https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० मार्च, २०२४

कृत्रिमतेचा भस्मासूर!

कृत्रिमतेचा भस्मासूर!

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची जी सृष्टी निर्माण केली ती नैसर्गिक उत्क्रांती पद्धतीने. या निर्मितीचा उद्देश निर्मित पदार्थांचा पदार्थांकडून नैसर्गिक वापर हाच होता. पण याच निसर्गाने पृथ्वीवर माणूस नावाचा सजीव पदार्थ पृथ्वीवर उत्क्रांत केला आणि त्याला अशी काही वासना व बुद्धी दिली की त्याने निसर्गाच्या मूळ नैसर्गिक उद्देशाचीच वाट लावली. त्याच्या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण सृष्टीची मूळ नैसर्गिकता नष्ट करून तिच्यात कृत्रिमता ठासून भरली.

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची सृष्टी निर्माण केली व तिच्यात आंतर वापराची एक शृंखला तयार केली. या आंतरवापर व्यवहारात निसर्गाने मनुष्याला उच्च स्थानावर आणून बसवले. मानवाची जैविक उत्क्रांतीच सृष्टीच्या पर्यावरणीय पिरॕमिडमध्ये सर्वोच्च स्थानावर झाल्याचे (की केल्याचे?) दिसत आहे. मनुष्याची बुद्धी सुद्धा उत्क्रांतीतून अधिकाधिक  तल्लख होत गेली. या बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विविध पदार्थांचे गुणधर्म तर शोधलेच पण या विविध पदार्थांमधील आंतरवापरी साखळी सुद्धा शोधून काढली. मग मनुष्याने स्वतःच या सर्व पदार्थांचा स्वतःच्या मर्जीनुसार वापर सुरू केला. हा वापर खरोखरच नैसर्गिक वापर राहिलाय का की मनुष्याकडून त्याचे कृत्रिम वापरात रूपांतर केले गेलेय हा प्रश्न आहे.

पदार्थांच्या नैसर्गिक वापराचे तांत्रिक कृत्रिम वापरात रूपांतर केल्यानंतर मनुष्याने या पदार्थांची त्यांच्या कृत्रिम वापरासह जी आंतरमानवी देवाणघेवाण सुरू केली ती तरी नैसर्गिक राहिलीय का? निसर्गाने माणसासह विविध पदार्थ निर्माण केले पण त्यांची पैशातील किंमत  माणसाने स्वतःच्या सोयीनुसार ठरविली. ही किंमत मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम आहे. विविध पदार्थ वैशिष्ट्यांना संलग्न विविध मानवी सेवा निर्माण करून माणसाने या सेवांची किंमतही पैशात ठरविली. वस्तू व सेवा कर (गुडस अँड सर्विस टॕक्स म्हणजे जी.एस.टी.) हे या पैशातील किंमतीचे सरकारी पिल्लू. मुळात वस्तू व सेवांची आंतरमानवी आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी निर्माण केला गेलेला पैसा हीच मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम गोष्ट आहे.

पैसाच काय पण ज्यावर व ज्यासाठी माणसाचे राजकारण चालते ती राजकीय सत्ता ही सुद्धा कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित गोष्ट होय. कृत्रिमतेची ही यादी अपूर्ण आहे. हल्ली हल्लीच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही मानवाने शोध लावलाय व तिचा वापरही सुरू केलाय. माणसाने सृष्टी मध्ये नैसर्गिकता किती शिल्लक ठेवलीय याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे.

माणूस नैसर्गिक जीवन जगणेच विसरून गेलाय. त्याला कृत्रिमतेची इतकी सवय लागलीय की तो या कृत्रिमतेतच आयुष्य जगतो व आयुष्य संपवतो. आयुष्यभर तो या कृत्रिमतेचे मार्केटिंग करून तिचीच देवाणघेवाण करीत राहतो. इतकेच काय कृत्रिमतेच्या कृत्रिम भीतीने तो स्वतःचे जीवन त्रस्त, तणावग्रस्त करून टाकतो. कृत्रिमता ही पूरक गोष्ट आहे. ती मूळ नैसर्गिकतेची जागा घेऊ शकत नाही हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.३.२०२४

सोमवार, १८ मार्च, २०२४

उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी मिळाली नाही तर?

उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी मिळाली नाही तर?

माणूस उच्च ध्येयाने उच्च शिक्षण घेतो. उच्च शिक्षणाची प्रमाणपत्रे लोकांना दाखवित फिरण्यासाठी तो उच्च शिक्षण घेत नाही. पण कठोर बौद्धिक परिश्रमातून मिळविलेल्या उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी म्हणजे उच्च कामाची योग्य संधी जर मिळाली नाही तर उच्च शिक्षित माणसापुढे उच्च ध्येय रहात नाही व उच्च शिक्षण त्याच्या मेंदूवर व्यर्थ भार होऊन बसते. असा उच्च शिक्षित माणूस मग दिशाहीन होऊन छोट्या छोट्या गोष्टींतच त्याचे आयुष्य वाया घालवतो.

निसर्गाचा कारभार किचकट आहे व वाढत चाललेल्या लोकसंख्येने तो अधिकाधिक स्पर्धात्मक व जास्त किचकट झाला आहे. उच्च शिक्षण हे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य देते. उच्च शिक्षण सतत मोठी आव्हाने डोक्यावर घ्यायला आतुर असते. तीच तर उच्च शिक्षणाची कसोटी असते. अशा या उच्च शिक्षणाला मोठी आव्हाने पेलण्याची संधीच दिली नाही तर उच्च शिक्षण उच्च शिक्षित माणसाच्या डोक्यावर मोठा भार होऊन बसते. कशाला घेतले एवढे मोठे उच्च शिक्षण असे उदास विचार अशा उच्च शिक्षित व्यक्तीच्या मनात सारखे घोंघावत राहतात. समाजात जेव्हा अशिक्षित किंवा अर्ध शिक्षित माणसे पैसा व सत्ता यांच्या जोरावर समाजात दिमाखात मिरवतात तेव्हा तर ही उदासिनता जास्त वाढते.

उच्च शिक्षणातून मिळविलेल्या उच्च ज्ञानाला मोठ्या आव्हानांचे मोठे अवकाश (स्पेस) मिळाले नाही तर उच्च शिक्षण भरकटते. ते शिक्षण छोट्या व साध्या गोष्टींतच अडकून, तिथेच घुटमळत बसते. साधे गवत कापायला खुरपे बस्स असते. तिथे तलवार काय कामाची? पण धारधार उच्च शिक्षणाला जर असे साधे गवत कापण्याची वेळ आयुष्यभर आली तर त्या उच्च शिक्षणाची अवस्था काय होत असेल? मोठ्या गोष्टी जर उच्च शिक्षणाला अवास्तव व छोट्या गोष्टी वास्तव झाल्या तर त्या उच्च शिक्षणाला छोट्या गोष्टींवरच सतत लक्ष केंद्रित करणे शक्य होईल काय? त्या उच्च शिक्षणाला अशी परिस्थितीत छोट्या गोष्टीच अतिशय अवघड वाटू लागल्या तर त्यात त्या उच्च शिक्षणाचा काय दोष?

जगावर प्रभुत्व गाजवणाऱ्या मानव समाजाचे संपूर्ण अवकाश (स्पेस) हे खरे तर मूलभूत शिक्षण व त्यापुढील उच्च शिक्षण यांनी व्यापले पाहिजे. पण ते खरे व्यापलेय कोणी? तर दोन शक्तीशाली गटांनी. एक गट आहे श्रीमंत भांडवलदारांचा व दुसरा गट आहे बाहुबळी राजकारण्यांचा. या दोन्ही गटांची भागीदारी आताची नाही. ती कितीतरी काळापासून पिढ्यानपिढ्या चालू आहे. या अतूट भागीदारीत शारीरिक कष्ट करणाऱ्या शेतकरी-कामगारांचा व बौद्धिक कष्ट करणाऱ्या सुशिक्षित व्यवस्थापक-कर्मचाऱ्यांचा वाटा अगदीच नगण्य आहे. खरं तर हे शारीरिक व बौद्धिक कष्टकरी वरील दोन शक्तीशाली गटांचे अर्थात भांडवलदार व राजकारणी यांच्या भागीदारीचे नोकर चाकर, गुलाम राहिले आहेत व रहात आहेत.

मेहनतीने घेतलेल्या उच्च शिक्षणाला त्याचे कर्तुत्व गाजवण्याची संधी कोण देणार? माणसांनी बनवलेला कायदा की हा कायदा राबवणारी माणसे? पण हा कायदा खऱ्या अर्थाने कोण राबवतेय? समाजातील मूठभर भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना! आता हे दोन गट कायद्याची अंमलबजावणी कायद्याप्रमाणे करतात की नाही हे पाहण्यासाठी व न्यायाचे हुकूम देण्यासाठी जरी स्वतंत्र न्याययंत्रणा असली तरी तिलाही तिच्या मर्यादा आहेत. न्यायाधीश मंडळी ही सुद्धा माणसेच असतात व न्यायालयात अशिलांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर युक्तिवाद करणारी वकील मंडळी ही सुद्धा माणसेच असतात. आणि शेवटी न्यायालयात भांडवलदार व राजकारणी या दोन शक्तीशाली गटांना अशील म्हणून स्वीकारून त्यांची वकिली करणारे मूठभर वकील हे सुद्धा फार मोठे वकील असतात. त्यांच्यापुढे गरीब व अशक्त अशा सर्वसामान्य अशिलांचा व त्यांची हिंमतीने वकिली करणाऱ्या वकिलांचा काय आणि किती निभाव लागणार? तरीही आपण म्हणायचे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. अशा परिस्थितीत उच्च शिक्षणाला उच्च दर्जाच्या कामाची संधी कशी मिळणार? कारण शेवटी अशी संधी देणारे आहेत कोण? वर उल्लेखित भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना? त्यांच्याकडे उच्च शिक्षण असो नसो, ते प्रचंड शक्तीशाली आहेत हे आपल्या मानव समाजाचे कटू वास्तव आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर हे कटू वास्तव कळल्यावर बऱ्याच गोष्टी मनाला पटेनाशा होतात. पण त्या सहन करीत राहण्याशिवाय पर्याय नसतो. पटवून घ्यावे लागते व त्यासाठी मनावर विजय मिळवावा लागतो. मनावर विजय मिळविण्याला पर्याय नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.३.२०२४

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

परिक्रमा!

परिक्रमा!

निसर्गातील विविधतेशी देवधर्माची विविधता कशी संलग्न आहे हा माझा संशोधनाचा विषय. तसा मी कोणी वैज्ञानिक शास्त्रज्ञ किंवा आध्यात्मिक पंडित नाही. मी एक निरीक्षक आहे व निरीक्षणातून माझ्या अल्प बुध्दीला जे काही आकलन होते त्या आकलनाची मी शब्दांत मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी जे काही बोलतो किंवा लिहितो ते परिपूर्ण असूच शकत नाही. त्यात त्रुटी राहणारच. तेंव्हा चुकभूल द्यावी घ्यावी.

माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार निसर्ग विज्ञानाच्या विविधतेचे जसे एक गोल चक्र आहे तसे परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेचेही एक गोल चक्र आहे. ही दोन्ही वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेली आहेत. ही दोन्ही चक्रे वेळ आणि काळाच्या घड्याळात (कालचक्रात) गोल फिरत असतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या चक्राला मी वेळचक्र म्हणतो तर तिच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा (परिक्रमा) पूर्ण करण्याच्या चक्राला मी कालचक्र म्हणतो. संपूर्ण विश्वाचे (ब्रम्हांडाचे) कालचक्र खूप मोठे आहे हा माझा निरीक्षणावर आधारित असलेला एक अंदाज.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण होणे हे शारीरिक आरोग्यासाठी व मनःशांतीसाठी खूप आवश्यक असते. या परिक्रमेत अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ शकतो जसा हृदयाच्या पंपिंगचे सर्किट पूर्ण करणाऱ्या विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हा २ एवी हार्ट ब्लॉक मला सद्या चालू आहे जो माझा हृदयविकार आहे. माझ्या याच हार्ट ब्लॉक मधून मला वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे व त्यांची परिक्रमा कळली असे म्हणायला हरकत नाही. संकटे, आव्हाने यांच्यातूनच अशाप्रकारे सकारात्मक गोष्टी कळतात.

निसर्ग विज्ञानाच्या विविधतेची परिक्रमा करताना कोणत्या तरी एकाच गोष्टीत अडकून पडले की वैज्ञानिक परिक्रमा पूर्ण होत नाही. अगदी तसेच परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेची परिक्रमा पूर्ण करताना कोणत्या तरी एकाच देव किंवा देवतेत अडकून पडले की सर्व देव देवतांची परिक्रमा पूर्ण होत नाही. निसर्ग हा वैज्ञानिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो तसा परमेश्वर हा आध्यात्मिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो. निसर्ग व परमेश्वर एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहेत तसे विज्ञान व अध्यात्म एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहे. निसर्गाचा (सृष्टीचा) निर्माता व नियंता परमेश्वर असल्याने शेवटी वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांच्या परिक्रमा त्याच्या भोवतीच पूर्ण होत असतात, फिरत असतात.

कालचक्री घड्याळात फिरणाऱ्या वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण करताना एखाद्या वैज्ञानिक गोष्टीतच किंवा एखाद्या आध्यात्मिक गोष्टीतच जास्त वेळ गूंतून, अडकून राहणे म्हणजे दोन्ही चक्रांची परिक्रमा पूर्ण करण्याच्या मार्गात अडथळा/ब्लॉक निर्माण करणे. असा अडथळा (ब्लॉक) वैज्ञानिक दृष्ट्या आणि/किंवा आध्यात्मिक दृष्ट्या अनैसर्गिक असतो. वैज्ञानिक व आध्यात्मिक परिक्रमेत असा अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ नये व झालाच तो लवकर दुरूस्त व्हावा म्हणून सर्व देव देवतांची व परमेश्वराची मनोमन प्रार्थना!

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.३.२०२४

गुरुवार, १४ मार्च, २०२४

वास्तव!

वास्तव!

अल्पज्ञानी, अल्पबुद्धी, अल्पशक्ती, अल्पजीवी माणूस असल्याने मला जेवढा अनुभव आला, जेवढे ज्ञान मिळाले तेवढेच मर्यादित मी बोलू व लिहू शकतो. माझ्या अल्पज्ञानातून व अल्पबुद्धीतून मला ज्ञात झालेली पृथ्वीवरील जगातील वास्तवे तीन आहेत.

पहिले वास्तव हे की, जगात विविध मानव समुदायांचे विविध धर्म, धम्म आहेत. धर्म हे देव आस्तिक तर धम्म हे देव नास्तिक असा फरक आहे. अनेक देव आस्तिक धर्मांच्या अनेक देवदेवता, अनेक धर्मसमजूती व अनेक धर्मपरंपरा आहेत. बुद्धीला पटो अगर न पटो या सर्व आस्तिक धर्मांचा व नास्तिक धम्मांचा आदर करणे हे अपरिहार्य आहे. त्यांच्यावर टीका, टिप्पणी करणे धोक्याचे आहे कारण लोकांची भावनिक, बौद्धिक पातळी सारखी नसते. याच लोकांत आपल्याला रहायचे आहे हे वास्तव आहे.

दुसरे वास्तव हे की, या जगातील आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता ही काही ठराविक भांडवलदार व राजकारणी मंडळींकडे एकवटलेली आहे. सर्वसामान्य माणसांचे एकूण  आर्थिक संपत्तीतील भागभांडवल व एकूण सत्तेतील वाटा नगण्य आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेतही हीच गोष्ट चालू आहे. लोकांचे राज्य ही लोकशाहीची संकल्पना एक मिथ्यक आहे. वास्तव भलतेच आहे. नीट अभ्यास व निरीक्षण केले तर दिसून येईल की सर्वसामान्य माणसे ही पिढ्यानपिढ्या मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी लोकांची गुलाम होऊन किड्या मुंग्यांचे जीवन जगत आहे. शिक्षणाने यात काहीही फरक पडलेला नाही. अशिक्षित व सुशिक्षित अशी दोन्ही सर्वसामान्य माणसे कायम मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींची गुलाम आहेत. शिक्षणाने त्यांना गुलामगिरी तून मुक्त केलेले नाही. साम्यवादी देशांतही राजसत्ता काही ठराविक मूठभर राजकीय लोकांच्या हातातच एकवटलेली असते. त्यामुळे तिथेही मूठभरांची हुकूमशाही व सर्वसामान्य  जनतेची गुलामगिरी चालू आहे.

तिसरे वास्तव हे की, जगातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ परिवर्तनशील म्हणजे नाशिवंत व तात्पुरत्या काळा पुरते आहेत. त्यांची कोणतीही एक अवस्था कायम नाही. त्यामुळे या पदार्थांचाच सजीव भाग असलेला माणूस सुद्धा नश्वर, नाशिवंत आहे. नैसर्गिक जीवनचक्रात अडकलेले मनुष्य जीवन नाशिवंत असल्याने तात्पुरते आहे. त्यामुळे जीवनातील इच्छा आकांक्षा, राग लोभ, सुख दुःखे या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. तरीही या जगात जन्म घेतल्यावर जीवनाचे भोग हे भोगावेच लागतात व जीवनातील त्रास, यातना या सहन कराव्याच लागतात व शेवटी मृत्यूचा स्वीकार हा करावाच लागतो.

मनुष्य जीवनाची वरील तीन वास्तवे ही सरळस्पष्ट वास्तवे आहेत. त्यांत बदल करणे हे कोणत्याही एका माणसाच्या हातात नसल्याने त्यांचा निमूटपणे स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४

बुधवार, १३ मार्च, २०२४

कसे आहात, एकदम मस्त!

कसे आहात, एकदम मजेत!

कसे आहात या लोकांच्या प्रश्नाला "एकदम मजेत" असेच उत्तर द्यायचे ठरवलेय. स्वतःचे दुःख दुसऱ्यांना सांगितल्याने हलके होते असा माझा गैरसमज होता. तो फार उशिरा दूर झाला. स्वतःचे दुःख दुसऱ्यांना सांगितल्याने ते हलके होण्याऐवजी जड होते हा माझा जिवंत अनुभव. याचे कारण हेच की काही अपवाद सोडले तर असल्या फुकटच्या चौकशा करणाऱ्या लोकांचा दुःखात काही उपयोग तर होत नाहीच पण हे लोक सतराशे साठ फुकटचे सल्ले देऊन डोक्याला ताप करतात.

आपला आनंद शेअर करून बघा. तो किती लोकांकडून सगळीकडे शेअर केला जातोय हे जरा बघा आणि मग आपले दुःख शेअर करून बघा. त्यात तिखट, मीठ, लसूण, मसाला घालून ते दुःख लोकांकडून गावभर फिरवले जाईल. लोकांना इतरांच्या चटपटीत गोष्टी विशेष करून इतरांची भांडणे, इतरांचे दुःख ऐकण्यात/वाचण्यात भयंकर रस असतो.

कॉलेजात असताना एका मित्राने मला सहज एक चांगला सल्ला दिला होता. तो सल्ला म्हणजे कोणी "हाऊ आर यू" असा प्रश्न विचारला की त्याला "बेटर दॕन यू" असे उत्तर द्यायचे. म्हणजे "तू कसा आहेस" या प्रश्नाला "तुझ्यापेक्षा सुखी" असे उत्तर द्यायचे. मित्राच्या या सल्ल्याचा अर्थ मला त्यावेळी नीट कळला नाही पण आता अनेक अनुभवांतून तो नीट कळलाय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.३.२०२४

किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य माणसांचे जीवन, किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य लोकांनी थोडे अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. काय करतोय आपण आयुष्यात याचे थोडे तरी मनन, चिंतन करावे. देवाच्या ध्यानधारणेपेक्षा वास्तव जीवनाचे हे मनन, चिंतन फार महत्त्वाचे आहे. या मनन, चिंतनात जगाच्या एकूण संपत्तीत लाखो, करोडो सर्वसामान्य लोकांचे भागभांडवल किती हे नीट समजून घ्यावे व मग मोठमोठ्या गोष्टींच्या हवेतील गप्पा माराव्यात.

