https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

SUPPLEMENTS!

SUPPLEMENTS!

The original structure and  working mechanism of the natural products including humans beings produced by Nature is so good, so perfect and so beautiful  that there is no need for any human intervention & intermeddling with it.

But the human beings at the instance of their over intelligence, over wisdom and with profit motive have spoiled original structure & original mechanism by artificial supplements. The processed fast foods as supplements to original natural food products is fine example of artificial supplements created by human beings out of their over enthusiasm & greed in the name of their technical advancement & industrial progress.

To get away from artificial supplements by throwing them in dustbin for living natural life has been made difficult by human beings themselves because they have forgotten originality of Nature by getting habitual to their own creation of artificial supplements. The artificial intelligence is the latest model of such man made artificial supplement.

-©Adv.B.S.More, 6.2.2024

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

मी मरणाच्या वयात आलो!

मी मरणाच्या वयात आलो!

वैद्यकीय निष्कर्षानुसार भारतीय लोकांचे सरासरी आयुष्य ६७ वर्षे आहे व खूप कमी लोक ८० वर्षाच्या पुढे जगतात. हा निष्कर्ष कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. माझे मन आनंदाने नाचत आहे. याचे कारण काय तर मला हे कळले की परमेश्वराने मला सरासरी वयापर्यंत म्हणजे ६७ वर्षापर्यंत मस्त जगवले. मी आणखी पाच महिन्यांनी २७ जून २०२४ रोजी ६७ वर्षे पूर्ण करून ६८ वर्ष वयात प्रवेश करणार. म्हणजे ६७ वर्षे आयुष्याची सरासरी गाठायला आता फक्त पाच महिने बाकी आहेत. त्याच्या आतच गेल्या महिन्यात परमेश्वराने मला माझ्या मृत्यूचा सिग्नल दिला. मृत्यू घंटाच म्हणा की. गेल्या महिन्यात माझ्या हृदयात सेकंड डिगरीचा हार्ट ब्लॉक निघाला. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके अनियमित, संथ झाले. तसा मी संथ माणूस. शांतपणे हळूहळू कासवासारखा जीवन जगणारा संथ माणूस. मोठ्या श्रीमंत लोकांच्या दारात जाऊन त्यांना कमी फी मध्ये शांतपणे मोठा वकिली सल्ला देणारा व कमी पैशात मोठ्या समाधानाने जीवन जगणारा विशाल मनाचा संथ वकील. आता अशा संथ माणसाच्या हृदयाचे ठोके महान परमेश्वराने ६७ या सरासरी वयात संथ केले व मी आता मरणाच्या वयात आलोय असे संथपणे सांगितले त्याबद्दल महान परमेश्वराचे आभार मानायचे सोडून बसवू का मी तो बॕटरीवाला पेसमेकर माझ्या छातीत माझ्या हृदयाशेजारी? माझे सगळे संघर्षमय जीवन न डगमगता मी बिनधास्त धाडसाने जगलोय. असला माणूस ते कृत्रिम उपकरण छातीत लावून जगण्याचा विचार तरी करू शकेल का? छे, असे करून मी त्या महान परमेश्वराने मला दिलेल्या नैसर्गिक सुंदर शरीर यंत्राचा व त्यातील सुंदर हृदय यंत्राचा अपमान करण्याचे पाप केल्यासारखे होईल. परमेश्वरा, हे पाप मी करणार नाही. तुझा अपमान मी करणार नाही. तुझे उपकार कसे फेडू? तू प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची केवढी मोठी हिंमत मला दिलीस. आता तू ६७ या सरासरी वयात मला माझ्या हृदयात तो ब्लॉक दिलास आणि माझ्या हृदयाची गती संथ केलीस. केलीच पाहिजे! किती धावत होतो मी पोटासाठी लोकांच्या दारात जाऊन भेट वकिलीची ती अपमानास्पद मजूरी व चाकरी करण्यासाठी आणि ही असली भेट वकिली करून आयुष्याच्या शेवटी आता माझी शिल्लक काय तर माझा एक फ्लॅट. पण माझ्या या कष्टाचे फळ म्हणून त्याहूनही मोठा ठेवा तू मला दिलास. तो ठेवा म्हणजे माझी उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम, वैवाहिक दृष्ट्या सुसंस्कारित अशी माझी एकुलती एक मुलगी व तेवढाच उच्च शिक्षित, सशक्त, समंजस माझा जावई. सोबत माझी सतत काळजी घेत मला प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत साथ देणारी माझी पत्नी. आणखी काय हवंय देवा मला! आता आणखी काही काही नको. मी जीवनात नुसता समाधानी नाही तर तृप्त आहे. चल कधी घेऊन जातोस मला या जगातून. मी आता त्यासाठी तयार झालो आहे. तुझे उपकार कसे आणि किती मानू! भयंकर वेदना देणारा कॕन्सर सारखा आजार तू मला दिला नाहीस. मी ६७ वर्षे या सरासरी वयात सुद्धा अगदी चांगला खातोय, पितोय आणि तू दिलेला हृदयाचा तो ए.व्ही. ब्लॉक बरोबर घेऊन हळूहळू चालतोय सुद्धा. देवा, सगळी माहिती घेतलीय मी त्या पेसमेकर नामक कृत्रिम उपकरणाची आणि ठाम निर्णय घेतलाय की मी तू दिलेल्या हृदयाच्या सुंदर, नैसर्गिक यंत्रात पेसमेकर नावाच्या त्या कृत्रिम उपकरणाने काड्या घालणार नाही. कशासाठी त्या काड्या घालू मी तू दिलेल्या तुझ्या सुंदर नैसर्गिक हृदय यंत्रात? ६७ या सरासरी वयानंतरही आणखी पुढे जगण्यासाठी? छे, बिलकुल नाही. कारण तुझे हे जग मी खालून वरून चांगले बघितले आहे. लोकांची हमालीही भरपूर केली आहे. आता हे जग आणखी बघण्याची इच्छा नाही व ती हमाली करण्याची इच्छा नाही. जे दिलेस ते भरपूर दिलेस. त्याने मी तृप्त झालोय  व त्यामुळे मृत्यूची मला भीती वाटत नाही. आणि तू जर मला हार्ट अटॕक नावाच्या सोप्या पद्धतीने मारायचे ठरवले असशील तर मरण्याच्या अगोदर ॲडवान्समध्ये मी तुझे  हृदयातून आभार मानतो. चल कधी बंद पाडतोस माझे हृदय!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

https://youtu.be/3FdKjFlzxdM?si=Y9_XKzLxRbCofP2-

https://youtu.be/IDhnwY5M4c4?si=kFx5Y6GS-OZN_m5o

https://youtu.be/pkEQC0EnCXE?si=o2G1Z6ha0Eo_VcYh

https://youtu.be/ip6y-Lcp9HU?si=HfWktZLI54X1hkOT

https://youtu.be/DjGGQB5tPAE?si=XYXvtfHJo-Aikid9

माझी चळवळ बंद!

माझी चळवळ बंद, बंद, बंद!

लहानपणापासून चळवळी बघत आलोय व त्यातून शिकत आलोय. या चळवळी लोककल्याणासाठी असतात का? या चळवळींतून स्वतःच्या कल्याणासाठी भांडवल निर्मिती करून शेत जमिनी विकत घेऊन सधन शेतकरी झालेले तर काहींनी कारखाने उभे करून श्रीमंत  उद्योगपती झालेले धूर्त, वस्ताद लोक मी बघितले. याला काही अपवाद निघाले पण त्यांच्या आयुष्याची वाट लागली.

अशा स्वार्थी चळवळींपासून मी लांब राहिलो. या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत. शुद्ध राजकारण, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण इतकेच काय शुद्ध ज्ञानकारणही समाजात दुर्मिळ होत गेले व आता तर ते शोधूनही सापडेनासे झालेय. धर्मकारणाविषयी तर न बोललेले बरे. स्वार्थी अर्थकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी व तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी धूर्त लोक देवधर्माचा दुरूपयोग, गैरवापर करत असताना स्पष्टपणे दिसत आहे. श्रीमंत भांडवलदार, धूर्त राजकारणी व दहशतखोर गुन्हेगार यांची दुष्ट साखळी घट्ट झाल्याचे दिसत आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होत असल्याचे दिसत आहे. पण माझी वकिली व माझी देवप्रार्थना या गोष्टी रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात माझ्या ज्ञान व धैर्याच्या जोरावर मी जी काही थोडीफार सामाजिक चळवळ केली ती आता बंद. माझी ती चळवळ या भयंकर दुष्ट रेट्यापुढे इतकी कमकुवत, इतकी क्षीण ठरली की ती कोणाच्या नजरेसही आली नाही.

आजूबाजूला चाललेल्या या स्वार्थी चळवळी बघून मीही चळवळ केली व ती चळवळ म्हणजे अशिक्षित व गरीब कौटुंबिक वातावरणात खूप हिंमतीने, खूप जिद्दीने, खूप कष्टाने उच्च शिक्षण घेण्याची चळवळ. याच चळवळीतून मी वकील झालो. पण वकील बनून पोटासाठी शेवटी मला काय करावे लागले तर काही सधन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजूरी करावी लागली व काही श्रीमंत कारखानदार लोकांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी करावी लागली.

मी या स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात वकील म्हणून जाणे ही गोष्टच माझ्या उच्च शिक्षणाचा, माझ्या प्रामाणिक वकिलीचा घोर अपमान होता. पण या वकिलीत कोणाचाही भरभक्कम पाठिंबा नसल्याने मला हा अपमान सहन करावा लागला. माझ्या घराला मी वकिलीचा फलक (बोर्ड) लावला पण माझ्या घराच्या दारात माझ्या ज्ञानाला योग्य किंमत देणारे अशील आलेच नाहीत. शेवटी मलाच स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात माझे ज्ञान घेऊन जावे लागले. दुसऱ्याच्या दारात जाऊन चांगल्या मालाची विक्री करू पाहणाऱ्या फिरत्या विक्रेत्याच्या मालाची लोक काय किंमत करतात? अगदी तसेच माझ्या ज्ञानाचे झाले.

काय म्हणावे माझ्या या असल्या वकिलीला? पण मी शेवटी फिरता वकील म्हणूनच प्रसिद्ध झालो. गंमत ही की अगदी कालपरवा सुद्धा एका माणसाने मला मेसेज केला की त्याचा काहीतरी कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्याच्या नरीमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात येऊ शकतो काय? काय म्हणावे या असल्या मागणीला? प्रश्न त्याचा, कायदेविषयक चर्चा त्याच्या प्रश्नावर करायची आणि त्यासाठी तो मला माझ्या डोंबिवलीच्या घरातून त्याच्या नरीमन पॉईंटच्या आॕफीसात बोलवतोय आणि त्यासाठी तो मला फी किती देणार यावर काही बोलत नाही? फिरता वकील म्हणून प्रसिद्ध झालेला मी वकील माझ्या भेटीची व नुसत्या चर्चेची फी कमीतकमी किती मागावी? निदान १०००० रूपये तरी पण नाही मला तो १००० रू. एवढी कमी फी सुद्धा त्याच्या दारात जाऊनही देणार नाही याची मला खात्री होती. शेवटी मी पडलो भिडस्त! म्हणून त्याला माझे खरे ते वैद्यकीय कारण सांगून शक्य नाही असे स्पष्ट सांगून टाकले. शिवाय त्याने ती तुटपुंजी १००० रू. फी त्या भेटीची व त्या चर्चेची दिली असती तरी माझे मन आता अशा फुटकळ भेटी व चर्चेला तयार नाही.

वकील असून आयुष्यभर श्रीमंतांच्या शेतात जाऊन एकतर शेतमजूरी केली किंवा त्यांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी केली. भले ही मजूरी किंवा चाकरी कधी तीन तासांची, कधी दोन तासांची तर कधी एक तासाची होती तरी ती स्वतंत्र बाण्याची वकिली मुळीच नव्हती. लोकांच्या दारात जाऊन कसला वकिलीचा रूबाब दाखवणार मी? त्यांच्या दारात लांबून जाणे हे होते शारीरिक कष्ट व त्यांच्या शेतीतील किंवा कारखान्यातील कचरा माझ्या  कायद्याच्या ज्ञान कौशल्याने साफ करणे हे होते बौद्धिक कष्ट. हे दुहेरी कष्ट मी स्वार्थी चळवळी लोकांच्या शेतात व कारखान्यांत जाऊन ६७ वर्षे वयातही गेल्या महिन्यापर्यंत  करीत होतो.

पण आता परमेश्वरालाच ही गोष्ट पटली नसावी. त्याने माझ्या या दारोदारी भटकण्याच्या वकिलीला चांगलाच खुट्टा मारून ठेवलाय. खरं तर परमेश्वराने हे खूपच मस्त काम करून टाकले. त्याने हृदयाचे ठोके नियमित ठेवणारा माझ्या हृदयाचा इलेक्ट्रिक ट्रान्समिटरच बिघडवून टाकला कसला तो ए.व्ही. ब्लॉक माझ्या हृदयात निर्माण करून. आता  डॉक्टरने कसला तो पेसमेकर माझ्या हृदयात बसवण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय. कशासाठी बसवू मी ते कृत्रिम उपकरण माझ्या हृदयात? पुन्हा लोकांची ती हमाली लोकांच्या दारात जाऊन करण्यासाठी? नाही म्हणजे नाही, बिलकुल नाही! आता तो पेसमेकर नाही की ती हमाली नाही. माझी चळवळ बंद, बंद, बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.२.२०२४

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वराचे सगुण अस्तित्व म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या भौतिक विविधतेला परमेश्वराचे विविध अंश चिकटलेले आहेत ज्यांना ईश्वरी अंश म्हणता येईल. हिंदू धर्मातील विविध देवदेवता म्हणजे निसर्गातील विविध ईश्वरी अंश. हे अंश सगुण आहेत व ते निसर्गाच्या भौतिकतेला ईश्वरी आध्यात्मिकतेने नियंत्रित करतात. या ईश्वरी अंशानाच देवकण (गाॕड पार्टिकल) असे म्हणता येईल जे देवकण असंख्य आहेत. हिंदू धर्मात असलेल्या तेहतीस कोटी देवदेवता म्हणजे हे असंख्य ईश्वरी अंश किंवा देवकण. निर्गुण परमेश्वर एक आहे पण सगुण देवकण अनेक आहेत. कोणताही देवकण सर्वगुणसंपन्न नाही. पण त्यातला एखादा देवकण  जर बहुगुणसंपन्न म्हणून निसर्गात अवतीर्ण झाला तर त्याला हिंदू धर्मात निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप किंवा सगुण अवतार मानतात. हिंदू धर्मातील असंख्य देवदेवतांपैकी फक्त काही देवदेवताच बहुगुणसंपन्न आहेत. तीन मुख्य देव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या स्त्री शक्तींसह, श्री गणेश, राम, कृष्ण, गुरूदेव दत्त हे सर्व देवकण असे बहुगुणसंपन्न देवदेवता व देवावतार होत. सारांश हाच की, परमेश्वर निर्गुण परमात्मा आहे तर ईश्वर हा त्या परमात्म्याचा सगुण ईश्वरी अंश किंवा देवात्मा आहे. निर्गुण परमात्मा कायम आहे तर सगुण देवात्मे येतात, जातात म्हणजे ते तात्पुरते आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.१.२०२४

रविवार, २८ जानेवारी, २०२४

भारत संघराज्य राष्ट्र

भारत एक संघराज्यीय राष्ट्र!

भारत हे संघराज्यीय राष्ट्र आहे. या संघराज्यातील प्रत्येक राज्याच्या वेगळ्या प्रादेशिक अस्मिता व वेगळी भाषिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत.  हीच परिस्थिती या संघराज्यातील जनतेची आहे. ही भारतीय जनता विविध धार्मिक व जातीय समाज गटात विभागलेली आहे. प्रत्येक समाज गटाची वेगळी धार्मिक व जातीय अस्मिता, संस्कृती आहे. या विविधतेमुळे या संघराज्याला एकच धर्म व एकच जात नाही. तरीही सर्व भारतीय एक राष्ट्र म्हणून एक आहेत हे विविधतेतील एकतेचे जगातील एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारताला कोणताही एक धर्म किंवा जात नाही हे वास्तव हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१.२०२४

भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे!

भौतिक स्पर्धा व मानसिक आरोग्य!

या पदार्थीय सृष्टीतील विविध निर्जीव वस्तू पदार्थ व सजीव वनस्पती, प्राणी, माणसे या सर्वांबरोबर वैज्ञानिक निसर्ग नियमांनुसार प्रमाणबद्ध व मर्यादित देवाणघेवाणीचे संबंध प्रस्थापित करण्याऐवजी मानवी मन त्यांच्याशी स्पर्धा करते, ईर्षा करते व त्यातून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवते. इतरांशी तुलनात्मक स्पर्धा सोडा पण मानवी मन स्वतःशीही स्पर्धा करते. भौतिक यशासाठी ठराविक मर्यादेपर्यंत स्पर्धा ठीक आहे. पण मानवी मन या स्पर्धेचा अतिरेक करते व स्वतःबरोबर इतरांचेही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवते.

जीवनात स्वतःच्या मर्यादा ओळखून  त्या मर्यादेतील शक्य तेवढे भौतिक यश मर्यादित स्पर्धेतून मिळवल्या नंतर स्पर्धेतून बाजूला व्हायला हवे. अर्थात स्पर्धेतून निवृत्ती घ्यायला हवी. अशी निवृत्ती घेतल्यानंतर आपण जगाच्या भौतिक स्पर्धेत नाही आहोत याची खंत न बाळगता इतरांची स्पर्धा त्या स्पर्धेपासून अलिप्त राहून लांबून बघायची असते. मोह झाला तरी त्यात भाग घ्यायचा नसतो व त्याचा विचारही करायचा नसतो.

