https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २५ मे, २०२४

वास्तवात जगताना!

वास्तवात जगताना!

निसर्गाची विविधता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या विविधतेला निसर्गाच्या विविध ज्ञान शाखा चिकटलेल्या आहेत. माणूस त्याच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये या खालच्या पायरीपासून वरच्या पायरी पर्यंतच्या शैक्षणिक संस्थांतून या ज्ञान शाखांचे शिक्षण घेतो व पुढे तरूण, प्रौढ वयात या ज्ञानाचा वापर करून हळूहळू सरावाने त्यात विशेष प्रावीण्य, कौशल्य मिळवून तज्ज्ञ होतो. माणसे येतात, जातात पण नैसर्गिक विविधतेला चिकटलेल्या या ज्ञान शाखा व त्यांना संलग्न असलेल्या विविध शैक्षणिक संस्था व कार्यशाळा कायम राहतात.

माणसे निसर्गाच्या विविधतेचे ज्ञान मिळवून व त्यात कौशल्य प्राप्त करून या विविधतेची एकमेकांशी देवाणघेवाण करतात व निसर्गाचे वास्तव जगतात. ते जगण्यासाठी माणसे एकमेकांवर अवलंबून असतात व म्हणून तर विविधतेची आंतरमानवी देवाणघेवाण होते. माणूस स्वयंपूर्ण असता तर अशी देवाणघेवाण शक्य झाली नसती.

माणसे निसर्गाचे वैविध्यपूर्ण वास्तव जगताना त्यात काल्पनिक रंग भरून  हे वास्तव मनोरंजक करतात. हे वास्तव जगताना येणारा प्रत्यक्ष अनुभव व घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना माणसे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतात व त्यातून एकमेकांशी शाब्दिक संवाद साधतात. ही मानवी अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क कायद्याने काही अटी शर्तींसह मान्य केला आहे.

निसर्गाच्या वैविध्यपूर्ण वास्तवाचा अनुभव घेत माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अभिप्रेत आहे, जनावर म्हणून जगण्याचा नव्हे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा