https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निवृत्ती!

वाढत्या वयानुसार वाढणाऱ्या बौद्धिक व शारीरिक कष्टावरील मर्यादा व निवृत्ती!

मानवी मेंदूमनाला वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या सुशिक्षित-सुसंस्कृत करणारे ज्ञान  सतत देण्याचा कार्यक्रम राबवणारा शिक्षणाचा कारखाना अविरतपणे सतत चालू आहे. त्याला क्षणभरही विश्रांती नाही. या कारखान्यात लहानपणापासून सतत काम करून करून मानवी मेंदू थकतो. कारण या कारखान्याला शेवट नाही पण नश्वर मानवी आयुष्याला शेवट आहे.

शिक्षणाच्या कारखान्यात हळूहळू  ज्ञान प्रगल्भ होत जाणारे मेंदूमन त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग म्हणजे सराव करण्याचा प्रयत्न सुरू करते. म्हणजे एकीकडून सतत सुरू असलेला ज्ञानाचा ओघ तर दुसरीकडून सतत त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सराव व त्यासाठी मेंदू बुद्धीला व शरीर अवयवांना सतत कार्यरत ठेवण्याचा दुहेरी कार्यक्रम म्हणजे बौध्दिक व शारीरिक कष्टाचा दुहेरी कार्यक्रम आयुष्यभर सुरू राहतो.

मेंदूमनावर झालेले ज्ञानसंस्कार मनुष्याला गप्प बसू देत नाहीत. या ज्ञानसंस्काराचा वापर सातत्याने व्यवहारात करण्यासाठी मेंदूमन सारखे पुढे पुढे करते. अशाप्रकारे मानवी आयुष्यात शिक्षणाचा व व्यवहाराचा असे दोन्ही कारखाने सतत सुरू राहतात. पण या दोन्ही  कारखान्यात काम करताना बौद्धिक व शारीरिक कष्ट करण्यावर वाढत्या वयानुसार नैसर्गिक मर्यादा पडतात. या मर्यादा लक्षात घेऊन कालानुरूप शरीर, मनाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाच्या विश्रांतीचा काळ उतार वयात वाढवत जाण्यालाच निवृत्ती असे म्हणतात जी निवृत्ती नुसती नोकरीतच नव्हे तर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, राजकारण, समाजकारण यातूनही घ्यावी लागते व या नैसर्गिक निवृत्तीला वैद्यकीय, वकिली किंवा इतर कोणतेही व्यवसाय, उद्योगधंदे किंवा राजकारण, समाजकारण हे अपवाद होऊ शकत नाहीत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१.२०२४

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

NATION!

NATION!

The nation is an artificial institution created by union of people under the law of nation called constitution. This institution remains the notional owner and director of the wealth and resources of nation including people who continue as members of this institution. These members are allowed to own and enjoy the national wealth and resources of nation privately but subject to the restrictions and  conditions of the law of nation called constitution. The united maintenance & protection of such wealth & resources is the condition precedent for this private ownership and enjoyment. The people may come by birth and go by death but the nation remains alive & constant all time. This is the truth with any artificial institution. The institution created by people can be dissolved only by people and this happens when there is a breakdown in the union of people.

-©Adv.B.S.More, 26.1.2024

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

निरक्षरांची लोकशाही?

निरक्षरांची लोकशाही?

कसेही करून विशेषतः बळी तो कानपिळी नियमाने जगणे हा मनुष्य सोडून इतर सर्व प्राणीमात्रांचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे तर मनुष्याच्या विशेष नैसर्गिक बुद्धीमुळे सन्माननीय जीवन (डिग्नीफाईड लाईफ) हा मनुष्याचा व एकंदरीत मानव समाजाचा नैसर्गिक मूलभूत हक्क आहे. या हक्काची जाणीव जेव्हा कधीकाळी मनुष्याला झाली व त्याचे मनुष्याला भान आले तेव्हापासून या विशेष मानवी हक्काचा विकास व्हायला सुरूवात झाली. ही विकास प्रक्रिया अजूनही पिढ्यानपिढ्या चालूच आहे.

राजेशाही, हुकूमशाही, लोकशाही हे याच मूलभूत मानवी हक्काच्या संक्रमणाचे टप्पे आहेत. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही जे वरील विशेष मानवी हक्कासाठी म्हणजे सन्माननीय जीवन या मूलभूत हक्कासाठी चालविलेले राज्य. तसे तर निसर्गात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला जीवन कसे जगायचे हे सामान्य ज्ञान (काॕमन सेन्स) निसर्ग जन्मापासून ते मरेपर्यंत निसर्गाच्या खुल्या शाळेत देत असतो. अर्थात या सामान्य ज्ञानासाठी मानवनिर्मित शाळा, काॕलेजात जाऊन सुशिक्षित होण्याची गरज नसते. पण मनुष्य प्राण्याचा सन्माननीय जीवनाचा हक्क काय व तो कसा जगायचा हे कळण्यासाठी मात्र खास शिक्षणाची गरज असते कारण मुळात हा हक्क मनुष्याला निसर्गाकडून विशेष हक्क म्हणून प्राप्त झाला आहे पण त्या हक्काचे विशेष संगोपन करण्याची जबाबदारी मात्र निसर्गाने मानव समाजावरच टाकून दिली आहे.

या विशेष मानवी हक्काविषयी जागरूक होण्यासाठी व तो विशेष नैसर्गिक-सामाजिक पद्धतीने जगण्यासाठी विशेष शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी अक्षर ओळख ही मूलभूत गोष्ट आहे. अक्षर ओळखी शिवाय माणूस सामान्य ज्ञानी होऊ शकतो पण तो सुशिक्षित होऊ शकत नाही. ज्या समाजात बहुसंख्य लोक निरक्षर म्हणजे अशिक्षित आहेत अशा समाजात लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होणे फार कठीण आहे. बहुसंख्य निरक्षर  लोकांचे बहुमत यालाच लोकशाही म्हणायचे तर अशा लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत व्हायला वेळ लागत नाही. कारण अशा निरक्षरी बहुमतावर सन्माननीय जीवन हक्क म्हणजे काय हे लिखित स्वरूपात सांगणाऱ्या अक्षरी संविधानाची हुकूमत चालत नाही. याचा अर्थ हाच की निरक्षरी बहुमताची लोकशाही ही सांविधानिक लोकशाही होऊ शकत नाही. बहुतेक हाच विचार करून म. गांधीनी "साक्षर लोकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा" असे हरिजन मध्ये लिहिले होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.१.२०२४

मराठा आरक्षण, माझी भूमिका!

मराठा आरक्षण, माझी भूमिका!

मराठा लोक किती शिकलेत व दर महिन्याला त्यांची आर्थिक कमाई कोणत्या उद्योग, व्यवसायातून किती एवढे दोनच प्रश्न मराठ्यांना विचारून शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व मराठा लोकांना सरकारने शैक्षणिक, आर्थिक व राजकीय असे तिन्ही प्रकारचे आरक्षण देऊन मोकळे व्हावे, उगाच फाफट पसारा वाढवू नये ही मायबाप सरकारला एक ९६ कुळी उच्च शिक्षित मराठा म्हणून माझी कळकळीची नम्र विनंती आहे. मी वकील आहे म्हणजे उच्च शिक्षित असल्याने व महिन्याला पोटापुरता म्हणजे माझ्या किमान गरजांपुरता व्यवस्थित पैसा कमावत असल्याने व तसेच मला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, संत्री बनण्याची राजकीय महत्वाकांक्षा नसल्याने मला आरक्षण बिलकुल नको. मराठा सर्वेक्षण करताना आमच्या घरातील स्त्रिया कुंकू लावतात का, मंगळसूत्र घालतात का असले अपमानास्पद प्रश्न सर्वेक्षणाच्या नावाने बिलकुल विचारू नयेत. या असल्या प्रश्नांना एक वकील म्हणून माझी कडक हरकत राहील. गरीब, अशिक्षित/अल्पशिक्षित मराठ्यांना सरकारने आरक्षण देऊन टाकावे व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब करून घ्यावे. त्यासाठी कायदेशीर युक्तिवाद हा असावा की शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण हाही सामाजिक मागासलेपणाचा निकष आहे. केवळ मागासलेली जात हाच फक्त आरक्षणाचा निकष  होऊ शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठे हे  आपोआप सामाजिक दृष्ट्या मागासलेले होतात हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाला पटवून द्यावा लागेल. अशा मराठ्यांच्या सन्माननीय जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी आरक्षण आवश्यक आहे ही गोष्ट सरकारने लक्षात घेऊन ती सर्वोच्च न्यायालयात मांडावी व संकुचित आरक्षणाची टक्केवारी मराठा आरक्षणासाठी वाढवून घ्यावी. त्यामुळे ओ.बी.सी. विरूद्ध मराठा हा वाद होणार नाही. 

-©ॲड.बी.एस.मोरे, ९६ कुळी उच्च शिक्षित मराठा, २५.१.२०२४

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व विधीवत शब्दाचा अर्थ!

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून विधीवत शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला!

सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्या येथील नवीन मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. कोणत्याही गोष्टीचा विचार मी कायद्याच्या दृष्टिकोनातून करतो. कायद्याची चौकट म्हणजे मर्यादेची चौकट आणि प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात मर्यादा पुरूषोत्तम. त्यामुळे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हे एक जिज्ञासू वकील म्हणून ओघाओघाने आलेच. खरं तर या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून विधीवत या शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला.

कायदा हा तीन गोष्टींनी बनतो. कल्याणकारी, मंगल निर्माणाचे विशिष्ट ध्येय हा कायद्याचा पाया असतो. या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी एक विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते ती दिशा किंवा चौकट हा कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा असतो. विशिष्ट धोरणात्मक चौकटीने एक विशिष्ट तात्विक/ तांत्रिक प्रक्रिया निश्चित केली जाते ती प्रक्रिया म्हणजे कायद्याचा प्रत्यक्ष  विधी असतो. या तिन्ही गोष्टींचा मिळून कायदा बनतो. कायद्यानुसार सर्वकाही व्यवस्थित पार पडणे म्हणजे एखादे विशिष्ट कार्य विधीवत  पार पडणे.

एखादी इमारत उभी करताना अशी इमारत उभारणे हे ध्येय असते. अशा इमारतीचा आराखडा ही इमारतीची धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते. या आराखड्यानुसार इमारत बांधकाम तंत्रज्ञानाने इमारतीचे बांधकाम करणे ही अशा इमारतीची विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. इमारत निर्मितीचे ध्येय, इमारतीचा आराखडा व इमारतीचे बांधकाम या तिन्ही गोष्टी जुळून आल्या की अशी इमारत विधीवत बांधली गेली असे म्हणायचे.

अयोध्या येथील श्रीरामाच्या नवीन मंदिराचे बांधकाम असेच विधीवत पार पडले. या मंदिरात सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली याचा अर्थ हाच की ती हिंदू धर्म शास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. ईश्वर मूर्तीला मंदिरात स्थानापन्न करताना प्राणप्रतिष्ठेचा हिंदू धर्मशास्त्रीय विधी हा धार्मिक कायदाच आहे. या कायद्यात वर उल्लेखित तिन्ही गोष्टी येतात. त्या म्हणजे ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे ध्येय. या प्राणप्रतिष्ठेची म्हणजे ईश्वर मूर्तीच्या विधीवत स्थानापन्नतेची विशिष्ट दिशा/चौकट म्हणजे विशिष्ट शुभ मुहुर्त वगैरे. त्यानंतर त्या विशिष्ट चौकटीतील प्राणप्रतिष्ठेची विशिष्ट पद्धत/कायदेशीर प्रक्रिया म्हणजे मंत्रोपचार वगैरे. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे व्यवस्थित पार पडल्या की ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही विधीवत पार पडली असे म्हणायचे. अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशीच विधीवत पार पडली.

अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशाप्रकारे विधीवत पार पडल्यावर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी जमलेल्या मान्यवरांसमोर जे भाषण केले ते भाषण विधीवत या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगते. या भाषणाद्वारे पंतप्रधानांनी एक संकल्प सोडला. भारताचे नवनिर्माण (नया भारत) हाच तो संकल्प. पुढील  एक हजार वर्षांत पवित्र म्हणजे मंगल, कल्याणकारी भारत व कणखर म्हणजे स्वसंरक्षणासाठी खंबीर व शस्त्रसज्ज भारत, अशा भारताची पायाभरणी आता करून त्या ध्येयाने पुढे वाटचाल करायची हा संकल्प, हे ध्येय हा नवीन भारत निर्माण करण्याच्या कायद्याचा पाया झाला. या ध्येयपूर्तीसाठी आता विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट आखली जाईल, निश्चित केली जाईल. तो असेल नवभारत निर्माण कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा. या धोरणात्मक चौकटी अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यात बसणारी जी प्रक्रिया राबवली जाईल ती असेल या नवभारताची विशिष्ट  कायदेशीर प्रक्रिया. अशाप्रकारे नवभारताच्या कायद्याचे तीन घटक, तीन गोष्टी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्येतील भाषणात थोडक्यात स्पष्ट केल्या.

विधीवत या शब्दाचा अर्थ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून मला वरील प्रमाणे अधिक स्पष्ट झाला.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

जशास तसे तत्वज्ञान!

देवाची जपमाळ ओढत बसायचे की जशास तसे वागायचे?

डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा नुसता निसर्ग विज्ञानापुरताच मर्यादित नाही तर तो परमेश्वराच्या अध्यात्म धर्माची चिकित्सा करण्यासाठीही उपयुक्त आहे. पुराणे ही घडली की रचली यावर वाद आहेत. इतिहासाला पुरावे आहेत पण पुराणांना पुरावे नाहीत. पुराण कथा या बोध कथा म्हणून घ्यायच्या की सत्य कथा म्हणून घ्यायच्या यावर सत्याचे पुरावे हाच निकष आहे. 

प्रश्न हा आहे की निसर्गापासून परमेश्वराला वेगळा करून त्याची आध्यात्मिक उपासना करण्याची कल्पना प्राचीन, अर्वाचीन समाजात का व कशी निर्माण झाली? मुद्दा हा आहे की सजीव शरीरापासून जसे मनाला वेगळे करता येत नाही तसे निसर्गाच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला किंवा परमेश्वराला वेगळे करता येत नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या कशा असू शकतात? निसर्गाला विज्ञानात जगायचे व त्याच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला, परमेश्वराला मात्र अध्यात्मात भजायचे, पूजायचे ही मानवी मनाची संभ्रमावस्था नव्हे काय?

पूर्वी लोक टोळ्यांनी जगायचे. नंतर सुद्धा टोळ्या संपल्या नाहीत. सद्या सुद्धा अंडरवर्ल्ड मध्ये अधूनमधून टोळी युद्धे होतच असतात. अशाच काही परकीय टोळ्यांनी आपल्या भारतावर अनेकदा आक्रमणे केली. ब्रिटिश ही सुद्धा व्यापाराचे निमित्त करून हळूच भारतात घुसलेली व नंतर भारतालाच गुलाम करून राज्य केलेली धूर्त परकीय टोळीच होय. मग भले त्याला राष्ट्र हे आधुनिक नाव द्या. अशा या परकीय टोळ्यांचे हल्ले परतवून लावता न आल्याने, त्यांच्या आक्रमणापुढे टिकाव लागू न शकल्याने, बराच काळ त्यांचे गुलाम होऊन रहावे लागल्याने पराभूत मानसिकतेतून गुलाम लोकांकडून निसर्गात परमेश्वराचा दैवी आधार शोधला गेला असावा का? त्यातूनच पुढे सगुण-निर्गुण परमेश्वराची कल्पना उदयास येऊन त्याची आध्यात्मिक उपासना सुरू झाली असावी का? पण हळूहळू पुढे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव जसजसे जनमानसाला कळत गेले तसतसे अध्यात्म धर्मातील अंधश्रद्धा दूर होत जाऊन चांगल्यास चांगले, वाईटास वाईट, म्हणजे जशास तसे हे निसर्ग वास्तववादी तत्वज्ञान उदयास आले असावे का? हे जशास तसे तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतील बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाशी जुळते. जगातील राष्ट्रांनी निर्माण केलेली लष्करे व शस्त्रसज्जता याच बळी तो कानपिळी निसर्ग नियमावर आधारित आहेत. त्यात परमेश्वर व त्याचे अध्यात्म कुठे येते? जशास तसे हे वास्तववादी तत्वज्ञानच आधुनिक नीतीधर्म व कायदेकानून, नियमांचा आधार आहे. आता या नैसर्गिक वास्तवातून परमेश्वराला बाजूला करून त्याची जपमाळ किती ओढत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१.२०२४

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!

नाशिकच्या डाॕक्टर बरोबर ठाण्याची महिला एवढया लांबून मैत्री करते काय, जवळीक निर्माण झाल्यावर त्याच्याकडून ५० लाख रूपयांची खंडणी मागते काय आणि डाॕक्टर मित्राने खंडणी देण्यास नकार दिला म्हणून त्याच्या हत्येचा कट रचते काय, सगळेच भयंकर (बातमी, लोकसत्ता दि. २३.१.२०२४). बापरे, मैत्री एवढी भयंकर, खतरनाक असू असते? मी पैशाने जाम गरीब आहे पण तरीही कोणाचे कधी आणि कशावरून डोके फिरेल याचा काही नेम नाही. म्हणून तर मी फेसबुक इनबाॕक्स चॕटिंग टाळतो. ओळख ना पारख आणि मग कशाला हवी ही असली इलेक्ट्रॉनिक जवळीक किंवा आॕनलाईन मैत्री? वैचारिक मैत्री वैचारिक पोस्टसपुरती मर्यादित ठेवलेली बरी. आणि खरंच काही कायद्याचे काम असेल तर, तेही चार पाचशे फेसबुक मित्रांमधून एखाद्या कडून कधीतरी निघते व बऱ्याचदा फुकटात असते, प्रत्यक्ष भेटून केलेले बरे. या समाज माध्यमातून वास्तव लिखाण करताना सांभाळून करावे लागते. काही जणांनी तर माझी ३५ वर्षाची वकिली व ६७ वर्षाचे वय याचा मुलाहिजा न ठेवता मला बिनधास्त शिव्या हासडल्यात माझ्या काही सरळमार्गी वास्तव पोस्टस वरून. असल्या फेसबुकी मित्रांना मी जाम टरकतो आणि घाबरून त्यांना लगेच ब्लॉक करून टाकतो. कशाला उगाच म्हातारपणी नसते लचांड मागे लावून घ्यायचे? 

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४