अशी अवस्था प्राप्त केल्यानंतर प्रवास सुरू होतो तो परमेश्वराच्या अध्यात्माचा. ज्याने हे सर्व विविध पदार्थ निर्माण केले व त्यांच्यापासून ही विज्ञानबद्ध भौतिक पदार्थीय सृष्टी रचली त्या निर्माता, नियंता, परमेश्वराबरोबर मानवी मनाला भौतिक स्पर्धा करता येईल का? परमेश्वराबरोबर भौतिक स्पर्धाच काय पण त्याच्याबरोबर भौतिक देवाणघेवाणही शक्य नाही. मग त्याच्यापुढे भौतिक स्पर्धेतील भौतिक यशाची मागणी का करावी?

मग मानवी मन काय करू शकते? तर परमेश्वरापुढे आध्यात्मिक मनाने लीन होऊ शकते. आध्यात्मिक मन म्हणजे भौतिक भावना व भौतिक विचार यांचा त्याग केलेले, या सर्व भावना व हे सर्व विचार परमेश्वर चरणी अर्पण केलेले मन. असे आध्यात्मिक मनच परमेश्वराशी एकरूप होऊ शकते. आणि अशी आध्यात्मिक एकरूपता मनुष्याला जिवंतपणीही साधता येते व त्यातून आध्यात्मिक आनंद व शांतीची अनुभूती मिळवता येते.

या आध्यात्मिक अनुभूतीसाठी मला हिंदू धर्मातील सगुण ईश्वरापासून निर्गुण परमेश्वरापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास आवडतो जो मी खालील आध्यात्मिक प्रार्थनेने दररोज करतो.

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री रामकृष्णाय नमः !
ओम नमः शिवाय !
ओम श्री गुरूदेव दत्ताय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम शरणम गच्छामी !
ओम सर्वम सुखीनम भवती !
ओम शांती !

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१.२०२४
https://youtu.be/E-NqjMfZeMk?si=fRC0-xfLkD6rOncV

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निवृत्ती!

वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या बौद्धिक व शारीरिक कष्टावरील मर्यादा व निवृत्ती!

मानवी मेंदूमनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या सुशिक्षित-सुसंस्कृत करणारे ज्ञान  सतत देण्याचा कार्यक्रम राबवणारा शिक्षणाचा कारखाना अविरतपणे सतत चालू आहे. त्याला क्षणभरही विश्रांती नाही. या कारखान्यात लहानपणापासून सतत काम करून करून मानवी मेंदू थकतो. कारण या कारखान्याला शेवट नाही पण नश्वर मानवी आयुष्याला शेवट आहे.

शिक्षणाच्या कारखान्यात हळूहळू  ज्ञान प्रगल्भ होत जाणारे मेंदूमन त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग म्हणजे सराव करण्याचा प्रयत्न सुरू करते. म्हणजे एकीकडून सतत सुरू असलेला ज्ञानाचा ओघ तर दुसरीकडून सतत त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सराव व त्यासाठी मेंदू बुद्धीला व शरीर अवयवांना सतत कार्यरत ठेवण्याचा दुहेरी कार्यक्रम म्हणजे बौध्दिक व शारीरिक कष्टाचा दुहेरी कार्यक्रम आयुष्यभर सुरू राहतो.

मेंदूमनावर झालेले ज्ञानसंस्कार मनुष्याला गप्प बसू देत नाहीत. या ज्ञानसंस्काराचा वापर सातत्याने व्यवहारात करण्यासाठी मेंदूमन सारखे पुढे पुढे करते. अशाप्रकारे मानवी आयुष्यात शिक्षणाचा व व्यवहाराचा असे दोन्ही कारखाने सतत सुरू राहतात. पण या दोन्ही  कारखान्यात काम करताना बौद्धिक व शारीरिक कष्ट करण्यावर वाढत्या वयानुसार नैसर्गिक मर्यादा पडतात. या मर्यादा लक्षात घेऊन कालानुरूप शरीर, मनाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाच्या विश्रांतीचा काळ उतार वयात वाढवत जाण्यालाच निवृत्ती असे म्हणतात जी निवृत्ती नुसती नोकरीतच नव्हे तर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, राजकारण, समाजकारण यातूनही घ्यावी लागते व या नैसर्गिक निवृत्तीला वैद्यकीय, वकिली किंवा इतर कोणतेही व्यवसाय, उद्योगधंदे किंवा राजकारण, समाजकारण हे अपवाद होऊ शकत नाहीत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१.२०२४