https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १ एप्रिल, २०२४

किचकट जीवन, कासावीस मन!

किचकट जीवन, कासावीस मन!

सृष्टीची रचनाच मुळात किचकट गुंतागुंतीची. तिचा मुळापासून अभ्यास करीत तिच्या शेपटाला येऊन पोहोचायचे ज्या शेपटीत सृष्टी रचनेत उत्क्रांत झालेल्या माणसाची पैदास वळवळ करताना दिसते. या वळवळीचा व सृष्टीच्या मुळाचा संबंध अभ्यासायचा. हा शैक्षणिक अभ्यास ज्याला ज्ञानप्राप्ती म्हणतात तो असतो अनाकलनीय सृष्टी निर्मात्याचा मानवी मनावरील बलात्कार. या प्रदीर्घ अभ्यासातून मिळवलेल्या ज्ञानाची आयुष्यभर उजळणी, सराव करीत रहाण्याची जबरदस्ती हा असतो त्या सृष्टी निर्मात्याचा मानवी शरीर मनावरील अत्याचार. किड्या मुंग्यासारखी माणसे सृष्टी रचनेच्या या शेपटीत जन्माला येतात, हा बलात्कार व अत्याचार सहन करीत वळवळ करतात आणि शेवटी मरतात. हे सहन करावेच लागते कारण हे भोग किचकट सृष्टी निर्माण करणाऱ्या सृष्टी निर्मात्याने माणसांवर लादले आहेत. तरीही काहींना हे असले बलात्कारी, अत्याचारी जीवन सोडता सोडवत नाही. मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांचा जीव कासावीस होतो. परंतु ही तर मृत्यू समयीची अवस्था झाली मानवी मनाची. पण संपूर्ण आयुष्यभर वळवळ करणारा माणूस खरंच त्याच्या वळवळीतून सुखी असतो का? त्याला या वळवळीतून खरंच शांती मिळते का? या भौतिक वळवळीला कारणीभूत असलेल्या परमेश्वराला (सृष्टी निर्मात्याला) आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघून का कधी आध्यात्मिक शांती मिळते? हे माझे वैज्ञानिक वास्तवावर आधारित वैयक्तिक भाष्य आहे. ते सर्वांना पटेलच असे नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा