायात तुम्हाला यायचे असेल तर खिशात दमडी नसताना सुद्धा राजासारखे जगायची हिंमत ठेवा व वकील बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

टीपः

काल एका कायद्याच्या विद्यार्थ्याने वकील व्हावे की नको याविषयी मार्गदर्शन विचारले व त्यातून एक लेख तयार झाला. आजही मला कायदा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वकिली व्यवसाया विषयी हाच प्रश्न केला व त्यातून हा लेख तयार झाला.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

निसर्गाचा सर्वव्यापी कठोर कायदा व वकील!

निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!

(१) मानवी शरीराच्या शरीरग्रंथीतून जसे स्त्राव स्त्रवतात तसे मनाच्या कप्प्यातूनही वासना व भावनांचे रस स्त्रवतात. अर्थात मानवी शरीराचे जसे रसायनशास्त्र असते तसे मानवी मनाचेही रसायनशास्त्र असते. मनाचे रसायनशास्त्र हे मानवी मनाच्या वासना व भावना यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

(२) साहित्य व कलेत नऊ रसांचे वर्णन केले आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या सकारात्मक भावना, अहंकार, तिरस्कार, क्रोध, सूड यासारख्या नकारात्मक भावना, लैंगिक आकर्षण, तहान, भूक, झोप यासारख्या मूळ भौतिक वासना यांच्या रसांनी मानवी मन तुडुंब  भरलेले असते. या सकारात्मक व नकारात्मक भावना आणि मूलभूत भौतिक वासना यातून मनात नऊ रस तयार होतात ते खालीलप्रमाणे.

(क)शृंगार रसः लैंगिक आकर्षण/कामवासना
(ख)वीर रसः उत्साह, पराक्रम, शौर्य
(ग)करूण रसः शोक, वियोग, दुःख, संकट
(घ)हास्य रसः विसंगती, विडंबन, विनोद
(च)रौद्र रसः अतिशय क्रोध, चीड
(छ)भयानक रसः हिंस्त्रपणा, राक्षसी वृत्ती
(ज)बीभत्स रसः किळस, वीट, तिटकारा
(झ)अद्भुत रसः विस्मय, आश्चर्य
(ट)शांत रसः निसर्गशक्तीची/ईश्वराची भक्ती 

(३) मानवी मनातील वरील नऊ रसांपैकी नववा  जो शांत रस आहे त्याला भक्ती रस असेही म्हणता येईल. या भक्ती रसातूनच मानवी मन ईश्वर चिंतन करून शांती मिळविण्याचा प्रयत्न करते. हाच भक्ती रस मनुष्याला निसर्गात देव दर्शन घडवून आणतो. पण निसर्गातील देवाला माणसाने सतत भक्ती रसात बुडून रहावे असे बिलकुल वाटत नाही. तसे असते तर त्या देवाने इतर आठ रस निर्माणच केले नसते.

(४) नवग्रह, नवरंग, नवरस आणि आता देवीचा सुरू असलेला नवरात्रोत्सव यात नऊ हा अंक महत्त्वाचा! कला, साहित्यातील नवरस हे तर निसर्ग शक्तीचेच किंवा निसर्गातील ईश्वराचेच आविष्कार आहेत. मानवी मनाचे रसायनशास्त्र या आविष्काराचाच अभ्यास करते.

(५) वर लिहिलेले नवरस हा निसर्गाच्या विविध पदार्थांचा, विविध रूप व गुणांचा व त्यांच्या विविध वैशिष्ट्यांचा भाग आहे. हे नवरस त्यांची विशेषतः गाजवायला लागले की त्यांना त्यांच्या मर्यादेची आठवण करून देऊन त्यांना संतुलित करीत वठणीवर आणणारा निसर्गाचा सर्वव्यापी  कठोर कायदा हाच निसर्गाचा सर्वोच्च हुकूम होय. या हुकूमाची अर्थात निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

POVERTY!

POVERTY!

Poverty does not mean just poverty in money or material wealth. It is poverty of mind too. The mind can remain poor means narrow even with higher education or higher material wealth. The basic purpose of education is to make mind rich by expanding its scope of thinking and understanding beyond its narrow, selfish world. If you see the world around, you can find lot of difference between developed countries, developing countries and under developed countries. The poverty is basic criterion for this world classification. The developed countries like America are top class  countries which are rich in material wealth as well as education. The developing countries like India are middle class countries which are are at middle level of richness in material wealth and education. But frankly speaking India continues to be very poor in education because its educated population is very less. On the other hand, under developed countries like Sudan, Nigeria are lower class countries being very backward both in material wealth and education. The poverty is thus not only in money or material wealth, but it is also in education! The feeding of hungry stomachs and educating of under developed brains of very poor class people with strong government support are two basic measures in eradication of poverty at lower economic and educational class (NOT CASTE) level! I am on the point of upliftment of very lower class people who cannot afford to attend schools with their hungry stomachs. This is NOT CASTE based but economic and educational poverty based classification. The strong government support is very much needed for upliftment of this very lower class people living below poverty line. This is NOT for those of ANY caste who have already reached at middle class level of material and educational richness!🙏

-Adv.B.S.More©19.10.2020

कायदा व वकील!

कायदा शिकून वकील का बनायचे?

कायदा जगातील सगळ्या विषयांना, सगळ्या ज्ञान शाखांना, सगळ्या गोष्टींना स्पर्श करतो व माणसाची समज प्रगल्भ करतो, माणसाला जगाची खरी ओळख करून देतो, म्हणून कायदा शिकायचा. पैसे कमावण्यासाठी कायद्याचेच काय पण कोणतेही औपचारिक शिक्षण आवश्यक नाही हे उदाहरणासह सिद्ध करायची गरज नाही. फक्त डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला बघा म्हणजे पैसा कुठे कुठे फिरतोय हे दिसेल. जो मनुष्य फक्त पैसा कमावण्यासाठी वकील बनतो तो वकील नव्हे!

-ॲड.बी.एस.मोरे©१९.१०.२०२०

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नैसर्गिक आविष्कार!

निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही!

(१) निसर्गातील देवाचा अर्क हाच निसर्गरूपाने प्रकट झालाय, सादर झालाय. हा आविष्कार म्हणजे त्या देवाची नैसर्गिक अभिव्यक्ती! गंमत अशी की निसर्गातील मूलद्रव्ये मानवी बुद्धीच्या  आकलनाला (विज्ञानाला) सापडली असली तरी निसर्गातील देवाचा तो अर्क किंवा प्रत्यक्षात  तो देव मात्र विज्ञानाला सापडला नाही. मग तो देव सापडत नाही म्हणून निसर्गाचा आविष्कार हेच सत्य आहे, नैसर्गिक आविष्काराच्या या सत्यामागे देवाचा अर्क, देव वगैरे काही नाही  असा निष्कर्ष काढून काही माणसे सरळ हात वर करून मोकळी होतात.

(२) निसर्गातील देव निसर्गात (विश्वात/सृष्टीत) किती गुणांत, किती आकारात, किती रंग व रूपात प्रकट, सादर, व्यक्त झालाय! केवढी प्रचंड ही निसर्गाच्या आविष्काराची अनेकता व विविधता! हा एवढा मोठा निसर्गाचा आविष्कार  माणसाला त्याच्या मेंदूत साठवून ठेवता येईल का? शेतातून जीवनावश्यक धान्य पिकणे, आकाशातून पाऊस पडणे, नद्या समुद्राला जाऊन मिळणे आणि एवढेच नव्हे तर मानवी भाषा, संस्कृती तिच्या वैविध्यपूर्ण रंगढंगाने, लकबीने काय नटणे, प्रादेशिक विविधतेचा या विविध मानवी संस्कृतीवर विविधांगी प्रभाव पडणे, हे सर्व मानवी मनाला अचंबित, चकित करून टाकणारे आहे. फेसबुकवर भारतातील विविध राज्यांतील माझे मित्र, मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे वेगवेगळे व्हिडिओज, चित्रे मला बघायला मिळतात. सद्या चाललेल्या नवरात्रोत्सवाचेच उदाहरण घ्या! देवीचा उत्सव एकच पण पश्चिम बंगाल, आसाम, गुजराथ, महाराष्ट्र या विविध राज्यांत देवीच्या या सणाचे वेगळेपण दिसते. अर्थात देशात हिंदू संस्कृती एक पण तिच्यातही विविध राज्यांची प्रादेशिक विविधता पहायला मिळते.

(३) अशा पर्यावरणीय परिस्थितीत मानवी मन निसर्ग आविष्काराच्या किती रूपात, किती रंगात, किती गुणांत समरस होणार व या सर्व विविधतेला स्वतःत सामावून घेऊन स्वतःचा कृत्रिम मानवी आविष्कार दाखविणार? असा मानवी आविष्कार, अभिव्यक्ती ही निसर्गाची नकल (कॉपी) असते. अशी नकल करायला पण अक्कल लागते. म्हणून जे जे मानवनिर्मित आहे ते ते नकली (कृत्रिम) आहे. निसर्गाच्या आविष्काराची नकल (कॉपी) करणे व अशा कृत्रिमतेतही निसर्गाची नैसर्गिकता कायम राखणे हे माणसापुढे निसर्गातील देवाने निर्माण केलेले मोठे आव्हान होय! निसर्गाचा विविधांगी आविष्कार मनात मुरवणे, अंगात जिरवणे ही काही सोपी गोष्ट नाही.

(४) निसर्गाची कृत्रिम नकल करताना निसर्गाची नैसर्गिकता या कृत्रिमतेतही कायम ठेवण्याचे आव्हान स्वीकारणारा माणूस या आव्हानात नेहमीच यशस्वी होईल असे नसते. म्हणून तर त्याचे वर्तन कधीकधी नैसर्गिक (नॉर्मल) ऐवजी अनैसर्गिक (अबनॉर्मल) होते. अशा अनैसर्गिक वर्तनाला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवून माणसाला कृत्रिम पण नैसर्गिक वर्तन करण्यास  भाग पाडण्यासाठी सुशिक्षित, सुसंस्कृत मानव समाजाने कायद्याच्या राज्याची निर्मिती केली आहे जी कृत्रिम असली तरी नैसर्गिक आहे. निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही हे सांगण्यासाठी तर माझा हा अभ्यासपूर्ण लेख आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

https://www.facebook.com/338024653358851/posts/958188094675834/

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

मानवी संबंधातील ओलावा व कोरडेपणा!

मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा!

लहानपणी आईवडिलांच्या छत्रछायेत वाढत असताना बहीण भावंडांत असलेला भावनिक ओलावा पुढे वय वाढत जाईल तसा कमीकमी होत जातो. लग्ने होऊन आपआपल्या संसारात पडल्यानंतर तर या भावनिक ओलाव्याचा प्रवास घट्ट, दाट ते पातळ असा होतो. आठवा ती लहानपणीची रक्षाबंधने, भाऊबीजेच्या ओवाळण्या व नंतर प्रौढपणीचे, वृध्दापकाळाचे बहीण भावातील भावनिक ओलावा जपणारे हेच सण! आईवडील दोघेही वारल्यावर तर मग रक्ताची नाती आणखी पातळ होत जातात. काही अपवाद असतीलही या अनुभवाला पण सर्वसाधारण अनुभव तर कालानुरूप होणाऱ्या भावनिक दुराव्याचाच असतो ना! अगोदरच दुरावलेल्या रक्ताच्या नात्यांत पुढे जेंव्हा व्यवहार आडवा येतो तेंव्हा तर अशा नातेसंबंधात खूप ताणतणाव निर्माण होतात. आईवडिलांच्या इस्टेटीची भावाबहिणीत वाटणी करताना तर भावनिक ओलाव्याची मोठी कसोटी लागते. रक्ताची नैसर्गिक नाती असोत की लग्नाची कृत्रिम नाती असोत, ही नाती इतर कारणांनी सुद्धा दुरावतात. नातेवाईकांतील कोणी त्याच्या स्वकर्तुत्वावर पुढे गेला की नातेवाईकांकडून त्याचे मनापासून कौतुक होण्याऐवजी असूया व तिरस्काराच्या नकारात्मक भावनेतून अशा नातेवाईकाबरोबर संपर्क कमी करीत त्याला दूर ठेवण्याचे (वाळीत टाकण्याचे) प्रकारही काही ठिकाणी होत असतात. अशा जळकुट्या नातेवाईकांकडून भावनिक ओलाव्याची अपेक्षा करणे हा शुद्ध मूर्खपणा! बाहेरच्या जगातही मानवी संबंध निर्माण होत असतात. पण त्यात जवळच्या नातेसंबंधासारखा भावनिक ओलावा नसतो. असे संबंध व्यावहारिक असतात जे कोरडे असतात. अशा व्यावहारिक संबंधात वस्तू व सेवांची व त्यासोबत पैशाची आर्थिक देवाणघेवाण होत असते तशी सत्तेची राजकीय देवाणघेवाणही होत असते. अशा व्यावहारिक संबंधात हृदयापेक्षा (भावनेपेक्षा) मेंदू (बुद्धी) महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. अशा संबंधात फायद्यातोट्याचा हिशोब असतो व अशा हिशोबातून निर्माण होणारा व्यावहारिक कोरडेपणा असतो. भावनिक ओलाव्याचा अंश नगण्य असल्याने असे कोरडे व्यावहारिक संबंध बिघडण्याची शक्यता मोठी असते. गरज सरो व वैद्य मरो असाच काहीसा प्रकार अशा व्यावहारिक संबंधात असतो. म्हणून तर अशा कोरड्या व्यावहारिक संबंधाना नियंत्रित करणे ही सरकारची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी तर सरकारी कायदे असतात. माझा हा लेख मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा या विषयापुरताच मर्यादित आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!

निसर्गातील देव दिसत नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याला समोरासमोर नमस्कार करता येत नाही. परंतु निसर्गातील देवत्व मात्र प्रत्यक्षात दिसते, प्रत्यक्षात अनुभवता येते. पण हे देवत्व निसर्गातील दलदलीवर उभे आहे, त्या दलदलीला चिकटलेले आहे हेही सत्य आहे. याचा अर्थ हाच की देवाचा स्वर्ग राक्षसाच्या नरकाला चिकटलेला आहे. उदा. चिखलातून कमळ उमलते, काटेरी झुडुपाला गुलाबाची फुले येतात, लैंगिक वासनेतून प्रेमाचा अंकुर फुटतो. चिखल, काटे, लैंगिक वासनेचा अंगार यांना मी राक्षसी नरक म्हणतो तर अनुक्रमे कमळ, गुलाब, प्रेम यांना मी देवाचा स्वर्ग असे म्हणतो. या स्वर्गातच देवत्व दिसते, अनुभवता येते. पण निसर्गाची रचनाच अशी की देवत्वाचे निर्माण हे राक्षसी नरकातून, दलदलीतून होते. माझी पत्नी स्वैपाकघरात अन्नपदार्थ बनवून जेंव्हा माझ्यापुढे जेवणाचे ताट आणून ठेवते तेंव्हा जणूकाही अन्नपूर्णा देवीने प्रसन्न होऊन माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला अन्नदान केले असे वाटते व ताटातील अन्नपदार्थांत मला देवाचे देवत्व दिसते. मग मी माझे जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटाला नमस्कार करून जेवण सुरू करतो. माझा तो नमस्कार निसर्गातील देवाला असतो. कच्चे अन्नपदार्थ शिजवून खाण्यायोग्य व चवदार बनविणे ही एक सुंदर निर्मिती प्रक्रिया आहे. या सुंदरतेच्या नवनिर्माण प्रक्रियेत देवत्व असते व तेच देवत्व सुंदर नवनिर्मितीत उतरलेले असते. पण निसर्गात देवत्व शोधणे, स्वतःच्या मनात देवाला जाणून ते देवत्व स्वतःच्या परिश्रमाने निर्माण करणे व टिकविणे हे एक फार मोठे आव्हान असते. दलदलीचा राक्षस या देवत्व निर्मितीच्या व टिकविण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण करतो. त्या राक्षसी दलदलीने भरलेल्या अडचणींवर मात करून दलदलीत राहणाऱ्या राक्षसाला नामोहरम करणे, त्याला हरवणे हे फार मोठे आव्हान निसर्गातील अदृश्य देवाने माणसापुढे उभे केले आहे. सुंदर देवत्व निर्मितीचे हे आव्हान देवाने माणसापुढेच उभे केले आहे, जंगली जनावरांपुढे नव्हे. जंगली जनावरांना जंगली वागण्यासाठी देवाने मुक्त ठेवलेय. त्या जंगली जनावरांची ती नरकातली मुक्ती म्हणजे माणसांना कायम डोकेदुखी! ही डोकेदुखी म्हणजे दलदलीतून देवत्व निर्मितीचे माणसापुढे देवाने उभे केलेले मोठे आव्हान होय! दलदल ही केवळ जंगली जनावरांच्या जंगलीपणातच नसते. ती माणसांतल्या वाईट, दुष्ट प्रवृत्तीतही असते. खून, बलात्कार, चोऱ्या, दरोडे यासारखे गुन्हे करणारी जंगली माणसे, भ्रष्टाचार करणारी व तसेच दुसऱ्याच्या सुंदर नवनिर्मितीच्या कर्तुत्वावर जळणारी व त्या असूयेपोटी नातेसंबंधात विष कालवणारी दुष्ट, हलकट प्रवृत्तीची अर्धजंगली माणसे ही तर फार जवळ चिकटलेली दलदल होय. अशा माणसांना सरळ जंगलात नेऊनही सोडता येत नाही. देवत्वाची आवड असलेल्या चांगल्या माणसांना या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांसोबतच जगावे लागते. या बिकट परिस्थितीवर चिडून, त्रागा करून काही उपयोग नसतो. कमळाला चिखलासोबत व गुलाबांना काट्यांसोबत राहण्याशिवाय निसर्गाने की निसर्गातील अदृश्य देवाने पर्यायच ठेवला नाही. मग कमळाला चिखलावर व गुलाबाला काट्यांवर चिडून कसे चालेल? या त्रासदायक दलदलीच्या, काट्याच्या वास्तविक सत्याचा स्वीकार करून निसर्गातील सुंदरतेचा अर्थात देवत्वाचा अनुभव घेणे यातच कमळ व गुलाब यांचे हित आहे. माणसांनीही निसर्गाचे हे सार्वत्रिक कटू सत्य स्वीकारून त्यांच्या जीवनात देवत्वाचे निर्माण करण्याचा, ते देवत्व जगण्याचा व टिकविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न हीच निसर्गातील  देवाची देवपूजा होय! अशा देवपूजेतून देवत्व निर्माण करता येते व ते जगताही येते. प्रयत्नांती परमेश्वर ही मराठी म्हण बहुतेक या नैसर्गिक सत्यावर आधारित असावी.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

