https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म!

अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म!

अणू हा पदार्थाचा लहानातला लहान कण पण या अणुकणाला वस्तुमान/ जागा (मास) प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली कण अणुकणात असतो त्या कणाला देवकण (हिग्ज बोसॉन/गॉड पार्टिकल) म्हणतात असा शोध पीटर हिग्ज या ब्रिटिश शास्त्रज्ञाने लावला. या शोधामुळे महास्फोटानंतर (बिग बँग) विश्वाची निर्मिती कशी झाली या प्रश्नाचा उलगडा झाला.

याचा अर्थ काय तर प्रत्येक अणुत देवकण आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ, प्राणी, माणूस यात देवकण आहे. कोणताही पदार्थ त्या पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) यांनी बनलेला असतो. अणुकणांच्या वस्तुमानात देवकण व त्याला संलग्न उर्जा/शक्ती असे गणित आहे तर मग अणुकणांना वस्तुमान प्राप्त करून देणाऱ्या देवकणांत वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त ताकदवर चुंबकीय उर्जा असणार असा निष्कर्ष निघतो. देवकणाची ही अधिक ताकदवर चुंबकीय उर्जा पदार्थीय वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेला जवळ घट्ट पकडून धरत असणार.

याचा अर्थ पदार्थाच्या वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेपेक्षा अधिक ताकदवर उर्जा पदार्थातील अणुतील देवकणात आहे. म्हणून तर पीटर हिग्ज या शास्त्रज्ञाने त्या शक्तिशाली कणाला देवकण असे नाव दिले. पण मला प्रश्न हा पडलाय की या देवकणात एवढी मोठी ताकदवर चुंबकीय उर्जा कुठून येते? ती तर पदार्थीय वस्तुमान संलग्न उर्जेचा भाग नाही आणि तरीही ती वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यापुढे जाऊन आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी असे म्हणेल की शिव व शक्ती यांनी मिळून हे विश्व बनले आहे असे गृहीत धरावे तर मग शिव हा त्याला संलग्न असलेल्या शक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे असे निष्पन्न होते आणि म्हणून तर शिव हा शक्तीला स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे शक्तिशाली गंगा नदीचा प्रवाह शिवशंकराने स्वतःच्या जटांत बंदिस्त/धारण करून मग हळूहळू त्या नदी प्रवाहाला पृथ्वीवर सोडणे. अशी आख्यायिका हिंदू धर्मशास्त्रात आहे. अध्यात्मात डोकावले की जसे विज्ञान दिसते तसे विज्ञानात डोकावल्यावर अध्यात्म दिसते. माझ्या दृष्टिकोनातून परमेश्वराचे अध्यात्म व निसर्गाचे विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. पुन्हा शेवटी आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतो तो हा की परमेश्वर कोणाला म्हणायचे? शक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली असलेल्या शिवाला की शिवाला संलग्न असलेल्या शक्तीला की शिव व शक्ती या दोघांच्या एकत्रित अस्तित्वाला? विश्वातील महाशक्ती म्हणजे विश्वचैतन्य म्हणजे परमेश्वर असे मी मानत होतो. पण आता पदार्थीय वस्तुमान व देवकणी शक्ती असलेला शिव एकीकडे व वस्तुमान नसलेली नुसतीच महाशक्ती (नुसते शुद्ध चैतन्य) दुसरीकडे असे दोन भाग पीटर हिग्ज यांनी लावलेल्या देवकणाच्या शोधामुळे माझ्यासमोर उभे राहतात. या दोन भागांना एकत्र करून त्या एकत्रित गुणरूपात परमेश्वर कसा बघायचा हाही एक आध्यात्मिक व वैज्ञानिक बुद्धीचा मला पडलेला कठीण प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२४

बुधवार, १० एप्रिल, २०२४

श्री स्वामी समर्थ!

श्री स्वामी समर्थ!

श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांना श्री गुरूदेव दत्ताचा अवतार मानतात. श्री दत्त अवतार हा ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन प्रमुख देवतांचा त्रिगुणात्मक अवतार. तीन देवतांचे तीन गुण कोणते तर निर्मिती, निर्मित गोष्टींचे पालन पोषण व त्यांचे रक्षण.  ब्रम्हाचे कार्य निर्मिती, विष्णूचे कार्य पालन पोषण व महेशाचे कार्य रक्षण आणि ही तिन्ही कार्ये नियमांनी बद्ध आहेत ज्याला आपण विधी लिखित म्हणतो.

वरील तीन गोष्टींत श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द आहेत. श्री या शब्दात बुद्धीदेवता श्री गणेश आहे. अक्कलकोट या शब्दात अक्कल हा शब्द आहे त्याचा अर्थ बुद्धी. कोणत्याही कार्यात सर्वप्रथम बुद्धीचा वापर महत्वाचा. म्हणून प्रथम वंदन असते बुद्धीदेवता श्री गणरायाला. म्हणून आध्यात्मिक प्रार्थनेची सुरूवात श्री गणेशाय नमः अशी करायची. दुसरे वंदन सगळ्या जगाचा स्वामी म्हणजे परमेश्वर, परमात्म्याला. विश्वातील महाशक्ती किंवा विश्वचैतन्य यालाच मी परमेश्वर असे म्हणतो. म्हणून श्री गणेश वंदनेनंतर श्री विश्वचैतन्याय नमः असे म्हणून जगाच्या स्वामीला म्हणजे विश्वचैतन्याला वंदन करायचे आणि मग शेवटी श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे.

श्री स्वामी समर्थ या तीन शब्दांतील श्री शब्दात गणेश आहे, स्वामी शब्दात जगाचा स्वामी परमेश्वर (महाशक्ती/विश्वचैतन्य) आहे व समर्थ शब्दात सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बुद्धीदेवता गणेश व जगाचा स्वामी परमेश्वर या दोघांचे आहे. हे सामर्थ्य कर्मयोद्ध्याला कर्मयोग्य फळ देण्याचे सामर्थ्य आहे. चांगल्या कर्माला चांगले फळ पण वाईट कर्माला वाईटच फळ असा त्याचा अर्थ आहे.

म्हणून आपण आपल्या बुद्धीच्या मदतीने व विश्वचैतन्याच्या आधाराने चांगले कार्य करीत असताना त्याचे फळ चांगले मिळावे अशी अपेक्षा करून असे फळ मिळण्यासाठी श्री गणेशा, स्वामी परमेश्वरा तुम्ही तुमचे सामर्थ्य वापरा अशी थोडक्यात प्रार्थना "श्री स्वामी समर्थ" हे तीन शब्द उच्चारून करायची. या तीन शब्दांतील ही अगदी थोडक्यात अशी ईश्वर प्रार्थना आहे. समर्थ म्हटले की पुढे आणखी काही मागायलाच नको कारण योग्य ते कर्मफळ द्यायला श्री स्वामी म्हणजे श्री गणेश व परमेश्वर हे दोघे समर्थ आहेत. पण कर्म जर वाईट असेल तर त्याचे वाईट फळ द्यायलाही श्री स्वामी समर्थ आहेत. वाईट कर्माचे कर्मफळ हे वाईटच मिळणार मग कितीही "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांची प्रार्थना करा. कारण ही सर्व रचना नियमबद्ध म्हणजे विधी लिखित आहे. परंतु चांगले कार्य करताना "श्री स्वामी समर्थ" अशी तीन शब्दांची प्रार्थना केल्याने एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती मिळते, आत्मबल मिळते.

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांनी बनलेल्या वाक्याचा आध्यात्मिक अर्थ वरीलप्रमाणे आहे. हाच गहन अर्थ मला श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रतिमेत दिसतो.

श्री स्वामी समर्थ!

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४ (श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन)

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

विश्वचैतन्य म्हणजेच परमेश्वर का?

विश्वचैतन्य म्हणजेच परमेश्वर का?

पदार्थातील (मॕटर) अणुकणांचा समुच्चय/संच जागा व्यापतो त्याला त्या पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) म्हणतात आणि अणुकणांच्या या वस्तुमानाला गती देऊन हालचाल करायला भाग पाडणारी जी क्षमता त्या पदार्थात असते त्या क्षमतेला त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) म्हणतात. अर्थात पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) व पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) मिळून पदार्थ (मॕटर) बनतो.

मनुष्य प्राणी (लिविंग मॕटर) हा अनेक जीवपेशींनी बनलेला मांसाचा गोळा आहे. हा गोळा म्हणजे शरीर (लिविंग मटेरियल स्टफ/मास) होय. पण या शरीरात उर्जा/शक्तीच (लिविंग एनर्जी) नसेल तर मानवी शरीराची हालचालच होऊ शकणार नाही. मानवी शरीरातील ही जिवंत उर्जा/शक्ती म्हणजे जिवंत चैतन्य होय. या जिवंत चैतन्यालाच आत्मा असे म्हणतात. आत्मा म्हणजे मन नव्हे. मन हे फक्त मेंदूत (एक मांसल अवयव) असते. पण चैतन्यमय आत्मा हा संपूर्ण शरीरभर असतो. हा आत्मा (चैतन्य) जिवंत शरीरातून निघून गेला की जिवंत शरीर मृत होते. अर्थात आत्मा हा मनापेक्षा मोठा असतो. त्याचा निवास मानवी मनातही (मेंदूत) असतो. मनातील या आत्मिक चैतन्यशक्तीलाच मनःशक्ती असे म्हणतात. मनःशक्ती हा शरीरातील चैतन्यशक्तीचा एक छोटासा भाग असतो.

पदार्थ सजीव असो की निर्जीव, त्या पदार्थात जर उर्जा/शक्ती नसेल तर त्या पदार्थाला काही अर्थ नसतो. सजीव शरीरातील उर्जा/शक्तीला आत्मा तर निर्जीव पदार्थातील उर्जा/शक्तीला फक्त उर्जा/शक्ती असे म्हणता येईल. सजीव शरीरातील चैतन्यशक्ती (आत्मा) निघून गेली तर खाली राहिलेल्या मृत शरीराला काही अर्थ रहात नाही. म्हणून मृत मानवी शरीराची आपआपल्या धर्म संस्कृती नुसार विल्हेवाट लावतात.

विश्वाला एक प्रचंड मोठा पदार्थ (जायंट मॕटर) मानले तर त्यातील पदार्थीय अणुकणांच्या वस्तुमानाला (जायंट मास) हलवण्यासाठी प्रचंड मोठी उर्जा/शक्ती अर्थात महाशक्ती (जायंट एनर्जी) विश्वरूपी पदार्थात असल्याशिवाय विश्वाची हालचाल होऊच शकत नाही.

पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थातील उर्जा/ शक्ती (एनर्जी) या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. मास व एनर्जी या दोघांत कोण कोणाला भारी हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. कारण एनर्जी ही अणुमासाला गतीमान करणारी प्रचंड मोठी क्षमता आहे. मग महाप्रचंड ताकदीच्या विश्वातील महाशक्तीलाच परमेश्वर मानावे का? महाशक्तीमान विश्व चैतन्य म्हणजेच महान परमेश्वर (चैतन्यप्रभू) का? हे प्रश्न मानवी मनात निर्माण होतात. खरं तर विश्व रूपी पदार्थ व त्यातील एकूण उर्जा/ शक्ती कायम स्थिर आहे. त्यात बदल होत नाही. परिवर्तनीय बदल होतोय तो विश्व पदार्थातील अणुमासाच्या वस्तुमानात. तसेच संपूर्ण भौतिक विश्वाची परिवर्तनशील भौतिक हालचाल ही निसर्ग नियमांनी म्हणा नाहीतर विश्व नियमांनी म्हणा स्थिर आहे. अस्थिर आहे ते मानवी मन!

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

अधीनता!

अधीनता!

अधीनता म्हणजे पराधीनता, बंधन, परावलंबन, ताबेदारी. निसर्गातील विविध पदार्थ, प्राणी, माणसे या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत. या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत म्हणजे त्या निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या अधीन आहेत. या चैतन्यशक्तीला परमेश्वर म्हटले तरी चालेल. 

परमेश्वर ही कोणी महाशक्तीमान व्यक्ती नव्हे तर ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती होय. ती या निसर्गातच आहे, निसर्गाच्या बाहेर नाही. या महाशक्तीनेच निसर्गाचे पदार्थीय रूप धारण केले आहे. याचा अर्थ विश्वात अगोदर शक्ती (एनर्जी) व नंतर पदार्थ (मॕटर). पण तरीही शक्ती व पदार्थ (आध्यात्मिक भाषेत आदिशक्ती व शिव) हे दोघे एकमेकांपासून अलग नाहीत. हे विश्व शक्ती व पदार्थ (एनर्जी व मॕटर), शक्ती व शिव यांनी बनलेले आहे. विश्वाला निसर्ग असे मी म्हणतो.

आदिशक्ती ही शिवापेक्षा श्रेष्ठ होय कारण शिव ही तिची निर्मिती होय. निर्मिती ही निर्माणकर्त्या महाशक्ती पेक्षा मोठी होऊ शकत नाही. परंतु मनुष्य त्याच्या तोकड्या भावनेने व तोकड्या बुद्धीने निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीला विविध देवरूपांत बसविण्याचा प्रयत्न करतो. परंतु असा प्रयत्न हा व्यर्थ असतो कारण निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती ही महाशक्तीमानच नव्हे तर अनाकलनीयही आहे. तिला एखाद्या महामानवी व्यक्तिमत्त्वात बसवणे चूक आहे. त्या महाशक्तीला कोणत्याही देवावतारात, देवदूत, देव प्रेषितात किंवा महापुरूषात बसवता येत नाही. पण माणूस स्वतःच्या कल्पनेने तसा बळेच प्रयत्न करतो.

निसर्गातील सर्व पदार्थ, प्राणी व माणसे निसर्गाच्या (निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या) अधीन आहेत म्हणून माणसाने या अधीन पदार्थ, प्राणी, माणसांच्या अधीन रहावे का? अधीन रहाणे व आहारी जाणे यात फरक आहे. अधीन रहाणे म्हणजे शरणागत, गुलाम राहणे व आहारी जाणे म्हणजे वाहवत जाणे किंवा नदी प्रवाहातील ओंडक्या प्रमाणे प्रवाहाबरोबर वाहत जाणे. या दोन्ही गोष्टी मनुष्याने इतर पदार्थ, प्राणी व माणसांच्या बाबतीत नेटाने टाळल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाची निसर्गातील महाशक्तीपुढे असलेली अधीनता वेगळी आहे. प्रत्येकाची ताकद (स्ट्रेन्ग्थ) वेगळी, प्रत्येकाचा कमकुवतपणा (विकनेस) वेगळा. त्यामुळे कोणी कोणाच्या किती अधीन रहावे याला ठराविक प्रमाण आहे. एखादी महान व्यक्ती जर आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर तिला आदराने वंदन करणे वेगळे आणि तिच्यापुढे सतत शरणागत, गुलामीच्या भावनेने झुकून राहणे वेगळे. निसर्गातील महाशक्तीपुढे झुकून राहणे वेगळे व एखाद्या शक्तिशाली व्यक्तीपुढे झुकून राहणे वेगळे कारण या जगातील कोणतीही व्यक्ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती एवढी मोठी असू शकत नाही. जगात शेरास सव्वाशेर निर्माण होतोच कारण तशीच रचना या चैतन्य महाशक्तीची आहे. म्हणून माणसाने निसर्गातील महाशक्ती सोडून इतर कोणाच्याही अधीन राहू नये मग कोणी कितीही मोठा असो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

रविवार, ७ एप्रिल, २०२४

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

या जगात निसर्ग नियमांपासून कोणीही मुक्त नाही, स्वतंत्र नाही. ज्यांना आपण परमेश्वराचे अवतार मानतो त्यांना सुद्धा निसर्ग विज्ञानाचे चक्र पार करता आले नाही. त्यांनाही नैसर्गिक भोग भोगावेच लागले व त्यांचाही अंत झाला. दैवी चमत्कार करून त्यांना अमर होता आले नाही. कालानुरूप मंदिरे जीर्ण होतात व त्यांचा जीर्णोद्धार करावा लागतो. देव देवतांच्या मूर्त्यांना कालानुरूप तडे जातात व त्यावर रासायनिक लेप लावावा लागतो. अर्थात ज्या देव मूर्त्यांत आपण परमेश्वर बघतो त्या मूर्त्या निसर्ग नियमांच्या अधीन आहेत. परमेश्वर हा जर निसर्गाचा निर्माता असे मानले तर तो कधीही निसर्गाचा गुलाम असता कामा नये. उलट निसर्गच त्या निर्मात्याच्या म्हणजे परमेश्वराच्या तालावर नाचत राहिला पाहिजे. खरंच नाचतो का निसर्ग परमेश्वराच्या तालावर? खरं तर निसर्ग त्याच्या तालावर नाचतो व इतरांना त्याच्या तालावर नाचवतो. निसर्गाच्या या वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना त्याच्या आत असलेला म्हणजे निसर्गाधीन असलेला परमेश्वर वेगळा व त्याच्या बाहेर असलेला म्हणजे निसर्गावर बाहेरून हुकूमत गाजवत असलेला परमेश्वर वेगळा, असे दोन वेगळे परमेश्वर आहेत का हे कळायला मार्ग नाही. निसर्गात जगताना परमेश्वर सुद्धा जिवंत जगता आला पाहिजे. तो प्रत्यक्षात जगता आला पाहिजे, कल्पनेत नव्हे. परंतु मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही. परमेश्वराचे मानले गेलेले देवावतार किंवा प्रेषित यांना जिवंत परमेश्वर मानणे चूक की बरोबर हे मानवी बुद्धीने नीट विचार करून ठरवावे. कदाचित परमेश्वर ही कोणी सर्वशक्तिमान व्यक्ती नसून ती सर्वशक्तिमान निसर्ग उर्जा, निसर्ग शक्ती असावी. ही महाशक्ती हाच निसर्गासह मनुष्य जीवनाचा स्त्रोत असावा? समजा असे जर कदाचित असेल तर मग त्या महाशक्तीची आध्यात्मिक ध्यानधारणा करून तिला जिवंत जगता येईल का? खरं तर एवढया मोठ्या शक्तीला स्वतःत सामावून घ्यायला मनुष्य एवढा सामर्थ्यशाली आहे का? आणि त्या अनाकलनीय महाशक्तीची प्रार्थना करून ती खरंच कोणाला पावत असेल का? हे प्रश्न बुद्धी असलेल्या माणसाच्या मनात निर्माण होणार म्हणजे होणार!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

NOTHING IS CHANGED, NOTHING WILL CHANGE!

NOTHING IS CHANGED, NOTHING WILL CHANGE!

Nothing is changed and nothing will change. The total matter & total energy of world is constantly the same. The cycles within Nature have remained  constantly the same. The human world has been constantly competitive with all types of people within it namely rich industrialists, shrewd politicians, cruel gangsters, scientists and technocrats, intellectuals, lawyers and celebrities and of course common people. One has to choose person of his class and category to develop life friendship for close give and take. Really speaking, everything is almost fixed and people have little choices. In past chitchatting was face to face, it is now on facebook without anybody having met face to face. The radio, television, cinema houses were entertainment and  time pass platforms in the past. Now in addition to them many social media platforms have flourished for time pass purpose. The time pass business has thus remained constant. So please do not live in the fantasy of change. Nothing is changed and nothing will change. Just observe and watch the show which is constantly the same all the time forever.

-©Adv.B.S.More, 6.4.2024

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

छोटा चंद्र पृथ्वी जवळ म्हणून मोठा!

छोटा चंद्र पृथ्वी जवळ म्हणून होतो पृथ्वीला मोठा, तर मोठा सूर्य पृथ्वी पासून लांब म्हणून होतो पृथ्वीला छोटा, छोट्या संधीच सतत जवळ राहिल्यावर व मोठ्या संधी सतत लांब राहिल्यावर माणसाच्या प्रगतीला सूर्य ग्रहण लागते अर्थात सूर्यासारखे तेजस्वी यश लांब राहते! -ॲड.बी.एस.मोरे