https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

सार्वजनिक जीवन व खाजगी जीवन!

समाज माध्यमावरील लाईक्स व कौटुंबिक जीवनातील लाईक्स यात फरक आहे!

खाजगी लाईक्स व सार्वजनिक लाईक्स यात फरक आहे. दोन्ही जीवनात अंतर आहे. सोशल मिडिया हे समाज माध्यम असल्याने ते खाजगी  नसून सार्वजनिक आहे. सार्वजनिक गोष्टी घरात मांडत बसल्या तर संसारात त्रास होऊ शकतो व घरच्या खाजगी गोष्टी सोशल मिडियावर उघड्या करीत बसल्या तर खाजगी जीवनाची वाट लागू शकते. दोन्हीत संतुलन राखा!

-ॲड.बी.एस.मोरे©८.१०.२०२०

गरजेवर चैन भारी?

गरजेचा खून करण्याची संधी चैनीला देऊ नका!

सजीवांची जगण्याची गरज भागविण्यासाठी सृष्टीची रचना करणाऱ्या देवाने हवा, पाणी, अन्नधान्य मुबलक प्रमाणात दिले व कधीतरी चैन म्हणून अंगावर घालण्यासाठी सोने, हिरे, माणिक, मोती यांना दुर्मिळ केले. पण ज्या देवाने मनुष्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचीच मनुष्याने पुरी वाट लावली. त्याने काय डोके चालवले तर देवाने जे मुबलक प्रमाणात दिले त्याची किंमत कमी केली व देवाने अल्प चैन म्हणून जे दुर्मिळ केले त्याची किंमत वाढवली.  मग काय दारू, सिगारेट, चित्रपट, नाट्य, संगीत कला, क्रिकेट सारखे खेळ या करमणूक प्रधान चैनीच्या गोष्टी सेलिब्रिटी झाल्या. या दुर्मिळ चैनीच्या गोष्टींचे अक्षरशः सोने झाले. शेतात कष्ट उपसणारा शेतकरी व उद्योगधंद्यात घाम गाळणारा कामगार मात्र या नीच मानसिकतेतून गरीब झाला. अतिशहाणी मूठभर मंडळी याला कारण काय देतात तर अशा कष्टकरी लोकांची संख्या मुबलक आहे व श्रीमंत भांडवलदार मूठभर असल्याने दुर्मिळ आहेत. अहो पण या मूठभर लोकांना दुर्मिळ व सेलिब्रिटी कोणी केले हो? देवाने का माणसाने? देवाने तर चांगली सृष्टी निर्मिली! पण त्याने एक चूक केली की माणसाला थोडी जास्तीची बुद्धी देऊन सृष्टीचे व्यवस्थापन माणसाच्या ताब्यात देऊन तो देव मोकळा झाला. हाच अनुभव पदोपदी येत आहे मग "ज्या प्रभूने या सृष्टीला रचले, तोच ही सृष्टी चालवत आहे" या देवाच्या भजनाला माझ्या सारख्या खोलात विचार करणाऱ्या माणसाने का बरे म्हणून गुणगुणत बसावे? तसे करीत बसले तर आभासात जगल्यासारखे होईल व सत्य लपले जाईल. मूठभर श्रीमंतांना व त्यांना गुपचूप मदत करणाऱ्या काही धूर्त राजकारणी  मंडळींना तर हेच हवे आहे की लोकांनी डोळे उघडून सत्य बघूच नये. त्यांनी डोळे झाकून कायमच आभासात जगावे. तेंव्हा लोकांनी "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा विचार सोडून देऊन डोळे उघडणे गरजेचे आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनो तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणता कामा नये. तुम्ही असा विचार करून चैनीला गरजेचा खून करण्याची संधी देत आहात हे लक्षात घ्या!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

रचा है सृष्टी को जिस प्रभू ने, वही ये सृष्टी चला रहे है!

निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझी मूलभूत नैसर्गिक श्रद्धा आहे!

(१) आपल्याकडून जाणीवपूर्वक केली जाणारी कृती ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष कृती असते. ती आपल्या जागृत मनाने संपादन केलेल्या आपल्या ज्ञानावर आधारित असते. अशा कृतीची अचूकता ही ते ज्ञान नीट समजून घेण्याच्या आपल्या जागृत मनाच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून असते. अशी कृती जागृत मनाकडून कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत केली जाते. जागृत मन म्हणजे जागे असलेले मन. झोपी गेलेले मन अशी जाणीवपूर्वक कृती करू शकत नाही. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या क्रिया या ऐच्छिक क्रिया होत. पण काही क्रिया झोपेतही अजाणतेपणे केल्या जातात. उदा. प्रतिक्षिप्त क्रिया. आपल्या अजाणतेप्रमाणे केल्या जाणाऱ्या या क्रिया आपल्या जागृत मनाच्या विश्रांती (झोप) काळात आपल्या अजागृत मनाकडून गुपचूप केल्या जातात. या क्रियांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. ऐच्छिक  क्रिया आपल्या मोठ्या मेंदूकडून व अनैच्छिक क्रिया आपल्या छोट्या मेंदूकडून पार पाडल्या जातात. पण हे दोन्ही मेंदू हे एकाच मेंदूचे दोन भाग आहेत.

(२) याच विज्ञानाचा आधार घेत मी अधिक खोलात जाऊन विचार केला तेंव्हा कळले की आपल्या जागृत मनावर आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो व त्या प्रत्यक्ष  प्रभावाखालीच आपले जागृत मन जाणीवपूर्वक कृती करते व त्या कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेते. पण मग आपल्या अजागृत मनावर कोणाचा प्रभाव असतो? ते अजागृत मन आपोआप आपल्या अजाणतेपणे कसे कार्य करते? या अप्रत्यक्ष प्रभावाची आपल्या जागृत मनाला बिलकुल जाणीव नसते काय? मग आपले जागृत मन झोपेत स्वप्ने बघते, त्या स्वप्नांचा अप्रत्यक्षपणे अनुभव घेते त्याचे काय करायचे? आपल्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेला जाणीव म्हणूच नये काय?

(३) निसर्ग (निसर्ग म्हणजे पदार्थांनी बनलेली सृष्टी) ही प्रत्यक्ष अनुभव घेता येणारी गोष्ट आहे. पण मग निसर्गात असलेल्या अप्रत्यक्ष प्रभावाचे काय करायचे? त्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावाचाही अनुभव येतोच की आपल्या जागृत मनाला! या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर आपल्या जागृत मनाचे नियंत्रण आहे का? मग आपला लिखित कायदा कशाचे नियंत्रण करतोय? कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय? आपल्या समाजाच्या लिखित कायद्याने फक्त आपल्या जागृत मनाच्या प्रत्यक्ष कृतीवर ध्यान देता येते व तिचे नियंत्रण करता येते. निसर्गातील गूढ शक्तीवर, आपल्या अजागृत मनावर असलेल्या   तिच्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर व त्या अप्रत्यक्ष प्रभावाखाली आपल्या अजागृत मनाकडून केल्या जाणाऱ्या अप्रत्यक्ष कृतीवर (अनैच्छिक क्रियांवर) आपल्या लिखित कायद्याचे नियंत्रण प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे. आपल्या जागृत मनाचेच या गूढ शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण नाही तर मग आपल्या जागृत समाजमनाकडून निर्माण केल्या गेलेल्या व केल्या जात असणाऱ्या लिखित कायद्याचे अशा गूढ नैसर्गिक शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण प्रस्थापित होणे कसे शक्य आहे?

(४) म्हणून माझे हे म्हणणे आहे की, निसर्गाच्या विज्ञानाची व समाजाच्या कायद्याची जाणीव ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष जाणीव होय तर निसर्गातील गूढ शक्तीची व त्या शक्तीच्या गुप्त प्रभावाची जाणीव ही आपल्या जागृत मनाची अप्रत्यक्ष जाणीव होय. मानवी मनाच्या याच अप्रत्यक्ष जाणिवेतून निसर्गातील देवावर मानवी मनाची श्रद्धा निर्माण झाली असावी. जगात देवावर श्रद्धा ठेवणारे जे धर्म आहेत ते याच नैसर्गिक श्रद्धेवर आधारित आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. हे देवधर्म जागृत मानवी मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून आपोआप, सहज नैसर्गिकपणे निर्माण झाले असावेत असे मला वाटते. निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझ्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून निर्माण झालेली मूलभूत नैसर्गिक श्रद्धा असल्याने मी तिच्यावर ठाम आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

सरकारनामा!

पोरांनी आईबापाला विसरून कसे चालेल?

अरेरे, काय पण जमाना आलाय! पोरं आईबाप विसरू लागलीत, त्यांच्या काही चुकांवर बोट ठेऊन त्यांनी दिलेले योगदान विसरू लागली, त्यांचा चांगला इतिहास पुसू लागली. काळा चष्मा घालून आईबापाच्या चांगल्या गोष्टींवर काळे फासू लागली. भारतीय काँग्रेसच्या मुख्य माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीचे योगदान नाही, राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाही, राष्ट्राच्या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीत प. नेहरूंचे योगदान नाही, सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचेच पण त्यांचे काही योगदान नाही, १९६५ भारत पाकिस्तान युद्धात लालबहादूर शास्त्रींचे योगदान नाही, समाजवादी व भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था विकसित करून हरित क्रांती, १९७१ भारत पाकिस्तान युद्ध, संस्थानिकांचे तनखे बंद व बँकांचे राष्ट्रीयीकरण, अॉपरेशन ब्लू स्टार मध्ये देशासाठी बलिदान केलेल्या लोहस्त्री इंदिरा गांधीचे योगदान नाही, राजीव गांधींचे संगणक क्रांतीत योगदान नाही, त्यांनी भारत श्रीलंका शांती करारात देशासाठी केलेले बलिदान व्यर्थच, नरसिंह राव यांचे उदारीकरण धोरणात योगदान नाही, मोठी जागतिक मंदी आली होती तेंव्हा भारताला आर्थिक संकटातून वाचविण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान नाही. म्हणजे काँग्रेसने देशासाठी काहीच का चांगले केले नाही! सगळे वाटोळे केले! अहो, इतिहासाची पाने फाडून किंवा डिजिटल क्रांती करताना डिलिट मारून का कधी इतिहास संपवता येतो? खोटे रेटून सांगितले म्हणजे का सत्य लपवता येते? आहात कुठे तुम्ही? जुना इतिहास पुसून टाकताय का? ज्यांनी मूलभूत पाया घालून मोठे केले त्या आईबापालाच तुम्ही विसरताय का? धन्य हो तुमची! कोपरापासून नमस्कार तुम्हाला! मतभेद टोकाचे आहेत बरं का आपल्यात! तरीही आम्ही तुमच्यावर केवळ करायची म्हणून टीका करणार नाही. चांगल्या कामाला चांगलेच म्हणणारी आम्ही माणसे! अहो, तुम्ही कितीही नावे ठेवली तरी आम्हा गरिबांना इंदिरा गांधी यांचा त्या काळात खूप आधार वाटायचा. मी तर इंदिरा गांधी यांच्या शिका व कमवा (Earn while you learn) या योजने अंतर्गत कॕनरा बँकेत अर्धवेळ नोकरी करीत कॉलेज गाठायचो व त्यांच्याच राष्ट्रीय कर्ज शिष्यवृत्ती (NLS - National Loan Scholarship) च्या जोरावर बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेय. तो माझा इतिहास पुसता येईल का तुम्हाला? आता काय श्रीमंतांचे दिवस आलेत. खाली मान घालून आहे त्या पगारात काम करायचे नाहीतर उद्यापासून काम बंद असे अमेरिकन स्टाईलचे हायर आणि फायरचे दिवस आलेत हो! करार पद्धतीने नोकऱ्या (कॉन्ट्रॕक्ट लेबर) मिळतात हल्ली! परमनंट नोकरी आता इतिहासजमा! किती कामगार चळवळी पाहिल्या आम्ही, पण आता कुठे ती चळवळच दिसत नाही. चळवळ कशाला साधी वळवळ सुद्धा दिसत नाही. सगळं चिडीचूप! असं का कधी जास्त दिवस चालते! असो, आपण काही चांगली कामेही करीत आहात. काश्मीरचा तो स्वतंत्र दर्जा तुम्ही रद्द केला तेंव्हा किती बरे वाटले आम्हाला! गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही फटक्यात करून दाखवले. श्रीराम मंदिराचा गहन प्रश्नही सयंमाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निकालात निघाला. आताही अटल टनेलचे उदघाटन तुम्ही  केले, बरे वाटले! पण एक सांगा या टनेलसाठी काँग्रेसने काहीच केले नव्हते का? बरं त्या नोटबंदीने व जी.एस.टी. ने काय साधलेय हे अजूनही आमच्या डोक्यात नीट शिरलेले नाही. तुमचा लॉकडाऊन मात्र खूपच कडक होता. आता तो सैल करा ना लोकल ट्रेन चालू करून. आम्ही मास्क लावून कामाला जाऊ. गेले सहा महिने जाम टरकून आम्ही अर्धपोटी आमच्या घरी सुरक्षित राहिलोय. पण आता थोडी रिस्क ही घ्यायला लागणारच ना! नाहीतर काय होईल की आम्ही घरात कोरोना पासून सुरक्षित राहू पण उपासमारीने तडफडून मरू. आमचे माय बाप सरकार आहात तुम्ही! काही चुकलं का आमचं असे स्पष्ट बोलून? अहो, भीती वाटते आम्हाला कारण शेवटी तुम्ही सरकार आहात!

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

कॉपी पेस्ट प्रॕक्टिस?

माझ्या बौद्धिक संपदेचा मालक मी स्वतः आहे!(मेरी बौद्धिक प्रापर्टी का मालिक मै खुद हूं!)

माझ्या लिखाणाचे कॉपी पेस्ट करताना लेखक म्हणून कोणी माझे नाव काढून तिथे स्वतःचे  नाव टाकले तर खरंच माझी तळपायाची आग मस्तकात जाते. मी माझ्या लेखांवर माझे नाव व तिथे कॉपी राईट हक्काची © निशाणी लावतो. पण ती © निशाणी न बघता काहीजण खुशाल माझ्या लिखाणावरून माझे नाव काढून स्वतःचे नाव घालतात. हे जर माझ्या नजरेस आले तर मी अशा लोकांना उघडे करतो. खरंच, कॉपी करण्याचा यांना इतका मोह व्हावा!🙏🙏😢

एका व्हॉटसॲप ग्रूपवर हा कॉपी पेस्ट खेळ आज एकाने केला व मग मला त्याला चांगलेच झापावे लागले. तोच अनुभव इथे फेसबुकवर शेअर करतोय. तिथे हिंदी व इंग्रजीत संवाद झाला म्हणून थोडी हिंदी व इंग्रजी इथेही.

Admin please see this and warn against copy paste practice here at least in my original posts.🙏👏

मै बौद्धिक मेहनत करू और मेरी मेहनत कोई चुराकर कोई मेरे सामने ही मुझ पर राज करने की कोशिश करे तो मै कैसा चूप रहू? मै ऐसी गांधीगिरी नही करता. मेरी मेहनत, मेरा फल, बस्स! उसका क्रेडिट दुसरा कोई ले यह मै बरदाश्त नही कर सकता.

माझ्या वरील संताप कमेंटवर त्या ग्रूप मधील दुसऱ्या सभासदाने इंग्रजीत दिलेली ही सहमत प्रतिक्रिया.

Sir You are GREAT! I FULLY Agree with the contents and your attachments with literature actually in this regard . I request to put a note in the group that such copyright post should not be forwarded without the sender permission . Because it will not be justified without the permission of the sender it should not be forwarded so Admin kindly ensure it . 🙏🏻

हा अनुभव मी मुद्दामहून इथे फेसबुकवर शेअर करीत आहे जेणे करून अशा गोष्टी माझ्या बाबतीत तरी कोणी करणार नाही. मी माझ्या ज्ञानाला पैशापेक्षा जास्त किंमत देतो हे स्पष्ट करून माझी ही अनुभव कथा इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०