खरं तर गरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना लहानपणापासून मर्मभेदी शिक्षण मिळतच नाही. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत गोल गोल फिरवत एवढा काही मसाला शिकवला जातो की विचारू नका. पण त्या ढीगभर मसाल्यात मर्मातल्या मूळ गोष्टी किती असतात? सर्वसामान्यांच्या मुलांना सुरूवातीपासूनच या गोष्टी शिकवल्या जात नाहीत कारण काय तर म्हणे बालबुद्धीला त्या झेपणार नाहीत? मग मोठ्या भांडवलदार व पॉवरफुल राजकारण्यांच्या मुलांना लहानपणापासूनच घरात बाळकडू दिले जाते ते मोठ्यांच्या त्या मुलांना कसे झेपते? ही मोठ्यांची मुले फक्त नावाला शाळा, कॉलेजात जातात. खरे शिक्षण त्यांना घरातूनच मिळत असते.

आयुष्यातील छोट्या गोष्टी कोणत्या व मोठ्या गोष्टी कोणत्या हे समजून घेऊन छोट्या गोष्टींना कमी वेळ व कमी शक्ती आणि मोठ्या गोष्टींना जास्त वेळ व जास्त शक्ती दिली गेली पाहिजे हे सर्वसामान्यांना कधी कळते? छोट्या गोष्टींतच आयुष्याचा मोठा काळ व मोठी शक्ती वाया घालवल्यावर म्हातारपणी हे कळते. पण तोपर्यंत आयुष्यातील अमूल्य वेळ टळून गेलेली असते.

जगातील मोठया गोष्टी ठराविक मोठ्या लोकांच्या ताब्यात का आहेत व त्या त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या कोणत्या ताकदीवर चालू राहिल्यात यातील वास्तव कधी समजून घेणार सर्वसामान्य माणसे? सर्वसामान्य माणसांना कायम छोट्या गोष्टींतच गुंतवून ठेवून मोठ्या गोष्टींचा विचार करण्याची सुद्धा संधी मिळू द्यायची नाही हा तर मोठ्यांचा मोठा गेम आहे जो पिढ्यानपिढ्या चालू आहे.

सर्वसामान्य माणसे म्हणजे मोठ्या लोकांच्या मोठ्या व्यवहारांत प्रत्यक्ष भाग न घेता त्यांचा फक्त हिशोब ठेवणारी हिशोबनीस माणसे. बँकेत रोखपाल (कॕशियर) काय करतो तर लोकांच्या नुसत्या नोटा मोजतो. पण त्या नोटांचा मालक तो असतो का? या नोटांतील मोठ्या गठ्ठ्याचे खरे मालक कोण असतात तर मोठे भांडवलदार व मोठे राजकारणी असतात. या रोखपालाला नोटा मोजण्याच्या कामाचा मासिक पगार किती दिला जातो? चिल्लर पगार असतो तो. कारण त्या नोटांमागील मोठ्या व्यवहारांत त्या रोखपालाचा सहभाग नसतो. नव्हे तशी संधीच त्याला मिळू दिली जात नाही. सर्वसामान्य गरिबांच्या उच्च शिक्षित मुलांच्या तोंडावर पैशाचे असे छोटे छोटे तुकडे फेकले जाऊन त्यांना मिंधे केले जाते, गुलाम केले जाते. गुलामगिरीचा घाऊक बाजार भरला आहे जगात मग ते भांडवलशाही देश असोत की साम्यवादी देश असोत.

ब्रिटिश लोकांची शिक्षण व्यवस्था ही भारतीयांना ब्रिटिशांचे गुलाम बनविण्याची शिक्षण व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थेत काही बदल झालाय का? कसला बदल आणि कसला विकास आणि कोणाचा विकास? मूठभर श्रीमंत भांडवलदारांचा विकास? का झाले सर्वसामान्य गरिबांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण महाग? गुलामगिरीच्या मानसिकतेतून, किड्या मुंग्यांच्या जीवनातून सर्वसामान्य माणसांना बाहेर काढणारे मर्मभेदी शिक्षण लहानपणापासून सर्वसामान्यांच्या मुलांना देण्याची मूलभूत गरज आहे. भारतीय राज्यघटनेनुसार हा शिक्षण हक्क सर्वसामान्य भारतीयांचा मूलभूत हक्क आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४

मंगळवार, १२ मार्च, २०२४

लग्ने जमवताना सावधान!

लग्ने जमवताना सावधान!

समाजमाध्यम बंद करण्यापूर्वी एक नमुना हाही वाचा. आमच्या शेजारी एका सोसायटीत घडलेली लग्नाची ही सत्य घटना. हिंदू मराठा मुलगी दिसायला गोरी, गोमटी छान, सुंदर. शिक्षण बी.काॕम. खाजगी कंपनीत अकौंटंटची नोकरी महिना ३०००० रूपये पगार. तिच्या आईवडिलांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या मार्फत एल.आय.सी. सरकारी कंपनीतला एम.काॕम. शिकलेला व महिना ५०००० रू. पगारवाला नवरा मुलगा मुंबईत बघितला. पण मुलगी सहा महिनेही तिथे नांदली नाही. नवरा फारच कंजूष आहे हे कारण घेऊन आईवडिलांकडे परत आली व घटस्फोट घेऊन रिकामी झाली. तिचे आईवडील त्या नातेवाईकाला आता सारख्या शिव्या देत आहेत की त्याच्यामुळेच त्यांच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाले. 

मग ती घटस्फोटित मुलगी एक वर्ष घरी बसल्यावर तिच्या आईने तिच्या ओळखीच्या मैत्रिणी मार्फत एक घटस्फोटित मुलगा बघितला. तो पण एम.एस्सी. व चांगल्या खाजगी कंपनीत महिना ६०००० रूपये पगारवाला होता. मग घटस्फोटित मुलीच्या आईने या घटस्फोटित मुलाबरोबर आपल्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न लावले. ही मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्या बरोबर चांगली दीड वर्षे नांदली. त्या काळात त्यांना एक मूल झाले (मुलगा). मात्र पुढे त्या नवरा बायकोची काही घरगुती कारणांवरून भांडणे होऊ लागली आणि एके दिवशी ती मुलगी त्या बाळाला घेऊन आईवडिलांच्या घरी परत आली ती कायमचीच. आता तिने दुसऱ्या घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केलाय. आणि त्या मुलीची आई तिच्या त्या मैत्रिणीला येता जाता सारखी शिव्या देत असते की त्या मैत्रिणी मुळेच तिच्या मुलीचे वाटोळे झाले.

आजूबाजूला अशा घटना घडताना बघून लोक सावध झालेत. माझ्या पुतण्याचा बायोडाटा आमच्याच सोसायटीतील दोघांकडे मी जेव्हा दिला तेव्हा त्यानी मला रिस्पेक्ट देण्यासाठी तो त्यांच्याकडे घेतला पण शेवटी हात झटकून मला वधूवर सूचक मंडळ बघा असा सल्ला दिला. हल्ली लोक इतरांची लग्ने जमवायला घाबरतात. कारण चांगले झाले तर आमच्या नशिबाने आणि वाईट झाले तर तुमच्यामुळे असाच लोकांचा पवित्रा असतो. 

गंमत ही की, वरील सत्य घटनेतील मुलीची आई फार देवभक्त. तिने मुलीच्या दोन्ही लग्नाच्या वेळी तिची सगळी कुलदैवते, ग्रामदैवते व इष्ट दैवते गोळा केली होती. पण या  सगळ्या देवदेवतांनी तिच्या मुलीच्या संसारावरून दोन वेळा चांगला नांगर फिरवला. म्हणून मी कधीही जास्त देवदेव करीत नाही. 

आमच्या घरातील देव्हाऱ्यात माझ्या व माझ्या बायकोच्या कोणत्याही कुलदैवताला व ग्रामदैवताला स्थान नाही. कारण मी काय किंवा माझी मुलगी काय आम्ही खूप मेहनतीने शिक्षण घेत असताना, स्वकर्तुत्वावर व्यवसाय, नोकरी करीत असताना व जीवनात आडव्या येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करीत असताना यातील कोणतेही देव आम्ही जवळ केले नव्हते. साडे नाही, ढवळस नाही की कुर्डु नाही आणि तिथले कोणतेही कुलदैवत किंवा ग्रामदैवत आमच्या घरात आम्ही जवळ केले नाहीत. अहो, लग्नातील सत्यनारायण पूजा सोडून नंतर कधी साधी सत्यनारायण पूजा मी माझ्या घरात घातली नाही. इतकी घरे बदललीत मी की प्रत्येक ठिकाणी सत्यनारायण पूजा घालीत बसलो असतो तर अनेक पूजा कराव्या लागल्या असत्या. मी कधीही श्रावण पाळत नाही की  गेल्या ३९ वर्षाच्या संसारात आम्ही कधी आमच्या घरात श्रावणातील सत्यनारायण पूजा घातली.

आमच्या घरात, देव्हाऱ्यात काही मुख्य देव आहेत ते म्हणजे गणपती, ब्रम्हा, विष्णू, महेशाचा एकावतार गुरूदेव दत्त (गुरू दत्तामध्ये शंकर असल्याने त्याची वेगळी पूजा नको), गुरूदेव दत्ताचाच अवतार ज्यांना समजले जाते ते श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी देवी (आम्ही एकच शक्ती मानतो व सरस्वती, पार्वतीला एकाच महालक्ष्मी देवीत बघतो) आणि माझ्या गावचा पंढरपूरचा विठ्ठल (पांडुरंग) या देवांनाच प्रमुख स्थान आहे. बाकी कुठल्याही कुळदैवत, ग्राम दैवत यांना आमच्या घरात स्थान नाही. कारण त्यांचे सोवळे ओवळे मोठे असते व ते आम्हाला जमणारे नाही, परवडणारे नाही. उगाच कोपले तर काय करायचे?

या उपदेवांची भीती आम्ही मनात कधी घेत नाही कारण मुख्य देव आमच्या सोबत असतात. बाकी मनुष्य जीवन आहे. संकटे येणार. आजार येणार. आता कोणी असेही म्हणेल की मी कुळदैवताला, ग्रामदैवताला जवळ न केल्यामुळे मला माझा विद्युत प्रवाह रोखणारा हार्ट ब्लॉक झाला. असे कोणाला वाटले तर माझ्यासमोर तसे काही बोलायची कोणाची हिंमत तर होणार नाही आणि झालीच तर त्याला मी सरळ म्हणेन बस रे बाबा आता आनंदाने टाळ्या वाजवत तुझ्या मानसिक समाधानात की कुठले तरी कुळदैवत, ग्रामदैवत माझ्या वर कोपले म्हणून. मला हार्ट ब्लॉक झालाय तो सहन करायला मी स्वतः समर्थ आहे व त्याने मला मरण आले तर ते स्वीकारायलाही मी समर्थ आहे. त्यासाठी कुठल्याही देवाची जपमाळ ओढत मी बसणार नाही.

मी हा असा आहे. माझा बापही असाच होता. आमचे हे असले विचार कोणाला पटावेत अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही. आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व गुणांचा काही फायदा वाटला तर त्याचा योग्य मोबदला देऊन जवळ या नाहीतर आमचा रस्ता वेगळा, तुमचा रस्ता वेगळा. लग्ने जमवताना मात्र सावधान कारण मुलीला माझ्यासारखा रोखठोक नवरा योगायोगाने मिळू शकतो आणि मग पटवून घेता आले नाही तर सोडून जावे लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), १३.३.२०२४