हिऱ्यांचे नशीब!

सगळ्याच हिऱ्यांच्या नशिबी चमकणे नसते!

सद्या गाजत असलेला दूरदर्शन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा हा खोटे खोटेच स्वतःला वर उंचावण्याच्या माणसाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा एक भाग आहे. पण शैक्षणिक पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे मिळवून का कोणी सुशिक्षित होतो? स्वतःचे खोटे सत्कार घडवून आणून का कुठे सामाजिक प्रतिष्ठा मिळते? इस्त्रीची पांढरीशुभ्र कपडे घालून का कुठे गुंड मवाली चारित्र्यवान होतात? समाजात असे कितीतरी हिरे आहेत की ज्यांना स्वतःवर पैलू पाडण्याची योग्य  संधी मिळत नाही व त्यांना कायम अंधारातच रहावे लागते. याचे एक कारण असेही आहे की, कृत्रिम प्रक्रियेने सोन्याचा मुलामा अंगावर चढवून तांबे, पितळ, लोखंड हे धातू सोन्याची खोटी चमक दाखवित अंधारात चाचपडणाऱ्या खऱ्या हिऱ्यांना वाकुल्या दाखवित खोट्या रूबाबात फिरत आहेत. अंधारात पडलेल्या हिऱ्यांची पारख करू शकणारे जवाहीर या हिऱ्यांच्या नशिबी येत नाहीत हे या हिऱ्यांचे दुर्दैवच होय! "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार, देवा अजब तुझे सरकार" असे म्हणतच हे अंधारात चाचपडणारे हिरे जगत असतात. फेसबुक, व्हॉटसॲप सारख्या समाजमाध्यमांवर स्वतःची सुंदर कलाकृती जशी सुंदर चित्रे, सुंदर गायन किंवा नृत्य, लेखन टाकून या माध्यमांवर कोणी कलेची, ज्ञानाची पारख असलेला जवाहीर मिळतोय का याची मोठ्या आशेने चाचपणी करीत या माध्यमांवर वावरणारी काही ज्ञानी,  गुणी मंडळी आहेत. सामान्य लाईक्सपेक्षा कोणी जवाहीर मिळतोय का याकडे त्यांचे लक्ष असते. पण या समाजमाध्यमावर हिऱ्यांची पारख असलेले जवाहीर असतील का याविषयी मला शंका आहे. हे जवाहीर समाजमाध्यमाच्या बाहेर राहून विमानातून प्रवास करीत हिऱ्यांचा शोध घेत फिरत असावेत! समाजमाध्यमांवरील कलाकारांची कला एखाद्या दर्दी माणसाच्या हृदयाला जाऊन भिडेल व मग त्या कलेचे चीज होईल या आशेने समाजमाध्यमी कलाकार मंडळी आपआपल्या कलेच्या चित्रफिती या समाजमाध्यमावर टाकत असतात. माझे लेखन हा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. पण गेल्या पाच वर्षातील माझ्या अखंडित फेसबुक लेखनाला एक पण मायका लाल जवाहीर भेटला नाही. मी मात्र दुसऱ्यांच्या लेखनाची, कलेची मनापासून प्रशंसा करीत अधूनमधून त्या गोष्टी माझ्या स्वतःच्या फेसबुक खात्यावर शेअर करीत असतो. पण माझ्या त्या वैयक्तिक कौतुकाशिवाय इतरांच्या त्या सुंदर कलाकृतीला खरा न्याय मिळत नाही. कारण हिऱ्यांची खरी पारख असलेले जवाहीर बाहेरच विमानातून फिरत असतात. ते समाजमाध्यमात घुटमळत नसतात.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

बौद्धिक कौशल्याने व्हा ज्ञानबेटाचे राजे!

बौद्धिक कौशल्याशिवाय ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही!

माहिती, ज्ञान व कौशल्य असे बौध्दिक प्रगतीचे तीन टप्पे असतात. निसर्गाचे ज्ञान हेच विज्ञान! हे विज्ञान म्हणजे महासागर! या महासागराची वरवरची माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती ही मनाची प्राथमिक जाणीव असते. ही जाणीव प्रगल्भ होण्यासाठी अर्थात माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी बुद्धीला त्या माहितीवर काम करावे लागते. महासागर लांबून दिसतो तसा नसतो जसा उंच डोंगर लांबून दिसतो तसा नसतो. म्हणून दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. महासागरात लांब गेल्यावर व डोंगरावर उंच गेल्यावर जे प्रत्यक्षात दिसते व अनुभवास येते त्याला ज्ञान म्हणतात. माहितीचे रूपांतर ज्ञानात अशाप्रकारे होते. चौकस बुद्धी नुसत्या माहितीवर गप्प बसत नाही. ती माहितीच्या अधिक खोलात जाते व माहितीतून ज्ञान बाहेर काढते. ज्ञान म्हणजे माहितीचे ताक घुसळून बाहेर काढलेला लोण्याचा गोळा होय. पण नुसते ज्ञान जवळ असून फार उपयोग नसतो. बुद्धीला त्या ज्ञानाचा सराव केल्याशिवाय त्यात कौशल्य प्राप्त करता येत नाही. ज्ञानात बौद्धिक कौशल्य नसेल तर कृती सहज व उत्कृष्ट होऊ शकत नाही. निसर्ग विज्ञानात असलेल्या अनेक ज्ञानशाखा ही ज्ञानाच्या महासागरातील विविध ज्ञान बेटे होत. या ज्ञान बेटांचे राजे होण्यासाठी एखादे बेट निवडून त्या बेटावरील पर्यावरण आत्मसात करून त्यावर बुद्धीचे प्रभुत्व प्राप्त करावे लागते. बेटावरील पर्यावरणाच्या ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय अशा निवडलेल्या बेटाचे राजेपण प्राप्त होत नाही. कला, क्रीडा, वैद्यक शास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, धर्म, अर्थकारण, राजकारण अशा कितीतरी ज्ञानशाखा मानवी बुद्धीला निसर्ग विज्ञानातून सापडल्या आहेत. या सर्व ज्ञान शाखांत कौशल्य प्राप्त करणे मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या वैयक्तिक  आवडीनुसार व बौद्धिक गतीनुसार निरनिराळी माणसे विविध ज्ञान शाखांतून विशेष प्रावीण्य मिळवित चित्रपट अभिनेते, संगीतकार, गायक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए., व्यवस्थापक, शिक्षक, अर्थकारणी, राजकारणी होतात. ही सर्व तज्ज्ञ मंडळी फक्त त्यांच्याच ज्ञान शाखेत तज्ज्ञ असतात. इतरांच्या ज्ञान शाखा म्हणजे त्यांच्यासाठी वरवरची माहिती असते किंवा त्यांच्याविषयी त्यांना फार जुजबी ज्ञान असते. सर्वसामान्य माणसे निरनिराळ्या ज्ञान शाखांच्या फक्त माहितीवर किंवा जुजबी ज्ञानावर जगत असतात. पण सामान्य ज्ञान व सर्वसाधारण अक्कल (कॉमन सेन्स) ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे, मग तो माणूस तज्ज्ञ असो की सर्वसामान्य माणूस असो. माहिती, ज्ञान व कौशल्य या तीन पायऱ्या पार केल्याशिवाय बुद्धीला पर्यावरणातील पदार्थांना, प्राणीमात्रांना व माणसांना योग्य प्रतिसाद देता येत नाही. उदा. एखादी व्यक्ती ही अन्नावाचून उपाशी आहे व तिला तुम्ही अन्न देण्याऐवजी आध्यात्मिक भक्तीमार्ग शिकवताय हा प्रतिसाद योग्य होईल का? तुम्ही योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपर्कात येणाऱ्या पदार्थ, प्राणी व माणसांविषयी अगोदर माहिती व नंतर सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच तुमची अशा पदार्थ, प्राणी व माणसांबरोबर व्यावहारिक देवाणघेवाण शक्य आहे. फेसबुकवर तुमचे मित्र झालेल्या किती लोकांविषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे? त्यांच्याविषयी ज्ञान असणे हा तर खूप पुढचा भाग झाला. मग अशा जवळजवळ अनोळखी असलेल्या व्यक्तीं बरोबर किती संपर्क ठेवायचा, त्यांच्याबरोबर एखाद्या विषयावर किती वादविवाद घालायचे हे तुमच्या बुद्धीला कळले पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रथम माहिती मिळवा, नंतर सखोल अभ्यासाने त्या माहितीतले ज्ञान मिळवा व नंतर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करून त्यात बौद्धिक कौशल्य प्राप्त करा. कारण तुमचे बौद्धिक कौशल्य तुम्हाला तुमच्या कृतीत आत्मविश्वास व सहजता प्राप्त करून देते. ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय त्या ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.१०.२०२०

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०

१४ आॕक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.

(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.

(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा  मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.

(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.

(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या  एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०


मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

देव, दानव, मानव!

देव, दानव, मानव!

नुसत्या आध्यात्मिक धर्माला कवटाळून देवाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही देव नाही व नुसत्या भौतिक विज्ञानाला कवटाळून मनगटाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही दानव नाही, देवाची आध्यात्मिक मनःशक्ती व निसर्गाची भौतिक शरीर शक्ती या दोन्ही शक्तींना सोबत घेऊन सारासार विचार करणाऱ्या बुद्धीच्या जोरावर जगावर राज्य करणारा माणूस हा देव नाही की दानव नाही तर तो फक्त माणूस आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

मॉडर्न आर्ट

मॉडर्न आर्ट!

परिपूर्णतेचा ध्यास व नीटनेटकेपणाची सवय पुढे पुढे त्रासदायक होते. हे आहे माझे बाथरूम जिथे मी दररोज अंघोळ करतो. साधेच आहे पण जमेल तेवढे स्वच्छ ठेवण्याचा बायको प्रयत्न करते. अंघोळ करताना बाथरूम मध्ये ठेवलेल्या या निळ्या रंगाच्या पाण्याच्या पिंपावर असलेले हे डाग पुसण्याचा मी अधूनमधून उगाच निरर्थक प्रयत्न करतो. कालानुरूप पिंपाचा निळा रंग उडणे व बाथरूम सिलिंगला मागे पांढरा रंग लावताना त्या पिंपावर पडलेले पांढऱ्या रंगाचे डाग पिंपावर तसेच राहणे ही गोष्ट नॉर्मलच! पण माझा काटेकोरपणा मला आडवा येतो. ते डाग साबणाने धुवून किंवा ब्रशने घासून सुद्धा निघणार नाहीत हे मनाला कळत असूनही अंघोळ करताना मला हे डाग दिसले की जाम त्रास होतो. मग त्यावर हात फिरव, पाणी टाक असले प्रकार मी करतो. यालाच मंत्रचळ (ओसीडी) असे म्हणतात. हा सौम्य मानसिक आजारच आहे. त्यावर मी माझ्या विचारांनीच मात करीत आलोय. माझे काटेकोरपणाचे किंवा नीटनेटकेपणाचे विचार मला अंघोळ करण्याच्या कृतीवर लक्ष एकाग्र करू देत नाहीत. त्या विचारांच्या प्रवाहातून लक्ष पुनःपुन्हा अंघोळीच्या कृतीवर आणताना मी चाचपडतो. माझे मन अंघोळीऐवजी त्या पाण्याच्या पिंपावरील डागांवरच सारखे सारखे गेल्याने मी स्वतःच स्वतःवर चिडतो. त्यामुळे अंघोळ क्रिया पूर्ण करण्यासाठी मला जास्त वेळ लागतो. मग मी सजग होतो व निरर्थक कृतीत वेळ वाया घालवू नकोस असे स्वतःला बजावतो. आज शेवटी मनाला समजावले की बाबारे, हे असेच असते. जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते. या पिंपावर जे डाग आहेत ना त्यांना तू मॉडर्न आर्ट समज. मॉडर्न आर्ट मधील त्या उभ्या आडव्या रंगरेषा तूला समजल्यात का कधी? मग तसेच या पिंपावरील न पुसल्या जाणाऱ्या डागांना समज आणि त्यांच्याकडे मॉडर्न आर्टच्या नजरेने बघत मस्त अंघोळ कर. अगदी खरंच सांगतोय! मी आज असा नवीन दृष्टिकोन स्वीकारूनच मस्त शांतपणे अंघोळ केली. फुकट डोक्याला तापच नको त्या जुनाट काटेकोरपणे, नीटनेटकेपणाने राहण्याच्या सवयीचा! अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आल्यावर मग मात्र डोक्यात विचार आला की, यालाच बदल म्हणायचा का? खरं तर, बदल हा झालाच नव्हता. फक्त आहे त्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघायचे ठरवले एवढेच! फक्त दृष्टी बदलायची आणि बदल झालाय असे खोटे खोटे मनाला पटवायचे आणि अशाप्रकारे मनाला शांत करायचे. खरंच, हे मन म्हणजे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

माणूस व निसर्ग!

माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार झाला आणि निसर्ग हात चोळत बसला?

सृष्टीला रचतानाच सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी सृष्टी व्यवस्था निर्माण करून तुमचे जीवन-तुमची जबाबदारी असे सजीवांना सांगून निसर्ग हात झटकून मोकळा झाला. मग माणसाने पुढे होऊन ती जबाबदारी अंगावर घेत निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी व सृष्टी व्यवस्था स्वतःच्या दावणीला बांधत स्वतःला सोयीस्कर वाटणारा स्वतःच्या फायद्याचा कायदा त्या मूळ व्यवस्थेतूनच निर्माण केला व त्या कायद्याच्या जिवावर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे म्हणत हा माणूस निसर्गाला वाकुल्या दाखवत बसला. हे बघून, कशाला हा असला माणूस मी बनवला असे म्हणत निसर्ग हात चोळत बसला असेल. वैतागून हात चोळता चोळता निसर्गाला स्वतःच्याच चुकीचा राग आला की मग अवर्षण, अतीवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा मारा निसर्ग त्यानेच निर्माण केलेल्या माणसांवर करतो. कोरोना विषाणू हा त्यातलाच एक प्रकार! पण माणूस महावस्ताद! तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर असल्या नैसर्गिक आपत्तींनाही तोंड देतो व फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने झेप घेतो. खरंच काय बरे वाटत असेल निसर्गाला की निसर्गातील देवाला या असल्या माणसाकडे बघून?

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

गाठ पडली ठका ठका!

गाठ पडली ठका ठका!

राजकारण, धर्म, जात हे विषय हल्ली फारच धोक्याचे वाटू लागलेत. लोक खूप संवेदनशील असतात या विषयांवर! म्हणून हल्ली मी या विषयांवर सावधपणे व्यक्त होतोय. यात वाद वाढत गेले तर लोक भावनातिरेकाने जीव घ्यायला कमी करीत नाहीत. हे समाजमाध्यम आहे. हितशत्रू लोक प्रतिक्रिया देत नसतीलही पण गुपचूप तुमच्या लिखाणाचे वाचन करीत नसतील कशावरून? मी पूर्वी खूप सडेतोड लिहायचो. पण हल्ली तसले रोखठोक लिखाण कमी केलेय. आपण पोटतिडकीने लिहून काही उपयोग नाही हे कळून चुकलेय. माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या चाव्या मोठ्या लोकांच्याच हातात आहेत हेच खरे! त्यांना राग आला तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिलटा सारखे चिरडून मारतील हे सत्य लक्षात घेऊन हळूहळू सावध लिहायला, सावध प्रतिक्रिया द्यायला शिकत चाललोय. काही धूर्त मंडळी ही खूप हुशार, कावेबाज, दगाबाज असतात. ज्या गोष्टी मला या ६४ वयात कळू लागल्यात त्या काही लोकांना तरूणपणातच त्यांच्या घरातूनच कळलेल्या असतात. त्यामुळे मध्यम वयातच अशा व्यक्ती व्यवहार चतुर झालेल्या असतात. त्यांच्यापुढे या उतार वयात मी शहाणपणाचा आव आणून समीक्षा करणे हा मूर्खपणा होय! म्हणून माझे सामान्य जीवन आनंदात व शांतीत जगण्याचा प्रयत्न करतोय. जवळ नुसते ज्ञान असून उपयोग नसतो. इतरही बऱ्याच गोष्टी जवळ लागतात मोठी हिंमत करायला. त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे स्वतःचा वकूब बघून वागायला हवे. नाहीतर गाठ पडली ठका ठका असे व्हायचे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.१०.२०२०

विविधता, समरसता, सहजता, समता!

विविधतेत समरसता व सहजता आहे, पण समता (समानता) नाही!

(१) मानव समाजात माणसे सारखी का वागत नाहीत हा मला सतावणारा एक वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न! माणसे व त्यांची माणुसकी हा सुद्धा याच प्रश्नाला चिकटलेला दुसरा एक प्रश्न! माणसे इथून तिथून सारखीच! समता व बंधुत्व हे शब्द किती गोड! मन प्रसन्न होऊन जाते हे शब्द ऐकताना, वाचताना. पण हे खरेच असे आहे का?

(२) माणसे इथून तिथून सारखीच, त्यांच्या  सभोवतालचे नैसर्गिक पर्यावरण सारखेच, त्यांच्यावर असलेला निसर्गाचा प्रभाव पण सारखाच, पण या सारखेपणात जगणाऱ्या  माणसांचे विचार व वर्तन सारखे का नाही हा मला सारखा सतावणारा मूलभूत वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न!

(३) मग वरील प्रश्नातून बाहेर पडलेला माझा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने माणसांना दिलेली शरीरे व वासना-भावना-बुद्धी या तिन्हींचा संगम असलेली मने सारखी नाहीत का? मग आणखी पुढे पडणारा प्रश्न हा की, निसर्गाने सृष्टीत जशी विविधता निर्माण केलीय तशी माणसांच्या शरीर व मनातही विविधता निर्माण केलीय का? मग वरील विचारातून पडणारा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने जर सृष्टीप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केली असेल तर मग त्यांच्यात समानता कुठून येणार?

(४) वरील प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मला कळलेले नैसर्गिक सत्य हे आहे की, निसर्गाने माणसे अगदी तंतोतंत सारखी केली नाहीत. म्हणून तर मराठीत एक म्हण आहे की हात एक असला तरी हाताची सर्व बोटे सारखी नसतात. निसर्गाने सृष्टीच्या रचनेप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केलीय आणि म्हणून तर माणसांचे धर्म सारखे नाहीत, त्यांच्या भाषा सारख्या नाहीत, त्यांच्या संस्कृती सारख्या नाहीत. निसर्गाने जर सृष्टीप्रमाणेच विविधता प्रधान रचना माणसांतही निर्माण केली आहे तर मग त्यांच्यात समानता कुठून आणणार?

(५) विविधतेने नटलेल्या सृष्टीत समरसता आहे म्हणजे सृष्टीतील विविध आकारी, विविध गुणधर्मी पदार्थ एकमेकांशी समरसतेच्या एका समान धाग्याने बांधले आहेत, ते समरसतेच्या धाग्याने एकमेकांशी निगडीत आहेत. अशा विविध पदार्थांना एकमेकांशी जोडणारा हा समरसतेचा धागा समान असला तरी या विविध  पदार्थांत व त्यांच्या समरसी देवाणघेवाणीच्या जोडणीत समानता नाही अर्थात सर्वांना ५०ः५० टक्के असा समान न्याय नाही.

(६) वरील नैसर्गिक सत्य लक्षात घेऊन भारतीय   संविधानात वाजवी वर्गीकरण (reasonable classification) व त्याबरोबर वाजवी बंधने (reasonable restrictions) या महत्वाच्या तरतूदींचा समावेश केला आहे. या तरतूदी या मूलभूत नैसर्गिक तरतूदी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याच तरतूदीनुसार समान काम, समान वेतन व असमान काम, असमान वेतन हे मूलभूत नैसर्गिक तत्व मानवी श्रम कायद्यात समाविष्ट केले आहे. म्हणून तर औद्योगिक कारखान्यात व्यवस्थापक व कामगार यांच्या पगारात तफावत असते. याच नैसर्गिक तत्वाने समान वर्तणूकीला समान कायदा व असमान वर्तणूकीला असमान कायदा हे नैसर्गिक तत्व अधोरेखित होते.

(७) या लेखाचा सार हाच आहे की, माणसांनी कितीही ठरवले तरी त्यांच्यात पूर्ण समानता निर्माण होणे केवळ अशक्य आहे. समानतेचा असा कायदा करून का मानव समाजात अशी ओढूनताणून कृत्रिमपणे पूर्ण समानता निर्माण करता येऊ शकेल? अशा कृत्रिम समानतेत नैसर्गिक सहजता कशी असेल? साम्यवाद जर अशा कृत्रिम समानतेचा आग्रह धरीत असेल तर तो आग्रह अनैसर्गिक होय. म्हणून नैसर्गिक विविधता, समरसता, सहजता, पदार्थांतील मोजकी समानता (समता) व त्यासोबत सर्व विविध पदार्थांतील असमानता (असमता) ही नैसर्गिक तथ्ये व सत्ये नीट समजून घेतली पाहिजेत.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.१०.२०२०

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

हळदी कुंकू!

हळदी कुंकू!

हळदी कुंकू म्हणजे पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण.... 

हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बरं वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही.

ज्या सणामध्ये पती मयत झालेल्या स्त्रिया, शहीद जवानांच्याच्या वीर पत्नी व आत्महत्या शेतकर्‍यांच्या पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही. संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदी कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून थटून एकमेकींना हळदी कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी कुंकू त्याच स्त्रिया लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.

देशाच्या सिमेवर शहीद झालेल्या वीर पत्नीला कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटूनथटून तुम्ही हळदीकुंकू समारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत त्यांच्या मनात सतत येत असते माझे पती असते तर मीही अशी नटली असते. फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू विषयावर मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? सतत त्यांना हेतू पुरस्सर अपमानीत केल जाते. का यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारा सण असू शकत नाही का? कोणत्या शुभ कार्यात त्यांना पुढे येऊन देत नाही. ती चुकून त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावले जाते. असं का  अपमानीत जीवन जगायचे. 

"नवरा असणे" हाच केंद्रबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का? खरंतर जास्तीची भावनिक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेंव्हा अपमानीत न करता त्यांना सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.

पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा अजून किती काळ चालू ठेवायच्या? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ 'विषमतेला' खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षे पाळायचे ? पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त 'सौभाग्यवती भवः' असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!

वर्षानुवर्षे चालत आलेल्या या मानसिक गुलामगिरीचं काय? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय?  मूग गिळून गप्प बसणार का ?
आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू?

शिकलेला स्त्री, पुरुष समाज आपल्या परिवार, समाजाला अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नाही त्या शिक्षणाचे काय उपयोग? शिक्षण याला म्हणावे जे घेतल्यानंतर चांगले वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करतो.आता आपण बदलायला हवं. नवरा नसलेल्या स्रीलाही सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे.

साभार🙏

(फेसबुक कॉपी पेस्ट)

एकाकीपणा!

आयुष्याच्या अखेरीस येणारे एकटेपणाचे दुःख भयंकर!

आज दिनांक ११.१०.२०२० च्या रविवारच्या लोकसत्तेत आयुष्याच्या अखेरीस एकाकीपणा असह्य झाल्याने अरण्य जीवनावर सतत लेखन करणारे प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांना नागपूर सोडून सोलापूरला स्थलांतर करावे लागले ही बातमी वाचून काळजात धस्स झाले. आधी त्यांची पत्नी गेली, मग मुलगीही काळाने हिरावून नेली. मग लेखकाची वैयक्तिक  काळजी घ्यायला घरी कोणीच नाही. बाहेरून भरपूर मानसन्मान मिळवलेले. पण बाहेरची मंडळी वैयक्तिक काळजी घ्यायला घरी रहात नाहीत. बायको नाही, मुलगी नाही. मग घरात एकटेच मरून पडू की काय ही भीती मनाला सतत सतावू लागली. आयुष्याच्या अखेरीस आलेला हा एकाकीपणा खायला उठला. म्हणून शेवटी नागपूर ही कर्मभूमी सोडून चितमपल्ली यांनी सोलापूरला जायचे ठरवले. कारण काय तर तिथे त्यांचा पुतण्या आहे म्हणून. शेवटी काय तर बाहेरची माणसे तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्यावर माया प्रेम करणारी तुमची जवळची माणसेच तुमच्या उपयोगाला येतात. असे नातेवाईक आयुष्यात शेवटपर्यंत जवळ असणे हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे हेच वरील उदाहरणावरून सिद्ध होते. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचा फायदा आहे तोपर्यंतच बाहेरचे लोक तुमच्या अवती भोवती घुटमळतील. वयानुसार तुम्ही त्यांना निरूपयोगी झालात की तुमचे कौतुक करणारी हीच मंडळी तुम्हाला टाटा, बाय बाय करून दूर निघून जातील. म्हणून सार्वजनिक लोकप्रियता, घराबाहेर मिळणारा मानसन्मान याची नशा डोक्यात शिरू देऊ नका. हा खेळ क्षणिक असतो. आयुष्याच्या अखेरीस जेंव्हा शरीर थकते व मन खचते तेंव्हा या खेळातील हवा फुस्स होते. दुसरे एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक वयस्कर पुरूष क्लायंट आहे. भरपूर पैसा जवळ, मुंबईत आलिशान फ्लॅट पण पैशाच्या मस्तीत राहून लग्न केले नाही. मुंबईतील मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आता एकटाच राहतोय. पण पैशाच्या मस्तीत सगळे जवळचे, लांबचे नातेवाईक दूर ठेवले. आता आयुष्याच्या अखेरीस जवळ कोणीच नाही. त्याने लग्न केले असते तर त्याच्या जवळ निदान बायको, मुले तरी असती त्याची काळजी घ्यायला. कोरोना लॉकडाऊन काळात तर या जीवघेण्या एकाकीपणामुळे त्याची हालत खूप खराब झाली. एकही नातेवाईक जवळ आला नाही. पैशाला मिठीत घेऊन जग आता शेवटचे आयुष्य असे ते म्हणाले. शेवटी एका मित्रालाच त्याची दया आली. तो मित्र पैशाने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. तो मित्र दररोज माझ्या या श्रीमंत क्लायंटच्या फ्लॅटवर दोन्ही वेळचे जेवण सकाळच्या नाष्ट्यासह आणून देतो. त्याचे पैसे मात्र घेत नाही. इथे तो पैसा किती भिकारी झाला बरे! अहो पण नुसते जेवण पुरेसे नसते आयुष्याच्या अखेरीस! मायाप्रेमाची माणसे जवळ लागतात तुमची आपुलकीने वैयक्तिक काळजी घेण्यासाठी! लोकप्रियता मिळवलेले मारूती चितमपल्ली व माझा श्रीमंत क्लायट यांची ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. अखेरच्या आयुष्यात लोकप्रियता कामी आली नाही व पैसाही कामी आला नाही. फौजदारी  कायद्यात एकांतवासाची शिक्षा (solitary confinement) ही फार भयंकर मानली जाते. एकटेपणा हा खायला उठतो. म्हणून हजारो, लाखो लोकांची लोकप्रियता तुम्ही नाही मिळवली तरी चालेल पण मरेपर्यंत तुमची काळजी घेणारी मायाप्रेमाची थोडी जरी माणसे मिळवलीत तरी खूप मिळवलेत. विवाहसंस्था ही या दृष्टीने अत्यंत मोलाचे काम करीत आहे. आयुष्यातील तिचे महत्त्व जाणा! जीवनभर तुमची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार व तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुले व तसेच आपुलकीचे नातेवाईक हीच जगातील तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे हे कायम ध्यानात ठेवा! वरील दोन उदाहरणातून मला बस्स एवढेच सांगायचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.१०.२०२०