https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १२ मार्च, २०२४

लग्ने जमवताना सावधान!

लग्ने जमवताना सावधान!

समाजमाध्यम बंद करण्यापूर्वी एक नमुना हाही वाचा. आमच्या शेजारी एका सोसायटीत घडलेली लग्नाची ही सत्य घटना. हिंदू मराठा मुलगी दिसायला गोरी, गोमटी छान, सुंदर. शिक्षण बी.काॕम. खाजगी कंपनीत अकौंटंटची नोकरी महिना ३०००० रूपये पगार. तिच्या आईवडिलांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या मार्फत एल.आय.सी. सरकारी कंपनीतला एम.काॕम. शिकलेला व महिना ५०००० रू. पगारवाला नवरा मुलगा मुंबईत बघितला. पण मुलगी सहा महिनेही तिथे नांदली नाही. नवरा फारच कंजूष आहे हे कारण घेऊन आईवडिलांकडे परत आली व घटस्फोट घेऊन रिकामी झाली. तिचे आईवडील त्या नातेवाईकाला आता सारख्या शिव्या देत आहेत की त्याच्यामुळेच त्यांच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाले. 

मग ती घटस्फोटित मुलगी एक वर्ष घरी बसल्यावर तिच्या आईने तिच्या ओळखीच्या मैत्रिणी मार्फत एक घटस्फोटित मुलगा बघितला. तो पण एम.एस्सी. व चांगल्या खाजगी कंपनीत महिना ६०००० रूपये पगारवाला होता. मग घटस्फोटित मुलीच्या आईने या घटस्फोटित मुलाबरोबर आपल्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न लावले. ही मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्या बरोबर चांगली दीड वर्षे नांदली. त्या काळात त्यांना एक मूल झाले (मुलगा). मात्र पुढे त्या नवरा बायकोची काही घरगुती कारणांवरून भांडणे होऊ लागली आणि एके दिवशी ती मुलगी त्या बाळाला घेऊन आईवडिलांच्या घरी परत आली ती कायमचीच. आता तिने दुसऱ्या घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केलाय. आणि त्या मुलीची आई तिच्या त्या मैत्रिणीला येता जाता सारखी शिव्या देत असते की त्या मैत्रिणी मुळेच तिच्या मुलीचे वाटोळे झाले.

आजूबाजूला अशा घटना घडताना बघून लोक सावध झालेत. माझ्या पुतण्याचा बायोडाटा आमच्याच सोसायटीतील दोघांकडे मी जेव्हा दिला तेव्हा त्यानी मला रिस्पेक्ट देण्यासाठी तो त्यांच्याकडे घेतला पण शेवटी हात झटकून मला वधूवर सूचक मंडळ बघा असा सल्ला दिला. हल्ली लोक इतरांची लग्ने जमवायला घाबरतात. कारण चांगले झाले तर आमच्या नशिबाने आणि वाईट झाले तर तुमच्यामुळे असाच लोकांचा पवित्रा असतो. 

गंमत ही की, वरील सत्य घटनेतील मुलीची आई फार देवभक्त. तिने मुलीच्या दोन्ही लग्नाच्या वेळी तिची सगळी कुलदैवते, ग्रामदैवते व इष्ट दैवते गोळा केली होती. पण या  सगळ्या देवदेवतांनी तिच्या मुलीच्या संसारावरून दोन वेळा चांगला नांगर फिरवला. म्हणून मी कधीही जास्त देवदेव करीत नाही. 

आमच्या घरातील देव्हाऱ्यात माझ्या व माझ्या बायकोच्या कोणत्याही कुलदैवताला व ग्रामदैवताला स्थान नाही. कारण मी काय किंवा माझी मुलगी काय आम्ही खूप मेहनतीने शिक्षण घेत असताना, स्वकर्तुत्वावर व्यवसाय, नोकरी करीत असताना व जीवनात आडव्या येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करीत असताना यातील कोणतेही देव आम्ही जवळ केले नव्हते. साडे नाही, ढवळस नाही की कुर्डु नाही आणि तिथले कोणतेही कुलदैवत किंवा ग्रामदैवत आमच्या घरात आम्ही जवळ केले नाहीत. अहो, लग्नातील सत्यनारायण पूजा सोडून नंतर कधी साधी सत्यनारायण पूजा मी माझ्या घरात घातली नाही. इतकी घरे बदललीत मी की प्रत्येक ठिकाणी सत्यनारायण पूजा घालीत बसलो असतो तर अनेक पूजा कराव्या लागल्या असत्या. मी कधीही श्रावण पाळत नाही की  गेल्या ३९ वर्षाच्या संसारात आम्ही कधी आमच्या घरात श्रावणातील सत्यनारायण पूजा घातली.

आमच्या घरात, देव्हाऱ्यात काही मुख्य देव आहेत ते म्हणजे गणपती, ब्रम्हा, विष्णू, महेशाचा एकावतार गुरूदेव दत्त (गुरू दत्तामध्ये शंकर असल्याने त्याची वेगळी पूजा नको), गुरूदेव दत्ताचाच अवतार ज्यांना समजले जाते ते श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी देवी (आम्ही एकच शक्ती मानतो व सरस्वती, पार्वतीला एकाच महालक्ष्मी देवीत बघतो) आणि माझ्या गावचा पंढरपूरचा विठ्ठल (पांडुरंग) या देवांनाच प्रमुख स्थान आहे. बाकी कुठल्याही कुळदैवत, ग्राम दैवत यांना आमच्या घरात स्थान नाही. कारण त्यांचे सोवळे ओवळे मोठे असते व ते आम्हाला जमणारे नाही, परवडणारे नाही. उगाच कोपले तर काय करायचे?

या उपदेवांची भीती आम्ही मनात कधी घेत नाही कारण मुख्य देव आमच्या सोबत असतात. बाकी मनुष्य जीवन आहे. संकटे येणार. आजार येणार. आता कोणी असेही म्हणेल की मी कुळदैवताला, ग्रामदैवताला जवळ न केल्यामुळे मला माझा विद्युत प्रवाह रोखणारा हार्ट ब्लॉक झाला. असे कोणाला वाटले तर माझ्यासमोर तसे काही बोलायची कोणाची हिंमत तर होणार नाही आणि झालीच तर त्याला मी सरळ म्हणेन बस रे बाबा आता आनंदाने टाळ्या वाजवत तुझ्या मानसिक समाधानात की कुठले तरी कुळदैवत, ग्रामदैवत माझ्या वर कोपले म्हणून. मला हार्ट ब्लॉक झालाय तो सहन करायला मी स्वतः समर्थ आहे व त्याने मला मरण आले तर ते स्वीकारायलाही मी समर्थ आहे. त्यासाठी कुठल्याही देवाची जपमाळ ओढत मी बसणार नाही.

मी हा असा आहे. माझा बापही असाच होता. आमचे हे असले विचार कोणाला पटावेत अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही. आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व गुणांचा काही फायदा वाटला तर त्याचा योग्य मोबदला देऊन जवळ या नाहीतर आमचा रस्ता वेगळा, तुमचा रस्ता वेगळा. लग्ने जमवताना मात्र सावधान कारण मुलीला माझ्यासारखा रोखठोक नवरा योगायोगाने मिळू शकतो आणि मग पटवून घेता आले नाही तर सोडून जावे लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), १३.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा