https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

चक्रव्यूह!

चक्रव्यूह!

जगात विविध पदार्थ, पशूपक्षी व माणसे यांची नुसती रेलचेल आहे. नुसत्या मनुष्याचा विचार केला तर पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या पदार्थ व जीवसृष्टीच्या पसाऱ्यात असंख्य माणसे दिसतात. या माणसांकडून त्यांच्या जैविक उपभोगासाठी सतत निर्माण होत जाणाऱ्या असंख्य वस्तू व सेवांची असंख्य उत्पादने दररोज निर्माण होतात. या उत्पादनांच्या विविध निर्मिती (उत्पादन) प्रक्रिया पहायला मिळतात. या सर्व उत्पादन प्रक्रिया राबवणारे मानव संचालित अनेक कारखाने दिसतात. या अनेक कारखान्यांचे श्रीमंत मालक व त्यात राबणारे असंख्य कामगार, कर्मचारी, व्यवस्थापक मंडळी दृष्टीस पडतात. या कारखान्यांतून दररोज बाहेर पडणाऱ्या उत्पादनांचा प्रचंड मोठा बाजार भरलेला दिसतो ज्यात अनेक व्यापार, धंदे, व्यवसाय, नोकऱ्यांचा सहभाग दिसतो. अनेक कारखाने व बाजारातील देवाणघेवाणीत प्रत्येक मानवी घटक त्याच्या आर्थिक उत्पन्न व खर्चाचे दैनंदिन व वार्षिक हिशोब ठेवताना दिसतो. मानवनिर्मित वस्तू  सेवांच्या विक्रीवर सरकार कडून वसूल करण्यात येणारा अप्रत्यक्ष कर व वस्तू सेवांच्या विक्रीनंतर अप्रत्यक्ष करासह सर्व खर्च वजा केल्यावर  शिल्लक राहिलेल्या नफ्यावरील सरकार कडून वसूल केला जाणारा प्रत्यक्ष कर या सर्व करवसूलीचा हिशोब सरकारला ठेवावा लागतोच पण जमा झालेल्या या करातून सार्वजनिक व्यवस्थेवर सरकारी खर्च किती झाला वगैरेचा हिशोबही सरकारला ठेवावा लागतो. या सर्व प्रचंड मोठ्या कारभारामागे असलेले  सामाजिक विज्ञान व या सामाजिक विज्ञानाचा पाया असलेले निसर्ग विज्ञान या दोन्ही विज्ञानांचा शाळा/कॉलेज मधून सखोल अभ्यास करून मग पुढे तरूण, प्रौढ व वृद्ध वयात या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करणे ही गोष्ट मानवी जीवनात असते. या सर्व मानवकृत गोष्टींवर देखरेख ठेवत त्यांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावणे हे महत्त्वाचे कार्य लोकनियुक्त सरकार कडून पार पाडले जाते. लोकांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावण्याचे कठीण काम सरकार नावाच्या माध्यमातून काही राजकारणी मंडळी पार पाडत असतात व त्यासाठी ही राजकारणी मंडळी धूर्तपणे लोकांना आश्वासने देऊन त्यांच्याकडून जबरदस्त मोबदला वसूल करतात. राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.  राजकारणात मोठी मेहनत, मोठी हुशारी व मोठी हिंमत या तिन्ही गोष्टी जवळ असाव्या लागतात. नुसत्या अर्थकारणात पैसा हे शक्तीशाली साधन मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात तर राजकारणात पैसा व सत्ता ही दोन्ही शक्तीशाली साधने मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात. शिक्षण व त्यानंतर शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अर्थकारण व राजकारण या दोन क्षेत्रांत या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव व शिक्षण घेण्याची व त्याचा असा सराव करण्याची ही सर्व धडपड, मेहनत लहानपणात, तरूणपणात व प्रौढावस्थेत शक्य होते. वृद्धापकाळी मात्र शरीर झिजून थकल्यामुळे, मेंदू विचार करून व बुद्धीचा सतत वापर करून शिणल्यामुळे व मन जगाचे रहाटगाडगे कळल्याने निरूत्साही, विरक्त झाल्यामुळे वरील धडपड, मेहनत या काळात अवघड होऊन बसते.

निसर्गाची विविधता ज्यात निसर्गाचे विविध सजीव, निर्जीव पदार्थ व त्यांच्या सक्रिय हालचालीचे विविध कायदेनियम या गोष्टींचा समावेश होतो या सर्वांचे मिळून विज्ञान बनते. या विज्ञानाचे ज्ञान मिळवून त्याचा प्रत्यक्ष सराव करणे म्हणजे विज्ञान शिक्षण व विज्ञान सराव या दोन गोष्टींनी मनुष्याचे आयुष्य व्यापलेले आहे. हा व्याप हे एक प्रचंड मोठे चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहात मनुष्य सापडलेला आहे. या चक्रव्यूहात निसर्गाच्या विविधतेने माणसापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. ही अनेक आव्हाने म्हणजे अनेक दिशांनी शरीर व मनावर येणारे अनेक बाण. हे अनेक आव्हान बाण झेलताना, त्यांच्याशी प्रत्यक्ष सामना करताना माणूस नावाच्या शूर वीर, योद्ध्याची तारांबळ उडते. चक्रव्यूह योद्धा भांबावतो, चक्रावतो, घाबरतो व अधूनमधून गोंधळून संभ्रमित, भ्रमिष्ट होतो. परंतु निसर्ग रचित हे चक्रव्यूहच असे आहे की माणसाला चक्रव्यूहातून पळ काढता येत नाही. त्याला शेवटपर्यंत लढत लढत या चक्रव्यूहातच मरावे लागते. हे लढणे जमत नाही म्हणून आत्महत्या करणे हा पळपुटेपणा झाला.

या चक्रव्यूहात लढताना अनेक आव्हान बाणांशी सामना करावा लागतो. पण असा सामना करताना परिपूर्णतेचा (परफेक्शन) अट्टाहास करणे हे मुळातच चुकीचे आहे. निसर्ग व त्याचे विज्ञान तरी कुठे परिपूर्ण (परफेक्ट) आहे. हे वास्तव लक्षात घेऊन परिपूर्णतेच्या मागे लागण्यात वेळ व शक्ती वाया घालवू नये. बऱ्याच वेळा "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवणे फायद्याचे ठरते कारण त्यातून निरर्थकपणावर वाया जाणारा वेळ व शक्ती वाचते. मन खोडकर आहे. ते निरर्थक गोष्टी जवळ करायला बघते. पण मनाच्या या खेळाला मनानेच आवर घालावा लागतो.

आता शेवटी परमेश्वर या संकल्पनेचा थोडक्यात विचार करूया. निसर्गाचा निर्माता कोणीतरी निसर्गाहून मोठा असा परमेश्वर आहे व त्याने निर्माण केलेल्या निसर्गाचा तोच नियंता आहे हे कोणालाही वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेले नाही. अध्यात्म परमेश्वराची दैवी अनुभूती व त्याच्या चमत्कारावर जोर देते. पण त्याचा वैज्ञानिक पुरावा देत नाही. त्यामुळे केवळ कोणीतरी त्याला आलेल्या दैवी चमत्कार किंवा अनुभूतीची गोष्ट सांगते (जी केवळ वैयक्तिक असते) म्हणून त्यावर आंधळ्यासारखा सर्वांनी विश्वास ठेवावा असे होऊ शकत नाही. या जगात परमेश्वर मानणारे अनेक आध्यात्मिक धर्म अस्तित्वात आहेत. या देवधर्मांची धार्मिक कर्मकांडे केल्याने कोणाला आध्यात्मिक शांती किंवा मानसिक समाधान मिळत असेल तर तो त्याचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. पण हा वैयक्तिक अनुभव सार्वजनिक अनुभव होऊ शकत नाही. म्हणून अध्यात्माला अर्थात देवधर्माला सार्वजनिक स्वरूप देणे हे मुळातच चुकीचे आहे. अदृश्य, अनाकलनीय, कल्पनेतल्या देवाच्या, परमेश्वराच्या पाठीमागे लागणे ही गोष्ट मृगजळाच्या किंवा पळत्याच्या पाठीमागे लागण्यासारखी आहे. हा एक मनाला सवय लावणारा मंत्रचळ आहे. तरी पण कोणाला असे करणे आवडतच असेल तर त्याला न दुखवता, न डिवचता खुशाल तसे करू द्यावे व याबाबतीत "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवावा.

माझा हा लेख म्हणजे मी जीवनात प्रत्यक्ष अनुभवलेल्या चक्रव्यूहाचा लेख आहे. तो सर्वांना भावेल, पटेल असे नाही व माझा तसा आग्रहही नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा