https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

बी.डी.डी. चाळी!

पुनर्विकासानंतर मुंबईतील सर्व बी.डी.डी. चाळी इतिहासजमा होणार!

मित्रांनो, ही आहे परळ, दादर जवळील नायगावची एक बी.डी.डी. चाळ. मी तिचा बाहेरून व आतून फोटो घेतला कारण बी.डी.डी. चाळीशी माझे बालपण व थोडेसे तरूणपण जोडले गेले आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणजे वरळी, डिलाईल रोड, नायगाव वगैरे ठिकाणी बांधल्या गेलेल्या या चाळी सगळीकडे अगदी एकसारख्या आहेत. या चाळीतील एकेक खोली एकदम छोटी म्हणजे १०×१२ म्हणजे १२० चौ.फूटाची. तळ, पहिला, दुसरा, तिसरा अशा चार मजल्यांच्या या चाळीत प्रत्येक मजल्यावर २० खोल्यांनुसार एकूण ८० खोल्या. प्रत्येक मजल्यावर इकडून १० व तिकडून १० अशा खोल्यांच्या मधोमध ऐसपैस व्हरांडा ज्याला वटण असेही म्हणतात. या वटणात आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील खोलीच्या बाहेर मी माझे अंथरूण टाकून झोपायचो. आई सकाळी शाळेत जाण्यासाठी व नंतर काॕलेजला जाण्यासाठी मला ६ वाजता झोपलेले शरीर अलगद हलवून उठवायची. मजल्यावर मधल्या भागात २० खोल्यांच्या सामूहिक वापरासाठी मधला नळ व शौचविधी साठी स्त्रियांसाठी ३ व पुरूषांसाठी ३ असे दोन्ही बाजूला सार्वजनिक संडास. एकेका खोलीत एक कुटुंब म्हणजे आईवडील व साधारण ४ मुले असा गरीब गिरणी कामगाराचा संसार गिरणगावातील बी.डी.डी. चाळीत थाटलेला. तो अनुभवच फार वेगळा होता जो मला माझ्या वृद्धापकाळीही विसरता येत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी,

माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी?

ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम शांती !

(१) श्री गणेशाय नमः !
बुद्धीदेवतेचे प्रथम स्मरण, मेंदूचे बौद्धिक इंजिन नीट चालावे म्हणून.

(२) श्री परमेश्वराय नमः !
परमेश्वराचे द्वितीय स्मरण, भौतिक जगातील काही काळच असलेला तात्पुरता प्रवास अडथळे न येता किंवा येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून सुखाचा व्हावा यासाठी मनाला एक भरभक्कम, कणखर आधार लागतो म्हणून. परमेश्वर कोणत्याही शब्दात, दस्तऐवजात, प्रतिमेत, मूर्तीत पूर्णपणे साठवता येत नाही कारण तो अनाकलनीय व प्रवाही आहे. म्हणून मी जगातील कोणत्याही देवधर्मात व कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमांत, मूर्तींत एकच परमेश्वर बघतो. तिथे मला एकच परमेश्वर दिसत असल्याने माझे हात तिथे नम्रपणे जोडले जातात. माझ्या दृष्टिकोनातून, आंतरधर्मीय संघर्ष हा मानवनिर्मित संघर्ष आहे, नक्कीच तो परमेश्वर निर्मित संघर्ष नव्हे. म्हणून मी या संघर्षापासून स्वतःला अलिप्त ठेवून संपूर्ण चराचर सृष्टीत सर्वांसाठी एकच असलेला परमेश्वर समोर ठेवून त्याच्यापुढे लीन होतो.

(३) श्री स्वामी समर्थाय नमः !
साधुसंतांचे तृतीय स्मरण, जगात होऊन गेलेल्या सर्व धर्मातील सर्व साधुसंतांचे प्रातिनिधीक प्रतीक व देवत्वाचे प्रत्यक्ष गुणात्मक रूप म्हणून मी श्री स्वामी समर्थांकडे बघतो व त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून परमेश्वर जवळ असल्याची अनुभूती मिळते.

(४) ओम शांती !
शेवटी मनःशांतीची प्रार्थना गणेश, परमेश्वर व स्वामी समर्थ या तिघांना एकत्र, कारण म्हातारपणी उतार वयामुळे शरीर झिजलेले, थकलेले असते. ते पूर्वीसारखे भौतिक कार्य करू शकत नाही. शरीराचे जडत्व वाढून शरीराच्या हालचालींची गती संथ झालेली असते.

उतार वयाची हालचाल म्हणजे परतीचा पाऊस. जन्म म्हणजे नव्या नवतीचा पाऊस, जीवन म्हणजे पावसाचे काही काळ स्थिरावणे व मृत्यूपंथाला लागलेला वृद्धापकाळ म्हणजे जिथून आला त्या ठिकाणी पुन्हा माघारी परतणारा परतीचा पाऊस. याच काळात म्हणजे म्हातारपणीच परमेश्वरी अध्यात्माची जास्त गरज असते.

याचे मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे वृद्धापकाळात आयुष्याच्या परतीचा पाऊस सुरू झालेला असतो आणि तरीही थकलेल्या, झिजलेल्या, जीर्ण झालेल्या शरीरात असलेले मेंदूमन ते वास्तव न स्वीकारता स्वतःला उगाच चिरतरूण समजत असते. त्याला वाटते की वृद्धापकाळातही आपण तरूण शरीरातच आहोत. म्हणून आपण जशा उड्या मारतो तशा उड्या या जीर्ण शरीरानेही मारल्या पाहिजेत. म्हणून ते मेंदूमन हट्टाने थकलेल्या वृद्ध शरीरालाही स्वतःच्या कलाने नाच म्हणते. ज्याप्रमाणे लहान नातवंडे वृद्ध, थकलेल्या आजी आजोबांना बोकांडी बसून त्यांना घोडा करून धाव म्हणतात व त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीराची चाळण करतात तसेच वृद्ध शरीरात उड्या मारणाऱ्या मेंदूमनाचे असते. काही आजी आजोबांना ही नातवंडी धमाल, मस्ती आवडते तसेच काही म्हाताऱ्यांना आपण अजूनही तरूण आहोत असेच वाटत असते.

मी या अवास्तव गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवतो. माझे मेंदूमनही मला नाच म्हणते, पूर्वीसारखे धाव म्हणते. पण माझे थकलेले शरीर माझ्या मनाला बिलकुल जुमानत नाही. पूर्वी मन शरीरावर राज्य करायचे. आता उतार वयात शरीर मनावर राज्य करीत आहे. ते राज्य स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नाही. पण माझे मन हे वास्तव स्वीकारायला तयार होत नाही. या कटू वास्तवामुळे ते नाराज, हिरमुसले होऊन अशांत होते. अशा या अशांत मनाला शांत करण्यासाठी म्हणजे माझ्या मनःशांतीसाठी मला परमेश्वरी अध्यात्माची गरज भासते. अर्थात उतार वयात अध्यात्म ही माझी चैन नसून गरज आहे. ही गरज मी माझ्या वरील आध्यात्मिक पद्धतीने भागवतो. या लेखातून माझी आध्यात्मिकता का (गरज म्हणून), कुठे (परमेश्वरापाशी) व कशी तर (ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री परमेश्वराय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः,ओम शांती) या पद्धतीने. या अध्यात्म पद्धतीत मी सुरूवात ओम ने करतो कारण ओम मधूनच विश्व निर्माण झाले व ओम मध्येच सारे विश्व सामावलेले आहे व या ओम विश्वाचे मूळ परमेश्वर आहे ही हिंदू धर्मीय संकल्पना, धारणा मी स्वीकारली आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१.२०२४

Copyright Disclaimer!

COPYRIGHT DISCLAIMER!

All please know it well that this videographed film song is within public domain and being open for public watching on public platform, its public sharing by members of public cannot be claimed as the exclusive copyright of its original creator provided its original artistic form is not changed and is not claimed to be original creation of one who shares it in public meaning the name & credit of original creator remains reserved with such original creator only.

I do respect the copyright of original creator of any art such as music, writing etc. I being myself a writer. I have shared this musical video without any change or modification in its original content with my facebook friends purely for the purpose of enjoying its music in its original form within friend circle and not with commercial purpose of making any profit out of such sharing. 

I am not at all claiming it as my own creation & original creation remains with the original creator of artistic creation or musical video. The copying simply means imitation of others creation as creation of copy master. I have shared this musical video with my facebook friends for FAIR USE for purpose of enjoying it within friend circle. This FAIR USE is  permitted by Copyright Act and there is no infringment of copyright of original creator. It is non-profit sharing only for personal entertainment purpose within friend circle and such use is FAIR USE. I disclaim my ownership  right over this creation and I disclaim that I have infringed with copyright of its original creator. Thank you!

-©Adv.B.S.More 


शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

विविध पदार्थ, वनस्पती, पशूपक्षी व माणसे जशी निसर्गात विखुरलेली आहेत तसे निसर्गाचे विज्ञानही निसर्गात विखुरलेले आहे. एका माणसाला या विखुरलेल्या विविध गोष्टींवर व विखुरलेल्या विज्ञानावर एकट्याचे स्वराज्य निर्माण करता येत नाही, मग सुराज्याचा तर प्रश्नच नाही.

एकटा माणूस त्याच्या आयुष्यात फार तर विखुरलेल्या तुकड्यांच्या काही तुकड्यांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो व त्या प्रावीण्याच्या जोरावर त्या ठराविक तुकड्यांवरच मर्यादित राज्य करू शकतो. विखुरलेल्या या सगळ्या तुकड्यांना आर्थिकदृष्ट्या एकत्रित करून त्यांचे एकत्रित आर्थिक मूल्य मोजून तेवढाच पैसा बाजारात खुला करण्याचे काम देशाच्या मध्यवर्ती बँकेचे (भारतीय रिझर्व्ह बँक हे उदाहरण) असते.

माझा प्रश्न हा आहे की, अनैसर्गिक व असामाजिक वर्तनातून पर्यावरण प्रदूषित करणारे विनाशी घटक पर्यावरणात सतत निर्माण होत असतात व त्यांच्याकडे वातावरण बिघडवण्याचे उपद्रव मूल्य (न्युसन्स वॕल्यू) जबरदस्त असते. हे विनाशी उपद्रव मूल्य देशाची मध्यवर्ती बँक विखुरलेल्या तुकड्यांच्या एकूण आर्थिक मूल्यातून वजा करते काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.१२.२०२३

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

छळणाऱ्या गोष्टी!

मनाला छळ छळ छळणाऱ्या उपद्रवी गोष्टी!

जग विविधतेने भरलेले आहे पण त्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या प्रत्येक विविधतेशी प्रत्येकाची मैत्री होऊ शकत नाही. त्यातील बऱ्याच गोष्टी दुरून डोंगर साजरे प्रकारातील असतात. निरनिराळे खेळ प्रकार, निरनिराळ्या कलाकृती, राजकारण इतकेच काय कसले ते देवधर्मी अध्यात्म या माझ्यासाठी तरी अशाच दुरून डोंगर साजरे प्रकारातील गोष्टी  आहेत. त्यामुळे कदाचित लोक मला निरस, अरसिक म्हणतील पण मला त्याची पर्वा नाही. कारण इतरांसाठी फायद्याच्या असणाऱ्या या गोष्टी त्यांचा खुळा नाद केल्याने मला मात्र उपद्रवी, छळवादी होतात.

जोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्या क्रियाशीलतेशी मैत्री संबंध जुळवत नाही तोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्यासाठी कायम परकी राहणार. परक्या माणसांना मायाप्रेमाने तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुमची फजिती होणार त्यापेक्षा ती गोष्ट टाळलेली बरी.

मूलभूत, आवश्यक गोष्टी कोणत्या व त्यांना पूरक गोष्टी कोणत्या म्हणजे गरजा कोणत्या व चैनी कोणत्या याची यादी प्रत्येकाने करायला हवी. मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून पूरक गोष्टींकडेच जास्त लक्ष दिले तर मनाला पूरक गोष्टींचाच खुळा नाद लागतो. अशा पूरक गोष्टींचीच मनाला सवय लागते, मनाला त्यांचे वेड, व्यसन लागते. त्यामुळे चैनच मनाची गरज बनते. उद्योगधंद्याचे जाहिरात तंत्र (मार्केटिंग) मानवी मनाच्या या वेडावर, व्यसनावर चालते. मनाला चिकटलेली अशी चैन पुढे मनाचा छळ सुरू करते. दारू सिगारेटचे, जुगाराचे व्यसन हे याच छळवादी प्रकारातले. पण याच छळवादी मानसिक वेडावर काही चालू माणसे गडगंज श्रीमंत होतात व व्यसनाधीन माणसे भिकेला लागतात.

स्वतःच्या मनाला उगाच चिकटून घेतलेल्या अशा पूरक चैनीच्या, व्यसनी गोष्टी कोणत्या याची यादी बनवा व त्यांना अती किंमत न देता होता होईल तेवढ्या त्या दूर ठेवा. त्यांची छळवादी सवय जबरदस्तीने मोडून काढता आली नाही तरी ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. या उपद्रवी गोष्टींची किंमत हळूहळू शून्यावर आणा. स्वतःपुढे काय वाढून ठेवलेय हे न बघता जगाचा निष्फळ विचार करणे सोडून द्या. आभासात, कल्पनाविश्वात जगणे सोडून देऊन वास्तवात जगायला शिका. स्वतःच स्वतःचा मानसिक छळ करू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१२.२०२३

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

माझ्या माहितीनुसार (चुकत असेल तर स्पष्ट करून सांगा) ओशो हेच सांगतात की भौतिकतेचा अत्युच्च आनंद घ्या मग संपृक्त अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेला पोहोचल्यावर भौतिकता जरा सुद्धा आवडणार नाही आणि मगच तुम्ही भौतिक मार्ग सोडून आध्यात्मिक मार्गावर याल. असे कुठे होते काय? हे तत्वज्ञान भांडवलदार लोकांना पटले असते तर जगात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालीच नसती. गंमत ही आहे की अध्यात्म गरीब लोकांना सांगून त्यांना ठेविले अनंते तैसेची रहावे शिकवले जाते म्हणजे षडयंत्री लोकांना मलई खायला रान मोकळे. अशावेळी अध्यात्मातला देव शांतपणे ही गंमत बघत असतो. आपण वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१२.२०२३

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जात हा ज्ञात शब्दाचा अपभ्रंश असावा. पिढ्यानपिढ्या ठराविक  समाज वर्गाकडे निसर्ग विज्ञानाचे विशिष्ट ज्ञान व त्यातील कौशल्य (विशिष्ट विज्ञान-तंत्रज्ञान) संचयित झाल्याने विशिष्ट ज्ञान कौशल्यावर आधारित व्यवसाय, उद्योगधंदा करणाऱ्या लोकसमूहाचा विशिष्ट समाज वर्ग निर्माण झाला असावा व त्या वर्गाची विशिष्ट जात निर्माण झाली असावी. अशाप्रकारची जात ही ज्ञानाधारित असल्याने तिला जात म्हणण्याऐवजी ज्ञात म्हटले तर समाजातील विविध जाती या ज्ञाती म्हणून दिसू लागतील.

विज्ञानाला धर्माचा रंग देऊन किंवा विज्ञानावर धर्माचा मुलामा चढवून एखाद्या समाज वर्गाने विज्ञानाचा गाभा पिढ्यानपिढ्या स्वतःच्या ताब्यात ठेवून बहुजन समाजाला ज्ञानापासून खरंच पिढ्यानपिढ्या वंचित ठेवले का अर्थात ज्ञानाला सामाजिक दृष्ट्या संकुचित करून ठेवले का हा जातीचा (माझ्या मते ज्ञातीचा) इतिहास अभ्यासण्याचा विषय आहे. यावर डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल संशोधन करून शूद्र पूर्वी कोण होते यावर संशोधनात्मक कारणमीमांसा करीत निष्कर्ष काढला आहे. परंतु ज्याला हे संशोधनात्मक आंबेडकरी साहित्य वाचण्याचा आळस, कंटाळा असेल त्याने स्वतःचा काॕमन सेन्स (सामान्य जाणीव) वापरला तरी समाजातील जातसंघर्षाची कारणे कळतील.

डाॕक्टरांच्या मुलाबाळांनी वैद्यकीय ज्ञान स्वतःकडे एकवटून ठेवून तोच वैद्यकीय व्यवसाय पिढ्यानपिढ्या करायचे ठरवले तर डाॕक्टरांचीही ज्ञानाधारित डॉक्टर जात (ज्ञात) बनेल. वकिलांच्या मुलाबाळांनीही पिढ्यानपिढ्या तेच केले तर वकील वर्गाचीही जात (ज्ञात) बनेल. हेच काय पण पोलीस, लष्कर, उद्योजक व व्यापारी, अर्थकारणी यांच्याही ज्ञानाधारित जाती (ज्ञाती) बनतील. प्रश्न आहे तो सफाई कामगारांचे काय करायचे? त्यांच्या मुलांनीही पिढ्यानपिढ्या सफाई कामगार बनूनच जगायचे का? म्हणजे ज्ञान वंचित राहिल्याने पिढ्यानपिढ्या खालच्या दर्जाची कनिष्ठ कामेच करीत रहायचे का? जन्माने अशी जात (वंचित ज्ञानाधारित वंचित ज्ञात असे वाचावे) त्यांच्यावर उच्च ज्ञान वर्गीय समाजाने लादल्यामुळेच समाजात शूद्र हा समाज वर्ग निर्माण झाला व त्या वर्गातून अनेक शूद्र जाती निर्माण झाल्या हे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन वाचल्यास कळेल. जन्माने अशी शूद्र जात विशिष्ट कनिष्ठ वर्गावर उच्च वर्गीय समाजाने लादल्याने शूद्रांचा ज्ञान, अर्थ व राज (सत्ता) विकास होऊ शकला नाही म्हणून भारतीय राज्य घटनेत अशा कनिष्ठ (शूद्र) जातींच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी जातनिहाय आरक्षण कायद्याने निर्माण करावे लागले, ही मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

समाजाने जर अशी विशिष्ट जात विशिष्ट समाज वर्गावर जन्माने लादली तर अशी गोष्ट मनुष्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्य, विकासाच्या आड येते. डॉक्टरच्या मुलाला इंजिनियर होऊ वाटले तर त्याला इंजिनियर होऊ दिले पाहिजे. वकिलाच्या मुलीला जर आंतरराष्ट्रीय कंपनीची व्यवस्थापिका होऊ वाटले तर तिला तशी व्यवस्थापिका होऊ दिले पाहिजे. माझ्या मुलीला मी तेच निवडीचे स्वातंत्र्य दिले व वकील होण्याऐवजी ती आंतरराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापिका झाली. म्हणजे माझी वकिली माझ्याबरोबरच संपणार. माझे वडील गिरणी कामगार पुढारी होते पण मी कामगारच झालो नाही. कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन वकील झालो तर मग पुढे कामगार पुढारी होण्याचा प्रश्नच उरला नाही. जन्माने माझ्या वडिलांची, माझी व माझ्या मुलीची जात एकच व ती म्हणजे मराठा. पण ज्ञानकर्माने आमच्या एकाच मराठा कुटुंबात तीन जाती (ज्ञाती) निर्माण झाल्या त्या म्हणजे अनुक्रमे कामगार पुढारी, वकील व व्यवस्थापन. आमच्या या तीन जाती आमच्या वैयक्तिक ज्ञानकर्मावर आधारित आहेत. आमचे नातेवाईक केवळ मराठा समाजाचे आहेत या एकाच निकषावर आमचे आमच्या नातेवाईकांशी बौद्धिक, वैचारिक पातळीवर जमेलच असे नाही. तिथे वैचारिक आंतरविरोध व जातसंघर्ष असू शकतो व त्याला मुख्य कारण म्हणजे ज्ञानकर्मावर आधारित निर्माण झालेल्या आपआपल्या कुटुंबातील आमच्या अंतर्गत जाती (ज्ञाती) या वेगवेगळ्या आहेत. त्यात समानता नाही. एवढेच काय एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेली मुले एकाच जैविक रक्ताची असली तरी ती बौद्धिक, वैचारिक दृष्ट्या पुढे एकसारखी राहतील याची शास्वती देता येत नाही. कारण बौद्धिक कष्ट व कर्म वेगळे असते. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्यातलाच हा भाग. असे म्हणतात की वेगवेगळी असलेली हाताची ही पाच बोटे एक झाली तर एकजूटीची मूठ बनते व जेवण करणे सोपे जाते. पण एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या हातांची नुसती बोटेच वेगळी नसतात तर त्यांच्या मुठीही वेगळ्या असतात ही गोष्ट विसरता कामा नये. एकाच कुटुंबातील अशी सगळीच मुले उच्च शिक्षित झाली तरी अशा उच्च विद्याविभूषित भावाबहिणींमध्ये सुद्धा वैचारिक संघर्ष असू शकतो कारण त्यांच्या वैचारिक जाती (ज्ञाती) वेगवेगळ्या असू शकतात. एकाच धर्मात अनेक पंथ व एकाच जातीत अनेक पोट जाती असतात व त्यांच्यात आंतर विरोध असतो त्यातलाच हा प्रकार. माझ्या मते, शिक्षण, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यात कौटुंबिक व सामाजिक अडवणूक केल्यानेच आंतरविरोध व जातसंघर्ष निर्माण होतो.

माझ्या या लेखाचा थोडक्यात अर्थ एवढाच आहे की प्रत्येकाची जात (ज्ञात) ही जन्माने नव्हे तर प्रत्येक मनुष्याच्या ज्ञानकर्माने ठरते. हे तत्व समाजमान्य व्हायला हवे तरच जन्माधारित जातीपातींचा अंत होऊन जातसंघर्ष नष्ट होईल व मग आरक्षण या विषयावर कायमचा समाजमान्य तोडगा निघेल. सद्या तरी समाजात जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण हे दोन्ही मुद्दे हे वास्तविक मुद्दे आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३