https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मे, २०२०

वरळी बीडीडी चाळ

का रे दुरावा?

(१) वय वाढते तसे जीवनात बरेच बदल घडत जातात. तुरळक माणसे अविवाहित राहत असली तरी बरीच माणसे विवाह करून संसारात रमतात. त्यांना मुलेबाळे होतात. मग हळूहळू त्यांचे जुन्या मित्रमंडळींकडे जाणे येणे कमी होते आणि राहतात त्या फक्त जुन्या आठवणी!

(२) तुम्ही जेवढे जास्त संवेदनाशील तेवढ्या जुन्या आठवणी तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतात. मी वरळीच्या बी.डी.डी. चाळीत राहायचो. त्या चाळीतले प्रेमळ वातावरण मी कदापि विसरू शकत नाही. १०×१२ च्या छोट्या खोल्यांत सर्वांचे संसार थाटलेले. घरे जेवढी चिकटून तेवढी माणसांची मनेही चिकटून!

(३) दिवाळीच्या अगोदर सगळे शेजारी करंज्या, लाडू वगैरे गोड पदार्थ बनवायचे तेंव्हा एकमेकांच्या घरात मदतीला जायचे. बहुतेक शेजारी गिरणी कामगारच असल्याने दिवाळीचा बोनस मिळाला की मग बाजारातून रवा, मैदा साखर, तेल वगैरे कच्च्या मालाच्या खरेदीची लगबग सुरू व्हायची. सर्वांची आर्थिक परिस्थिती जवळजवळ सारखी असल्याने दिवाळीचे पदार्थ बनविताना तूपाऐवजी गोडेतेलाचाच जास्त वापर व्हायचा. पण रेशनवर डालडा अर्थात वनस्पती तूप मिळायचे. त्या डालड्याचाही पदार्थ खुसखुसीत होण्यासाठी वापर व्हायचा. सगळीकडे दिवाळीच्या पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. एकमेकांचे पदार्थ चाखून अमूक अमूक शेजाऱ्याचा लाडू मस्तच झालाय, अमूक अमूक शेजाऱ्याची करंजी खूपच छान झालीय, अशी कुजबूज कानी यायची. दिवाळी तर सर्वजण मिळूनमिसळून धूमधडाक्यात साजरी करायचे.

(४) दिवाळीचे जाऊ द्या, पण रोजच्या दैनंदिन जीवनात सुध्दा घरात बनविलेल्या अन्नपदार्थांची देवाणघेवाण व्हायची. अमूक अमूक शेजाऱ्याच्या घरी मच्छी तळत असल्याचे लगेच कळायचे कारण त्याचा ठसका शेजारच्यांना जोरात लागायचा. संबंध खूपच जवळचे असतील तर त्या शेजाऱ्याला तो मच्छीचा तुकडा मिळायचा. 

(५) सांगता येण्यासारख्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत वरळी बी.डी.डी. चाळीतल्या त्या वास्तव्याच्या. मनातून जाता जात नाहीत त्या आठवणी. आता सगळी मंडळी विखुरलेली आहेत. जवळजवळ सर्वांचेच आईवडील आता हयात नाहीत. जी मंडळी हयात आहेत ती आता मागेपुढे माझ्याच वयाची आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी ही मंडळी आपआपल्या संसारात इतकी समरस झाली आहेत की एकमेकांना पुन्हा भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यायला कोणाला वेळच नाहीये. 

(६) काहीजण फेसबुक वर माझे मित्र आहेत. पण माझ्या पोस्टस ते वाचतात की नाहीत हे मला माहित नाही. नाही वाचू देत. पण कधीतरी त्यांनी फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये यावे, जुन्या आठवणी काढीत मस्त गप्पा माराव्यात असे अधूनमधून वाटत राहते. फेसबुक वर असणाऱ्या एका बी.डी.डी. चाळ शेजाऱ्याचा काल वाढदिवस होता. मी व्हॉटसअपवर नाही त्यामुळे त्याला त्याच्या फेसबुक टाईमलाईन वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच इनबॉक्स मध्ये "कसा आहेस, मुलेबाळे काय करतात" असा मेसेज टाकलाय.  बघूया काय उत्तर येतंय ते. शेवटी सर्वांनाच या जगाचा कायमचा निरोप घ्यायचाय. जिवंत आहोत तोपर्यंत तरी अधूनमधून बोलूया की! वय झाले म्हणून काय झाले? एवढा दुरावा का?

-आपल्या सर्वांचा तोच संवेदनाशील बाळू

गुरुवार, २८ मे, २०२०

ओम् सुख शांती परमेश्वरा!

ओम् सुख शांती परमेश्वरा!

ही प्रार्थना अंतर्मनाच्या अंतःप्रेरणेतून व अंतःस्फूर्तीतून येत असेल तर म्हणायला काहीच हरकत नसावी. पण ही प्रार्थना सारखी सारखी किंवा पुन्हा पुन्हा म्हणण्याचा मंत्रचळ लावून घेऊ नये.

या प्रार्थनेत ओम् म्हणजे प्रचंड मोठे विश्व असा अर्थ असल्याने अशी प्रार्थना संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची अर्थात संपूर्ण विश्वात सुख शांती  इच्छिणारी अर्थात तेवढी विशाल असेल तरच तिला अर्थ आहे. कारण फक्त स्वतःच्याच सुख शांतीची इच्छा प्रगट करणारी स्वार्थी प्रार्थना विश्वाच्या सर्वोच्च, स्वयंभू, स्वयंपूर्ण निसर्गशक्ती पर्यंत म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचतच नाही.

हा माझा स्वतःचा वैयक्तिक विचार आहे. त्याला कोणत्याही धार्मिक पांडित्याचा आधार नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी व माझ्याशी निरर्थक वाद टाळावेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.५.२०२०

मंगळवार, २६ मे, २०२०

निसर्ग माझा गुरू!

निसर्गाला गुरू मानायचे, पण देव मानायचे नाही?

(१) निसर्गाच्या म्हणजे विश्वाच्या निर्मिती मागे देव आहे की नाही, त्या निर्मिती नंतर निसर्गात देवाचे अस्तित्व, वास्तव्य आहे की नाही यावर होत असलेल्या चर्चा बस्स झाल्या व वादही बस्स झाले. काय झाले या चर्चातून, वादातून तर आस्तिक व नास्तिक असे दोन गट तयार झाले. या दोन गटांनी खरं तर बुद्धीचा फालुदा करून टाकलाय. म्हणून मी या वादातच पडत नाही. काही फायदा नाही या वादात पडून. पण मला निसर्गाचे कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटी मी निसर्गाचे निरीक्षण करतो. त्याचे परीक्षण करण्याएवढा मी मोठा नाही. म्हणून निरीक्षण हाच माझ्या अभ्यासाचा पाया!

(२) या निरीक्षणातून मला कळते की निसर्ग हा स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. तो कोणावरही अवलंबून नाही. मग निसर्ग हा जर एवढा मोठा, परिपूर्ण, शक्तीमान आहे तर त्यालाच देव मानले तर काय फरक पडतो? या निसर्गात जन्म घेतल्यावर हा निसर्गच तर आमचा गुरू होतो. तोच तर आम्हाला त्याच्या सान्निध्यात कसे रहायचे हे शिकवितो.

(३) गुरू म्हणून निसर्गाची शिकवण काय तर तुम्हाला मी जगण्यासाठी शारीरिक व बौद्धिक ताकद दिली आहे तिचा हुशारीने वापर करून जगा. तुम्ही माझ्यासारखे स्वयंभू व स्वयंपूर्ण होऊ शकत नसला तरी तुम्हाला माझ्या कडून मिळालेल्या मर्यादित शारीरिक व बौद्धिक शक्तीच्या जोरावर तुम्ही जास्तीतजास्त स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर व्हा. तुम्ही तुमचे स्वत्व जाणा व स्वतःच्या नैसर्गिक अंतःस्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने, स्वप्रेरणेने स्वतःचे स्वकर्तुत्व सिद्ध  करीत स्वाभिमानी व्हा!

(४) निसर्गाचे निरीक्षण करताना व निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना निसर्गाकडून मला वरील संदेश मिळतो आणि म्हणून निसर्ग हाच माझा सर्वात मोठा गुरू होतो. या महान गुरू पुढे इतर सर्व महान शास्त्रज्ञ, महापुरूष, संत, महात्मे मला लहान वाटतात. याचे कारण म्हणजे या महान लोकांचे महान कर्तुत्व हे त्यांनी निसर्ग गुरूला जवळ केल्यानेच शक्य झाले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

(५) आता प्रश्न राहिला की, निसर्गाला गुरू मानायचे पण देव मानायचे नाही, असे का? याचे कारण म्हणजे मानवी मन देव संकल्पने विषयी खूप हळवे आहे. या हळवेपणातूनच देवावर विसंबून राहण्याची मानवी मनाला सवय लागते. आणि हे परावलंबीत्व निसर्गाला मान्य नाही. प्रत्येक सजीवाने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे हा निसर्गाचा आग्रह असतो. उदा. वयानुसार माणसाची दृष्टी कमी होते. अशावेळी निसर्ग माणसाला काय सांगतो तर "बाबारे, दृष्टी  अधू झाली म्हणून माझ्याकडे रडत येऊन मी तूला दिलेल्या बुद्धीचा अपमान करू नकोस, त्याच बुद्धीने डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा व चष्म्याचा नंबर काढून घेऊन दुकानातून चष्मा विकत घेऊन तो डोळ्यांवर लाव"! हा निसर्ग संदेश माणसाला स्वावलंबनाचे, आत्मनिर्भरतेचे शिक्षण देतो व त्या शिक्षणातून मानवी बुद्धीला शहाणपणा शिकवितो.

(६) क्षणभर अशी कल्पना करा की, निसर्ग जर देव रूपात प्रकट होऊन माणसांपुढे साक्षात उभा राहिला तर काय होईल? माणसाच्या मर्यादित बुद्धीला, इंद्रियांना निसर्गाचे ते महान देव रूप झेपेल काय? माणसेच काय पण निसर्गातील सर्व सजीव सृष्टीच ठप्प होऊन जाईल. याच प्रमुख कारणामुळे निसर्ग कधीही देव रूपात प्रकट होत नाही किंवा प्रकट होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे एकदा का मनाला कळले की मग निसर्गाला देव माना नाहीतर मानू नका, काही फरक पडत नाही. पण निसर्गाला गुरू मानून त्याच्याकडून त्याच्या नैसर्गिक सत्याचे अर्थात विज्ञानाचे शिक्षण घेण्यात व त्या वैज्ञानिक शिक्षणातून शहाणपणा शिकण्यात फायदाच आहे हे विसरता कामा नये.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.५.२०२०

शनिवार, २३ मे, २०२०

आत्मनिर्भर भारत?

आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!

एक तरी ॲप आहे का टिकटॉक सारखे भारतात? आणि टिकटॉक वरील लोकांची कला ही किटकिट वाटण्यासारखी गोष्ट आहे का? कला सादर करण्याची मक्तेदारी काय फक्त सेलिब्रिटी लोकांनाच आहे? आणि हे फेसबुक काय किंवा व्हॉटसअप काय ते भारत निर्मित समाज माध्यम आहे काय? ते नसते तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या व बडी पोच नसलेल्या लोकांचे  लिखाण कोपऱ्यात धूळ खात पडले असते ना! वकील, डॉक्टर मंडळी फेसबुक लाईव्ह होऊन लोकांना कायदेविषयक व वैद्यकीय मार्गदर्शन करू शकतात ते या परदेशी समाज माध्यमांच्या मुळेच ना! टिकटॉक वर सादर होणाऱ्या गरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या कलेचेही तसेच आहे. ट्वीटर वरील राजकारणी, सेलिब्रिटी लोकांची टिवटिव चालते आणि टिकटॉक वरील सर्वसामान्य माणसांच्या कलेची किटकिट वाटते? आत्मनिर्भर भारत व्हायचेय ना, मग चीनच्याच का भारत सोडून इतर सगळ्याच देशांच्या सगळ्याच गोष्टी फेकून  दिल्या पाहिजेत ना! १४० कोटी भारतीय जनते पैकी किती भारतीय तयार होतील परदेशी अॕप, परदेशी समाज माध्यमे, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायला? जरा ही मोहीम उघडून तरी बघा! स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी म्हणून ही स्वदेशी चळवळ ठीक होती, पण आता असे देशप्रेमी करोडोच्या संख्येने पुढे येतील का? आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.५.२०२०

बुधवार, २० मे, २०२०

सत्य हाच ईश्वर!

सत्य हाच ईश्वर!

(१) महात्मा गांधी म्हणाले की Truth is God म्हणजे सत्य हाच ईश्वर! त्यांच्या या वाक्यात खूप सखोल अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मात सत्यनारायणाची पूजा केली जाते. पण त्या पूजेमागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याचा कोणी प्रयत्न केलाय का? तो अर्थ समजून न घेता चमत्कार असलेल्या काही कथा त्या पूजेत घालून लोकांना सत्यापासून अंधश्रध्देकडे नेण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.

(२) महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्व हे सत्याने भरलेले आहे. विश्व म्हणजेच निसर्ग! देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ हाच की नारळ हे विश्व किंवा निसर्गाचे प्रतीक होय आणि त्यातील पाणी हे  विश्वातील किंवा निसर्गातील सत्य ईश्वराचे प्रतीक होय! थोडक्यात विश्व किंवा निसर्ग हे सत्य ईश्वराचे घर किंवा मंदिर होय! या घराचे किंवा मंदिराचे सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच सत्य होय. संपूर्ण विश्व किंवा निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच प्रतिबिंब होय!

(३) सत्य निसर्गातील सत्य ईश्वर कसा आहे? तर तो त्या निसर्गाप्रमाणेच आहे. अर्थात आपण आपल्या शरीराला जर निसर्ग मानले तर त्या शरीरातील आपल्या मनाला आपण ईश्वर मानणे यात चूक नाही (तोरा मन दर्पण कहलाये या आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातील मन ही ईश्वर, मन ही देवता हे शब्द आठवा). आपले शरीर व आपले मन या दोन्हीही गोष्टी सत्य आहेत व निसर्गातील सत्य ईश्वराचाच त्या आविष्कार आहेत. निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे निसर्गातील सत्य ईश्वराप्रमाणे दोन स्वरूपात आहे. हे सत्य सुंदर आहे तसे बीभत्सही आहे, प्रकाशमय आहे तसे अंधारमयही आहे, चांगले आहे तसे वाईटही आहे, स्वच्छ आहे तसे अस्वच्छही आहे, सुखदायक आहे तसे दुःखदायकही आहे. हे सत्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ! निसर्गात असलेल्या सत्य ईश्वराचे किंवा सत्यनारायणाचे हेच तर खरे रंग, रूप आहे व हेच गुण आहेत.

(४) निसर्गाचे नैसर्गिक सत्य हाच ईश्वर आहे हे एकदा का मनात ठामपणे पक्के केले की मग देवाविषयीच्या अंधश्रध्दा आपोआप दूर होतात. या अर्थाने ईश्वरावर श्रध्दा असणाऱ्या महात्मा गांधी यांचा ईश्वराविषयीचा दृष्टिकोन हा पूर्ण वैज्ञानिक होता हे मान्य करावेच लागेल.

(५) निसर्गातील ईश्वरी सत्य ही मिथ्या कल्पना करायची गोष्ट नाही तर प्रत्यक्षात अनुभवायची गोष्ट आहे. निसर्गातील नैसर्गिक सत्याचा खरा अनुभव हीच निसर्गातील सत्य ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती होय! निसर्गात सतत सत्यकर्म करीत रहायचे व त्या सत्यकर्माचा सत्य अनुभव घेत रहायचा हेच तर त्या सत्य ईश्वराने नेमून दिलेले ईश्वरी कार्य होय!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.५.२०२०

मंगळवार, १९ मे, २०२०

कोरोनाची भीती?

कोरोनाची भीती, खरे काय आणि खोटे काय?

कोरोनावर लस नाही, औषध नाही तर मग कोरोनाचे रोगी बरे कसे होतात? अहो, ज्यांचा कोरोना प्राथमिक अवस्थेत आहे व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे ते सर्दी, खोकला, तापाच्या जनरल ट्रीटमेंटने बरे होतात आणि कोरोनावर स्पेसिफिक ट्रीटमेंट नसल्याने बाकीचे मरतात हे जनतेला नीट समजावून कधी सांगणार? सूर्यप्रकाशात असलेल्या  ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पण सक्तीच्या लॉकडाऊन मुळे सूर्यप्रकाश दुर्मिळ झालाय त्याचे काय? लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय आहे काय? रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असलेली कोरोनाग्रस्त व्यक्ती या रोगाच्या लक्षणाशिवाय मस्त राहते, पण ती समाजात कोरोना वाहक म्हणून फिरते हे विचित्र वाटत नाही काय? मग सगळ्यांनाच क्वारंटाईन करून टाकायचे काय? आम्ही वैद्यकीय तज्ञ नसलो तरी आम्हाला यातील काहीच कळत नाही असे कृपया गृहीत धरू नका! मुंबई, पुण्यातील एखाद्या कोपऱ्यात कोरोनाग्रस्त वाढत असतील तर मग तो तेवढा कोपराच रेड झोन म्हणून सील करून त्या कोपऱ्याचीच विशेष वैद्यकीय काळजी घेत राहिल्यावर सगळी मुंबई व सगळे पुणे शहर कोरोनामय झालेय असा चुकीचा संदेश गावी जाणार नाही ना? मुंबई, पुण्यातील मोठा प्रदेश कोरोनापासून सुरक्षित असेल तर तसे जाहीर का होत नाही? रोज नवीन आकडेवारी जाहीर होतेय व सरसकट प्रचंड मोठी भीती निर्माण होतेय या कोरोनाविषयीच्या नकारात्मक बातम्यांनी त्याचे काय करायचे? खरं तर, कोरोनाची भीती ही त्याच्या प्रत्यक्ष धोक्यापेक्षा त्याच्या विषयीच्या अज्ञानातच जास्त आहे, हे खरे नाही काय? कधी तळपणार ज्ञानाचा सूर्य आणि कधी होणार अज्ञानाच्या अंधाराचा नायनाट?

-ॲड.बी.एस.मोरे©१९.५.२०२०

सोमवार, १८ मे, २०२०

ओम् सुख शांती!

ओम् सुख शांती!

(१) निसर्ग व देव यांना मला मरेपर्यंत सोडता येणार नाही. नास्तिक निसर्गाला जवळ करतात पण देवाला दूर करतात. त्यामागे त्यांची एक विशेष बौद्धिक धारणा आहे. पण मी निसर्ग व देव या दोघांनाही चिकटून आहे व त्यामागे माझीही एक विशेष बौद्धिक धारणा आहे. निसर्गाच्या पाठीमागे व निसर्गात भले भौतिक स्वरूपात का असेना पण कोणती तरी प्रचंड मोठी देव शक्ती असल्याशिवाय निसर्गाचा पसारा वाढू शकत नाही व त्या पसाऱ्याचा गाडा चालू शकत नाही, अर्थात आईबापाशिवाय मुले होऊ शकत नाहीत व मुलांचा नीट सांभाळ होऊ  शकत नाही, ही माझी आस्तिक होण्यामागील सरळ साधी मूळ बौध्दिक धारणा!

(२) माझ्यासाठी निसर्ग म्हणजे संपूर्ण विश्व जे पदार्थमय आहे व शक्तीमय आहे. या निसर्गाचे रंग, रूप, गुण त्यातील असंख्य सजीव, निर्जीव पदार्थांच्या विविधतेमुळे वेगवेगळे आहेत. पण तरीही या निसर्गाचे (म्हणजे विश्वाचे) वैश्विक वागणे सगळीकडे म्हणजे सगळ्या विश्वात सारखेच आहे हे विशेष! पृथ्वीवरील संपूर्ण सजीव, निर्जीव सृष्टी हे पृथ्वीवरील संपूर्ण विश्व असा मर्यादित अर्थ घ्यायला हवा. कारण ग्रह, तारे युक्त अंतराळ विश्व हे प्रचंड मोठे आहे व त्यात पृथ्वीच काय पण तिच्यासोबत असलेली सूर्यमाला हा सुध्दा अंतराळ विश्वातला एक छोटासा कण आहे. त्यामुळे आपण आपल्या पृथ्वीवरील विश्वाविषयीच जास्त बोलू शकतो. 

(३) निसर्गाचे वागणे हे त्याच्या विविधतेसह जगात सगळीकडे म्हणजे पृथ्वीवर असलेल्या  वेगवेगळ्या प्रदेशात सारखेच आहे हे सद्याच्या कोरोना विषाणूने (कोविड-१९) सिद्ध केले आहे. विविधतेत असलेला निसर्गाचा हा वैश्विक  सारखेपणा हेच सिद्ध करतो की निसर्ग हा सगळीकडे एकच आहे. सगळीकडे एकच असलेल्या निसर्गाची निर्मिती ही आपोआप झालीय की ती कोणत्या तरी दैवी शक्तीने (देवशक्तीने) केलीय हे समजायला मार्ग नाही. ही निर्मिती देवशक्तीने केली असावी असा एक बौद्धिक तर्क आहे. पण विश्वाची निर्मिती ही आपोआप झालेल्या महास्फोटाने झाली असाही काही वैज्ञानिकांचा तर्क आहे. मी तो तर्कच म्हणतो कारण त्या वैज्ञानिकांकडे बिग बँग नावाची एक थिअरी आहे जी थिअरी ठोस शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेली नाही. नास्तिक लोक ती सिद्ध न झालेली थिअरी स्वीकारतील पण देवशक्तीचा तार्किक सिद्धांत स्वीकारणार नाहीत. मी मात्र तसा महास्फोट झालाच असेल तर त्यामागेही देवशक्तीच असली पाहिजे या मताशी ठाम आहे.

(४) माझ्या मनात येणारा दुसरा तार्किक विचार असाही आहे की निसर्गाची निर्मितीच झाली नाही. निसर्ग पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. त्याला सुरूवात नाही की अंत नाही. हा निसर्ग त्याच्या प्रचंड मोठ्या विश्वात त्याला हवा तिथे व त्याला हवा तसा त्याच्या मर्जीप्रमाणे उत्क्रांत होतो जसा तो पृथ्वीवर उत्क्रांत झाला. डार्विन या शास्त्रज्ञाने पृथ्वीवर सजीव सृष्टीची उत्क्रांती "बळी तो कानपिळी" या नियमानुसार कशी झाली हे काही वैज्ञानिक पुराव्यांसह पटवून सांगितले आहे. पण मी तर म्हणेल की पृथ्वीवर निसर्ग हा त्याच्या मर्जीनुसार उत्क्रांत झाला व या उत्क्रांती मागेही निसर्गातील गूढ शक्ती आहे. या निसर्गाचे एकंदरीत वागणेच एक गूढ आहे. मग पुन्हा मनात एक तार्किक प्रश्न असा निर्माण होतो की गूढत्वाने भारलेल्या या निसर्गालाच देव मानावे की निसर्गाहून वेगळी अशी कोणती तरी गूढ दैवी शक्ती (देवशक्ती) या निसर्गातच वास्तव्य करून आहे असे मानून त्या सर्वश्रेष्ठ शक्तीलाच देव मानावे? या तार्किक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पुराव्यांनी मिळणे हे खूप कठीण आहे. याचे कारण म्हणजे माणूस नावाचा स्वतःला अती बुद्धीमान समजणारा प्राणी हा निसर्गापुढे अत्यंत क्षुल्लक आहे.

(५) मी मात्र माझ्या सरळसाध्या बुद्धीने या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत जी भली लोकांना वरवरची उत्तरे वाटतील. माझ्या बुद्धीला एकच कळते आणि ते म्हणजे निसर्ग काय किंवा त्या निसर्गातला देव काय या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या मिसळलेल्या आहेत की त्या अलग करताच येणार नाहीत. जसे मनुष्याचे शरीर व मन या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. म्हणून माझ्यासाठी निसर्ग व देव या दोन्ही गोष्टी जशा एक आहेत त्याप्रमाणे  निसर्गाचे भौतिक विज्ञान व देवाचा आध्यात्मिक धर्म या दोन्ही गोष्टीही एकच आहेत. एकच याचा अर्थ असा की या दोन्ही गोष्टी त्यांच्या विविधतेसह एकमेकांत योग्य प्रमाणात अशा मिसळून गेल्या आहेत की त्यातून एकच  एकसंध अशी गोष्ट अस्तित्वात आली आहे किंवा पूर्वीपासूनच ती तशीच एकसंध आहे. ती एकसंध गोष्ट म्हणजे निसर्गासह देव आणि विज्ञानासह धर्म!

(६) मी अशाप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जवळ बाळगूनच आस्तिक आहे. अर्थात देवाविषयीची माझी आस्तिकता ही पूर्णतः नैसर्गिक आहे. त्यात अंधश्रध्दा बिलकुल नाही. मी निसर्गातील देवापुढे "ओम् सुख शांती" असे पुटपुटतो त्यामागे मोठा अर्थ आहे. ओम् मध्ये संपूर्ण निसर्ग त्यातील देवासह सामावलेला आहे अशी मी तार्किक कल्पना करतो (ज्याची नास्तिक लोक मिथ्य किंवा असत्य कल्पना अशी संभावना करतील) व मग त्या ओम् पुढे सुख, शांती या दोनच गोष्टींची संक्षिप्त प्रार्थना करतो. कारण माझ्या मते या दोन गोष्टी मिळाल्या की सर्व गोष्टी मिळाल्या (या प्रार्थनेचीही नास्तिक लोक अंधश्रध्दा अशी संभावना करतील). ओम् मध्ये मी संपूर्ण जग व जगाचा म्हणजेच निसर्गाचा ईश्वर पाहतो आणि म्हणून त्या ओम् पुढील माझी "सुख, शांती" ही प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसते तर संपूर्ण जगासाठी असते. जगात मीही आलो म्हणजे परमार्थात स्वार्थाचे समाधान हे सुध्दा आपोआप आले. माझी ही आस्तिकता माझ्यासाठी तरी पूर्ण नैसर्गिक असल्याने नास्तिक काय किंवा इतर लोक काय म्हणतात याची मी पर्वा करीत नाही.

ओम् सुख शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.५.२०२०