https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १३ मार्च, २०२४

किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य माणसांचे जीवन, किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य लोकांनी थोडे अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. काय करतोय आपण आयुष्यात याचे थोडे तरी मनन, चिंतन करावे. देवाच्या ध्यानधारणेपेक्षा वास्तव जीवनाचे हे मनन, चिंतन फार महत्त्वाचे आहे. या मनन, चिंतनात जगाच्या एकूण संपत्तीत लाखो, करोडो सर्वसामान्य लोकांचे भागभांडवल किती हे नीट समजून घ्यावे व मग मोठमोठ्या गोष्टींच्या हवेतील गप्पा माराव्यात.

खरं तर गरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना लहानपणापासून मर्मभेदी शिक्षण मिळतच नाही. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत गोल गोल फिरवत एवढा काही मसाला शिकवला जातो की विचारू नका. पण त्या ढीगभर मसाल्यात मर्मातल्या मूळ गोष्टी किती असतात? सर्वसामान्यांच्या मुलांना सुरूवातीपासूनच या गोष्टी शिकवल्या जात नाहीत कारण काय तर म्हणे बालबुद्धीला त्या झेपणार नाहीत? मग मोठ्या भांडवलदार व पॉवरफुल राजकारण्यांच्या मुलांना लहानपणापासूनच घरात बाळकडू दिले जाते ते मोठ्यांच्या त्या मुलांना कसे झेपते? ही मोठ्यांची मुले फक्त नावाला शाळा, कॉलेजात जातात. खरे शिक्षण त्यांना घरातूनच मिळत असते.

आयुष्यातील छोट्या गोष्टी कोणत्या व मोठ्या गोष्टी कोणत्या हे समजून घेऊन छोट्या गोष्टींना कमी वेळ व कमी शक्ती आणि मोठ्या गोष्टींना जास्त वेळ व जास्त शक्ती दिली गेली पाहिजे हे सर्वसामान्यांना कधी कळते? छोट्या गोष्टींतच आयुष्याचा मोठा काळ व मोठी शक्ती वाया घालवल्यावर म्हातारपणी हे कळते. पण तोपर्यंत आयुष्यातील अमूल्य वेळ टळून गेलेली असते.

जगातील मोठया गोष्टी ठराविक मोठ्या लोकांच्या ताब्यात का आहेत व त्या त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या कोणत्या ताकदीवर चालू राहिल्यात यातील वास्तव कधी समजून घेणार सर्वसामान्य माणसे? सर्वसामान्य माणसांना कायम छोट्या गोष्टींतच गुंतवून ठेवून मोठ्या गोष्टींचा विचार करण्याची सुद्धा संधी मिळू द्यायची नाही हा तर मोठ्यांचा मोठा गेम आहे जो पिढ्यानपिढ्या चालू आहे.

सर्वसामान्य माणसे म्हणजे मोठ्या लोकांच्या मोठ्या व्यवहारांत प्रत्यक्ष भाग न घेता त्यांचा फक्त हिशोब ठेवणारी हिशोबनीस माणसे. बँकेत रोखपाल (कॕशियर) काय करतो तर लोकांच्या नुसत्या नोटा मोजतो. पण त्या नोटांचा मालक तो असतो का? या नोटांतील मोठ्या गठ्ठ्याचे खरे मालक कोण असतात तर मोठे भांडवलदार व मोठे राजकारणी असतात. या रोखपालाला नोटा मोजण्याच्या कामाचा मासिक पगार किती दिला जातो? चिल्लर पगार असतो तो. कारण त्या नोटांमागील मोठ्या व्यवहारांत त्या रोखपालाचा सहभाग नसतो. नव्हे तशी संधीच त्याला मिळू दिली जात नाही. सर्वसामान्य गरिबांच्या उच्च शिक्षित मुलांच्या तोंडावर पैशाचे असे छोटे छोटे तुकडे फेकले जाऊन त्यांना मिंधे केले जाते, गुलाम केले जाते. गुलामगिरीचा घाऊक बाजार भरला आहे जगात मग ते भांडवलशाही देश असोत की साम्यवादी देश असोत.

ब्रिटिश लोकांची शिक्षण व्यवस्था ही भारतीयांना ब्रिटिशांचे गुलाम बनविण्याची शिक्षण व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थेत काही बदल झालाय का? कसला बदल आणि कसला विकास आणि कोणाचा विकास? मूठभर श्रीमंत भांडवलदारांचा विकास? का झाले सर्वसामान्य गरिबांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण महाग? गुलामगिरीच्या मानसिकतेतून, किड्या मुंग्यांच्या जीवनातून सर्वसामान्य माणसांना बाहेर काढणारे मर्मभेदी शिक्षण लहानपणापासून सर्वसामान्यांच्या मुलांना देण्याची मूलभूत गरज आहे. भारतीय राज्यघटनेनुसार हा शिक्षण हक्क सर्वसामान्य भारतीयांचा मूलभूत हक्क आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा