https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ जुलै, २०२०

मोठ्यांच्या कळपात छोटे पाखरू!

मोठ्यांच्या कळपात छोटे पाखरू!

(१) सिनियर वकिलाच्या हाताखाली ज्यूनियर वकील म्हणून काम करीत असताना एका केसच्या निमित्ताने माझी मुंबईतील एका मोठ्या व्यापाऱ्याशी ओळख झाली. तो व्यापारी मोठा हौशी होता. क्लासिकल संगीताची त्यांना खूप आवड होती. ते व्यापारी स्वतः क्लासिकल गायक होते. एकदा त्यांनी मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलात त्याच्या संगीत मैफिलीत येण्याचे मला निमंत्रण दिले. त्या कार्यक्रमाचा पास मला दिला. माझे सिनियर वकील त्यावेळी त्यांच्या काही कामानिमित्त दिल्लीला जाणार होते तेंव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून बहुधा मला तो पास दिला असणार.

(२) मी आयुष्यात पंचतारांकित हॉटेलची पायरी चढली नव्हती. आता या कार्यक्रमाला जायचे म्हणजे अंगावर भारी कपडे हवेत. माझ्याकडे तर खूप साधे कपडे होते. माझ्या सिनियर वकिलाकडे कोर्टाच्या काळ्या कोटाबरोबर इतर वेगवेगळ्या रंगाचे भारी कोटस होते. भारी कार होती. माझ्याकडे कोर्टात घालायचा एकमेव काळा कोट होता. आता हा कोट घालून त्या कार्यक्रमाला जावे तर मोठी माणसे माझ्याकडे बघून हसतील. म्हणून काळा कोट घालण्याचा विचार सोडून दिला. मग घरातील इस्त्री केलेली पँट व शर्ट घालून घाबरतच त्या कार्यक्रमाला गेलो.

(३) लोकल ट्रेन व बसने प्रवास करीत मी त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या प्रवेश दारात पोहोचलो. पण त्या दारातच मला धडकी भरली. कारण सगळे लोक कारमधून उतरूनच त्या हॉटेलात प्रवेश करीत होते. प्रवेशद्वारातला तो मिशीवाला द्वारपाल माझ्यापेक्षा रूबाबदार दिसत होता. शेवटी त्या द्वारपालाला मी माझ्या जवळचा कार्यक्रमाचा पास दाखवला. त्याने मला वर पासून खाली पर्यंत असा न्याहाळला की मी आतून घामाघूम झालो. मग त्याने रूबाबात सांगितले की "जाव, उपर पहले मालेपे एक हॉल है उसमे यह कार्यक्रम है उसमे घूस जाव"!

(४) मग मी हळूहळू महागड्या गालिचावरून पायऱ्या चढू लागलो. त्यावेळी मी जणूकाही स्वर्गाच्या पायऱ्या चढत आहे असा भास होत होता. शेवटी हळूच त्या पहिल्या माळ्यावरील हॉलमध्ये घुसलो. आत मध्ये मोठमोठी माणसे म्हणजे श्रीमंत स्त्रिया व पुरूष भारी भारी कपडे अंगावर घालून बसली होती. मधोमध छोटेसे स्टेज होते. त्या स्टेजवर मला पास देणारे ते श्रीमंत व्यापारी त्यांच्या काही साथीदारांबरोबर हातात हार्मोनियम घेऊन बसले होते. हॉलमध्ये  माझ्यापेक्षा भारी कपडे व टाय घातलेले वेटर्स तिथे बसलेल्या लोकांना स्टार्टर नाष्टा देत फिरत होते. माझ्याकडे ते अशा नजरेने बघत होते की जणूकाही मी त्या मैफिलीत घुसलेला कोणी चोर तर नाही ना! मला तर तो व्यापारी सोडून कोणीच ओळखत नव्हते. तो व्यापारी तर लांब त्या स्टेजवर हातात हार्मोनियम घेऊन बसलेला.

(५) शेवटी मी हिंमत करून हळूच पुढे गेलो आणि त्या स्टेजजवळच जाऊन उभा राहिलो आणि त्या व्यापाऱ्याला अदबीने नमस्कार केला. नशीब त्या व्यापाऱ्याने मला ओळखले. त्या स्टेजवरूनच तो व्यापारी म्हणाला "अरे आव मोरे आव, इधर मेरे सामने बैठो"! (वयाने तो व्यापारी मोठा असल्याने व मी ज्यूनियर वकील असल्याने तो व्यापारी मला बिनधास्त अरे तुरेच करायचा, पण मला तेच आवडायचे कारण त्यात प्रेमाचे भाव जास्त होते). त्या व्यापाऱ्याचे ते शब्द त्या वेटर्सनी ऐकले आणि मग मात्र माझा रूबाब वाढला. त्या वेटर्सनी मला स्टेजसमोरच खुर्ची दिली व निरनिराळे पदार्थ माझ्यासमोर पुढे केले. आता यातले काय उचलायचे असा विचार करीत असतानाच तो व्यापारी मोठ्याने म्हणाला "अरे लेव मोरे लेव, जो मंगताय वो लेव, मेरा गाना सुनने के पहिले तुमको थोडा खानाही पडेगा"!

(६) मग इकडेतिकडे बघत त्यातले काही पदार्थ  लाजत लाजत उचलले व तोंडात टाकले. मग त्या व्यापाऱ्याची ती संगीत मैफिल सुरू झाली. ती जवळजवळ दोन तास चालली. पाठीमागून वाहव्वा, वाहव्वा असे आवाज येत होते. मला तर ते क्लासिकल संगीत बिलकुल समजत नव्हते. हिंदी चित्रपटातील जुनी गाणी व मराठी चित्रपटातील लावण्या गुणगुणणारा मी माणूस आयुष्यात पहिल्यांदाच ते तसले क्लासिकल संगीत ऐकत होतो. खरंच सांगतो की मला त्या संगीतातले काहीही कळत नव्हते. जाम बोअर झालो होतो. हळूच सटकावे तर तसे सटकताही  येत नव्हते. कारण त्या व्यापाऱ्याच्या समोरच माझी खुर्ची ठेवली होती. तो सन्मान (खरं तर तो सन्मान माझा नव्हताच मुळी, तो तर माझ्या सिनियर वकिलांचा सन्मान होता) मला जाम भारी पडला. कधी यातून सुटका होतेय असे होऊन गेले होते. शेवटी दोन तासांनी ती संगीत मैफिल संपली आणि सुटका झाली एकदाशी असे मी मनातल्या मनात पुटपुटलो. पण शेवटी त्या व्यापाऱ्याने हाक मारून मला म्हटलेच "क्या कैसा लगा मेरा गाना"? आता या प्रश्नाला  काय उत्तर देणार होतो मी! पण शेवटी तोंडावर खोटा आनंद दाखवत म्हणालोच "बहोत अच्छा गाया सर आपने"!

(७) मग मैफिलीत सामील झालेली ती सगळी श्रीमंत मंडळी हातात थाळ्या घेऊन फिरत तिथले पदार्थ घेऊन खाऊ लागली. ते वेगवेगळे भारी पदार्थ नुसते बघूनच माझे अर्धे पोट भरले. आता थाळी कशी घ्यायची व त्यात पदार्थ कसे टाकून घ्यायचे व उभ्यानेच कसे खायचे याचा विचार करीत असतानाच दोन मध्यमवयीन श्रीमंत स्त्रिया माझ्याजवळ आल्या. बहुतेक त्यांना माझी दया आली असावी. त्यांनी माझ्या हातात थाळी देऊन स्वतःहून माझ्या थाळीत पदार्थ टाकायला सुरूवात केली. त्या पदार्थांची ओळख करून देत त्या स्त्रिया माझी ओळख करून घेत होत्या. मी गरीब घरातला आहे हे कळल्यावर तर त्यांनी मला खूप मदत केली. नको नको म्हणत असताना माझ्या थाळीत बदामाचा गोड हलवा टाकला व मला उभे राहून खाता येत नाही ही माझी अडचण ओळखून त्यांनी एका डायनिंग टेबलची माझ्यासाठी सोय करून दिली. श्रीमंत माणसेही मनाने चांगली असतात हा माझा तो अनुभव होता. पण तरीही श्रीमंतांच्या कळपात मला अजूनही सहजपणे वावरता येत नाही. शेवटी त्या स्त्रियांचे व त्या व्यापाऱ्याचे खूप प्रेमाने आभार मानून मी त्या मैफिलीचा निरोप घेतला.

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

शनिवार, ४ जुलै, २०२०

पक्षपातीपणा!

पक्षपातीपणा (नेपोटिजम)!

(१) कितीजणांना पक्षपातीपणाचा अनुभव आलाय आणि किती जण या पातीचा अनुभव घेत आहेत? आता काही लोक मला म्हणतील की या वकिलाला झालेय काय? ६४ वय, केस पांढरे, डोक्याला टक्कल या सर्व गोष्टी जवळ आल्यावर सुध्दा याला सुबुद्धी कशी येत नाही? सद्या लोक कोरोनाच्या दहशतीखाली कसेबसे जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि याला हा बिनकामाचा विषय सुचतोच कसा? आता या काही लोकांना मी एवढेच म्हणेल की, बाबांनो आजूबाजूला नीट डोळे फिरवून बघा म्हणजे तुमच्या डोळ्यांना कोरोनाच्या पक्षपातीपणाचा हलकटपणा थोडा तरी दिसेल. हा नीच कोरोना काही जणांना जाम त्रास देतो, इतका की त्याला यमसदनालाच पाठवतो. पण काही जणांवर याची जाम मेहेरबानी असते. म्हणजे असे की काही जणांच्या शरीरात तो घुसतो पण थोड्या गुदगुल्या करतो आणि हळूच निघून जातो. म्हणजे सर्दी, ताप, खोकला असली काही लक्षणेच दाखवत नाही. हा या नीच कोरोनाचा पक्षपातीपणा नव्हे काय? म्हणून तर सद्याच्या कोरोना काळातच हा विषय घेतलाय मी तुमच्या विचारविनिमयासाठी!

(२) आपल्या देशातून राजेशाही गेली आणि लोकशाही आली. राजे लोकांचा रूबाब व त्यांना सरकारकडून मिळणारे तनखे आपल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बंद केले. पण खरंच राजेशाही गेली का हो? याच इंदिरा गांधीच्या काळात जमीनदारी विरोधी कायदा आला. पण खरंच जमीनदारी संपली का हो? लोकशाहीत मतदार हा राजा असतो म्हणे. पण खरंच मतदार हा राजा असतो का? तसे असते तर संसद, विधानसभेत सर्वसामान्य मतदारच खासदार, आमदार बनून बसले असते ना! पण असे काहीच प्रत्यक्ष व्यवहारात होत नाही हे कोणालाही दिसेल आणि यामागचे प्रमुख कारण काय तर काही लब्धप्रतिष्ठित लोकांचा पक्षपातीपणा!

(३) वेगवेगळ्या उस्तादांच्या गायन शैलीनुसार व त्यांच्या राहत्या शहरांवरून संगीत क्षेत्रात पारंपरिक घराणेशाही निर्माण झाली. संगीत  क्षेत्रात ग्वालीअर, किराणा, जयपूर, आग्रा, दिल्ली आणि पतियाळा अशी सहा प्राचीन घराणी आहेत. यातील किराणा घराणे सोडले तर इतर पाच घराणी ही शहरांची नावे आहेत हे कळते. पण हा किराणा प्रकार काय आहे हे नीट कळले नाही म्हणून गुगलचे सर्च इंजिन फिरवले तर किराणा हे सुध्दा एका उस्तादांचे जन्मस्थान आहे असे कळले. मला काय फक्त किराणा दुकानातून किराणा माल आणतात एवढेच माहित होते. असो, तो संगीताचा विषय फार मोठा आहे. आपला आजचा विषय हा पक्षपातीपणाचा आहे व या पातीचा संबंध घराणेशाहीशी कसा आहे व ही घराणेशाही किती अन्यायकारक आहे हा आहे.

(४) आपल्याच घराण्याचे नाव पिढ्यानपिढ्या पुढे राहिले पाहिजे व मग त्यासाठी दुसऱ्यांची घराणी आपल्या घराण्याच्या खाली म्हणजे हाथ के नीचे राहिली पाहिजे या स्वार्थी भावनेचा संकुचित विचार पक्षपातीपणाला खतपाणी घालतो. हाच पक्षपातीपणा माणसांतील स्पर्धा गलिच्छ पातळीवर आणून टाकतो. स्पर्धा ही नेहमी निकोप म्हणजे न्याय (फेअर) व आरोग्य दायी (हेल्दी) असावी. काहीजणांनाच न्याय व काहीजणांनाच्याच आरोग्याची काळजी घेणारी स्पर्धा ही पक्षपातीपणावर आधारित असते. स्पर्धेचे नीट नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पूर्वी मक्तेदारी विरोधी कायदा होता. त्याचेच नामकरण पुढे स्पर्धा कायदा असे झाले. पण नावात बदल करून ना मक्तेदारी संपली ना स्पर्धा निकोप झाली. 

(५) तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, वकिली घ्या, वैद्यकीय घ्या, अभियांत्रिकी घ्या, कला घ्या, राजकारण घ्या किंवा आणखी काही कोणते घ्या, तुम्हाला सगळीकडे घराणेशाही व त्यातून निर्माण होणारा पक्षपातीपणा दिसेल. इंग्रजीत या पक्षपातीपणाला नेपोटिजम म्हणतात. मी वकील असल्याने वकिली क्षेत्रात कशाप्रकारचा पक्षपातीपणा चालतो हे प्रत्यक्ष अनुभवामुळे सांगू शकतो. सुरूवातीच्या काळात नवोदित वकिलाला सिनियर वकिलाच्या हाताखाली (हाथ के नीचे) खूप मेहनतीची उमेदवारी करावी लागते. पण या सिनियर वकिलाचाच मुलगा जर नवोदित वकील असला आणि दुसरा कोणी नवोदित वकील त्या सिनियर वकिलाच्या हाथ के नीचे काम करीत असला तर मग सिनियरचा वकील मुलगा व बाहेरचा वकील मुलगा या दोघांमध्ये त्या सिनियर वकिलाकडून दुजाभाव केला जातो. सख्खी मुले व सावत्र मुले यांच्यात जसा दुजाभाव केला जातो तसाच हा काहीसा प्रकार असतो. 

(६) वकिली क्षेत्रात न्यायाधीशांची व नामांकित वकिलांची मुले यांचा रूबाब काही वेगळाच असतो. आमच्यासारखी गरीब घराण्यातून (आमच्या सारख्यांचे पण घराणे असते ना) मोठ्या कष्टाने वकील झालेली मुले जेंव्हा कोर्टात वकिली करण्याचे धाडस करतात तेंव्हा त्यांना खालच्या मानेनेच वकिली करावी लागते. याला काही अपवाद असतीलही. पण मी इथे सर्वसाधारण अनुभव सांगतोय. मी झाबवाला या सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणाऱ्या लेखकाची कायद्याची जुनी पुस्तके जुन्या लॉ बुक स्टॉलमधून विकत घेऊन व ती वाचून एलएल.बी. झालोय. गंमत अशी झाली की मी मुंबई हायकोर्टात सुद्धा माझी वकिली सुरू करण्याचा प्रयत्न झाबवला लेखकाची जुनी पुस्तके हातात घेऊनच केला. पण मी जेंव्हा अंगावर वकिलाचा नवीन गाऊन चढवून पण हातात मात्र कायद्याची ती जुनी झाबवाला पुस्तके घेऊन हायकोर्टात फिरू लागलो तेंव्हा  मोठमोठया कायदा लेखकांची जाडजूड पुस्तके व फाईली हातात घेऊन या कोर्ट रूममधून त्या कोर्ट रूममध्ये फिरणारी मोठ्या वकिलांची मुले (काही तर इतर न्यायालयांत न्यायाधीश म्हणून काम पहाणाऱ्या न्यायाधीशांची मुले होती) जी हायकोर्टात रूबाबात कारनेच आलेली होती ती माझ्या हातातील झाबवाला लेखकाची ती जुनी पुस्तके बघून एकमेकांकडे डोळे मिचकावीत गालातल्या गालात हसू लागली. मला ती तशी का हसत आहेत हे त्यावेळी कळलेच नाही. पण एक गरीब घराण्यातील मुलगा कष्टाने वकील होऊन धाडसाने हायकोर्टात वकील म्हणून आलाय याचे कौतुक वाटण्याऐवजी त्या मोठ्या  लोकांच्या मोठ्या मुलांना माझे हसू येणे हाही पक्षपातीपणाचाच एक भाग होता. आणि हे सर्व नैसर्गिकच आहे असाही निर्लज्जपणे काहीजण युक्तिवाद करतात. मग तशा बऱ्याच गोष्टी नैसर्गिक आहेत ना! क्रूरपणा, स्वैराचार इत्यादी गोष्टीही नैसर्गिकच आहेत. मग मानवी विवेक व सुसंस्कृतपणा ही नैसर्गिक गोष्ट नव्हे काय? 

(७) पक्षपातीपणा हा काही फक्त एकाच प्रकारच्या व्यवसाय, उद्योग, धंद्यात नसतो. तो  वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय, उद्योग, धंद्यात सुध्दा असतो. अर्थकारणात विविध व्यवसाय, उद्योग, धंदे असतात. पण एखाद्या विशिष्ट व्यवसाय, उद्योग, धंद्यालाच अती महत्व दिले जाते. उदाहरणार्थ, अनेक वर्षे अभ्यास करून व्यवसाय करणाऱ्या वकील, डॉक्टर, इंजिनियर यांच्यापेक्षा चित्रपट कलाकार, क्रिकेट खेळाडू मोठे होतात, इतके मोठे की सेलिब्रिटीच! हा काय प्रकार आहे? माझ्या मते हा लोकांनी केलेल्या पक्षपातीपणाचाच प्रकार आहे. असो, अशा पक्षपातीपणाविरूध्द मी एकटा काय लढा देणार? असेच चालणार असेल तर मग चालू द्या तसेच! पण ढोंगीपणाचा पडदा हटवून सत्य उघडे केल्याने काहीजणांचा जर तिळपापड होणार असेल तर त्यालाही माझा नाइलाज आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©५.७.२०२०

वकील हा सरकार मधील महत्वाचा दुवा!

वकील हा सरकारमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा!

संसदेत निवडून जाणाऱ्या खासदारांना व विधानसभेत निवडून जाणाऱ्या आमदारांना कायदा कोण बनवून देतो? कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे अर्थात देशाचे दिवाणी  प्रशासन सांभाळणारे आय.ए.एस. व देशाचे फौजदारी प्रशासन सांभाळणारे आय.पी.एस. अधिकारी की कायद्याची पदवी घेऊन त्याचा सखोल अभ्यास असणारे विधीज्ञ, वकील? विधीशास्त्र कोणाला जास्त कळते प्रशासकीय अधिकाऱ्यांना की विधीज्ञ वकिलांना? या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच जर अन्याय झाला तर ते कोणाकडे येतात? विधीज्ञ वकिलांकडे की आणखी कोणाकडे? विधीमंडळाच्या कायद्यांचा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या  कायदे अंमलबजावणीचा पुनर्विचार कुठे होतो? न्यायालयांतच ना, मग न्यायालयाचा अधिकारी कोण फक्त न्यायाधीश की न्यायप्रक्रियेत अशा न्यायाधीशाला मदत करणारा वकील नावाचा सरकारचा महत्त्वाचा दुवा? वकिलाची शक्ती सरकारमधील किती जणांना माहित आहे? वकिलाला नुसत्या कोर्टालाच नव्हे तर देशातील  कोणत्याही प्रशासनाला, मग ते दिवाणी असो की फौजदारी, कायदा समजावून सांगण्याचा अधिकार आहे आणि त्याला जर कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने तसे करण्यावाचून रोखले तर वकिलाच्या कामात अशाप्रकारे निर्माण केलेला अडथळा हा सरकारी कामात केलेला अडथळाच होय कारण सरकार म्हणजे नुसते प्रशासन नव्हे तर त्यात न्यायालयही येते व त्याच न्यायालयाचा एक अधिकारी असतो तो म्हणजे वकील हे सत्य किती लोकांना माहित आहे? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला वकील वर्ग कोरोना लॉकडाऊन काळात काय करतोय? या वर्गाकडे सरकारने दुर्लक्ष केलेय, त्याची अत्यावश्यक सेवा न समजून घेता, वकिलाचा व्यवसाय हा अत्यंत उदात्त व प्रतिष्ठित व्यवसाय असल्याने त्याला इतर कामेही करता येत नाहीत, त्यामुळे बोटावर मोजता येतील अशा काही लब्धप्रतिष्ठित श्रीमंत वकिलांचा अपवाद वगळता लॉकडाऊनमुळे सर्वसाधारण वकिलांची खूप कोंडी झाली आहे हे सरकारला कळत नाही काय? या वकील वर्गाकडे सरकारने केलेले हे दुर्लक्ष म्हणजे सरकारला वकील वर्गाचे महत्वच कळत नाही याचे उत्तम उदाहरण आहे. यासाठी सर्व वकील वर्गाने आपआपसातील पक्षपातीपणा संपवून एकजूटीने सरकारला याचा जाब विचारलाच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

कुछ तो लोग कहेंगे!

कुछ तो लोग कहेंगे!

(१) मी कोणतीही एक विचारधारा घेऊन जगत नाही. जगातील सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना माझ्या बुद्धीला जे कळते, जे पटते ते मी माझ्या बुद्धीनुसार बोलत व लिहित असतो. त्यात दररोज सुधारणा होत असते. त्यामुळे कालची मांडणी आज बदलते व उद्याही बदलू शकते. पण सत्य हे सत्यच असते. त्याची फक्त मांडणी बदलत असते. ज्ञानाची प्रगल्भता व अनुभवाची परिपक्वता यानुसार मांडणीतला हा फरक होत असतो.

(२) मला प्राथमिक शाळेपासून लिखाणाची सवय आहे. कित्येक गोष्टी मी लहानपणापासून लिहून ठेवल्या. पण जसजसे ज्ञान प्रगल्भ होत गेले व अनुभव परिपक्व होत गेला तसतशा त्या लिहून ठेवलेल्या गोष्टी हवेत दूर उडून गेल्या. माझ्या जुन्या डायऱ्या आता या जगात कुठे आहेत हे त्या डायऱ्यांनाच ठाऊक! मी तरी त्या किती सांभाळणार! लहानपणीच काय पण पुढे तरूणपणीही एवढ्याशा छोट्या घरात राहणारा मी माझ्याच लिखाणाचा ढीग कुठे कुठे म्हणून साठवून ठेवणार! लग्न झाल्यावर अनेक घरे बदलली व मग टेम्पोतून घरसामान हलवताना कितीतरी जुन्या डायऱ्या, वह्या गहाळ झाल्या. वकिली सुरू केल्यावर मात्र मोठ्या वह्या घेऊन त्यात लिखाण करू लागलो. त्यातल्या काही हस्तलिखित वह्या आज एका कपाटात आहेत. पण त्यातली पाने आज चाळताना माझ्या लिखाणात कितीतरी बदल झालाय हे मलाच जाणवते.

(३) पाच वर्षापूर्वी मला दर्शना नावाच्या एका लेडी लिगल असिस्टंटने फेसबुकवर लिहा सर असे सुचवले. मग तिनेच माझे फेसबुक खाते उघडून दिले. तोपर्यंत मला समाजमाध्यम वगैरे गोष्टी माहित नव्हत्या. तेंव्हापासून मी फेसबुक वर लिहितोय. पेनाने हस्तलिखिते लिहूनही खूप कंटाळा आला होता. मोबाईलमध्ये कलर नोट हे ॲप डाऊनलोड केले व मग त्या नोट पॕडवर बोटाने लिहायला शिकलो. तिथे लेख लिहून झाला की मग तो बोटानेच सिलेक्ट करून कॉपी करायचा व फेसबुकवर पेस्ट करायचा. अशाप्रकारे माझे फेसबुक लिखाण सुरू झाले.जवळजवळ १००० लेख लिहिले व अनेक विचार वाक्ये लिहिली.

(४) पण फेसबुक मित्र झालेल्या काही पोरकट, टवाळखोर लोकांनी माझ्या लिखाणाची चेष्टा केली व त्यामुळे वैतागून जाऊन मी माझी पूर्वीची दोन फेसबुक खाती बंद केली. पण माझ्या त्या कृतीमुळे माझे लिखाण सिरियसली वाचणाऱ्या माझ्या बऱ्याच चांगल्या फेसबुक मित्रांवर अन्यायही झाला. काहींनी मला तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले व त्यांची नाराजी व्यक्त केली. तेंव्हा मग मी लॉकडाऊनच्या काळातच दोन महिन्यापूर्वी हे तिसरे फेसबुक खाते उघडले आहे. आता हे तिसरे खाते कसेही करून टिकवावे असे ठरवले असताना पुन्हा त्याच जुन्या वाईट अनुभवाची पुनरावृत्ती होऊ लागली. म्हणून मग काल त्यावर एक लेख लिहून मी माझे हे तिसरे खाते सार्वजनिक वरून खाजगी केले व त्यावर सरळ एक टॕग लाईन लिहून टाकली. "माझे फेसबुक खाते सुज्ञ लोकांसाठी आहे, टवाळखोरांना इथे प्रवेश नाही" हीच ती टॕगलाईन!

(५) आता मला असे का वागावे लागले याबद्दल माझ्या आयुष्यातील फक्त तीनच उदाहरणे इथे नमूद करतो. पहिले उदाहरण मला स्वतःला आलेल्या फेसबुकवरील अनुभवाचे. मी काही लिहिले की एकजण माझ्या पोस्टसवर सारख्या विचित्र कमेंटस करायचा. मला उलटसुलट प्रश्न विचारायचा. मी त्याच्या प्रत्येक कमेंटवर त्याला स्पष्टीकरण द्यायचो व अधूनमधून झापायचो. त्यावर त्याच्याकडे उत्तर नसायचे. मग त्याने खोडसाळपणे माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये घाणेरडे व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवायला सुरूवात केली. मी त्याला झापला व हे प्रकार बंद कर असे खडसावले. पण त्याने त्याचा तो खोडसाळपणा चालूच ठेवला. मग मात्र मला त्याला ब्लॉक करावेच लागले. या मूर्खांना हे कळत कसे नाही की मला जर या ६४ वयात असे व्हिडिओज, अशी चित्रे पहायची असतील तर त्या गुगलवर खजिना पडलाय ना अशा गोष्टींचा! पण ही नीच वृत्तीची माणसे! यांना एखादी व्यक्ती काही चांगली गोष्ट करतेय हे बघवत नाही.

(६) आता दुसरे उदाहरण माझ्या बायकोला आलेल्या अनुभवाचे. गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांना माझी बायको आमच्या दारात सुंदर रांगोळी काढायची. अजूनही काढते. आम्ही जेंव्हा बैठ्या चाळीत रहायचो तेंव्हा माझ्या बायकोने रांगोळी काढून घराचा दरवाजा लावून घेतला व नंतर काही तासांनी दरवाजा उघडून बघितला तर ती रांगोळी कोणीतरी मुद्दामहून पायाने पुसलेली असायची व त्यावर खोडसाळपणे दगडेही टाकलेली असायची. पण हे असे कोण व का करतेय हेच आम्हाला कळत नसायचे.

(७) आता तिसरे उदाहरण माझ्या वडिलांचे. माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे डॕशिंग पुढारी होते. त्यांचे वक्तृत्व खूप छान होते. ते ज्या मिलमध्ये नोकरी करायचे तिथे त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. पण त्यांच्या काही विरोधकांना ही गोष्ट बघवत नसायची. मग असे काही नीच वृत्तीचे लोक त्या मिलच्या संडासात माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर खोटे आरोप करीत खडूने घाणेरड्या कमेंटस लिहायचे व अश्लिल चित्रेही काढायचे. मग ती बातमी संपूर्ण मिलमध्ये पसरायची. माझ्या वडिलांचे अनुयायी त्यावर चवताळून जायचे व वडिलांना म्हणायचे तुम्ही फक्त सांगा मग बघा आम्ही त्या लोकांना कसे फोडून काढतो ते! त्यावेळचे ते खळ्ळ खट्याकच होते! पण माझे वडील त्या लोकांना शांत करीत सांगायचे की, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मग फक्त एक काम करा. त्या हलकट लोकांनी त्या ज्या काही घाणेरड्या कमेंटस लिहिल्या आहेत, अश्लिल चित्रे काढली आहेत ती साबणाने, पाण्याने पुसून टाका. हे ऐकून माझ्या वडिलांचे अनुयायी तसेच करायचे.

(८) आजचा जमाना हा डिजिटल जमाना आहे. पण अॉनलाईन व्यवहार सुरू झाल्याने लोकांची नीच वृत्ती बदलली का? माझ्या वडिलांचे यश न बघवून त्यांना बदनाम करणारी अश्लिल चित्रे मिलच्या संडासात काढणारी ती माणसे काय व आजच्या काळात मला फेसबुक इनबॉक्स मध्ये अश्लिल व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवणारी ती व्यक्ती काय, काही फरक आहे का या हलकट, नीच वृत्तीत? फक्त माध्यम बदलले, पण वृत्ती तीच राहिली.

(९) काही लोकांच्या अशा नीच वृत्तीवर, त्यांच्या ढोंगी स्वभावावर मी माझ्या कडक लिखाणातून जेंव्हा हल्ला चढवतो तेंव्हा माझेच काही चांगले मित्र मला अमर प्रेम या गाजलेल्या जुन्या हिंदी चित्रपटातील त्या फेमस गाण्याची आठवण करून देतात. आनंद बक्षी यांनी लिहिलेले, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले, किशोर कुमार यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायलेले व राजेश खन्ना या सुपर स्टारने त्या चित्रपटात शर्मिला टागोर या नायिकेला पेश केलेले ते गाणे काय म्हणते तर "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में, कहीं बीत न जाए रैना"! अरे कसे सोडणार या नीच लोकांना? आज कुछ तो लोग कहेंगे और कल कुछ तो लोग करेंगे भी! हे कुछ जे असते ना ते खूप टोचणारे असते. गुलाबाचे फूल सुंदर, सुगंधी असते म्हणून त्याच्या सोबत असणारे काटे कोण अंगाला टोचून घेते काय? ते काटे बाजूला काढून फेकूनच देतात ना. अगदी तसेच फालतू कमेंटस करणाऱ्या टवाळखोरांना मी माझ्या फ्रेंड लिस्ट मधून खड्यासारखे बाजूला काढून त्यांना ब्लॉक करणार व माझे लिखाण त्यातला अर्थ नीट समजून घेऊन जे वाचतात त्यांना मी गुलाबाप्रमाणे माझ्याजवळ ठेवणार. हाच त्या "कुछ तो लोग कहेंगे" या गाण्याचा मी माझ्या स्वतःसाठी काढलेला अर्थ!

-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२० 


माझी वैज्ञानिक आस्तिकता!

माझी वैज्ञानिक आस्तिकता!

कोरोना महामारीने माझ्या आस्तिकतेला वेगळे प्रमाण मिळाले. कोरोनाने मला नास्तिक जरी बनविले नसले तरी माझी आस्तिकता आणखी वैज्ञानिक केली हे मात्र खरे आहे. निसर्ग व देव आणि विज्ञान व धर्म यातील फरक कोरोनामुळे नष्ट झाला. यावर्षीची आषाढी एकादशीची यात्रा शुकशुकाटात संपन्न झाली व मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची महापूजा मास्क लावून केली गेली. त्यातून निव्वळ मानसिक अध्यात्म उपयोगाचे नाही हे मनाला पटले. आता तर गणेशोत्सव दहीहंडी उत्सव या गोष्टी सुध्दा कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत. मंदिर, मशीद, चर्च व इतर प्रार्थनास्थळे तर या कोरोनाने अगोदरच बंद करून टाकली आहेत. यातून काय निष्कर्ष निघतो? यातून हाच निष्कर्ष निघतो की नुसत्या मानसिक शांतीने काही होत नसते. कारण मन हा शरीराचाच भाग असतो व तो शारीरिक भाग म्हणजे आपला मेंदू. आधी पोटोबा, मग विठोबा अशी म्हणही आहे मराठीत. या म्हणीचा अर्थ एवढाच की उपाशी पोटी तुम्ही आध्यात्मिक शांती मिळवू शकत नाही. एकादशीचा उपवास हा एक दिवसाचा असतो. इतर धर्माचे काही उपवास महिनाभर चालतात. पण शरीराला पूर्ण उपाशी ठेवणारे ते उपवास नसतात. दररोज एक वेळचे जेवण त्यात असतेच. महिनाभर पूर्ण उपाशी राहून कोणीही देवाची आध्यात्मिक भक्ती करू शकत नाही. हे जर खरे आहे तर मग नुसते अध्यात्म उपयोगाचे नाही हेच यातून सिध्द होते. माझ्या मते अध्यात्म हे मूलभूत निसर्गधर्माला पूरक असे टॉनिक आहे. पण ते टॉनिक निसर्गधर्माचा पूर्ण आधार होऊ शकत नाही. आधी शरीर व मग मन हाच निसर्गाचा प्राधान्यक्रम दिसत आहे. आता ही गोष्ट नीट कळल्याने व मनालाही नीट पटल्याने माझी आस्तिकता ही आता गॉड पार्टिकल (देवांश) या वैज्ञानिक संकल्पनेकडे वळली आहे. जर निसर्गाच्या किंवा विश्वाच्या निर्मितीमागे व तसेच  नियंत्रणामागे हे गॉड पार्टिकल असेल तर या गॉड पार्टिकलचे अध्यात्म मी माझ्या मनात घेण्याऐवजी या गॉड पार्टिकलचे रसायन मी अगोदर माझ्या शरीरात घेईन. कारण हे रसायन माझ्या शरीरात आले की त्याबरोबर आपोआप त्या रसायनातले अध्यात्मही माझ्या मनात येईल. पण या सर्व जर तर च्या गोष्टी आहेत. गॉड पार्टिकल ही एक संकल्पना आहे. तिचे विश्वातील किंवा निसर्गातील अस्तित्व अजून सिद्ध व्हायचे आहे. पण तोपर्यंत जे सत्य दिसतेय त्यावर भाष्य नको का करायला? मला काही गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत. जगण्याला आवश्यक असणारी रसायने धूर्तपणे स्वतःच्या ताब्यात ठेऊन पोकळ शांतीच्या प्रवचनांचा पाऊस लोकांच्या मनावर पाडणाऱ्या काही ढोंगी लोकांचा मला राग येतो. सत्य दडवून ही मंडळी लोकांना फसवत आहेत हे बघवत नाही. पण मी काही करू शकत नाही. मी माझ्या स्वतःपुरते जे वैयक्तिक धोरण अंगिकारले आहे ते लोकांना सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी नास्तिक नाही, पण माझी आस्तिकता ही वैज्ञानिक आहे, ती गॉड पार्टिकलच्या संकल्पने भोवती फिरत आहे व तिला गॉड पार्टिकल मधील रसायनात जास्त रस आहे एवढेच मी नमूद करू इच्छितो!

-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०

टीपः हिग्ज या शास्त्रज्ञाने बोसॉन पार्टिकल्स हेच गॉड पार्टिकल्स असे सांगितले तर याला विरोध करताना सर्न या शास्त्रज्ञाने असे बोसॉन पार्टिकल्स ब्रम्हांडात अस्तित्वातच नाहीत असे सांगितले. मी मात्र ब्रम्हांडात अत्यंत सूक्ष्म वस्तुमान (Mass), प्रचंड मोठी भौतिक, रासायनिक व मानसिक शक्ती (energy) व तसेच गुणधर्म (property) असलेला एखादा सूक्ष्म अणु (atom) असणार व तो अणु हाच गॉड पार्टिकल (देवांश) असणार या संकल्पनेवर नुसती धार्मिक श्रध्दा नाही तर वैज्ञानिक विश्वास ठेवून आहे व माझ्या या वैज्ञानिक संकल्पनेनुसारच मी वैज्ञानिक आस्तिक आहे. -ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०

गुरुवार, २ जुलै, २०२०

आजपासून फेसबुक खाते खाजगी!

आजपासून माझे खाते पुन्हा खाजगी!

फेसबुकवरील एका हितचिंतकाने मला सावध केले होते की माझे फेसबुक खाते खाजगी आहे ते तसेच राहूद्या, ते सार्वजनिक करू नका, नाहीतर पुन्हा पूर्वीच्या जुन्या खात्यांप्रमाणेच उपद्रव होईल. पण मी त्यांचे ऐकले नाही व पुन्हा समाजवीर होण्याचा मोह होऊन मी माझे हे तिसरे खाते सुध्दा सार्वजनिक केले. त्याचा उपद्रव शेवटी सुरू झालाच. मी नुसते खाते सार्वजनिकच नाही केले तर पुन्हा योग्य ती चाळणी न करता कोणाच्याही फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारत गेलो. मित्रसंख्या वाढवून घेणे हा दुसरा मोह त्याला कारणीभूत ठरला. त्याचा भयंकर दुष्परिणाम आज मला दिसून आला. मी आज कोरोना नियंत्रण करण्यासाठी जाहीर झालेली संचारबंदी व जमावबंदी यांच्यातील फरक सांगणारा एक छोटा कायदेशीर लेख फेसबुकवर लिहिला व आता संचारबंदी जाहीर झाल्याने लोकांनी कोरोनाबरोबर पोलीस कारवाईचीही काळजी घ्यावी असे त्या लेखात लिहिले. तर एका मराठी मित्रानेच फिदीफिदी हसण्याचे चिन्ह माझ्या त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून टाकले व "तुम्हाला हे पसंत नसेल तर १४४ कलमाविरूध्द कोर्टात जा" असे मलाच उलट सुनावले. त्या व्यक्तीला मी ताबडतोब अनफ्रेंड व ब्लॉक करून टाकले आहे. माझ्या समाजमाध्यमावरील लिखाणाला आता काही अर्थच उरला नाही. माझ्या सखोल अभ्यासपूर्ण लिखाणाचे गांभीर्य नसलेली काही तथाकथित फेसबुक मित्र मंडळी जर माझीच चेष्टा मस्करी करायला धजावत असतील तर मग मी माझ्या या सामाजिक लिखाणाचा अट्टाहास पुन्हा पुन्हा का करावा? मला तर वरवर गुळमुळीत लिहिणे जमत नाही. मी माझ्या खास भाषा शैलीत सत्य लिहिण्याचा प्रयत्न करावा व पुन्हा माझेच हसू करून घ्यावे, हे सर्व कशासाठी? हे काही लोक गंभीर विषयावर हसूच कसे शकतात? यांना माझ्या कायद्याच्या ज्ञानाची गंमत वाटते काय? बरं, माझ्या ज्ञानाची ज्या कोणाला गंमत वाटत असेल त्यांनी मला ताबडतोब अनफ्रेंड करावे असे अगोदरच्या फेसबुक पोस्टने मी जाहीर करून टाकले आहे. एखाद्याच्या पोस्टसवर पोकळ कमेंटस व कुचेष्टापूर्ण हास्यचिन्हे टाकण्यासाठीच गंमत म्हणून फ्रेंड रिक्वेस्टस पाठविणाऱ्या लोकांना त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना मी कसे ओळखणार? काय निकष लावावेत मी अनोळखी माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना? सद्या मी दोनच निकष लावलेत आणि ते म्हणजे वकील व मराठी माणूस यांना प्राधान्य! पण माझ्या आजच्या  गंभीर पोस्टवर फिदीफिदी हास्यचिन्ह टाकून वरील विचित्र कमेंट करणारी व्यक्ती ही सुध्दा मराठीच होती ना! माझ्या या नवीन खात्यावर नव्याने मित्र झालेल्या लोकांच्या असल्या चित्रविचित्र प्रतिक्रियांची वाट बघत बसू का म्हणजे अशी कुचेष्टेची प्रतिक्रिया आली रे आली की मग लगेच अशा व्यक्तीला अनफ्रेंड व ब्लॉक करता येईल. यासाठी समाजमाध्यमावर अभ्यासपूर्ण लिखाण करायचे का? आता माझे हे तिसरे खाते पण अशा काही लोकांमुळे बंद करायची वेळ आली तर मात्र खूप कठीण झालेय असले फुकटचे समाजकार्य असेच म्हणावे लागेल. असो, पुढे या समाजमाध्यमाचा वापर कसा करायचा, माझे हे फेसबुक खाते इतर बहुसंख्य लोकांप्रमाणे फक्त आणि फक्त करमणूक व विरंगुळा (हवा पाण्याच्या गप्पा मारणारा टाईमपास) यासाठीच ठेवायचे का याचा मी जरूर गांभीर्याने विचार करीन. तूर्तास तरी हे खाते सार्वजनिक वरून खाजगी करून टाकत आहे म्हणजे माझ्या पोस्टस कोणाला कुठेही शेअर करता येणार नाहीत. या निर्णयाने माझ्या काही चांगल्या मित्रांवर अन्याय होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे. माझ्या ज्या हितचिंतक मित्राने फेसबुक खाते सार्वजनिक करू नका असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला त्या हितचिंतक मित्राचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!

-ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०

टीपः ६४ वर्षाच्या वकिलाला कायदा शिकवताय तुम्ही? ग्रेट! रामराम! ( माझ्या पोस्टवर विचित्र कमेंट करणाऱ्या त्या व्यक्तीला मी ब्लॉक करून माझ्या पोस्टवर तिने केलेल्या  कमेंटसमधील त्या व्यक्तीचे नावही मी डिलीट करून टाकले आहे. मला उगाच पुढील वाद नकोत. पण तरीही त्या व्यक्तीच्या काही कमेंटस तिच्या नावासह डिलीट झाल्या नाहीत. बहुतेक तिला ब्लॉक केल्याने तसे होत असावे). -ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०


बुधवार, १ जुलै, २०२०

फक्त माणूस म्हणूनच!

तुम्ही कोणत्याही लिंग, वय, प्रांत, भाषा, शिक्षण, धर्म, जात, वर्ण, वर्ग, विचारधारा किंवा पक्षाचे असाल, पण फक्त माणूस म्हणूनच तुम्ही माझे मित्र आहात! -ॲड.बी.एस.मोरे©२.७.२०२०

Be you belong to any gender, age, place, language, education, religion, caste, race, class, ideology or party, but you are my friends only as human being! -Adv.B.S.More©2.7.2020