https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १० मार्च, २०२४

ज्येष्ठांनी पुढे पुढे करू नये!

ज्येष्ठांनी उतार वयात पुढे पुढे करू नये!

माझ्या वडिलांच्या पुढारपणाचे खंदे समर्थक असलेल्या विनायक मामाचे काय झाले? जिवंत आहेत पण वय झाल्याने आता ते कालबाह्य झालेत. जमाना बदललाय आणि काळाची सूत्रे नवीन पिढीच्या हाती आलीत. मग जुन्या पिढीला कोण विचारेल? हे सर्वसामान्य ज्येष्ठांचे वास्तव आहे. मोठ्या राजकारणी व भांडवलदार मंडळींचे काय? त्यांचे तरूणपण जसे हटके असते तसे त्यांचे वृद्धत्व पण हटके असते. त्यांच्या ज्येष्ठत्वात सुद्धा वेगळाच रूबाब असतो. ही बडी माणसे निसर्गाने म्हातारी केली तरी समाजातून ती कालबाह्य होत नाहीत हे विशेष. सर्वसामान्य ज्येष्ठ लोकांसाठी आयुष्याच्या आठवणी चघळत बसण्यासाठी ज्येष्ठ कट्टा असतो. तिथे बसण्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो. कारण त्यांच्या जुन्या आठवणींना कोणी विचारत नाही. तरूण पिढी तिच्याच विश्वात गुरफटलेली असते. तिला सामान्य ज्येष्ठांच्या सामान्य आठवणी व जुना अनुभव चालू काळात बिनकामाचा, बिनफायद्याचा वाटतो. यात त्यांचा तरी काय दोष म्हणा. त्यांना तरूण रक्ताचा जोश असतो. पण आपणही पुढे वृद्ध होणार आहोत याचा होश नसतो. पुढचे पुढे बघता येईल असा त्यांचा त्यांच्या वयाला साजेसा असा विचार असतो. जुन्या वस्तू, जुनी माणसे (मोठे राजकारणी व मोठे भांडवलदार सोडून) कालबाह्य होतात. हे वास्तव स्वीकारून ज्येष्ठ मंडळींनी तरूण पिढीच्या जास्त पुढे पुढे करू नये. त्यांना परिपक्व सल्ला देण्याचा तर कधी प्रयत्न करू नये. स्वतःचा आब राखून वृद्धत्व जगावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा